Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for the ‘संजीद:’ Category

‘बिसवी सदी’. एक गाजलेलं उर्दू मासिक. आताही ते प्रसिध्द होतं. त्या दिवसात,ज्यावेळी मी कॉलेजला होतो,त्यावेळी हे मासिक वाचनालयात आवार्जून पहायचो. र ट प करीत मी ती उर्दू लिपी वाचायचो. त्यावेळी छापील उर्दूची जेवढी मासिकं/वर्तमान पत्रं पहाण्यात यायची, त्यात या ‘बिसवी सदी’तलं उर्दू टाईप मला फार आवडायचं. एक लाडिक असं वळण त्या लिपीचं मला तिथे जाणवायचं.
या ‘बिसवी सदी’त मी वाचायचो ते मुखपृष्ठाच्या मागचं आणि मलपृष्ठाच्या अलिकडचं पान. काळ्या पांढर्‍या रंगाचं ते तरूण स्त्रीचं छायाचित्र असायचं. विशेष हे,की ते नटीचं नसायचं. आणि त्या तरुणीच्या दिसण्या-असण्याशी, तिच्या चेहर्‍यावरच्या भावनेशी संबंधीत असा एक दिमाखदार शे’र,त्या छायाचित्राच्या खाली मोठ्या-गडद अशा टाईपमध्ये मुद्रित झालेला असायचा. मोठा टाईप असल्याने मला तो वाचायला सोपा व्हायचा, शे’र असल्याने खुमासदार वाटायचा आणि त्या सोबत त्या अनोळखी चेहर्‍यामुळे लज्जतदार होवून जायचा. किती तरी शे’र त्या चेहर्‍यांच्या संगतीनेच लक्षात राहिलेले. मासिकं अर्थात विकत घेतलेली,बाळगलेली नसायची.
एकदा,एक जवळून दिसणार्‍या चेहर्‍याच्या सोबत हा शे’र वाचायला मिळाला होता-
(तसल्सुल म्हणजे,निरंतरता; शृंखलाबध्दता . तनहाई म्हणजे  एकलेपण,एकांत.)


उफ ! ये यादों का तसल्सुल,ये खयालों का हुजूम
छीन ली आप ने मुझ से मेरी तनहाई भी..

छायाचित्रातली ती तरूणी उदास चेहर्‍याने झाडाखाली उभी असल्याचे दिसत होते. तो शे’र,ते छायाचित्र मनात कोरून राहिलेलं होतं. पुढे सिनेमातल्या नायिकांवर फिदा होण्याचे दिवस आले. काही छान असं दिसलं,की कापून वहीवर लावायचं,सांभाळून ठेवायचं अशी आदत लागली. एकदा मिनाक्षी शेषाद्रीचं सुरेख छायाचित्र एका साप्ताहिकात पाहिलं आणि ते काढून माझ्या डायरीच्या कव्हरच्या आतल्या बाजूला चिटकविलं. पहात बसलो, आणि दूरवरून एखादा वाटसरू शोधत शोधत येवून आपल्याला भेटावा तसा तो शे’र मनात उदभवला…
जाड निबची पेन खास विकत घेतली. पुढे मागे पाहून, आता आपल्याला कुणी ‘डिस्टर्ब’ करणार नाही, ही खात्री करून वळणदार अक्षरांत मिनाक्षीच्या छायाचित्राखाली हा शे’र मोठ्या भक्तीभावाने लिहून काढला.पहात बसलो…         ( आवडलेल्या ओळी स्वत:च्या अक्षरांत लिहिण्याची मोठी खुशी असते. त्या निर्मितीच्या अगदी जवळ गेल्याची ती खुशी असते का…)
…अस्वस्थ करणार्‍या आठवणींत माणूस (विशेषत:स्त्री) जेव्हा गुंतून पडतं,तेव्हा आठवणींच्या लाटा अंगावर येत असतात, साखळदंडानी बध्द व्हावे तसे आपण त्या स्मृतीत बध्द होतो.. आणि विचारांची-उलट सुलट विचारांची-किती दाटी झालेली असते !

