Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for the ‘संजीद:’ Category

दु:खाचा परिसर…

आयुष्यात कधी असे अनुभव येतात,की आपण चक्रावून जातो. गोंधळतो,निराश होवून जातो. आभाळ दाटून यावं तसं निराशा दाटून येते.जिकडे तिकडे कसं मळभ साचून राहिल्यासारखं वाटतं. मग आपलंच हे शरीर आपलाच हा चेहरा आपल्या नेहमीच्या हालचाली- त्यावरही कशी मरगळ येऊन जाते. इतकंच काय, परिसरातल्या -निसर्गातल्या नेहमीच्या गोष्टी- आभाळ,चंद्र,चांदणे,रात्र हे सगळं सगळंच अपयशी – अपेशी वाटत रहातं,अशूभ वाटत रहातं.. केवळ आपणच नाही तर सगळी सगळीच जण एका दु:खाच्या निराशेच्या लाटेत सापडली आहेत असं होतं…

चांद इक बेवा की चूडी की तरहा टूटा हुवा
हर सितारा, बेसहारा सोच में डूबा हुवा
गम के बादल इक जनाजे की तरहा ठहरे हुए,
हिचकियों के साज  पर कहेता  है दिल रोता हुवा..

दु:खाचे आभाळ दाटून आल्यावर चंद्राची कोर विधवेच्या फुटलेल्या कांकणासारखी वाटावी-दिसावी, नेहमी चमचमणारे सितारे आता कसे वेगवेगळे-एकटे विचारात बुडून गेल्यासारखे वाटावेत एखादी प्रेतयात्रा थांबावी तसे ते ढग थांबलेले वाटावेत…दु:खाचा केवढा परिणाम होवून गेला आहे हा.. .

हसरत जयपुरी यांनी शब्दबध्द केलेलं हे दु:ख अभिनेता दिलीप कुमार,गायक तलत महमूद आणि संगितकार शंकर जयकिशन यांनी तेवढ्याच उत्कटतेनं मांडलं आहे…जणू एखादा  जनाजा चालला आहे…ही सगळी जण शोकमग्न होवून त्यात शामील झालेली आहेत…

Read Full Post »

माणसाचं जीवन हे क्षणभंगूर असतं. आयुष्य त्याच्या हाती नसल्याने तो एका अर्थाने पाहिलं तर क्षुल्लकच की.पण माणूस स्वत:च्या सुखदु:खात गुंतून जातो, अन हैरान होतो.
रात्री आपल्याला झोप येत नसते,अवेळी जाग येते,अस्वस्थ होतं याची अनेक कारणं असतात. या अनेक कारणांपैकी एक असतं,मृत्यूच्या भयाचं कारण. झोपणं म्हणजे,संपून जाणं असं वाटतं की काय कोण जाणे, माणूस झोपायला तयार होत  नसतो, अन म्हणतो,की झोप का बरं येत नाही ?
अस्वस्थता असली,की झोप येत नसते-अस्वस्थता का येते-परिणामाची निश्चित माहिती नसते,नेमकं काय होणार आहे, कसं-कधी होणार आहे याचं उत्तर आपल्या विचारांच्या कक्षेबाहेर गेलं,की अस्वस्थता येते आणि-
झोप हरवते.
पण मिर्जा गालिबचं म्हणणं असं,की माणसाचा मृत्यू हा निश्चितच आहे. जावं तर लागणारच निर्विवाद; मग असं (आणि असंच) असल्यावर आता वाद कशाला ? निश्चिंत का रहाता येत नाही,झोप का बरं येत नाही…

मौत का एक दिन मुअय्यन है
निंद क्यूं रात भर नही आती

खरं म्हणजे, आपल्याला माहित असतं- त्याची स्पष्ट जाणिव असते,की आयुष्याचा हा कालावधी ठरलेलाच असतो,मर्यादितच असतो. आपल्याला मरायचं आहेच,मरणारच आहोत आपण. तो मृत्यू नको म्हटलं तरी येणार,ये म्हटलं तरी येणार. त्याचं स्वागत केलं तरी येणार,हाकलून लावलं तरी नाही जुमानणार. मग त्याला का भ्यावं बाबा… एक ना एक दिवस आपल्या घरात आपल्या मृत्यूचा तो ‘सोहळा'(हंगामा) होणारच आहे.

