Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

परभणी जिल्ह्यातले कै.गोपाळराव वांगीकर हे त्यांच्या जमान्यातले एक उत्तम कवी,विडंबनकार होते. तो काळ स्वातंत्र्याच्या पूर्वीचा. अर्थात मराठवाड्याचे हे जिल्हे हैद्राबादशी-निजामी अंमलचे होते. त्या पिढीतल्या माणसांचे शिक्षण उर्दू माध्यमातून होणे, पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी हैद्राबादच्या उस्मानिया विद्यापीठाशी संवंधीत असणे हे स्वाभवीकच असायचं.
तर हे गोपाळराव वांगीकर, यांनी उर्दू भाषेचा वापर करून काही मराठी कविता एवढ्या सुरेख केल्या आहेत, की आपण म्हणावं- लाजवाब !
सप्टेंबर 1993 मध्ये औरंगाबाद च्या दै. तरूण भारत मध्ये गोपाळराव वांगीकरांबद्दल माहिती आणि त्यांच्या काही रचना प्रसिध्द झाल्या होत्या. तो लेख मला एवढा आवडला होता, की एका रचनेचा तेवढा कागद कापून मी माझ्या जवळ अद्याप बाळगून आहे. त्यातली एक रचना – रचनेची गंमतम्हणून  त्या गमतीदार रचनेचा समावेश मी या ठिकाणी करीत आहे.
जर समर्थ रामदास स्वामी निजामी अमदानीत असते, तर त्यांच्या, मनाच्या श्लोकांचं स्वरूप कसं उर्दू मिश्रित झालं असतं, ही कल्पना करून वांगीकरांनी ते श्लोक अशा तर्‍हेने मांडले आहेत –

प्रभाते मनी राम चिंतीत जावा / पुढे वैखरी राम आधी वदावा
                     अलसुबह राम खयालात घ्यावा / आगे राम कबलज जबानी पढावा
( कब्ल : पहिला, आधी ) 

सदाचार हा थोर सांडू नये तो / जनीं तोचि तो मानवी धन्य होतो

                    सदाचार तो यार तरकू   नये तो / मुबारक बशर तोच दुनियेत होतो
( तर्क : सोडून देणे       बशर : माणूस )  

मना सज्जना भक्तिपंथेचि जावें / तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे
                    शरीफे दिला भक्ती राहेची जावे / पुढे श्रीहरी खुदबखुद राजि पावे

जनीं निंद्य ते सर्व सोडूनि द्यावे / जनीं वंद्य ते सर्व भावे करावें
जहांला पसंद नाच तरकून द्यावे /जहांला पसंद तहेदिलाने करावे

देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी / मना सज्जना हेचि क्रीया धरावी
                    झाल्यावरी फौत शोहरत उरावी /शरीफे दिला रीत हेचि धरावी
( फौत : मृत्यू      शोहरत : प्रसिध्दी ,कीर्ती  ) 

मना चंदनाचे परी तां झिजावे / परी अंतरी सज्जना निववावें
                    दिला संदलाचे परी त्वा घिसावे /शरीफे दिला त्वा बहेलवावे

समर्थाचिया सेवका वक्र पाहे / असा सर्व भूमंडळी  कोण आहे
                    तिरछा गुलामे-समर्थास पाहे / असा कोण कमबख्त दुनियेत आहे

जयाची लिळा वर्णिती लोक तीन्ही / नुपेक्षी कदा राम दासाभिमानी
                    जयाचा करिश्मा तिन्हीलोक गाती / न भुलो कभी रामदास उसके जो साथी

आणि लक्षात आलं, की ईश्वराबद्दल ठाम श्रध्दा असल्यावर आणि माणसाला तीव्र विनोदबुध्दी असल्यावर माणूस भक्तीमार्गात किती छान तर्‍हेने गमतीचे कारंजे उडवू शकतो !
थट्टा करणार्‍या माणसाचंही तसंच असतं. त्याच्या मनात एखाद्याबद्दल आस्था असली, प्रेम असलं तर अशा माणसाची थट्टा  ही निर्मळ होते. ती ऎकावी वाटते. त्या माणसाबद्दल, त्या विषयाबद्द्ल जिव्हाळा तयार होवून जातो. आजही मराठवाड्यात निजामी अंमलाचा परिणाम बोलीभाषेत जाणवतो, तो म्हणजे, बोलण्यात येणारा हिंदी-उर्दू भाषेचा असर. माणूस सहजच बोलून जातो – ‘फारच परेशानी झाली बुवा !’ किंवा ‘त्याची हैसियतच काय ?’ वगैरे. कार्यालयीन व्यवहारात तर पेशकार, इजलास, दाखल करणे, दाखला असे कितीतरी शब्द रूढ आहेत. आणि मग खरंच वाटून जातं,की रामदास स्वामी त्या जमान्यात असते, तर त्यांच्या भाषेत अशी गंमत झाली तर ? किंवा सर्वसाधारण जनतेला समजावं म्हणून त्यांनी अशा भाषेचा वापर करून काव्य रचले तर… ते स्वाभावीकच होईल की- अर्थात ही सगळी गंमतच. गमतीनेच पहायचं असतं याकडे.

