Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

सहमतीची विनंती

‘शगून’चित्रपटातलं जगजीत कौर हिने गायलेलं, ‘तूम अपना रंजो-गम ..’ हे गाणं ऎकताना काव्य-संगीत-आवाज यांची अनुभुती होत असतानाच मनात नकळत एक जादू होत जाते. ही जादू असते,एका अत्यंत खाजगी संवेदनांचे आपण साक्षीदार होत चालल्याची. ती आपल्या सहका-याला ( इथ पती म्हणण्यापेक्षा सहकारीच म्हणावे वाटते,एवढी उत्कटता,एवढी संवेदना त्या वातावरणात भरलेली आहे. ) त्याच्या दु:ख विवंचना आपल्याला सांगायला,त्यात सहभागी करून घ्यायला आर्जव करते आहे. तो बोलत नाही,सांगत नाही …आणि आपल्याला त्याचं तो गप्पपणा त्याचं स्वत:तच गुंतून बसलेपण जाणवत रहातं आणि आपण सुध्दा त्याच्या या सहचारीप्रमाणेच व्याकूळ होऊन जातो :

तूम अपना रंजो-गम,अपनी परेशानी मुझे दे दो
तुम्हे गम की कसम, इस दिल की विरानी मुझे दे दो

मुळात तिची अवस्था कशी आहे ? नाकारलेली,टाकून दिलेली.पण तरीही,आपल्या सोबत रहाणे त्याला स्विकारावे लागले,ही जाणिव मनात ती ठेवून आहे. असे असूनही अपमान विसरून त्याचं दु:ख कमी करायला ती तयार आहे-

ये माना मै किसी काबील नही हूं,इन निगाहों में
बुरा क्या है अगर, ये दुख ये हैरानी मुझे दे दो

..तुझ्या दृष्टीने माझ्यात एवढी पात्रता नसेलही…पण काय हरकत आहे,दु:खात सहभागी करून घ्यायला… कदाचीत समाजाच्या टीकेमुळे भीती,काळजीने त्याची कुचंबना झालेली असेल. अशावेळेस त्याला स्वत:बद्दल काळजी,दु:ख वाटत असते. आणि ती म्हणते-

मैं देखूं तो सही, दुनिया तुम्हे कैसे सताती है
कोई दिन के लिए,अपनी निगेबानी मुझे दे दो

या गीताचे गीतकार आहेत, साहिर लुधियानवी. साहिरच्या गाण्यात उर्दू शब्दांचा चपखल वापर असतो. या ओळीतसुध्दा ‘निगेबानी’शब्दामुळे अर्थाला आकार आला आहे. (निगाह-बान : संरक्षक,काळजी घेणारा)पुष्कळ वेळा असंही असतं,की बाहेरचे विश्व, स्पर्धा,चिंता हे घरात रहाणार्‍या सहचरीला माहीत नसतं. तिला एवढंच कळालेलं असतं,की याला काही दु:ख आहे, चिंता आहे. मग लहान मुलाला समजवावं तसं ती म्हणते-मी आहे नं इथं.तुमची काळजी माझ्यावर सोपवा.( कधी गमतीने वाटून जातं, लहानपणात मित्रांशी भांडल्यावर आई तावातावाने बोलायची, किंवा शाळेतल्या प्रश्नांची सोडवणूक मी करते, असं काही बोलायची,ते मला फार गैर वाटायचं,गैरजरूरी वाटायचं…आणि आईची तळमळही जाणवायची. खरंच अशा वेळी तळमळीच्या माणसाला सोबत घेता न येणं…किती कुचंबना म्हणावी ही…)

गाण्याच्या शेवटच्या ओळीत नायिकेच्या स्वत:च्या दु:खाची जाणीव आपल्याला होते. हे अपमानाचं दु:ख ती केव्हाच विसरलेली आहे. उलट, तुम्हाला वाटणारा अपमान, अपराधीपणा (पशेमानी)मला द्या,असे ती म्हणते-

वो दिल जो मैने मांगा था मगर, गैरो ने पाया था                                               
बडी शै है अगर, उसकी पशेमानी मुझे दे दो

सगळ्या गाण्यात ह्रदयाला थेट भिडणारा असा एक समजूतीचा सूर आहे. जणू दु:खाची जाणीव झाल्यानंतरचे सांत्वन आहे.गाणं ऎकलं,की असं वाटतं,आता त्याने तिच्या कुशीत आपला चेहरा लपविला असावा… सिनेमाच्या कथेनुसार गाण्याची रचना असते, अर्थाचा संदर्भ असतो हे खरे; पण इथे उत्कटताच एवढी आभळासारखी दाटून आलेली आहे, की आपण तिच्या त्या सुचीत केलेल्या दु:खाच्या वैशम्याच्या अनुषंगाने चार पावलं पुढे टाकीत जातो. सिनेमाच्या कथेची तशी गरज रहात नाही….

