Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Posts Tagged ‘फलासिफ :-ए-जिंदगी’

माणसानं आयुष्यभर जे काम केलं असतं,ते काम करत करत सरत जाणं, हे त्याचं जगण्याशी प्रामाणिक असणं म्हणावं का. .. गाणारा गात गात मूक व्हावा, वादक-वाद्याशी खेळत खेळतच थांबून जावा, बोलणारा बोलत बोलत गप्प व्हावा तर लिहिणारा लिहिता लिहिताच पूर्ण विरामाला यावा .. असंच असतं का .. असंच असायला पाहिजे का..
हे असं असणं, असं होणं म्हणजे एक प्रकाराने भान असणं. आपण संपणार आहोत, जाणार आहोत याचं भान असल्यावर मग शिकायत कशाची ? मर्यादित षटकांच्या खेळीत आणखी षटकाची इच्छा नाही,तो विचारच नसतो.;तो प्रश्नच नसतो.विचार असतो, तो एकच- शेवटचं षटक आहे हे खेळायचं ,जोरदार खेळून काढायचं.
शायरला असं मृत्यूचं भान असतं. तो तयार असतो. आपला प्राण आता आपल्या शरीराची संगत सोडणार आहे,सोडतो आहे याची जाणिव त्याला असतेच; इतकंच काय,आयुष्यभर  जे साधलं नसतं, ते त्याला, आत्ता या वेळी साधलेलं असतं : एकाच वेळेस शरीर आणि प्राण या दोहोंकडे अलिप्तपणे पहाणं. हे असं पहाता येतं,ते केव्हा- यावेळी. का ? तर यावेळी आयुष्यभराच्या सर्व संवेदना तीव्रतर अवस्थेत पोंचल्या असाव्यात.  म्हणूनच   ‘ दाग ‘ हा शायर या वेळेला-या शेवटच्या वेळेला आपल्याला सांगतो-

होशो-हवास-ओ’ताबो-तुवां, ‘दाग ‘ जा चुके ( शुध्दी,शरीरावरचा ताबा, भान )
अब हम भी जाने वाले  है, सामान तो गया
..

एक शायर असा, की त्याने आपले शरीर-प्राण यांना  संगिताच्या-मैफिलीच्या-वाद्यवृंदांच्या जाणिवेतूनच पाहिलेलं आहे. शरीर मनाला केवळ संगीताचा हिस्सा समजणं..केवढं वेगळ्या प्रकारचं,सुरेख असं ते जगणं असेल.. आपलं शरीर हे वाद्य आहे, ज्यातून संगीत स्त्रवणारं असतं, गाणं उमटत असतं. या स्वरांच्या,या संगीताच्या -या रागदारीच्या लोभात आयुष्याचा प्रवास त्याने केलेला असतो. गाता गाता वाट सरावी, तशा धुंदीत आयुष्याचा हा प्रवास चालतो, होतो अन्  आता वेळ आलेली असते,मैफिलीच्या शेवटाची. विलंबीत लयीत सुरू झालेला आयुष्याचा हा राग आता द्रुत लयीत आलेला तर असतोच, पण अगदी विरामाच्या समीप आल्यावर तर त्या लयीने एक गती पकडलेली असते,धुंदी चढलेली असते. हातवारे, शरीर, आवाज, चेहरा सगळं सगळं त्या क्षणापाशी गोळा होवू लागलेलं असतं… तो  क्षण -शेवटचा.जीवनाची मैफिल थांबविण्याचा.

हिचकीयों पर हो रहा है ,जिंदगी का राग खत्म
झटके दे कर तार तोडे जा रहे है, साज के..

प्राण जाताना येणार्‍या उचक्या, हातापायांच्या त्या हालचालीला कोणत्या वळणाने हा  शायर घेवून जातो आहे..
..पण कलावंत माणूस,कवी माणूस मोठा भाबडा असतो. त्याला परिसराचं भान असलं तरी, त्याचे त्या निमित्ताने उद्भवणारे प्रश्न – त्याच्या शंका एवढ्या निरागस असतात, एवढ्या भाबड्या असतात, की गंमत वाटावी. ..वास्तव समजून घ्यायचे त्याचे प्रयत्न ,त्याचे निकष एकदम साधे !
…की असंही असतं का- वय झालं,म्हातारपण आलं,की सगळी हुशारी, सगळं कर्तृत्त्व ,सगळं सगळं पाटीवरून पुसून जावं अन् मनाची पाटी पुन्हा कोरी व्हावी- लहानपण यावं, असं तर नाही ना.. हा शायर असाच झाला आहे. विझता विझता लहान लहान होतो आहे.त्याला कळेना झालंय की आपल्या बिछाण्याभोवताली ही सगली जण का बरं गोळा झाली असावीत…

ये क्यूं उड चला है रंग यारब मेरे चेहरे का
ये क्यूं पिछले पहर से सब के सब हुशियार बैठे है..

टीप: माझ्या दुसर्‍य़ा ब्लॉगला भेट द्या इथे – http://hasanyachaaakar.wordpress.com/

Read Full Post »

ऎसे तो ये जहान कहीं डूब जाएगा
हर शख्स कह रहा है, के बस नाखुदा हूं मैं
( शख्स : व्यक्ती,माणूस    नाखुदा : नावाडी, कर्णधार )