उम्र फानी है तो, फिर मौत से डरना कैसा     ( फानी : नाशिवंत )
इक न इक रोज ये हंगामा हुवा रख्खा है

पण ते वेगळं.आज आत्ता या क्षणाला-मत्यू आलेला नसतो.तो असतो काही अंतरावर. आपल्याला तशी एका अर्थाने ( आणि एकाच अर्थाने )खात्री असते,की आज तरी आपण मरणार नाहीत- खात्री नाही,आपला हिशोब म्हणा. मग आज जे आपण अस्वस्थ झालो असतो,ते आयुष्यातल्या असंख्य विवंचना,काळज्या,चिंतांनी. हा सगळा कोलाहल शरीर-मनात उद्भवतो. आपण हतबल होतो, हे सगळे त्रास संपून जायची इच्छा करतो अन शेवटी मृत्यूचाच आधार घेतो-

ये सब झगडे हैं जाने-नातवां तक ( जाने-नातवां : दुबळ्या जीवाचं अस्तित्त्व)
रहेगा दम कहां तक,गम कहां तक
( हे दु:खांनो-)मला तुम्ही त्रास  देता नं,द्या. केव्हापर्यंत तुम्ही मला त्रास द्याल…या दूर्बळ जीवाच्या अंतापर्यंतच ना?
…एकदा का दम निघून गेला, तर गम राहिलच कुठे…

Please visit :http://hasanyachaaakar.wordpress.com/

Read Full Post »

बेजूबानी…

प्रेम; आणि तक्रार नाही,हे असं कसं होईल ? प्रेमात तक्रार तर असतेच शिवाय या शिकवा-शिकायत मध्ये एक प्रकारची अवीट गोडीही असते.
पण हे कुणाला लागू होतं? जेव्हा दोघंही एकमेकांवर अगदी फिदा असतात त्यांनाच.
सहसा प्रेम हे एकतर्फी असतं. आणि मग अशा स्थितीत तक्रार करायला गेलं, की ऎकून तर घेतल्या जातच नाही,शिवाय नाराजी वाढत रहाते. अबोला बाळगल्या जातो. मग तो प्रियकर दिवस रात्र बेचैन होतो, ती भेटली की तेच तेच सांगत रहातो.तिला त्याच्या सांगण्याबोलण्यावर भरवसा रहात नाही आणि मग हळू हळू प्रेमाचं रुपांतर एका दाहक अशा अनुभवामध्ये होतं. त्याला गप्पपणा घेरतो. तो मग तिला म्हणतो-
हश्र के दिन मेरी चुप का माजरा,
कुछ न कुछ तुमसे भी पुछा जाएगा

त्याला ही खात्री आहे, की प्रलयाच्या दिवशी-ज्या वेळी पापा पुण्याचा हिशोब होईल, माणसाच्या कृत्यांचा जेव्हा पाढा वाचल्या जाईल, तेव्हा ‘हा का बरं गप्प आहे ?’ असा प्रश्न तुला विचारला जाईल. नक्कीच.
आयुष्यभर जिने त्याचं अजिबात ऎकलंच नाही, तो शेवटी आयुष्यातूनच निघून जातो. आणि ती जेव्हा त्याच्या अंत्यदर्शनाला येते, तेव्हा त्याच्या निष्प्राण चेहर्‍यावर जणू हेच उमटलेलं असतं-
सुने जाते न थे तुम से मेरे दिन रात के शिकवे
कफन सरकाओ,मेरी बेजूबानी देखती जाओ..

पण आता तिला याचा पश्चात्ताप होतो आहे. त्याला आपण प्रतिसाद दिला नाही याचं प्रचंड दु:ख सोसत ती आयुष्य काढते. तिचाही अंत होतो, आणि जगाचाही अंत होतो. मग प्रलयाचा दिवस (महशर) येतो. या दिवशी सर्व मृतात्म्यांच्या पापापुण्याचा हिशोब होतो. जीवनभराच्या कृत्यांचा हिशोब लावून त्या त्या नुसार माणसाला स्वर्गात पाठवायचं का नरकात-याचा निवाडा केल्या जातो.
पण हे काय ? ती इथे चक्क गप्प बसून आहे. इतकंच नाही, तर तिच्या चेहर्‍यावर प्रचंड अपराधीपणा दिसतो आहे.पश्चात्ताप ( पशेमानी ) दिसतो आहे. नेहमीच आनंदाने रहाणारी ती-आता अशा अवस्थेत पाहून तिचा तो प्रियकर-ज्याच्या सांगण्या बोलण्याला तिने आयुष्यभर जुमानले नाही- कमालीचा अस्वस्थ होतो. तिथेच तो एक ठरवून टाकतो-
अपने सर ले ली महशर में खताएं उनकी
मुझसे देखा न गया उनका पशेमां होना