एकटं असूनही निवांतपण हरवलेली ती अस्वस्थता …

Please visit my other blog http://hasanyachaaakar.wordpress.com/

Read Full Post »

मधुमेह हा असा आजार असतो, जो एकदा का उद्भवला,की आयुष्यभर कमी होत नाही. कितीही औषधोपचार करा,काहीही करा- समूळ नष्ट होणार नाहीच. मधुमेह नुकताच ‘डिटेक्ट्’झालेला माणूस आणि मधुमेहात रुळलेला माणूस,दोघांत  एक मजेदार फरक असतो : नवीन मधुमेही स्वत:च्या सुतकात किमान महिनाभर तरी असतोच असतो. स्वत:चा मातम (शोक) करताना अर्थात त्याला आयुष्याच्या ( म्हणजे आपल्या )संक्षेपाची जाणिव एवढी तीव्रतेने होत असते, की काही विचारू नका.

सुतक सरल्यावर मग तो सावरतो. आजकाल बर्‍याच लोकांना हा आजार असतो, आपल्याला तर जास्त नाही,आपण व्यायाम करू,आहार नियंत्रण करू काही प्रॉब्लेम नाही असं बजावून मग ‘जगायला’लागतो.मनात सतत शुगरची जाणिव असते. जशी शरीरातून ही शुगर जातच नसते, तसंच मनातूनही ही शुगरची जाणिव कधी हरपून नाही जात.

शरीर जसं शुगरसाठी अनुकुल होवून गेलेलं असतं-अन शुगर होते, मनाचंही अगदी तस्संच असतं. लहानपणापासून  मोठेपणापर्यंत नातेवाईकांचा-मित्रांचा सहवास आपल्याला असतो. त्यांच्याशी संबंध ठेवताना कधी घट्ट,मैत्रीपूर्ण असे संबंध ( गोड,गुळचिट्ट) झालेले असतात,तर कधी भांडंण होवून संबंध खलास झालेले असतात. या खलास झालेल्या संबंधाबद्द्ल आपल्याला ना खंत असते ना वैताग.आणि एका तर्‍हेने पाहता, ते ठीकही आहे.

खरी अडचण आपली होते,ती मैत्रीपूर्ण संबंधात बाधा आल्यावर. वयाचा परिणाम म्हणा, कंटाळा म्हणा…नाही, खरं म्हणजे एकमेकाबद्द्लचा  विश्वासच तो… अचानक-  का कोण जाणे (?) खल्लास होवून जातो, आणि मैत्रीपूर्ण संबंधात-नातेसंबंधात शुगर ‘डिटेक्ट’ होते. ही शुगर भांडणाची नसते, वैर नसतं त्यात. त्यात असते एक प्रकारची उदासी, एक प्रकारचा कंटाळा. कधी काळी जो आपल्या अगदी निकटचा असतो, ज्याच्याबद्द्ल आपल्याला अत्यंत जिव्हाळा असतो, तो आता नकोसा होतो..का बरं… आपला अहंकार कारणीभूत असतो का त्याला, का आपलं वय, का आपली परिस्थिती, का आपल्या बदलत गेलेल्या आवडी निवडी,आस्थाविषय, का आपल्या सवयी….का आपली अनुवंषिकता-मूळ स्वभावच… शुगर होण्यासाठी जेवढी कारणं, तेवढीच कारणं-हे मैत्रीसंबंध आटून जाण्यासाठी.

मग काय राहून जातं आता या मैत्रीत ? वैर तर नसतं,संबंध तोडून टाकण्याइतपत. आणि मैत्री-छे! ती तर शुष्क झालेली असते.काही केल्या ती मैत्री,ते संबंध जुळत नसतात. मग  शुगर ‘मेंटेन’ करणंच जसं आपल्या हाती असतं,तसंच इथेही होवून जातं. मैत्रीसंबंध-नाही, संबधच केवळ जसे आहेत-तसेच ठेवून रहाण्याचे. ..एवढंच आपल्या हाती असतं…

तिर्‍हाईत तर्‍हेने विचार केला तर (आणि तिर्‍हाईत तर्‍हेनेच विचार केला तर ) या प्रकृतीतली सर्वात दु:खदायक बाब कोणती असेल तर ही, की आपल्याला या उदासिनतेचं दु:खच होत नसतं ! कसलीच संवेदना उरली नसते. शुगरची प्रकृती जशी माणसाला वातड करून टाकते, तसंच मनही वातड होवून जातं.