याच निमित्ताने या विषयाशी संबंधीत वसंत सरवटे यांचे एक व्यंगचित्र आठवले. साप्ताहिक ‘माणूस’ मध्ये वर्ष 1968-70 या काळात सरवटे यांच्या व्यंगचित्रांचे सदर रहायचे. त्यात एकदा रामदास स्वामींबद्दल अनावश्यक वाद उपस्थित झाले होते, या घटनेची गंमत सरवटे यांनी उडवून दिली होती. ते व्यंगचित्र हे होते-( संदर्भ : रेषालेखक -वसंत सरवटे/ संपादन : दिलीप माजगावकर-मधुकर धर्मापुरीकर / राजहंस प्रकाशन,पुणे )

दु:खाचा परिसर…

आयुष्यात कधी असे अनुभव येतात,की आपण चक्रावून जातो. गोंधळतो,निराश होवून जातो. आभाळ दाटून यावं तसं निराशा दाटून येते.जिकडे तिकडे कसं मळभ साचून राहिल्यासारखं वाटतं. मग आपलंच हे शरीर आपलाच हा चेहरा आपल्या नेहमीच्या हालचाली- त्यावरही कशी मरगळ येऊन जाते. इतकंच काय, परिसरातल्या -निसर्गातल्या नेहमीच्या गोष्टी- आभाळ,चंद्र,चांदणे,रात्र हे सगळं सगळंच अपयशी – अपेशी वाटत रहातं,अशूभ वाटत रहातं.. केवळ आपणच नाही तर सगळी सगळीच जण एका दु:खाच्या निराशेच्या लाटेत सापडली आहेत असं होतं…

चांद इक बेवा की चूडी की तरहा टूटा हुवा
हर सितारा, बेसहारा सोच में डूबा हुवा
गम के बादल इक जनाजे की तरहा ठहरे हुए,
हिचकियों के साज  पर कहेता  है दिल रोता हुवा..

दु:खाचे आभाळ दाटून आल्यावर चंद्राची कोर विधवेच्या फुटलेल्या कांकणासारखी वाटावी-दिसावी, नेहमी चमचमणारे सितारे आता कसे वेगवेगळे-एकटे विचारात बुडून गेल्यासारखे वाटावेत एखादी प्रेतयात्रा थांबावी तसे ते ढग थांबलेले वाटावेत…दु:खाचा केवढा परिणाम होवून गेला आहे हा.. .

हसरत जयपुरी यांनी शब्दबध्द केलेलं हे दु:ख अभिनेता दिलीप कुमार,गायक तलत महमूद आणि संगितकार शंकर जयकिशन यांनी तेवढ्याच उत्कटतेनं मांडलं आहे…जणू एखादा  जनाजा चालला आहे…ही सगळी जण शोकमग्न होवून त्यात शामील झालेली आहेत…