निस्सीम प्रेम याहून काय उत्कट असू शकतं…

Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

Read Full Post »

शायर लोकांचे प्रेमाचे व्यवहार फार जालिम असतात. सामान्य माणसासारखं त्यांचं प्रेम काही असं तसं नसतं. जीवन मरणाच्या नुसत्या बाता मारणारे ते वादे-इरादे नसतात,तर कृतीत उतरवून दाखवायची धमक त्यात असते.आणि या शायर लोकांना प्रेयस्या ( वा! काय छान अनेक वचन आहे !) तशाच अगदी जालीम-अगदी जीवघेण्या असतात. एका शायरच्या नशिबाला अशीच एक जीवघेणी प्रेयसी लाभली. तिच्या, ‘निघून जा !’अशा सांगण्याचा एवढा असर त्याच्यावर झाला,की दुसर्याज दिवशी मोठ्या बाका प्रश्नाला उत्तर द्यायची वेळ त्याच्यावर आली-
जनाजा रोक कर मेरा,कुछ इस अंदाज से वो बोले
गली तो हमने कही थी,तुम तो दुनिया छोडे जाते हो
आता हा प्रश्न आपल्यासाठी हसण्याचं निमित्त होतो,त्याच्यासाठी जिव्हारी लागणारा असा.(पण जीवच गेला तर जिव्हार कुठे रहाणार..) आणि माणसाचं जाणं-निघून जाणं असंच तर असतं-सांगणारा असतो,ऎकणारा मात्र निघून गेलेला असतो. ‘अमर’मध्ये म.रफीने गायलेलं एक आर्त असं गाणं आहे-‘ओ दूर के मुसाफिर हमको भी साथ ले ले..’ शकील बदायुनीच्या या गीतामध्ये सुरूवातीला एक शे’र आहे-
चले आज तुम जहां से,हुई जिंदगी पराई
तुम्हे मिल गया ठिकाना,हमे मौत भी ना आई
आलेला माणूस हा जाणारा असतोच. बुलावा आला की त्याला निघावं लागतं,जावं लागतं. पण हे त्याचं जाणं केव्हा असतं-जेव्हा त्याला बोलावणं आलेलं असतं तेव्हा.
पण जवळचा माणूस जातो,तेव्हा आपल्याला का कोण जाणे वाटत रहातं, त्याने इतक्या लौकर जायला नको होतं.त्याने जायची घाई केली…जसं काही त्याला बोलावणं आलं नव्हतं,तोच निघून गेला.आपण होवून निघून गेला.रुग्णाची विचारपूस करायला आपण जातो.त्याच्याशी बोलतो.त्याला बरंही वाटतं. चार सुख दु:खाच्या गोष्टी होतात. प्रकृतीबद्द्ल सांगताना तो सांगून जातो,की फार अशक्त वाटतं आहे, उठायलासुध्दा होत नाही,तेवढी शक्तीच नाही राहिली.त्याला धीर देवून आपण त्याचा निरोप घेतो.
आणि सकाळी निरोप येतो, तो गेल्याचा. आपण सुन्न होतो. कालची विचारपूस आठवत रहाते. आपलं एक मन मग राहून राहून त्याला उद्देशून म्हणत असतं-
कल तो कहते थे,के बिस्तर से उठा जाता नही
आज दुनिया से निकल जाने की ताकत आ गई…

Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

Read Full Post »