पियानोच्या स्वरांच्या माळेत खय्यामने हे गाणं गुंफलं आहे. पियानोचा असाच वापर, सी.अर्जूनने ‘सुशीला’ या चित्रपटात केला आहे .( बे मुरव्वत बे वफा…)

जगजीत कौरचं हे गाणं असं आहे…प्रसिध्दीच्या गजबजाटापासून दूर असणारं,आपलं,खाजगी…

( माझ्या ‘गीतमुद्रा’ या शब्दालय प्रकाशनाच्या वतीने प्रसिध्द झालेल्या संग्रहातल्या एका लेखावरून. )

मुल्लांची थट्टा !

कोणत्याही धर्मातले धर्मगुरू खरं म्हणजे, चांगले असतात. त्यांचा आपल्याला त्रास नसतो. ते काही घरी येवून आपला कान धरून तिकडे घेवून जात नसतात प्रवचनाला. किंवा प्रवचनादरम्यान प्रश्न विचारून उत्तर नाही आलं, तर ना आपल्याला छड्या मारतात ना रागावतात ना अपमानित करतात. शिवाय ते बिचारे काही गृहपाठही देत नाहीत,आभ्यास करून येण्याबद्दल दटावतही नाहीत. ते आपापलं सांगत राहतात बिचारे- दु:ख विवंचनांना टाळण्यासाठी तो आध्यात्माचा-देवाचा रस्ता.
मग असं असताना, आपण का बरं नावं ठेवावीत ? का बरं त्यांची टिंगल करावी ? का बरं ? याचं खरं कारण म्हणजे, हा जो धर्मगुरू-ज्याला आपण हौसेने आणलेलं असतं आपणच आपल्या मनात. त्याची त्याची प्रतिष्ठापना केलेली असते उत्साहाने,उतावीळपणाने; आणि मग गणेश चतूर्थीचा उत्साह दुस-या.-तिस-या दिवशी ओसरावा अन मग दररोजच्या आरतीचे टेंशन यावे असे होवून जावे. गणपती तर निघून जातो बिचारा आठ दहा दिवसात; पण मनात बसलेला हा धर्मागुरू- धार्मिक,आध्यात्मिक भावनांची समज- ती कुठे निघून जाते ? त्याच्यासोबत रहाणं शक्य नसतं आणि मग त्याच्याबद्दलच्या तक्रारी सुरू होतात. त्याला नावं ठेवणं सुरू होतं. पहाता पहाता त्या तशा थट्टेत माणूस रमून जातो. ती थट्टा रुचकर वाटायला लागते. विशेषत: ‘संध्याकाळ’ च्या सवयीचा माणूस तर या थट्टेत अधिक आक्रमक होत असतो. कुणी तर ईश्वराचीही थट्टा करायला मागे पुढे पहात नाही. एक विनोद आहे :
एक फकीर भीक (खैरात ) मागण्यासाठी मशिदीसमोर कटोरा घेऊन उभा रहातो. सगळे नमाजी निघून जातात त्याला कुणी काही टाकत नाही. मग तो फकीर मंदिरासमोर येऊन उभा रहातो. तिथेही कुणी त्याला भीक घालीत नाही. मग तो चर्चसमोर उभा रहातो. तिथेही तसाच अनुभव. मग तो शराबखान्यासमोर येऊन उभा रहातो; तर तिथून जे जे शराबी बाहेर पडतात ते त्याला काही ना काही देवून जातात. त्याचा कटोरा भरतो. फकीर मग आभाळाकडे पाहून म्हणतो- “वाह मेरे मौला ! रहते कहा हो, और पता कहा का देते हो !”
मिर्जा गालिब म्हणतो,
कहां मैखाने का दरवाजा गालिब और कहां वाईज
पर इतना जानते थे कल वो जाता था के हम निकले

‘अकबर’इलाहाबादी तर या शैखची गंभीरपणे थट्टा करतात
शैख जी रात को मस्जिद में नही जाते है
यानी डरते है के बैठा कही अल्लाह न हो
म्हणजे, माणूस आणि ( धर्मगुरू ?) भुताला अन ईश्वराला रात्री भीतो की काय ?
बिघडलेला माणूस अधिकाधिक बिघडत जातो, पिन्याच्या सवयीचा होत जातो, तसतसं त्याला आतून त्याची सदसद्विवेक बुध्दी सतावीत रहाते. मग तो आपला राग या धर्मगुरूवर काढतो. त्याला शिकवायलाही कमी करीत नाही-
जाहिद शराब पीने दे मस्जिद में बैठकर
या वो जगह बता दे, जहां पर खुदा न हो
अशा पिण्यामुळे वाईट कृत्यांमुळे माणसाला स्वर्ग लाभत नाही, तो नरकात जातो असं तो शैख वारंवार बजावत असतो. पण शराबखान्यात बसलेला शायर काय म्हणतो