दु:ख हे शरण…

आमचे दादा-आईचे वडिल परभणीला सरकारी दवाखान्यात कम्पाउंडर होते. आईची बाळंतपणं तिकडेच झाली दादांकडे. मी आईसोबत असायचो. मी असेन पाच सहा वर्षांचा. दादांचं भरलेलं घर,वाढता खर्च आणि तुटपुंजी मिळकत ही तफावत मला लक्षात यायची, पण माझं ते शाळकरी वय असल्याने तेवढी जाणवायची नाही. मनात सतत असायचं ते घरात आंबटवरणाचं जेवण. चहाचं काम दादाच करायचे. संगीत नाटक, संगीताचा छंद असलेले आमचे दादा.
नवरात्रात तर देवीच्या आरत्यांचा उरूस या घरी भरलेला असायचा. आमच्या घरचं दैवत होतं बालाजीचं-गिरी बालाजीचं.आमच्या घरी हे वातावरण नसायचं; त्यामुळे या देवीच्या सामूहीक आरत्या, हे वातावरण मला फार आवडायचं. लाकडी वेलबुट्टीदार मोठ्या आकाराचं ते जाळीदार देवघर. त्यात रेणूका माता. आरत्यांच्या तयारीत संध्याकाळपासूनच आजी,मामी वगैरे असायच्या. महातपुरीकरांच्या त्या वाड्यातली-गल्लीतली स्त्री-पुरूष मंडळी घरात जामायची. मामा,आजोबा संगितातले जाणकार असल्याने आरत्यांतून करण्यात येणार्यास त्या अवाहनांना स्वरांचं-ठेक्यांचं छान रूप लाभलेलं असायचं. पाटावर उभे राहून आरतीचं तबक घेवून दादा रेणूका मातेच्या आरत्यांत सहभागी व्हायचे आणि त्या समूह स्वरांत मी- गर्दीत वडिलांचं बोट धरून चालावं तसं दादांच्या स्वरांवर-त्यांच्या आवाजावरच लक्ष ठेवून असायचो.
-आणि दादांची मिळकत आणि वाढत्या खर्चाची ती तफावत मात्र मला त्या वेळी तीव्रतेने जाणवायची. अगदी तीव्रतेने. दादांनी आरतीतल्या ओळींचा स्वर धरलेला असायचा-
अजूनी अंबे तुजला माझी करूणा का येईना हो….
गर्दीत वडिलांचं बोट धरलेलं असताना कधी भीतीने अधिक गच्च व्हायचं,मुठीतला घाम जाणवायचा. …त्या ओळींतून दादांच्या स्वरातला ओलावा मला जाणवत रहायचा.समूह स्वरांतून एकटा-वेगळा असा त्यांचा आवाज,त्यांचं एकट्याचं ते देवीला केलेलं आवाहन. त्या दाटीतून गर्दीतून दादांच्या जवळ मी सरकायचो. मला वाटायचं,त्या आरतीतून दादा सांगत असावेत देवीला, आपल्या कर्जाबद्दल, दुकानांच्या वाढत जाणार्‍या उधार्‍यांबद्दल,पैशाच्या गरजेबद्दल,पैशा अभावी वाटत रहाणार्‍या अपराधी भावनेबद्दल…एकदा परभणीला ‘देव दीनाघरी धावला’ हे नाटक आलं होतं.(फिरता रंगमंच हे त्या दिवसांत अप्रूप होतं.) घरासमोरून जाहिरातीचा टांगा जात होता आणि महिन्याअखेरीच्या त्या आर्थिक विवंचनेत असलेले दादा…त्यांची चुटपुट आजही मनात भरून आहे…‘काय करावं रे.. एवढं चांगलं नाटक..’
आज दादा नाहीत. ते केव्हाच निघून गेले. आता सगळ्यांचीच आर्थिक परिस्थिती चांगली झालेली आहे. मातीची घरं जाऊन फ्लॅटमध्ये रहात आहेत सगळे. चाळीस पावरचा पिवळा बल्ब जाऊन भक्क लाईट आहेत; एवढे भक्क की घरात अंधाराचा कण-क्षण कुठे सापडणार नाही,शोधूनही.
आजही मामांकडे रूढीनुसार नवरात्रात आरत्या होतात. आजही मी एक दिवस का होईना जातो. मामांची नातवंडं आरत्यांची पुस्तकं हातात धरून उत्साहाने आरत्यांत सहभागी होत असतात-
विपुल दयाघन गरजे तव ह्रदयांबरी श्री रेणूके हो !
पण- माझ्या मनात आज- आजचे हे दिवस आणि ईश्वराचं स्मरण यांची सरमिसळ झालेली आहे. मनात करूणा आहे, पण या करूणॆत चंचलतेचा समावेश झाला आहे. विवंचना आहेत, पण या चंचलतेपायी त्या ईश्वरापुढे त्या मांडणं गैरजरूरी वाटत आहे. लहानपणात नाही का,आईनं काही विचारलं तर मी चिडून म्हणायचो तिला- अं! तुला काय माहित आहे गं- उगं गप्प बस !
आज दिवस उजेडाचे आले आहेत, महत्त्वाचं म्हणजे वडिलधार्‍यांचं अर्धं अधिक आयुष्य हाता तोंडाची मिळवणी करण्यातच गुजरलं, तसं आज नाही.
…म्हणून तर आज जाणवतो आहे तो शे’र… निघून गेलेले ते शायर जावेद नासेर यांचा-

   अंधेरा हो तो तुझको पुकारूं यारब !
   उजालों में मेरी आवाज बिखर जाती है

अंधारात,संकटात ईश्वराची तीव्रतेने आठवण व्हावी,दु:खामुळे आवाजात-आवाहनात आर्तता यावी आणि तेच आवाहन तीच, आठवण प्रकाशात केलेली असताना, भल्या दिवसांत केलेली असताना लक्ष विचलीत झालेलं… खोडकर पोराचा आभ्यास असावा तसं ते चित्त…
म्हणून तर ईश्वराचं अस्तित्त्व जाणवत रहातं –दु:खात,अंधारात.
     हम्द म्हणजे स्तोत्र,स्तुती. आरत्यांमध्ये ईश्वराची,देवीची स्तुती असते. तसंच हम्दमध्ये अल्लाहची स्तुतीच असते. अशीच एक हम्द संगीतकार उषा खन्नाने स्वरबध्द केलेली आणि गायलेली आहे; मै हूं अलादिन नावाच्या चित्रपटात….

छायाप्रकाश

रात्रीची रोषणाई.विविध दिवे,प्रखर दिवे,रंगीत दिवे-अंधाराची फजिती करणारे,अंधाराला पळवून लावणारी ही रोषणाई… आणि या रोषणाईच्या मदतीने सगळा अंधार उज़ळून टाकून दिल्याची माणसाची मस्ती,त्याचा तो अभिमान – वृथा अभिमान. अंधारात कितीही दिवे लावले,केवढाही प्रकाश केला तरी पहाटेच्या उजेडाची बरोबरी हा प्रकाश कसा करणार ?
गृहसौख्य,निर्मळ प्रेम,कर्तव्य भावना या सगळ्यांकडे पाठ फिरवून माणूस संपत्तीचा आधार घेतो आणि जीवनात सगळा झगमगाट करून टाकतो.अतिरिक्त श्रीमंतीमुळॆ माणूस अंधाराला हाकलून लावायच्या प्रयत्नात असतो का नेहमी… आणि खोट्या रूबाबात वावरत असतो का…
पण… उदो उदो करणारी,सभोवताली जमणारी माणसं,ती संपत्ती ओसरली की अंधारात गडप झाल्यासारखी निघून जातात. म्हणून साधेपणा, निर्मळपणा याचं मोल करताच येत नाही.