‘साहिर’ लुधियानवी आणि ‘शकील’बदायुनी. उर्दू भाषेतले हे उत्तम कवी,साहित्त्यिक. मग ते सिनेसृष्टीत आले. सिमेमांसाठी त्यांनी गाणी लिहिली. असं गाणं लिहिताना, शायरपेक्षा थोडी वेगळी तबियत पाहिजे असते, ती त्यांनी आत्मसात केली. प्रसंगानुरुप, संगीत-चालीच्या अनुरूप शब्द रचना करताना, त्यांच्यातला शायर थोडा नाराजही होत असावा, त्याला गंमतही वाटली असावी.
सिनेमात मुजरा हा गाण्याचा प्रकार लोकप्रिय असतो. कोठीवर नायक आलेला असतो,नशेत असतो, त्या नशेत त्याला संसाराच्या विवंचना,अपराधी भावना अधिक भडक तर्‍हेने जाणवत असतात. आणि याच भडक संवेदनांना घेवून मुजर्‍याची शब्द रचना-संगीत रचना आयोजीत केलेली असते. आयुष्यातल्य़ा सुख दु:खाचा तो एक बाजारच मांडलेला असतो- रंजनाच्या,करमणुकीच्या रुपात.
आता आयुष्याबद्द्ल भाष्य करायचं तर असतं,पण ते कवितेच्या-नज्मच्या स्वरूपात न करता त्याला सादरीकरणाचं रूप द्यायचं असतं. अशावेळेस जातीवंत शायरला शब्दांची एकप्रकारची नशा चढते आणि तो व्यक्त होतो. एका अर्थाने सांगायचं झाल्यास सुख दु:खाचा झणझणीत रस्सा असलेलं हे गाणं असतं. सारंगी आणि तबल्याचा ठेका ही वाद्यं तर त्या तवायफसोबत असणार्‍या गडीमाणसांसारखी असतात. सुख दु:खाला सहमतीची, होकार-नकाराची संगत करणारी ही वाद्यं म्हणजे मुजर्‍याचे जीव प्राण.
‘गंगा जमुना’मध्ये शकीलने ‘माणूस’कसा धोकेबाज असतो, ते सांगितलं आहे-
जहां मे हो जिसे जीना, वो तुझसे दूर रहे,
जो मरना चाहे, वो आकर तेरे हुजूर रहे
आणि ‘बहूबेगम’मधल्या मुजर्‍यातली ही आर्तता पहा-

बरबादे वफा का अफसाना,हम किससे कहें और कैसे कहे
खामोश है लब, और दुनिया को अश्कों की जुबां मालूम नही

एवढं असलं तरी आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य लाभलेलं असतं या मुजर्‍याला-
मनात तीव्रतेने दाटून आलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी जोरदार तरीकाच हवा असतो. त्याच सोबत त्या दु:खाकडे हसून पहायची बेमुर्वत धुंदी.

Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

Read Full Post »

खामोशी

मुझे इ न्कार ही कर दे मगर कुछ गुफ्तगू तो कर
तेरा खामोश सा रहना मुझे तकलीफ देता है .
..

गप्प रहाणं,गप्प बसणं  आणि मौनात रहाणं, स्तब्ध-शांत,निरवतेत रहाणं या दोनही अवस्थांत फरक आहे का नाही. आहे. सूक्ष्म असा फरक आहे. पण या दोनही अवस्थांना एकच मात्रा लागू आहे,एकच शब्द योजलेला आहे-खामोश.खामोशी…

संतापून जावून आपण एखाद्यावर ओरडतो-खामोश ! समोरचा माणूस गप्प होतो. खामोश होतो. पण खरोखरच का तो खामोश झालेला असतो ?
पण खरोखरची खामोशी ही खरंच खामोशी असते का बरं ? आपण खरंच शांत कधी असतो का- आतून आतून अगदी निरव अशी शांतता खरंच आपल्याला अनुभवता येते का बरं…
खामोश न था दिल भी,ख्वाबीदा न थे हम भी
तनहा तो  नही गुजरा, तनहाई का आलम भी
( ख्वाबीदा: – झोपलेला )

तनहाई-एकलेपण असलं की आपण तसं पाहिलं तर शांत असतो,खामोश असतो. पण असं असलं तरी ते खर्‍या अर्थाने एकलेपण नसतंच.
खामोशीचे कायदे कानून वेगळे असतात. नुसतं शांत रहाणं म्हणजे जसं खामोशी नसते, तसंच इथे कोणताही शोर,आरडा ओरडा ‘गैर कानूनी’असतो. दुसरी बाजू अशी,की आणीबाणीच्या परिस्थीतीत गप्प रहाणं आवश्यक असतं,तिथे आवाज उठविणं चुकीचं,आततायीपणाचं होवू शकतं. एका शायरने म्ह्टलं आहे-
खामोशियोंके दश्त में,क्यूं चिखते हो तूम
कानून सब यहां के सदा के खिलाफ है
( दश्त :  जंगल      सदा : आवाज,हांक  )