खैर दोजख में शराब मिले ना मिले
शैख साहब से तो जां छूट जाएगी

शाळकरी वयात जेव्हा गाणी ऎकायचो, त्यावेळी ती काय सगळी बालगीतं थोडीच असायची ? छे ! उलट ती तशी गीतं आवडायची नाहीत. भक्ती गीतं,भावगीतं,चित्रपटातली गीत्ं ऎकल्या जायची. मोठ्या चवीनं ऎकल्या जायची. अर्थात त्या गाण्यांचा अर्थ समजण्याचं ते कुठं वय होतं म्हणा; पण गाणी मात्र मुखपाठ असायची.प्रश्नच नाही. मग शाळा ओलांडून जसजसं मोठं होत गेलो, तसतसं गाण्यांतल्या शब्दांचे अर्थ उजळू लागले, गाण्याचा अर्थ समजू लागला, गाणं कळू लागलं. अशी कितीतरी गाणी आहेत, जी शाळेत असताना वेगळ्या अर्थाची वाटली, त्याचा खरा अर्थ नंतर जाणवला. हिंदी गाण्यांच्या बाबतीत तर नेहमीच तारंबळ उडायची, ती शब्दांची. रेडिओवर ऎकलेलं ते गाणं- एक तर शब्द नीट ऎकायला यायचे नाहीत. नीट ऎकायला आले, तर त्याचा नेमका अर्थ समजायचा नाही.
मराठी गाण्यांच्या बाबतीत शब्दांचं तेवढं कोडं पडायचं नाही. ‘नववधू प्रिया मी बावरते..’ ( कवी : भा.रा.तांबे.)या गाण्यानं मात्र गंमत केली. शाळेत असताना हे गाणं आवडलं होतं, ते त्याच्या चालीमुळे. शिवाय आईला, मावशीला हे गाणं आवडायचं म्हणून मलाही आवडायचं. अर्थात त्या दिवसांतल्या सवयीमुळे ते गाणं मुखपाठ करून टाकलं होतंच. नव्या नवरीचं ते बावरणं, अडखळणं,लाजणं वगैरे सगळं सगळं त्यात आहे, हे शाळा ओलांडताना समजलं होतं फक्त. माहित असायचा प्रशनच नव्हता की. हे सगळं नवर्‍याला उद्देशून म्हटलेलं गाणं असून त्याच्यापुढे व्यक्त केलेल्या त्या भावना, आधारासाठी त्याने हात पुढे करावा हे आवाहन असलेलं ते गाणं जपून राहिलेलं होतं मनात. मग –
आता तूच भय लाज हरी रे
धीर देवूनी मी नवरी रे
भरोत भरतील नेत्र जरी रे
कळ पळभर मात्र खरे घर ते
हे कडवं ऎकलं की मनात चलबिचल व्हायची. काहीतरी वेगळं- उदासी ओलांडलेली हुरहुर,त्या प्रकारची अधीरता या गाण्यात आहे, हे तरूणपणात समजू लागलं. तथापि, हे कडवं तेवढं गांभीर्याने घेतलं नाही. का- कारण माझं तरूण वय आणि ती नववधू आहे, ही भावनाच एवढी तल्लख होती,की… अशावेळेस शरीरात गुंतलेल्या मनाला डोळ्यातला ओलावा जाणवत नसतो. तो कुणाचा दोष नसतो, बस- वय असतं ते.
…आजही त्या गाण्याची संगत सुटली नाही. आजही ते गाणं तितकंच आवडत आहे. मात्र त्या गाण्याच्या आवडीला आता कारण आहे माझ्या पन्नाशी ओलांडलेल्या वयाचं. ते शेवटचे कडवे जे मला फक्त समजले होते, ते आता अधिक अधिक जाणवत आहे. वय वाढू लागलं,व्याप-ताप वाढू लागले,मुलं मोठी झाली आणि कुणाच्याही लग्न समारंभाला गेलं, की आता मुलीचं ते निघणं मनात घर करू लागलं. लग्नाच्या घाईगर्दीचे साताठ दिवसांचे ते ताण तणाव, जाग्रणं, धावपळ,उत्साह, कष्ट सगळं सगळं गोळा होवून त्या निघण्याच्या वेळेला जणू पूर येवून जातो. अधीर झालेलं मन बावरून जातं….कुणाचंही लग्न असो, लग्नाच्या या शेवटच्या प्रसंगाने मनात चलबिचल होवू लागली.
दरम्यान केव्हातरी पूर्वीच या कडव्याचा अर्थ लागलेला होता.मागेच लक्षात आलं होतं,की हे गाणं ईश्वराला उद्देशून आहे. प्रियकराच्या रूपातला तो ईश्वर-तिकडेच जायचे आहे…खरं घर तेच आहे. आणि जाण्याची ओढही आहे- नदीच्या नैसर्गिक प्रवाहासारखी. आणि जाताना-निघताना होणारी थरथरही आहे. आता हे गाणं अधिक जिव्हाळ्याचं वाटू लागलं, अधिक जवळचं वाटू लागलं.
‘दिल ही तो है’ या चित्रपटातलं मन्नाडेचं गाणं अशाच नवथर तरूणीच्या अविचारी कृतीला पडलेला प्रश्न नमूद करणारं आहे-
लागा चुनरी में दाग छुपाऊं कैसे