चिरागां लेके दिल बहला रहे हो दुनिया वालों
अंधेरा लाख रोशन हो,उजाला फिर उजाला है.

खरं म्हणजे अंधाराला अस्तित्त्वच नसतं. प्रकाशाचा अभाव म्हणजे,अंधार.(प्रकाशाची तिरीप येते,तशी अंधाराची तिरीप येत नसते) त्याच प्रमाणे उर्जेचा अभाव म्हणजे थंडी. थंडीला वेगळं अस्तित्त्व नाहीच.

…असं जरी असलं तरी,जुल्फोंका अंधेरा- त्याला मात्र अस्तित्त्व आहे !मनात घर करून रहाणारा घनदाट केश संभार. प्रकाशीत चेहर्‍याच्या आजूबाजूचा हा सावळा अंधार..ही सावली;प्रखर उष्णतेच्या प्रकाशात हाताच्या खोप्याची जशी सावली; तशी-त्यापेक्षा अधिक मोलाची. य अंधाराचे वॆड ज्याला लागले,तो प्रकाशासाठी राजी होणारच नाही की !राजेन्द्र कृष्ण यांचा, एक मुजरा आहे; ‘जहान आरा’ सिनेमातला. लता आशाने गायलेल्या या मुजर्‍यातला  हा शे’र दोघींनी एवढा घोळवून घोळवून गायला आहे, की मनाला त्या भावनेची सुरेख कल्हई होवून जाते…अंधाराचे आकर्षण वाटत रहाते…

छाए रहे नजर में तेरी जुल्फ के अंधेरे
कई आफताब चमके,कई चांद जगमगाए


Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

…रहेगा गम कहां तक

माणसाचं जीवन हे क्षणभंगूर असतं. आयुष्य त्याच्या हाती नसल्याने तो एका अर्थाने पाहिलं तर क्षुल्लकच की.पण माणूस स्वत:च्या सुखदु:खात गुंतून जातो, अन हैरान होतो.
रात्री आपल्याला झोप येत नसते,अवेळी जाग येते,अस्वस्थ होतं याची अनेक कारणं असतात. या अनेक कारणांपैकी एक असतं,मृत्यूच्या भयाचं कारण. झोपणं म्हणजे,संपून जाणं असं वाटतं की काय कोण जाणे, माणूस झोपायला तयार होत  नसतो, अन म्हणतो,की झोप का बरं येत नाही ?
अस्वस्थता असली,की झोप येत नसते-अस्वस्थता का येते-परिणामाची निश्चित माहिती नसते,नेमकं काय होणार आहे, कसं-कधी होणार आहे याचं उत्तर आपल्या विचारांच्या कक्षेबाहेर गेलं,की अस्वस्थता येते आणि-
झोप हरवते.
पण मिर्जा गालिबचं म्हणणं असं,की माणसाचा मृत्यू हा निश्चितच आहे. जावं तर लागणारच निर्विवाद; मग असं (आणि असंच) असल्यावर आता वाद कशाला ? निश्चिंत का रहाता येत नाही,झोप का बरं येत नाही…

मौत का एक दिन मुअय्यन है
निंद क्यूं रात भर नही आती

खरं म्हणजे, आपल्याला माहित असतं- त्याची स्पष्ट जाणिव असते,की आयुष्याचा हा कालावधी ठरलेलाच असतो,मर्यादितच असतो. आपल्याला मरायचं आहेच,मरणारच आहोत आपण. तो मृत्यू नको म्हटलं तरी येणार,ये म्हटलं तरी येणार. त्याचं स्वागत केलं तरी येणार,हाकलून लावलं तरी नाही जुमानणार. मग त्याला का भ्यावं बाबा… एक ना एक दिवस आपल्या घरात आपल्या मृत्यूचा तो ‘सोहळा'(हंगामा) होणारच आहे.

उम्र फानी है तो, फिर मौत से डरना कैसा     ( फानी : नाशिवंत )
इक न इक रोज ये हंगामा हुवा रख्खा है

पण ते वेगळं.आज आत्ता या क्षणाला-मत्यू आलेला नसतो.तो असतो काही अंतरावर. आपल्याला तशी एका अर्थाने ( आणि एकाच अर्थाने )खात्री असते,की आज तरी आपण मरणार नाहीत- खात्री नाही,आपला हिशोब म्हणा. मग आज जे आपण अस्वस्थ झालो असतो,ते आयुष्यातल्या असंख्य विवंचना,काळज्या,चिंतांनी. हा सगळा कोलाहल शरीर-मनात उद्भवतो. आपण हतबल होतो, हे सगळे त्रास संपून जायची इच्छा करतो अन शेवटी मृत्यूचाच आधार घेतो-

ये सब झगडे हैं जाने-नातवां तक ( जाने-नातवां : दुबळ्या जीवाचं अस्तित्त्व)
रहेगा दम कहां तक,गम कहां तक
( हे दु:खांनो-)मला तुम्ही त्रास  देता नं,द्या. केव्हापर्यंत तुम्ही मला त्रास द्याल…या दूर्बळ जीवाच्या अंतापर्यंतच ना?
…एकदा का दम निघून गेला, तर गम राहिलच कुठे…

Please visit :http://hasanyachaaakar.wordpress.com/

जर्रेगिरी !