…पण दश्त म्हणजे आणीबाणी नाही. जंगलाची शांतता अनुभवायची असेल, तर इथले संकेत इथले नियम पाळायला हवेत. महत्त्वाचा आणि प्राथमिक नियम म्हणजे आपण कुणाला ही साद घालायची नाही, बोलवायचं नाही. आपण अनुभवायची  असते  ती  शांततेची वनराई….
पण या खामोशीचे अनेक अर्थ अनेक जण आपापल्या परीने लावीत असतात. ‘जिगर’मुरादाबादी म्हणतो-
उसे सैय्याद ने कुछ,गुल ने कुछ,बुलबुल ने कुछ समझा
चमन में कितनी मा’नीखेज थी, इक खामोशी मेरी
( सैय्याद : शिकारी       मा’नीखेज : अर्थपूर्ण  )

खामोशीने घेरलेल्या माणसाचं निकटचं माणूस त्याची खामोशी पाहून अस्वस्थतेनं घेरून जातं. जवळच्या माणसाचा गप्पपणा पाहून त्याला करमत नाही,राहून राहून मनात निरनिराळे विचार येत रहातात ;  आणि मग न रहावून त्याला सांगावं वाटतं,’मुस्कुराओ के जी नही लगता..’  खरंच, खामोश मुस्कुराहट किती बोलकी असते…आणि ते बोलणंसुध्दा पहात रहावं वाटणारं.
‘कंगन’ मध्ये निरूपा रॉय  हीच तर विनंती करते आहे, गीतकार राजेंन्द  कृष्ण यांच्या शब्दांतून संगीतकार चित्रगुप्तच्या चालीतून, …अशोक कुमारला

: अर्थपूर्ण )

Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

Read Full Post »

घर

एका व्य़ंगचित्रात एक माणूस टेलिफोन बूथवरून फायर ब्रिगेडला फोन करून सांगतो आहे : तुम्हाला ताबडतोब सापडेल माझं घर- गल्लीतलं तेवढंच तर घर आहे,आग लागलेलं..
आपण रहातो,त्या घराचा पत्ता अशा तर्‍हेनं देणं यावरून आपलं अन घराचं नातं याबद्दल  एक गोष्ट लक्षात येते,ती म्हणजे आपली उपरोधाची तबियत. एका शायरने आपल्या प्रेयसीला घरी येण्याचं निमंत्रण देताना घराचा पत्ता असा दिला-
सारी बस्ती में फकत मेरा ही घर है बे-चिराग
तीरगी से आपको मेरा पता मिल जाएगा

( बे-चिराग : प्रकाश नसलेलं         तीरगी  : अंधार  )
‘गालिब’ ची प्रेयसी घरी भेटायला आली, तर गालिबला त्यावर विश्वासच बसेना. तिचं घरी येणं ही ईश्वराचीच कृपा आहे असं वाटतं त्याला अन त्याची अवस्था काय होते?
वो आए घर में हमारे,खुदा की कुदरत है
कभी हम उनको कभी अपने घर को देखते है

आपलं घर.. आपण चोवीस तास घरात रहातो, पण जेव्हा कुणी वेगळं माणूस घरात येतं,तेव्हा हेच आपलं घर आपल्याला वेगळं वाटत असतं. आपण त्या दुसर्‍याच्या नजरेतून आपल्या घराकडे पहातो, आणि घराचं एक वेगळं रूप आपल्याला जाणवत राह्तं…

अब तक न खबर थी मुझे उजडे हुए घर की
तुम आए तो घर बे-सरो-सामां नजर आया
(‘जोश’मलिहाबादी)
…तू घरात आलीस आणि लक्षात आलं माझं घर किती उजाड आहे…कसलंच सामान नाही घरात.