काशान: …मोठा सुरेख शब्द आहे उर्दू भाषेतला. घर,झोपडी/काचेचे घर (श्रीमंतांचे हिवाळ्यात रहाण्याचे)/घरटे असे अर्थ आहेत या शब्दाचे. एका शायरने सांगितलं आहे-

खिजां के बाद जरूर आएगी बहार मगर
उजड के बस ना सकेंगे दिलों के का’शाने..
( खजां : पानगळ )

पण या नातेसंबंधातल्या शुगरचा आजार कमी होण्याची एक शक्यताही आहे बरं…त्याचीच चूक आहे, माझ्या मनात तसं काही नाही-नव्ह्तं, उगिच्या उगिचंच बोलत नाही तो,अशा बाष्कळ बाता काही कामाच्या नसतात;यातून आपला मूर्खपणाच जाहीर होत असतो,मूर्खपणा !  नातेसंबंध ,   माणूस-माणूसपण याबद्दल आपल्या संवेदना जेवढ्या तीव्र-तीव्रतर होत जातील त्या प्रमाणात मूळ चर्चा,मूळ उत्साह, मूळ जिव्हाळा,मूळ आस्था (ते पूर्वीचे उबदार दिवस..)पुन्हा मनात उगवेल. ( खरंच,उगवेल का…)

Read Full Post »

( ते तिच्या जीवाचे फूल / मांडीवर होत मलूल / तरी शोके पडूनि भूल /वाटतची  होते तिजला,राजहंस माझा निजला      ….सिडनी प्राणीसंग्रहालयात आपल्या गतप्राण पिल्लाला सोमवारपासून कवटाळलेल्या गोरिला मातेने  या  भावनेचाच प्रत्यय दिला आहे. )

…किती वर्षं झाली त्याला. वर्तमान पत्रातलं हे छायाचित्र पाहिलं आणि त्यासोबतच्या मजकुराने लक्ष वेधून घेतलं होतं. गोरिला मादी आपल्या पिल्लाला घेवून आहे, एवढंच दिसलं होतं; पण मजकुर वाचला,आणि आजवर त्या छायाचित्रातून बाहेर निघालो नाही. दि.3 एप्रिल 1998 च्या वर्तमानपत्रातलं हे छायाचित्र कापून, त्याला चोपडं-टिकावू आवरण चढवून ते मी बाळगतो आहे… तसंच, जसं ती आई आपल्या पिलाला बाळगून आहे.
मी एकदोन ठिकाणी वाचलं होतं,दूरदर्शनवर पाहिलंही होतं, वानरीला आपलं मूल गेल्याचं कळत नसतं म्हणे. ती त्याला तसंच एकदोन दिवस बाळगून असते…
या छायाचित्रासोबतचा मजकूर वाचला आणि पिलाची ती निष्प्राण नजर अस्वस्थ करून गेली. माणूस-प्राणी कसाही असो,कुठल्याही रंगाचा-पंथाचा-स्तराचा वा प्रकृतीचा ; प्रत्येकाला आपलं मूल राजहंसासारखं वाटतं. मृत झालेल्या त्या पिलाला जवळ घेवून बसलेल्या त्या आईच्या चेहर्‍याकडे पाहून वृत्तपत्राच्या त्या माणसाला या ओळींची अनावरपणे आठवण यावी,हे किती स्वाभावीक… राजहंस माझा निजला.
कितीदा तरी विचार येतो मनात, की माझी नजर,माझ्या भावना एवढ्या कालावधीतही खिळून राहिलेल्या आहेत, गुंतून राहिलेल्या आहेत त्या नेमक्या कशात… शब्दांत का दृश्यात… अनावर अशा भावना शब्दांतून  व्यक्त होतात- का बरं. शब्दांची गरज का भासावी ?  वाटून जातं,की अगतीक भावना, व्याकूळ भावना अनावर असतात, त्या धडपडतात शब्दांच्या आधारासाठी. कुठंतरी थांबण्यासाठी.म्हणून माणसाला शब्द पाहिजेत.