(जर्रा : कण )
संगीताच्या मैफलीमध्ये तबल्याची संगत असते,संगतच. पण आपण कधी पहातो, गाणं किंवा ते वाद्य संगीत रंगात आलं,की हा आपल्या हरकती दाखवायला लागतो-तबलावादक. एवढ्या त्याच्या हरकती,की मुख्य कलाकाराचा खोळंबा व्हावा. कोणत्याही कार्यक्रमात सूत्र संचालक हा दुवा असतो,कलावंत आणि श्रोत्यांमधला. पण या हौशी गृहस्थाला त्याचं भान रहात नाही अन तो स्वत:च बोलत सुटतो,सांगत सुटतो. गुरू गौरव समारंभात शिष्याचाच रूबाब दिसत असतो.नेत्यापेक्षा त्याच्या कार्यकर्त्यांची वर्दळ आणि ‘हुशारी’ दिसत रहाते. हाताखालच्या कुणालाही, त्याची चूक दाखवायला गेलं-काही सांगायला गेलं, की ‘अन्याया’च्या भाषेची त्याची प्रतिक्रिया होवून जाते.उजळणी शिकण्याच्या आज के दौरवयात मुलाने आईबाबांना वर्तणूकीचे दाखले द्यावेत,देवासमोरच भक्तांची अरेरावी पहायला मिळावी…
ज्या गोष्टी मुळात लहान आहेत,त्यांना लहान संबोधणं हा अवमनाचा मुद्दा समजला जातो आहे. त्यामुळे कर्तुत्त्वाने उंची गाठणारा आणि त्या मार्गाला नुकतीच सुरूवात केलेला, यांचं नातं बिघडत आहे. …’समभावा’च्या वृत्तीची ‘भावकी’ होवून बसली आहे- मी पणाची. एक शायर हतबल होवून तिरकस तर्‍हेने सांगतो-
आज के दौर में कमतर को न कमतर कहिए
जर्रे कहते हैं,हमें  महरे -मुनव्वर कहिए
आज कुण्या लहानाला ‘लहान’ म्हणू नका रे बाप्पा! त्यांची चूक दाखवू नका. कारण आज चमकणारे कणसुध्दा, त्यांना सूर्य म्हणा-चमक नाही ही; असं बजावीत आहेत…दरडावीत आहेत…
जर्रा-एक कण या कणावर सूर्याचा-चंद्राचा प्रकाश पडतो अन तो चमकतो. चमचमतो. पौर्णिमेच्या रात्री तलावातल्या जललहरींवर चंद्राचा प्रकाश पडतो आणि असंख्य लहरींचा सुरेख चमचमणारा खजाना पाहून मन आनंदीत होतं. पाण्याच्या त्या कणांना-त्या थेंबांना लाभलेलं हे प्रकाशीत रूप हे त्यांच वैभव आहे,त्यांचं वैशिष्ट्य आहे- आणि हीच त्यांची मर्यादाही आहे. नेमकं याचंच भान दुर्देवाने हरपून जातं. मग जेव्हा तो कण स्वत:ला सूर्यच म्हणू लागला,चंद्रच असल्याचा आग्रह धरू लागला, तर त्या जललहरींचं कलहात रूपांतर व्हायला किती वेळ लागणार ? स्वत:ची मर्यादा बाळगून सहिष्णू वृत्तीने रहाणं-मोठ्याला मोठं म्हणणं,लहानाला लहान म्हणलं तर त्यात गैर काही नाही अशी समजूत बाळगणं हे नितांत गरजेचं आहे. ‘लहान’पणाची जी चमक आहे, तेच त्याचं वैशिष्ट्य असतं, त्याचं मोल- त्या मोलाचा विसर पडणं ही अन्यायाची बाब नाही,दुर्देवाची बाब आहे.
नुमाया जर्रे जर्रे में वो ही तस्वीरे-जानां है ही जाणिव आपल्या सगळ्यांना समृध्द करते. आणि हीच क्षणभर-कणभर समृध्दी आपलं सार्थक असतं. अकबर इलाहाबादी यांचा एक शे’र आहे-
हर जर्रा चमकता है अनवर-ए-इलाही से
हर सांस ये कहती है,हम है तो खुदा है.
( ज्रर्रा जसा चमचमतो,तसाच या शे’रचा आशयसुध्दा : ईश्वरी प्रकाशाने प्रत्येक कण उजळून निघाला आहे, प्रश्नच नाही;तथापि, एकदा वाटतं, प्रत्येक श्वासागणिक जाणिव होते, ती अशी,की आम्ही आहोत, ‘म्हणूनच’ ईश्वर आहे, म्हणावं, का आम्ही आहोत, ‘म्हणजेच’ ईश्वर आहे असं म्हणावं ! म्हणजे,ही कृतद्न्यतेची भावना आहे, की ‘जर्रेगिरी’च्या उध्दटपणावर ‘अकबर’ यांनी नेहमी प्रमाणे व्यंग केलं आहे !) असो.