आपल्या या घरातल्या प्रत्येक निर्जीव वस्तू खरं म्हणजे आपल्याशी संवाद साधण्याच्या प्रयत्नात असतात. आपल्यालाच सवड नसते आणि म्हणूनच त्याची खबरही नसते. जिवाला जेव्हा लागतं,घरात जेव्हा आपण एकले असतो, तेव्हा आपल्याला घरातली प्रत्येक वस्तू जणू विचारीत असते, आपल्याला त्यांचं ते विचारणं जाणवत असतं-झोंबतही असतं…
घर की हर इक  शै पूछती है
कौन तुझको कर गया तनहा

…आणि मग एकलेपणा असह्य होतो. दारात उभं राहून तिच्या दिशेने आवाज द्यावा वाटतो,
तू जो आए तो इस घर को संवरता देखूं
एक मुद्दत से जो विरां है,वो बसता देखूं

please visit another  blog :       http://hasanyachaaakar.wordpress.com/

Read Full Post »

आयुष्याची लांबी

डॉ.इक्बाल यांनी म्हटलं आहे-

तू इसे पैमान:-ए-इमरोज व फर्दां से न नाप
जावेदां,पैहम रवां, हरदम जवां है जिंदगी
( पैमान: – मोजमाप,इमरोज : आज,   फर्दां : उद्या,   पैहम : निरंतर, र वां : प्रवाही )

दैनंदिन घटना, समस्या, काळजी ( आजाराची-मृत्यूची ?) अशा बाबीं कधी घ्रेरून येतात आणि मग गोमाशांनी एखादं जनावर त्रस्त होवून जावं तसं होवून जातं. काही खरं नाही गड्या.. असं वाटत जातं. कधी चिंतेचे एवढे काळे कुट्ट ढग जमा होतात, की वाटतं सरला आता खेळ सगळा, खल्लास ! हे खल्लास होणं केवळ शरीरानेच नाही तर अनेक अर्थांनी असतं. काही सुचत नसतं,संपून गेल्याची जाणिव अगदी रिकामं करून टाकीत असते.आयुष्याची निरर्थकता वगैरे तत्त्वांची आपण बडबड करीत असतो.  अशा वेळेस डॉ.इक्बाल सारखे विचरवंत आपल्याला समजावितात, की केवळ दिवस व रात्रीच्या फुटपट्टीने तू आयुष्याची लांबी-रूंदी मोजू नकोस…आयुष्य हे निरंतर आहे, प्रवाही आहे,सतत चालणारं आहे.

पण होतं असं, की हे पटून तर जातं मात्र मनात ती उदासी निर्थकता भरलेली असल्याने मनाला आलेला ओशटपणा काही जात नाही. हा ओशटपणा जातो, ते एखादं वडिलधारी माणूस जेव्हा तोच आशय सुरातून सांगतो, समोर येवून सांगतो तेव्हा. दिन और रात के हाथों नापी नापी एक उमरिया साँस की डोरी छोटी पड़ गई लम्बी आस डगरिया भोर के मन्ज़िल वाले उठ कर भोर से पहले चलते ये जीवन के रस्ते… ‘आशीर्वाद’ मधल्या या गीताचे गीतकार आहेत,गुलजार. दिवस-रात्रीच्या हातांनी हे आयुष्य मोजलं. श्वासाची दोरी तोकडी पडली. दीर्घप्रवास चालूच आहे… अशोक कुमारसारखा दिर्घ आयुष्याचा धनी, अभिनयाचा धनी हे सांगतो, आणि सांगता सांगता निघूनही जातो, तेव्हा आयुष्याचा हा प्रदीर्घ प्रवास आपल्याला जाणवत रहातो आणि दम खावून आपणही त्या प्रवासाची नव्याने तयारी करीत जातो. हे असं चालतच रहातं… डॉ.इक्बाल यांनी हे सांगितलं, ते 1938 मध्ये गेले ,तेव्हा गीतकार गुलजार  यांच्या आयुष्याची पहाट झालेली होती;त्यांचा जन्म 1934 चा.

 

please visit another  blog :       http://hasanyachaaakar.wordpress.com/

Read Full Post »

हवेची हलकीशी झुळूक असते.तसं पाहिलं तर तिचं अस्तित्त्व ते काय-महत्त्व काय-काहीच तर नाही की. कसल्याच जड वस्तूंना या झुळका जाणवतही नसतात, त्यांना पत्ताही लागत नसतो.
पण शेतातली डुलणारी रोपं-गहू,साळ किंवा मोहरीची रोपं जेव्हा आपल्या बहराला घेवून उभी असतात,त्यावेळी हवेची झुळूक त्यांच्यावरून गेली,की पाहता पाहता सगळ्या रोपांचा एकत्रित पिसारा होतो,डुलायला लागतो.त्यांच्या त्या हलण्या डुलण्यात ना शब्द असतात,ना स्वर असतो. एक तेवढी लहर सगळ्या रानावरून फिरते अन सगळ्या पिकावर मोहोर उठतो,रोमांच उठतात. कसल्याही’बाह्य’ घटनेशिवाय होणार्याक या हालचाली,ही अस्वस्थता.
आतूरलेल्या मनांचंही तसंच असतं. त्यांना ना शब्दांची गरज ना संवादाची आवश्यकता असते. त्याशिवाय कधी स्थिती अशी येते,की ना शारीर-जवळीकीची मुभा असते ना साद प्रतिसादाचं स्वातंत्र्य असतं. अशावेळी सूक्ष्म संवेदनांची लहर येवून जाते अन केवढी अंदोलनं निर्माण होतात !