…पण नाही. तसंही  म्हणणं एकेरीच असावं. रेबरच्या या व्यंगचित्रात तर शब्दांचा वापरही नाही;  ना शब्दांतून उतरलेल्या त्या भावना. एक वृध्दा बसलेली आहे. एकटीच अशी. स्वत:तच मग्न झालेली,गुंतून गेलेली,विचाररहीत गाढ भावनांत उतरलेली. तिच्या शेजारी, तिचंच असं मांजर जवळ तर बसलेलं आहे, पण अंग मुडपून, स्वत्:तच गुंतून. शेजारी वृध्देचाच तो पोपट आहे ; पण तो सुध्दा स्वत:तच मश्गूल होवून-स्थीर होवून बसलेला आहे. या तिघांच्याही गप्पपणाला  संदर्भ आहे, तो भिंतीवरच्या तसबिरीतल्या भरगच्च परिवाराचा. हा परिवार – या वृध्देचा परिवार.कुठे गेलाय तो.. कुठं गेलीत ती सारी माणसं,कुठं हरवलं ते गोकुळ… आज कुणीही नाही इथे. जी आहेत,माणूस -प्राणी ती निश्चल झालेली आहेत स्वत:मध्ये. भरलेलं घर होतं;आता ते रिकामं आहे- राजहंसांचा तो थवा निघून गेला आहे. निवासाची आता पोकळी झालेली आहे. मनात त्या गोकुळाच्या-त्या अपत्यांच्या स्मृती शेष आहेत.

पण आयुष्य थोडंच थांबणार आहे… आपल्याला जगावं लागतं.जगावं लागणार आहे. मात्र निकटच्या अशा आप्ताशिवाय जगत रहाणं म्हणजे…

गुजर ही जाएगी तेरे बगैर भी लेकिन
बहोत उदास, बहोत बेकरार गुजरेगी..

छायाचित्रात आणि व्यंगचित्रात…दोन्ही ठिकाणी एक प्रकारची विषण्णता
एक प्रकारची उदासी भरून आहे…आप्तांच्या दुराव्याची,अगतीकतेची
.

Read Full Post »

खामोश न था दिल भी, ख्वाबिदा न थे हम भी ( ख्वाबिदा : झोपलेला )
तनहा तो नही गुजरा, तनहाई का आलम .. .
– ‘ शमीम ‘ क्ररहानी.

‘लम्हे’ या टिपणावर विद्याने प्रतिक्रीया दिली, ती अशी : अबोलपणे जाणारे  क्षण रिकामेच असतात असे नाही..
बोलके क्षण आणि अबोल  क्षण याचा विचार करताना सहसा आपण ‘ब्लॅक ऍन्ड व्हाईट’ तर्‍हेने विचार करतो:  बोलके क्षण म्हणजे बडबड आणि अबोल क्षण म्हणजे कोंडून ठेवलेली बडबड ( आणखी एक उथळ कल्पना म्हणजे, बोलणारा तो सुखी; अबोल तो दु :खी ) असं काही खरंच नसतं. किंवा असं म्हणता येईल,की नेहमीच हे खरं असतं असं नाही.

कित्येकदा संध्याकाळी आपण एकटे असतो. त्यावेळी अनाहूतपणे आपल्याला एकलेपण जाणवत रहातं. या एकलेपणात कुणाबद्द्ल शिकायत नसते;ना हुरूप. एक प्रकारच्या निवांतपणाची पोकळी मनात तयार झालेली असते. आपण बाहेर पहात नसतो, बोलत नसतो,शांत असतो. अन्  मनातल्या त्या निवांत पोकळीत डोकावून पाहिलं तर तिथेही काहीच तर नसतं की. सगळेच क्षण जणू विरघळून गेलेले असतात. नितळ पाण्यासारखं मन-त्यावर ना लाटा ना हेलकावे…
या शांतपणाचा आपल्याला क्षणभर आचंबा वाटतो. मनात कुणीच नाही. कुठं गेले ते सारे… आणि आपण एकले आहोत का उदास आहोत… नाही,नाही;छे! उदासी नाहीच ही. खुशी- खुशीही नाही . गोड पदार्थ बाजूला सारावा, तशी ती खुशी आपोआपच बाजूला झालेली असते. पण हे रिकामपण नसतं.
मग हे काय असतं… काय आहे हे. रिकामं मन .ना आनंद ना विषाद ना तक्रार.. काहीच तर नाही. एक प्रकारची ‘चुपसी ‘ आहे ही. अशावेळेस आपलं मन आपल्याला काही तरी सांगू पहात असतं. फुलावर बसलेल्या फुलपाखराने संवाद साधावा तसं ते मन आपल्याशी सांगत-बोलत असतं.