प्रत्येकाने आपली मर्यादा बाळगून असणं हे संस्कृतीचं लक्षण आहे. त्यातच त्याचं मोल आहे आणि महत्त्वही आहे. ते स्वाभावीकही आहे.तसं जर नसेल, तर तपश्चर्या अन लक्ष लावून पहाणं सारखंच होवून बसेल की ! भक्ताने भक्तीच्या मार्गाने मोक्षाच्या प्राप्तीची इच्छा सोडून ईश्वरी अवताराचाच आग्रह ठेवावा हे विपरीत आहे.
प्रकाशाने विलक्षण चमकून उठणारा जर्रा-कण आणि अनुभुतीने विलक्षण जीवंत झालेला लम्हा-क्षण; तीच त्याची क्षमता आणि क्षणभराचं-कणभराचं अस्तित्त्व हेच त्याचं वैशिष्ट्य. माणूससुध्दा तसाचे की. कालप्रवाहाच्या दिर्घ व्यापापुढे त्याचं हे लहानपण,त्याचं हे मर्यादित आयुष्य;यातच खरी मौज आहे.
क्या गजब है के इंसा को नही इंसा की कद्र
हर फरिश्ते को ये हसरत है के इंसा होता
-दाग
देवदूताला माणसाच्या थोडक्या अस्तित्त्वाचा मोह होतो अन माणूस मात्र मोठेपणाचा आव आणतो-हाव धरतो.
क्षण एक पुरे प्रेमाचा असं,प्रेमाच्या प्रत्ययकारी क्षणाची अनुभुती घेणार्‍या कवीचं म्हणणंच एका शायरने असं मांडलं आहे-
इश्क फना का नाम है, इश्क में जिंदगी न देख
जल्वा-ए-आफताब बन, जर्रे में रोशनी न देख
प्रेम क्षणाचं असतं,त्याच्या कडून चिरंतनाची अपेक्षा ठेवू नको. ईश्वरी कृपा दृष्टीचं रूप हो,कृपा करणारा होवू नको.

(उर्दू शायरीतले हे शे’र.तसं पाहिलं तर गजलच्या या दोन ओळी. पूर्ण गजल,दिर्घ काव्यातल्या अनुभवाचं व्यापक स्वरूप शे’रमध्ये नसतं. आरशाच्या तुकड्यांत आभाळ दिसावं, तसा तो शे’र अन त्यातून जाणवणारं जीवन… …शे’रचे हे जर्रे चमकत असतात,भुरळ पाडीत जातात…)

Please visit my blog :http://hasanyachaaakar.wordpress.com/

असणं आणि दिसणं

माणसाच्या दिर्घ म्हणविल्या जाणार्‍या आयुष्यात अनेक टप्प्यांचे प्रवास असतात-
सुख,दु:ख,हसू-आसू,कष्ट-भोग,काय काय. सुखाच्या दिवसात शरीर मन कसं फुलून आलेलं असतं.पण कधी आकाशातून काळे ढग जातात,तेव्हा पठारावर त्यांची सावली पडावी,सगळा परिसर झाकोळून जावा तसं होतं अन संकटांना तोंड देता देता आपलं शरीर मन जणू कोळपून जातं. पण आयुष्य संपलेलं नसतं,प्रवास चालूच असतो. पण संकट-ते येऊन गेलेलं वादळ असं असतं,की आपला चेहरा मोहरा बदलून जातो-

चेहरे की चमक छीन ली हालात ने वर्ना
दो चार बरस में तो बूढापा नही आता

पण हे झालं, कष्टांशी प्रत्यक्ष लढण्यामुळे जी शरीर मनाची झीज होते,त्याबद्दल. गंमत अशी,की त्याच सोसलेल्या-भोगलेल्या दु:खाचं माणूस नंतर भांडवल करतो.कष्टी चेहरा करून वावरतो. सुखाचे दिवस आले, तरी त्याच्या चेहर्‍यावरचा तो कळंकलेपणा निघून जात नाही. शिवाय तिच सवय एकदा झाली,की माणूस एकांतातसुध्दा वाकड्या चेहर्‍यानेच रहातो.(-रहातो की काय! एकदा बघायला पाहिजे स्वत:कडे ) पण अशा कष्टी चेहर्‍याने अंतिमत: नुकसान कुणाचं होणार- आपलंच ना. कुणाला काय देणं घेणं असतं?

वक्त के पास न आंखे है न अहसास  न दिल
अपने चेहरे पे कोई दर्द न तहरीर करो ( तहरीर :लिहणे, दर्शविणे)

म्हणूनच ‘सिमाब्’ अकबराबादी हा शायर म्हणतो-

खुद किस्सा-ए-गम अपना कोताह किया मैने
दुनिया ने बहोत चाहा अफसाना बना देना ( कोताह : मर्यादित,सिमित)

माझ्या दु:खाची हकीकत मी स्व्त:च सिमित करून टाकली. गप्प राहिलो. लोकांना माझ्या दु:खाच्या हकिकतीमध्ये  भलतीच रूची दिसू लागली.. त्यांना ते ‘भलतंच’ चवदार वाटू लागलं, म्हणून…

Please visit :http://hasanyachaaakar.wordpress.com/

रूबाब

लताच्या एका जुन्या गाण्यात शेवटचे कडवे गाताना आवाज उंचावून ती गाते-
जो टूटता  है रूबाब, उसको टूट जाने दे
मेरे शबाब को जी भर के गीत गाने दे…