चुनरी में दाग छुपाऊं कैसे घर जाऊ कैसे
या गाण्याचंही असंच झालं. शास्त्रोक्त संगीताचा साज-शृंगार असलेलं, लयदार,ढंगदार असं हे गाणं; या गाण्यातली पहिली ओळच तेवढी त्या वयात जाणवायची, आवडायची.चुनरीला लागलेला-बदनामीचा,लोकांच्या बोलाचा हा रंग आता कसा लपवायचा,कसा पुसयचा…
पण त्यातही गंमत अशी व्हायची,की मन्नाडेची ती ओळ ज्या तर्‍हेने म्हटल्या गेली-
वो दुनिया मेरे बाबुल का घर, ये दुनिया ससुराल
जा के बाबुल से नजरे मिलाऊं कैसे,घर जाऊं कैसे
त्याच तर्‍हेने मनात वैताग उमटून जायचा- ही कसली ओळ ? या ससुराल-बाबुलचा कुठे संबंध आला या झोकदार,रोमॅंटिक गाण्यात ? आं !
पण गाण्यातले पडलेले-पडणारे हे प्रश्न आभ्यासातल्या प्रश्नांसारखे नसतात : उत्तर दिलंस तर पास नाहीतर नापास, असे दटावणारे हे प्रश्न नसतात. आवडीच्या प्रांतात न समजणार्‍या गोष्टी,न सुटणारे प्रश्न हे सुध्दा आपलेच असतात; आपुलकीचे असतात,ते सुटले नसले तरी त्या प्रश्नांची संगत छानच वाटत असते. हिंदी गाण्यातल्या अशा कितीतरी कितीतरी अपरिचीत- न समज़लेल्या प्रश्नांच्या गाठी सोबत राहिल्या आणि पुढे आपोआप सुटून गेल्या.
साहिरची ही रचना मनात अशीच घर करून राहिली होती; त्या ससुराल-बाबुलच्या संबंधाची गाठ घेवून. पुढे वयाच्या पुढच्या टप्प्यात लक्षात आलं, हे गाणं रोमांचीत करणार्‍या भावनांचं जसं आहे, तस6 त्यात वेगळ्या जाणिवांचा वावरही आहे. आपलं आयुष्य, आपला या जगातला वावर,आपल्या आयुमर्यादेची जाणिव,आपल्यावरची जबाबदारी, आपल्याकडून अनाहूतपणे झालेल्या चुकांमुळे आता ईश्वराला- तिकडे गेल्यावर, काय सांगावे- त्याला कसं तोंड दाखवावं, या अशा भावना असलेलं हे गाणं आहे-जोरदार वाद्यवृंद आणि लयीत असलेलं.
पण गंमत आहे या दोनही गाण्यांत. लता मंगेशकरच्या त्या गाण्यात ईश्वराला नाथ म्हटलेलं आहे. तिकडेच आपल्याला नांदायचं आहे,ही जाणिव आहे. आणि मन्नाडेच्या या गाण्यात ईश्वराचं घर हे बाबूल आहे-माहेर. दोनही गाण्यत रोमांचीत करणार्‍या शारीर भावनांतून शरीरापलीकडचे जे अस्तित्त्व आहे, त्या अस्तित्त्वाची ओढ आहे.-तिकडली जाणिव आहे.
गाण्यातले-काव्यातले अर्थ आपल्याला समजतात; पण खरेदीला आलेला ग्राहक जसा आपापल्या रुचीनुसार त्यात्या दुकानांत रेंगाळतो, तसं आपल्या वयानुसार- आवडीच्या अनुरूप आपण त्यात्या शब्दांपाशी गुंतून रहातो. …पुढे दिवस बदलतात आणि तेच गाणं आपल्याला वेगळ्या स्वरूपात जाणवत रहातं. ‘फिराक’ गोरखपुरींचा एक शे’र कॉलेजला असताना वाचण्यात आला होता-
हजारबार जमाना इधर से गुजरा है
नईनई सी है कुछ तेरी राहगुजर फिर भी
अर्थ सरळच होता.प्रेमाच्या ऑळखीच्या वातावरणाचा. प्रेयसीच्या घराकडचा हा रस्ता वर्दळीचा असा. जाणारे येणारे लोक नेहमीच येत जात असतात. मीसुध्दा या रस्त्यावरून आलो-गेलेलो आहे. पण जेव्हापासून तुझी ओळख झाली आहे, तू मला आवडायला लागली आहेस, तेव्हापासून हाच रस्ता कसा नवीन वाटतो आहे….
या शे’रचा अर्थ सरळ असूनही मला तो एकदम वेगळ्या तर्‍हेने जाणवला एकदा. दवाखान्यात चार दिवसांकरीता ऍड्मिट होतो. ते सगळं तिथलं वातावरण ती औषधं, आजारपणाचे ते वातावरण आणि ती काळजी हे सगळं सगळं मी अनेक वेळा पाहिलेलं होतं. मित्रांच्या,नातेवाईकांच्या उपचारांच्या निमित्ताने. दवाखान्यात आलो होतो,मुक्कामही केला होता, काळजीही… नवीन नव्हतंच तसं काही. पण जेव्हा माझ्यावरच ही वेळ आली, जेव्हा मीच रूग्ण झालो, तेव्हा मला हाच दवखाना, हेच वातावरण, हाच परिसर कसा नवा नवा वाटू लागला.
वयाचा हा अनुभव ही अनुभुती…