सगळ्याच पक्षांचं एकमेव उद्दीष्ट असतं – जनतेचं कल्याण. सगळ्याच नेत्यांच्या तोंडी असतं, देशाचं भलं- जनतेचं भलं. मग असं ज्रर पक्कं असेल, तर भोळ्या जनतेला असं वाटणं स्वाभावीक आहे, की बुवा मग सगळेच एक का होत नाहीत ? बरं,  नाही झाले एक तरी हरकत नाही; पण ही भांडणं का ? आरोप-प्रत्यारोप, चिखलफेक –  हंगामा ! ( हा खमंग शब्द आता गुलाम अलीच्या तोंडातून निघून राज्य सभेत जावून बसला आहे. तिखट होवून बसला आहे !)  का बरं; अन् ती ही आमचा हवाला देवून-जनतेचा ? आमच्या कल्याणाचं, कळवळ्याचं प्रयोजन पुढे करून ? बरं, प्रत्येकाचा आवेश,ती बोलण्याची तर्‍हा,ते वक्तृत्त्व अन् आमच्या अत्यंत खाजगी असलेल्या श्रध्देचा वारंवार उल्लेख करून तणाव उत्पन्न करायची त्यांची ती हातोटी पाहून थक्क व्हायला होतं.आपली अवस्था विचीत्र होवून जाते-

कदम कदम पे जहां बेशुमार राहबर है ( बेशुमार : असंख्य     राहबर : मार्गदर्शक  )
मुसाफिरों को वहां कैसे ऎतबार आए.. ( ए’अतिबार : विश्वास,भरवसा  )

मार्गदर्शक- पथप्रदर्शक. आपण लहानपणापासून त्याच्याबद्द्ल वाचलं आहे. गुरू असतो तो – मार्ग दाखविणारा. यशाकडे घेवून जाणारा. आपणही त्याच्यावर श्रध्दा ठेवून त्याच्या मागे जाणारे.. अशा प्रकारचे काहीसे चित्र शाळकरी वयात मनात जपलेलं असतं. मग जीवनात पुढे एक एक अनुभव येत जातात, मतदानाचा हक्क प्राप्त होतो अन् ध्यानात येतं,की कुणी तरी तेज:पुंज (!) व्यक्ती आपल्याला मार्ग दाखविते आहे.. गुळगुळीत दाढी केल्यासारखा तो छान वळणदार रस्ता,मग तो डोंगर,तो सूर्योदय,ते मंदिर,तो ध्वज.. आ रा रा रा , असं काही नसतं, तसं काही समजणं हे बावळटपणाचं आहे हे आपल्याला ताबडतोब लक्षात आलेलं असतं. कारण-आपल्याला आलेले खडतर अनुभव. कारण आपल्या भोवती पावला पावला वर वाढलेल्या – असुरक्षिततेची हवा तयार करून सुरक्षेची खात्री देणार्‍या मार्गदर्शकांची संख्या. त्यांचा उपदेश.. नाही तर.. धमकी.
अशावेळेस भानावर यायला पाहिजे ते आपणच. आपणच निर्णय घ्यायला पाहिजे.
सय्याद म्हणजे पारधी,शिकारी.तो माणूसच. जमिनीवर चालणारा. आणि तो शिकार करतो आभाळात वावरणार्‍या पक्ष्यांची. कसं शक्य आहे ते. किती विचित्र. जमिनीवरच्या माणसाला-ज्याला पंख नसतात,त्याला आभाळातल्या, पंख सर्सावून उडणार्‍या पक्ष्यांना पकडता कसं येणार… पण कठोर वास्तव असतं- कटू, पण सत्य अशी स्थिती असते.. आणि पक्षी शिकार होवून जातो, त्या सय्यादची.  सय्याद  सगळीकडेच असतात- सगळ्याच क्षेत्रात असतात, जाळी लावून बसलेले, भुलविणारे.. दोष त्यांचा नाही, आपला आहे- पक्ष्यांचा. आपली प्रकृती आकाशात भरारी घेण्याची. तिथे सय्याद पोंचूच शकत नाही. .. मात्र आपली भरारीच जर कमी झाली, आपणच रेंगाळू लागलो, वेंधळ्यासारखे प्रभावीत होवू लागलो, सारासार विचारशक्तीचे पंख जवळ घेवू लागलो, तर…
‘ असगर ‘ हा शायर म्हणतो-

यहां कोताही-ए-जौके-अमल है खुद गिरफ्तारी (कोताही -ए- जौके -अमल : तीव्र इच्छा शक्तीची मर्यादा )
जहां बाजू सिमटते है, वही सय्याद होता है.
‘असगर्’ गौंडवी.

आपली इच्छा शक्ती प्रखर असायला हवी- तीच क्षीण झाली, की मग भरारीला मर्यादा येणार, मलूलपणा येणार. आणि असा रेंगाळणारा गोंधळणारा पक्षी- सय्याद तर त्याच्यासाठीच ट्पून बसलेला असतो.
… म्हणून परिस्थीतीचे,  वास्तवाचे  भान ठेवणारा तरून जातो. अशा माणसाची निर्णय शक्ती शाबूत असते. आपलं स्वत:चं भलं बुरं याची त्याला  स्पष्ट जाण असल्याने तो गोंधळून जात नाही. आणि त्याला मार्गदर्शकांच्या गर्दीशी काही घेणं-देणं नसतं. .. ना त्यांच्यामुळे त्याची उत्तेजना वाढते.

अपनी मंजील के जो खुद राहनुमा होते हैं
राह से उनको भटकते कभी देखा न सुना

आपल्या कामावर ज्याची निष्ठा आहे, तो स्वत:च स्वत:चा मार्गदर्शक असतो. तो कधीही भरकटत  नाही. त्याला तारतम्य येतं.अशा माणसाची राहनुमाई कोण करतं ? कशाच्या आधारे तो निर्णय घेत असतो ? अशा माणसाचं लक्ष परिणामाकडे असतं.त्याला परिणाम लक्षात येतात,आणि तो सावध होतो-

भली राहनुमाई है, भली नाखुदाईयां है
वही रुख करार पाया, जो बता दिया हवा ने
( -‘ हफिज ‘ मेरठी )

Read Full Post »