माझ्या तारूण्याच्या उत्साहाला आवर मी घालणार नाही. मी गात रहाणार. गाण्य़ाच्या साथीसाठी घेतलेला हा जो रूबाब आहे, तो तुटला तरी बेहत्तर,मी गातच रहाणार…
हा रूबाब. हे वाद्य. साथ संगतीचं वाद्य. आणि उत्साहाच्या मनाला संगत देणारं शरीर हेसुध्दा वाद्यच असतं ना. आणि रूबाब हा शब्द आणखी एका अर्थाने लागू होतोच की आपल्याला. उत्साहाने,तारुण्याने भरलेल्या शरीराचा रूबाबच वेगळा असतो.
आणखी एका अर्थाने हा शब्द लागू होतो. शरीर हे थकणारंच असतं.संपणारच असतं. मनाला आवर नसतो,मर्यादा नसते. म्हणून तर अनावर झालेलं मन शरीराची पर्वा न करता म्हणत रहातं-जो टूटता है रूबाब,उसको टूट जाने दे… शरीर जेव्हा थकायला लागतं,तेव्हा आपण म्हातारे होत चाललो,की काय अशी शंका येत रहाते; आणि एवढंच नव्हे तर ती शंका स्वस्थ बसू देत नाही. मग मागचे ते दिवस, तारूण्यातल्या त्या आठवणी येत रहातात, मन अनावर होतं; अन वाटतं, नाही….अभी तो मैं जवान हूं..
मुहंमद ‘अल्वी’हा शायर म्हणतो,
याद करता हूं पुरानी बाते
सोचता हूं,के जवां हू मै भी

पण ‘जोश’मलिहाबादी हा शायर मात्र मोठा आचंबीत झालेला आहे. त्याला आपल्या यौवनाचे ते दिवस आठवतात.ती मस्ती,तो जोम आठवतो आणि ते सगळं आत्ताच्या तबियतीच्या तुलनेत (बीपी,शूगर,कोलेस्ट्रोल?) विचार करता,एकदमच खोटं वाटून जातं- मीच होतो का तो ? छे!
‘जोश’ अब तो शबाब की बातें
ऎसा लगता है जैसे अफवा हो

गेलेल्या दिवसांच्या दु:खात सगळ्यात जास्त क्लेषकारक बाब म्हणजे- गेलेले यौवन.
अब इत्र भी मलो तो खुशबू नही आती,
वो दिन हवा हुए,जब पसिना गुलाब था

खरंच आहे ते. यौवनाचे,उभारीचे ते दिवस…त्या दिवसांचं वेगळं असं अस्तित्त्व त्यावेळेस कुठं जाणवत असतं ? ते जाणवतं,ते प्रकर्षाने लक्षात रहातं ते तो काळ सरल्यावरच.
…आणखी एक गंमत अशी,की त्यावेळ्च्या सुखामुळे आपल्याला किती छान वाटलं होतं,अन त्या वेळच्या दु:खामुळे आपण किती विचलीत झालो होतो, हे आता आठवतं.
… आज ते सुख काही एवढं मोठं नव्हतं,ते दु:ख काही एवढं घाबरून जाण्यासारखं नव्हतं हे लक्षात आलेलं असतं.
‘जज्बी’ या शायरला त्या  सुख दु:खाचाच आचंबा वाटतो-

ऎश से क्यों खुश हुए, क्यों गम से घबराया किए
जिंदगी क्या जाने क्या थी,और क्या समझा किए

….जाऊ द्या.नाईलाज को क्या इलाज ?

टीप : माझ्या या जानिबे-मंजिल बद्दल इ टिव्ही (उर्दू) चॅनल वर बातमी आली होती,
त्या बातमीचा हा अंश :

Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

बेजूबानी…

प्रेम; आणि तक्रार नाही,हे असं कसं होईल ? प्रेमात तक्रार तर असतेच शिवाय या शिकवा-शिकायत मध्ये एक प्रकारची अवीट गोडीही असते.
पण हे कुणाला लागू होतं? जेव्हा दोघंही एकमेकांवर अगदी फिदा असतात त्यांनाच.
सहसा प्रेम हे एकतर्फी असतं. आणि मग अशा स्थितीत तक्रार करायला गेलं, की ऎकून तर घेतल्या जातच नाही,शिवाय नाराजी वाढत रहाते. अबोला बाळगल्या जातो. मग तो प्रियकर दिवस रात्र बेचैन होतो, ती भेटली की तेच तेच सांगत रहातो.तिला त्याच्या सांगण्याबोलण्यावर भरवसा रहात नाही आणि मग हळू हळू प्रेमाचं रुपांतर एका दाहक अशा अनुभवामध्ये होतं. त्याला गप्पपणा घेरतो. तो मग तिला म्हणतो-
हश्र के दिन मेरी चुप का माजरा,
कुछ न कुछ तुमसे भी पुछा जाएगा

त्याला ही खात्री आहे, की प्रलयाच्या दिवशी-ज्या वेळी पापा पुण्याचा हिशोब होईल, माणसाच्या कृत्यांचा जेव्हा पाढा वाचल्या जाईल, तेव्हा ‘हा का बरं गप्प आहे ?’ असा प्रश्न तुला विचारला जाईल. नक्कीच.
आयुष्यभर जिने त्याचं अजिबात ऎकलंच नाही, तो शेवटी आयुष्यातूनच निघून जातो. आणि ती जेव्हा त्याच्या अंत्यदर्शनाला येते, तेव्हा त्याच्या निष्प्राण चेहर्‍यावर जणू हेच उमटलेलं असतं-
सुने जाते न थे तुम से मेरे दिन रात के शिकवे
कफन सरकाओ,मेरी बेजूबानी देखती जाओ..