मुजरा…

संवेदना जास्त उत्तेजीत झाल्या, की त्या संवेदनांची अभिव्यक्ती ठळकपणे होणं स्वाभावीक असतं. सुख दु:खाच्या भावना तीव्रतर झाल्यावर हळूवार तर्‍हेने,सूचक तर्‍हेने ते सुख दु;ख व्यक्त होणं कठीण होतं. अवख़ळपणाने त्या भावना व्यक्त होतात आणि असं व्यक्त होताना सरळ सरळ सांगितलं जातं किंवा जीवन व्यवहाराचे नियम भक्क शब्दांत आकाराला येतात. नशेचा अंमल वाढला की, असं हमखास होतं.

या भावना गडद तर्‍हेने व्यक्त होणार्‍या. कोल्हापूरी मटनाचा तांबडा-पांढरा रस्सा मनसोक्त ‘ओढताना’ डोळ्यात पाणी यावं अन मजाही यावी, तसं उत्तेजनेच्या मन:स्थितीत जीवन व्यवहाराबद्दल विचार-भावना-तत्त्वद्न्यान कसं तिखट आग असलं की पोट भरतं.

हिंदी गाण्यात मुजरा ही अशी भूक क्षमविण्यासाठी योग्य प्रकार. मुज्रा म्हणजे,  कलावंतिणीने बसून म्हटलेले गाणे असा त्याचा अर्थ आणि आणखी एक अर्थ म्हणजे, कमी केलेला-वजा केलेला. दोनही अर्थ सिनेमातल्या मुजर्‍याला लागू होतात. ‘ठुकरा रहा था मुझको कई दिन से ये जहां,आज मैं इस जहां को ठुकरा के पी गया’ असा साहिरचा नायक ( प्यासा ) म्हणतो,ते कलावंतिणीच्या बैठकीत येवूनच.मुजर्‍यातसुध्दा अशा भावना कशा रस्सेदार तर्‍हेने व्यक्त होतात पाहा –

जो लुटते मौत के हाथों,तो कोई गम नही होता 
सितम इस बात का है जिंदगी ने हमको लूटा है  

आणि गंमत म्हणजे याची अनुभुती येते ते तिथेच- तिच्या कोठ्यावर !अर्थात आपली कोठी म्हणजे थिएटर !

या मुजर्‍याची शब्द रचना अगदी त्या मन:स्थितीला योग्य अशी. साजेशी अशी. भडक शब्दांत सुख दु:ख-विशेषत: स्वत:च्या दु:खाचं उदात्तीकरण हे या मुजर्‍याचं वैशिष्ट्य.  ‘भरोसा कर लिया जिस पर उसी ने हमको लूटा है,’  किंवा  ‘सनम तू बेवफा के नाम पर ‘  ही अशी काही उदारहरणं..

कालच्या ब्लॉगवर श्री रणजित यांनी प्रतिक्रिया देताना, त्यांना ‘दो बूंदे सावन की’  या गाण्याची आठवण झाली. श्रावणात बरसलेली पावसाची दोन थेंबं… त्यांचं नशिब किती वेगळं असतं, एकाच झाडावरची दोन फुलं, आणि दोन लहानपणच्या मैत्रिणी…. दोघांना सोसावं लागलेलं वेगवेगळं आयुष्य… साहिर लुधियानवींची ही रचना असून संगितकार आहेत खय्याम.या गाण्यात आशा भोसलेंची संगत केली आहे ती बासरीने. त्या बासरीचे स्वर आणि आशाबाईंचा आवाज… दोन मैत्रिणीच या…

जाणिवेचे स्वरूप

लहानपणात कुणी घसरून पडलेलं पाहिलं की अगदी खळखळून हसू यायचं. माणसाची फजिती आणि त्याचं खजील होणं याच्या एवढं करमणूकीचं प्रकरण दुसरं काही नसायचं. पुढे जसजसं मोठं होत गेलो, तसतसं त्यातली करमणूक कमी कमी होत गेली-म्हणजेच हसू कमी कमी होत गेलं. आता जेव्हा असं वय आलेलं आहे-ज्या वयात हात पायाला फ्रॅक्चर झालं तर किमान दोन महिने ते जुळणार नाही, याची जाणिव झाली आणि कुणी समोर घसरून पडलं तर चटकन त्याच्या मदतीला धावावं वाटतं;त्याला काही जास्त तर लागलं नाही ना या विचाराने अस्वस्थ होत रहातो.
जीवनव्यवहारातले टक्के टोणपे खाल्ल्यावर आता हसण्याचे विषय बदलले आहेत;किंबहूना आता हसण्यासारखं काही आहे का राहिलं,याचा विचार येतो आहे. पक्ष्याला पिंजर्‍यात द्डपून ठेवणं,पिलाला बांधून ठेवणं हे सगळं आता अघोरी वाटत आहे. जाणिवांचं स्वरूप बदललं की कसा अनुभव येतो पहा : अंत्यविधीच्या वेळेस मुतदेहावर उदबत्ती लावलेली, साबणाने त्याला स्नान घालून अत्तर लावलेलं एकदा जवळून पाहिलं-ते अनुभवलं, त्या सगळ्यांचे वास मनात असे भरून राहिले होते, की पुढे किती तरी दिवस या वासांना संदर्भ लागायचा तो संपून जायचा. वस्तू त्याच, ज्यांचा नेहमी वापर होतो, मनाच्या उल्हासासाठी,भक्तीच्या-मंगल वातावरणासाठी; पण कधी संदर्भ बदलले की विपरीत होवून जातं. एक शायर सांगतो-
एहसास के अंदाज बदल जाते हैं वर्ना
दामन भी उसी तार से बनता है कफन भी