वो दासतां,जो हमने कही  भी हमने लिखी
आज वो खुदसे सुनी है ..नही, उदास नही..

नाही, ही उदासी नसते. गप्प बसणं म्हणजे रुसून बसणं असं जे आपल्याला सहसा वाटत असतं,ती ही स्थिती नसते . ही वेगळीच- अनुभवावी अशी मन:स्थिती असते.
अशा या मन:स्थितीची हकीकत गायक-संगीतकार हेमंत कुमार यांनी मोठ्या( नाही, विशेषणसुध्दा लागू होणार नाही, एवढी निर्वीकार अवस्था असते ही ) स्वत:ला सांगितली आहे.गीतकार आहेत गुलजार; आणि सिनेमाचं नावसुध्दा या मन:स्थितीशी जुळणारं,असं.. सन्नाटा.

Read Full Post »

लम्हे…

..काही शब्द कधी अवचितपणे मनात रेंगळतात. त्यांना जवळ घ्यावं वाटतं. गोंजारावं वाटतं. लम्हा ( लमहे ) हा असाच शब्द. लिहिल्यानुसार त्याचा उच्चार करायच्या ऎवजी लमहा ( लमहे ) असं म्हटलं,की मोठं अल्हाददायक वाटतं.

..हे लमहे ,हे क्षण ..माणसाच्या इतके जवळ असतात- इतके जवळ की दिसू नये. सगळ्या कृती, सगळं वागणं-बोलणं क्षणांतच होत असतं.. बोलताना, बोलण्याच्या भरात क्षणांतच काही अद्वातद्वा बोलून जातं. मग त्याचा पश्चात्ताप होत रहातो. बरं, बोलणं हा काही ‘ स्क्रिन ‘ वरचा, ‘ सेव्ह ‘ न केलेला मजकूर नसतो;  कि बुवा घ्या ‘ कर्सर ‘ तिकडे, चुकीच्या शब्दाला  ‘ बॅकस्पेस ‘ नं ढकला, किंवा ‘डिलिट’ करा,असं. बोलून गेलेल्या शब्दांबद्द्लचा ‘ कर्सर ‘ आपल्या मनात नंतर ( अन् निरंतर ! ) स्थिरच होवून बसलेला असतो. तो डिलीट होत नाही ..वा दुरुस्त होत नाही. मनाच्या स्क्रिनवर मग चुटपुटीच्या भावना पसरून जातात. बोलून गेलेले क्षण – झोंबत रहातात. आपल्याला आणि ऎकणार्‍याला. हे सगळं का होतं- बोलताना आपण विचार करीत नाहीत या मुळं. माणसाचं मन ( बुध्दी ) एवढी कार्यक्षम असते, ती त्याच्या जन्मापासून सतत कार्यरत असते- अपवाद फक्त माणूस बोलत असतो, त्या वेळेचा; असं एक मजेदार कोटेशन आहे. फार वर्षांपूर्वी , अशाच पश्चात्तापदग्ध अवस्थेत, चुटपुटीच्या मन:स्थितीत मी डायरीत एक प्रश्न विचारला होता स्वत:ला –
.. त्याचं काय झालं- तू ठरविलं होतंस ना, बोलताना-बोलण्यापूर्वी क्षणभर थांबायचं,त्याचं ?

.. या प्रश्नाला अद्याप मला ना उत्तर सापडलं, ना ठरविल्यानुसार  कार्यवाही होते आहे. परिणामाची जाणिव न ठेवता, बोलून टाकायची  ती सवय ..

.. पण तशी,ती आठवण मनात ठेवून बसलं,की वेगळीच समस्या उभी रहाते पहा- गप्पपणाच घेरून रहातो. अडथळाच होवून बसतो. बोलणं पुढं ढ्कलल्या जात नाही. काल्पनिक विचार-समस्या-परिणाम या मध्ये घुटमळून गेलं, की वाचा थांबते. दातखिळ बसते. ही दातखिळ – अहंकाराची, अहंपणाची,अपमानीत मनाची.