पण आता तिला याचा पश्चात्ताप होतो आहे. त्याला आपण प्रतिसाद दिला नाही याचं प्रचंड दु:ख सोसत ती आयुष्य काढते. तिचाही अंत होतो, आणि जगाचाही अंत होतो. मग प्रलयाचा दिवस (महशर) येतो. या दिवशी सर्व मृतात्म्यांच्या पापापुण्याचा हिशोब होतो. जीवनभराच्या कृत्यांचा हिशोब लावून त्या त्या नुसार माणसाला स्वर्गात पाठवायचं का नरकात-याचा निवाडा केल्या जातो.
पण हे काय ? ती इथे चक्क गप्प बसून आहे. इतकंच नाही, तर तिच्या चेहर्‍यावर प्रचंड अपराधीपणा दिसतो आहे.पश्चात्ताप ( पशेमानी ) दिसतो आहे. नेहमीच आनंदाने रहाणारी ती-आता अशा अवस्थेत पाहून तिचा तो प्रियकर-ज्याच्या सांगण्या बोलण्याला तिने आयुष्यभर जुमानले नाही- कमालीचा अस्वस्थ होतो. तिथेच तो एक ठरवून टाकतो-
अपने सर ले ली महशर में खताएं उनकी
मुझसे देखा न गया उनका पशेमां होना

निस्सीम प्रेम याहून काय उत्कट असू शकतं…

Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

जाणं आणि…निघून जाणं

शायर लोकांचे प्रेमाचे व्यवहार फार जालिम असतात. सामान्य माणसासारखं त्यांचं प्रेम काही असं तसं नसतं. जीवन मरणाच्या नुसत्या बाता मारणारे ते वादे-इरादे नसतात,तर कृतीत उतरवून दाखवायची धमक त्यात असते.आणि या शायर लोकांना प्रेयस्या ( वा! काय छान अनेक वचन आहे !) तशाच अगदी जालीम-अगदी जीवघेण्या असतात. एका शायरच्या नशिबाला अशीच एक जीवघेणी प्रेयसी लाभली. तिच्या, ‘निघून जा !’अशा सांगण्याचा एवढा असर त्याच्यावर झाला,की दुसर्याज दिवशी मोठ्या बाका प्रश्नाला उत्तर द्यायची वेळ त्याच्यावर आली-
जनाजा रोक कर मेरा,कुछ इस अंदाज से वो बोले
गली तो हमने कही थी,तुम तो दुनिया छोडे जाते हो
आता हा प्रश्न आपल्यासाठी हसण्याचं निमित्त होतो,त्याच्यासाठी जिव्हारी लागणारा असा.(पण जीवच गेला तर जिव्हार कुठे रहाणार..) आणि माणसाचं जाणं-निघून जाणं असंच तर असतं-सांगणारा असतो,ऎकणारा मात्र निघून गेलेला असतो. ‘अमर’मध्ये म.रफीने गायलेलं एक आर्त असं गाणं आहे-‘ओ दूर के मुसाफिर हमको भी साथ ले ले..’ शकील बदायुनीच्या या गीतामध्ये सुरूवातीला एक शे’र आहे-
चले आज तुम जहां से,हुई जिंदगी पराई
तुम्हे मिल गया ठिकाना,हमे मौत भी ना आई
आलेला माणूस हा जाणारा असतोच. बुलावा आला की त्याला निघावं लागतं,जावं लागतं. पण हे त्याचं जाणं केव्हा असतं-जेव्हा त्याला बोलावणं आलेलं असतं तेव्हा.
पण जवळचा माणूस जातो,तेव्हा आपल्याला का कोण जाणे वाटत रहातं, त्याने इतक्या लौकर जायला नको होतं.त्याने जायची घाई केली…जसं काही त्याला बोलावणं आलं नव्हतं,तोच निघून गेला.आपण होवून निघून गेला.रुग्णाची विचारपूस करायला आपण जातो.त्याच्याशी बोलतो.त्याला बरंही वाटतं. चार सुख दु:खाच्या गोष्टी होतात. प्रकृतीबद्द्ल सांगताना तो सांगून जातो,की फार अशक्त वाटतं आहे, उठायलासुध्दा होत नाही,तेवढी शक्तीच नाही राहिली.त्याला धीर देवून आपण त्याचा निरोप घेतो.
आणि सकाळी निरोप येतो, तो गेल्याचा. आपण सुन्न होतो. कालची विचारपूस आठवत रहाते. आपलं एक मन मग राहून राहून त्याला उद्देशून म्हणत असतं-
कल तो कहते थे,के बिस्तर से उठा जाता नही
आज दुनिया से निकल जाने की ताकत आ गई…

Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com