…एकाच सूताने-एकाच धाग्याने दोनही वस्त्रं विणली असतात; पदराचे ते वस्त्रच आणि मृतदेहावर पांघरायचं कापड;ते पण त्याच धाग्याने बनलेलं की ! पण जाणिवेचे पदर वेगळॆ झाले की भावना बदलून जाणार…
एकाच धाग्याने बणलेली वस्त्रं जशी वेगळी वेगळी असतात तसंच माणसांचं ही असतं. अगदी ‘फिल्मी’ भाषेत सांगायचं झाल्यास एकाच आईचं एक पोरगं चोर तर एक पोरगं पोलीस असतं. एक सभ्य तर एक वाईट मार्गाचा. एकाचा वावर अंधारात तर एक प्रकाशाकडे जाणारा…
डॉ. इक्बाल यांनी अशीच एक तफावत सांगितली आहे-
परवाज है दोनों की इसी एक फिजां में
करगस का जहां और है,शाहीं का जहां और
एकाच वातावरणात दोनही पक्षी वावरतात, एकाच आभाळाखाली झेप घेतात- ससाणा आणि कावळा;
पण दोनही पक्ष्यांची प्रकृती वेगळी, दोघांचं विश्व वेगळं…

कुणाची प्रतीक्षा करणं म्हणजे वाढत जाणारा ज्वर सोसणं. प्रतीक्षा सुरू केव्हा होते-जेव्हा नियत वेळ ओलांडली जाते. कधी कधी ही नियत वेळ जेव्हा आपण स्वत:होवूनच अलिकडे-अगदी अलिकडे आणतो अन वाट पहायला सुरूवात करतो,तेव्हा खरं म्हणजे त्यावेळी ती प्रतीक्षा नसते बरं, ती असते अभिलाषा. उतावीळपणा,उत्सुकता. प्रतीक्षा करणार्याीची नजर वाटेकडे केंदित होवून बसलेली असते आणि त्या नजरेसोबत सगळं शरीर,सगळ्या हालचाली इतकंच काय श्वाससुध्दा तिकडे-त्या तिकडे लागून राहिलेले असतात.
आ,के मुंतजिर है बज्मे-गुलिस्तां तेरे लिए
महकी हुई है देर से सांसे गुलाब की
( मुंतजिर : प्रतीक्षा करणारा. बज्मे-गुलिस्तां : बागेची मैफल )
…बागेची ही मैफल सजलेली आहे,प्रतीक्षा करीत आहे.कुणाची प्रतीक्षा आहे बरं या उपवनाला..उपवनातले गुलाबसुध्दा अगदी उत्सुक होवून वाट पहात आहेत,त्यांचे श्वास त्या आगमनाच्या प्रतीक्षेत घमघमू लागले आहेत. कुणाची बरं असावी ही प्रतीक्षा…उपवनाला प्रतीक्षा कुणाची असणार- वसंताची;नाही का! बाग आणि बहार हे नातंच असं आहे. त्यांना एकमेकांची ओढ असणारच.
पण हा प्रतीक्षेचा ज्वर जसजसा वाढत जातो, तसतसं अस्वस्थ वाटत जातं. चुळबुळ होत रहाते. आठवणी,विचार आणि कल्पना यांची मनात जणू दंगल सुरू होते. येण्याची खात्री असल्यावर तर मग काय- तो साक्षात झाला आहे याचेच भास होत रहातात. ‘जिगर’मुरादाबादी तर गाण्यासाठी,संगीतासाठी एकदा एवढा उत्सुक झाला होता,की त्याला त्या वाद्यातून गाणं चक्क ऎकायला येवू लागलं होतं की !
गोशे-मुश्ताक की क्या बात कहूं अल्लाह अल्लाह !
सुन रहा हूं मैं वो नग्मा,जो अभी साज में है
( गोश : कान, गोशे-मुश्ताक : उत्सुक,आतूरलेले कान)
आणि माणसाची ही अशी उत्सुकता जर त्याच्या प्रिय व्यक्तीशी निगडीत असेल तर मग काय विचारता! हा जो संघर्ष आहे-प्रियतमेसोबतच्या जवळीकतेचा,दुराव्याचा; त्यात ह्रदयाचं स्पंदन हे शारिरीक चलनवलनाची कृती न रहाता भेटीच्या धडपडींची हालचाल होवून जातं-जणू आजाराची बाधा होवून जाते.मिर्जा गालिब आपल्या या ह्रदयाचा (मनाचा) समाचार घेताना ( दिले-नादां तुझे हुवा क्या है,,,) विचारतो-
हम है मुश्ताक और वो बेजार
या इलाही! ये माजरा क्या है
(बेजार: उदास,नाखुश या इलाही : हे माझ्या परमेश्वरा! माजरा: मामला,भानगड )
आम्ही एवढे उत्सुक आहोत अन ती चक्क उदासीन-आं! देवा, हा मामला काय आहे ? काय झालं?
‘मिर्जा गालिब’सिनेमात या ओळी सुरैय्याच्या तोंडी असल्याने आपली ( हो, आपलीच, गालिबची नाही ) ‘मुश्ताकी’ अधिक होवून जाते !