.. पण आपण गप्प बसल्याने समस्या थोड्याच सुटतात ? लोकं पुढे निघून गेलेले असतात,आपल्या गप्पपणाचा भलताच अर्थ बाळगून. सगळं जग पुढे निघून गेलेलं असतं अन् आपण बसलेलो असतो आपला मुखदुर्बळपणा गोंजारीत. एका शायरने क्षणा क्षणाचा हिशोब मांडताना, त्यातलं व्यस्त प्रमाण कसं मांडलं आहे पहा-
चले तो फासला तय हो न पाया लमहोंका
रुके तो पांवोसे आगे निकल गयी सदियां
..आपण चालतो, तेव्हा आपणच चालत असतो, अशा वेडगळ समजूतीत आपण असतो. खरं म्हणजे, आपल्याला याचं भान नसतं,की –
इक पल के रुकने से  दूर हो गई मंजिले
सिर्फ हम नही चलते,रासते भी चलते हैं

..म्हणजे जगण्याची ही ‘ ट्रेड मेल ‘ टेस्ट ज्याला जमते-सावरते, तो भानावर असतो.तो बदलाच्या संपर्कात असतो. माणसाने थांबू नये, आणि त्याच्या साठी कुणी थांबणार नाही.

.. बरं थांबू नये-ठीक आहे. चालू या. मग चालताना हे क्षणा-क्षणातलं अंतर एवढं दूरचं होवून बसतं, की मग पायाला मणामणाचं ओझं बांधल्यासारखं होवून जातं. विशेषत: नाते संबंधात,मैत्री संबंधात संवादाचे असे अडथळे येवून बसतात,की उच्चार थांबून जातात. मग थांबलेल्या उच्चारांचे प्रतिध्वनी उलटे उमटत जातात. मनात काळोख दाटत जातो.साचत जातो.एकमेकांबद्द्लचे राग-गैरसमज-उश्रमा हे सगळं सगळं भोवत रहातं. का ? तर बोलणं रुकल्यामुळे. ( आणि आजकाल मोबाईलमुळे संवादाला – संपर्काला एवढं जुजबी स्वरूप आलं आहे, की संवादाचं मोल खलास झालं आहे. ) आपण थांबून जातो अन् दुरावा दुप्पट वेगाने वाढत जातो.हे जे लम्हे आहेत, त्यातलं अंतर बोलण्यानेच मापायचं एवढंच नाही, चालण्यानेही-शारिरीक हालचाल,गती- याच्यानेही मापायचं असतं. जवळीक ही अशी शरीर मनाने क्षणाक्षणाला साधायची असते. वडिलधारं माणूस, जवळचा मित्र, बायको असं कुणी ; त्याने नुसतं पाठीवरून हात फिरवावा.. केवढी जवळीक वाटते… जवळीकतेचे ते क्षण..

…छे बुवा ! हे क्षणांच्या हिशोबात गुंतलं,की चिल्लर पैशांचा-नाण्यांचा गोंधळ व्हावा तसं होवून तर बसतं अन् शिवाय दिवसाचा हिशोब करता येतो,सांगता येतो. पण हे क्षण – केव्हा सरून जातात,वाळूच्या कणांसारखे निसटून जातात  पहा की-

बेच डाले है दिन के लम्हे
रात थोडी बहूत हमारी है
.

खरंच, दिवसभर बोलण्याच्या नादात, घुम्मेपणाच्या नादात आपण भरकटलेले असतो किंवा ठार होवून बसलेले असतो . हेवेदावे, मतभेद,व्यवहार,
लाभ-हानी,मान-अपमान यांना आपण आपले दिवसभरातले क्षण विकून टाकलेले असतात -विकून टाकलेले. हां, रात्र मात्र थोडी बहूत आपली असते. ही थोडी बहूत म्हणजे काय- झोपण्यापूर्वी, पंख जवळ घेताना, आपण आपल्या पाशी आलेले असतो. .. झोपेच्या त्या गूढ डोहात उरण्यापूर्वीचे ते क्षण . ती वेळ. त्या क्षणांत आपण ‘ जागे ‘ राहून पाहिलं,तर आपण आपल्याला दिसू- स्वच्छ.जसे आहोत तसे. अरे,अरे,पण पाय निसटतात,अन् पाहता पाहता आपण गाढ होवून जातो की. म्हणून तर मीना कुमारी म्हणते –

कई लम्हे
बरसात की सी बुंदे है
ना-काबिले-गिरफ्त
सीने पर आ के लगते है
और हाथ बढा, की इससे पहले-
फिसल कर टूट जाते है
!

Read Full Post »

« Newer Posts