तस्बीह

तस्बीह म्हणजे जपमाळ. ईश्वराचे स्मरण करण्यासाठी हाताशी असणारी मण्यांची माळ. अंगठा आणि तर्जनी यात धरून असलेली ती माळ- कधी डॉळे बंद असतात कधी अर्धवट उघडे असतात आणि मुंगी धावते तसा तो अंगठा मण्यांवरून सरकत रहातो. एकेक मणी तर्जनीवरून उतरत जातो,जपाचा संकल्प पुरा होत रहातो. ईश्वरनामाच्या आवर्तनाची संख्या जसजशी वाढत जाते-भक्तीभावाने मन ओथंबून जातं..एकेका मण्याच्या-क्षणाच्या मापाने ईश्वराच्या जवळीकीची भावना दाटत जाते.
पण माळ घेवून नाम जपताना मन तल्लीन असतंच असं नाही. मनातल्या त्या उच्चारांना कधी यांत्रिक स्वरूप येतं. आरती म्हणताना अन टाळ्या वाजवीत असताना नजर फिरत रहाते तसं आपलं मन त्या मण्यांवरून घरंगळून विचारांत-इतर विचारांत केव्हा नादाला लागतं पत्ता लागत नाही.
‘कामील’शुत्तारीचं मन असंच. माला जपताना त्याच्या मनात विचार येतो. पण हा विचार भलताच नसतो. अंगठ्याने मणी मागे मागे सारताना त्याच मार्गाने त्याचं मन पुढे धावतं आणि त्याला आचंबा वाटतो. स्वत:वर तो रागावतो अन् हे काय- हातातली माळ चक्क तोडून टाकतो !
कामील’ने इस खयाल से तस्बीह तोड दी
क्यूं गिन के उसका नाम ले, जो बेहिसाब दे

ईश्वर,जो आपल्याला भरभरून देतो-देताना कसला संकोच करीत नाही,काय दिलं,किती दिलं याचा हिशोब करीत नाही त्या ईश्वराचं आपण नाम घेतो, ते मात्र एकशे आठ, हजार आणि अशाच आकडेवारीच्या सहाय्याने ! तो देणारा दोन्ही हातांनी देतो अन् आपण त्याच्या नामाची मोजदाद करून हिशोबाने रहातो-केवढी विसंगती ही !
ईश्वर भक्तीमध्ये लबाडीची सरमिसळ फार बेमालूमपणाने कधी होत असते.लबाडी-चावटपणाला भक्तीच्या बेगडाचे वेष्टण लावून बसणारा एखादा बुवा ईश्वराला पुढे करून ‘मतलब’साधणारा असतो. भक्तीमार्गात स्त्रियांची दाटी असते आणि सुरेख चेहरे समोरून एकेकाने सरकत जाताना एकेकाने सरकत जाणार्‍या बोटांतल्या मण्यांवरून ईश्वर स्मरण आपोआप निसटून जातं…चेहर्‍यावर मन स्थीर झालेलं असतं आणि देवाच्या नावाच्या उच्चारांत लाडीगोडी आलेली असते-
तस्बीह की मूंगे होती है ये हसीन सूरत वाले
नजर से गुजरते जातें हैं,इबादत होती जाती है
( तस्बीह की मूंगे : माळेचे मणी इबादत : उपासना,आराधना )

 अशीच एक घटना आहे सिनेमतली :…तिच्या पायातलं घुंगरू वाजावं आणि माळेतल्या मण्यात गडबड होऊन जावी अशी घटना चित्रलेखा या चित्रपटात घडलेली आहे-ब्रह्मचारी असलेल्या महेमूदच्या बाबतीत.

बेखयाली

अत्यंतिक संवेदनशील मन:स्थिती ही अत्यंतिक ज्वालाग्राही पदार्थासारखी होवून बसलेली असते. निमित्ताची ठिणगी उद्भवली,की क्षणार्धात संवेदनांच्या ज्वाळा पेटतात. फरक एवढाच, की ज्वालाग्राही पदार्थाने पेट घेतला,तर परिणाम खाक होण्य़ात; तर पेटलेल्या संवेदनांमुळे- मन उजळून निघतं.
अर्थात ही अत्यंतिक संवेदना असते प्रेमाची-रोमांचीत करणार्‍या भावनांची संवेदना. ( द्वेषाची संवेदना,ज्वालाग्राही पदार्थापेक्षा बेकार) या संवेदनेनं तरूण मन जेव्हा भारावलेलं असतं, तेव्हा तिच्या हालचाली- तिचा कटाक्ष चक्क प्रतिसाद वाटून जातो. सहसा तिच्या त्या वागण्याबोलण्यात हालचालीत कसलंही आवाहन नसतं,ना सुचविणं- ती असते स्वाभावीक चलनवलनाची हालचाल. मात्र संवेदनांच्या धुक्यातून पहाताना,त्याच तिच्या हालचाली स्वर्गिय होवून बसतात. वेड लावतात. त्याला तो चक्क प्रतिसाद वाटत असतो-आपल्या संवेदनांसाठी दिलेला.
हिंदी सिनेमातल्या प्रेमव्यवहारात एवढ्या तरल संवेदना क्वचीत पहायला मिळतात. ‘मजरूह’सारखा निष्णात शायर सिनेमाचं गाणं लिहिताना कधी ही रेशमी-मुलायम भावना अलगद शब्दांत उतरवितो आणि मग आपण नकळत त्या संवेदनांच्या हवाली होतो.
‘तीन देवियां’ (1965) या चित्रपटात देव आनंदला एका पार्टीत फर्माईश केली जाते. सिनेमातला नेहमीचा -टिपीकल असा प्रसंग. आता भळभळ भरघोस प्रेम वहाणारं गाणं ऎकायला मिळणार अशा तयारीत आपण असतो आणि रफीच्या स्वरातून-शब्दांतून अलगद प्रकट होते, ती अत्यंतिक संवेदनशील मन:स्थिती…
कहीं बे-खयाल हो कर, यूंही छू लिया किसी ने
कई ख्वाब देख डाले,यहां मेरी बेखुदी ने

समारंभात भेटीगाठी होतात.हसणं-बोलणं होतं.कधी उपचार म्हणून, कधी ओळख म्हणून ,कधी नाईलाज म्हणूनसुध्दा. अशाच वेळी झालेला तो स्पर्श असतो. अगदी अनाहूत म्हणावा असा; पण त्या स्पर्शाच्या सुताने हा संवेदनेनं भरलेला माणूस चक्क स्वर्ग गाठतो की ! (बेखुदी : धुंदी,नशा ) तेवढ्याशा स्पर्शाने स्वप्नांची गर्दी होवून जाणं-दाटी होवून जाणं…केवढ्या तीव्र संवेदना म्हणाव्या त्या !
याच सिनेमात आणखी एक एका गाण्यात अगदी अशाच तर्‍हेने संवेदना कशा ‘ज्वालाग्राही’ बनलेल्या आहेत पहा-( गाणं आहे- ख्वाब हो तुम या कोई हकिकत…)
धडकनों ने सुनी इक सदा पांव की
और दिल पे लहराई आंचल की छांव सी

तीव्रता

‘अकबर’इलाहाबादी यांच्या शायरीत व्यंग असतं,विनोद असतो आणि व्रात्यपणाच्या जवळ जाणारा असा अवखळपणा असतो. शायर; अन तो सुध्दा शराबने किंवा आशिकीने एकदा का बेभान झाला की त्याच्या त्या बेभानवृत्तीला, ‘पिसाळला’ की काय ! असंही म्हणावं वाटतं. तशा कल्पना ‘अकबर’ यांच्या शायरीत उसळलेल्या असतात. आता याच शे’रचं उदाहरण पहा –
किस नाज से कहते हैं वो झुंझला के शबे-वस्ल
तुम तो हमें करवट भी बदलने नही देते

( नाज: हावभाव, नखरा    झुंझला के :वैतागून ) मिलनाच्या रात्री त्याच्य अवखळ उत्साहाची तीव्रता एवढी वाढलेली असते, की त्याच्या तशा वागण्याने वैतागून ती म्हणते,- अरे ! तू तर मला कूसही बदलू देत नाहीस !

….आणि जेव्हा नाराजी होते,माणूस मनात राग धरून असतं,तेव्हा हीच वागण्यातली तीव्रता टोकाला जाते. एवढी की त्याचा संपर्क तर दूरच राहिला,त्याच्या गल्लीतून जातानासुध्दा क्षणभर थांबायची तयारी नसते. ‘गालिब’ला अशा तीव्र नाराजीच्या वागण्याचा अनुभव आला-
पिनस में गुजरते हैं जो कुचे से वो मेरे
कंधा भी कहारों को बदलने नही देते

(पिनस : मेणा,डोली.    कुचा : गल्ली       कहार : मेणा वाहून नेणारी माणसं )
तीला जेव्हा लक्षात येतं,की आपण त्याच्या घराजवळून जातो आहोत, तर आपल्या माणसांना ती खांदा बदलायची उसंतसुध्दा घेऊ देत नाही.
-नाराजीची ही केवढी तीव्रता म्हणावी ही…