बज्म-ए-अगियार में हरचंद वो बेगाना रहे
फिर भी हात मेरा आहिस्ता दबा कर छोडा
चार लोकांसमोर ओळख दाखविता येत नाही. नजरेनेसुध्दा काही सूचीत करता येत नाही,सगळ्यांचं लक्ष असतं. अशा वेळेस सगळ्यांशीच हात मिळवणी करता करताच आपल्या माणसाने आपल्याशी हात मिळविताना, तो हलकासा दाबून धरल्यावर संवेदनांचं जे आदान-प्रदान होतं- त्याची खबर कुणालाही नाही,ही जाणिव आणि संवेदनांचा तो ‘निरोप’ यामुळे सगळ्या शरीरावर केवढे रोमांच उठतात… पण उदासीच्या संवेदना फार अस्वस्थ करणार्‍या असतात-

वक्त-ए-रुखसत,’अल्विदा’लफ्ज कहने के लिए
वो तेरे नाजूक लबोंका थरथ्रराना याद है…
निरोपाची ती सगळी भावना शब्दांपेक्षा थरथरणार्‍या  ओठांत जी समावलेली होती, ती कायम मनात कोरून ठेवलेली असते.
असा निरोप फार बेचैन करून जात असतो. आपण निघून तर गेलेलो असतो,पण निघताना संवेंदनांचं जे आदान प्रदान झालेलं असतं, त्यामुळे ताटातूट होण्यापेक्षा माणूस एकजीव होवून जातो.
…आणि अशा एकजीव झालेल्या माणसाचं कशात म्हणता कशातच लक्ष लागत नाही…

हर मंजिले-हयात से गुम कर दिया मुझे
मुड मुड के राह में वो तेरा देखना मुझे


Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

Read Full Post »

आंसू

‘आंसू तूम अब कभी न बहना’असं लतानं गायलेलं फार जुनं फिल्मी गीत आहे. मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी अभिनयाला जादा कष्ट न होवू देता काम करणारे हे डोळ्यातले दवबिंदू सिनेमात फार फार उपयोगाची ‘प्रॉपर्टी’ असते. ‘ये आंसू मेरे दिल की जुबान है’,’आंसू भरी है ये जीवन की राहे’, ‘भर भर आयी अखिंया’, अशी कितीतरी गाणी प्रसिध्द आहेत.

डोळ्यांच्या पापण्याआड असणार्‍या या ओलसर संवेदना केवढ्या आतूर,केवढ्या कार्यक्षम असतात;आणि गजब म्हणजे, आपल्याला त्याचा पत्ताही नसतो. खोल जिव्हारी अशी जखम बुजलेली असते,ती बुजून गेलेली आहे असं आपण बजावीतही असतो, पण रस्त्यात अचानक-अनाहूतपणे परिचीत माणूस नजरेला यावं,तशी ती आठवण उमटते आणि लागलीच डोळ्यांची झरझर सुरू होते…
आया ही था खयाल, के आंखे छलक पडी
आंसू किसी की याद के कितने करीब है.


मीना कुमारी. सौंदर्यवती,अभिनेत्री आणि शायरा. तिच्या प्रत्येक शे’रमधून एकप्रकारची झिरपणारी भावना जाणवत असते.
काम आते है, ना आ सकते है बेजां अलफाज
तर्जूमा दर्द की खामोश नजर होती है
या शे’रमध्ये दु:ख व्यक्त करण्यासाठी खामोश नजर हाच उपाय असतो,असं ती म्हणते. एका शे’रमध्ये ती म्हणते,डोळ्यांतून ओघळणार्‍या थेंबाची जाणिव कुणी करून घेतली, तरच तो थेंब-त्याला अश्रूचं मोल येतं. दखल न घेतल्या गेलेलं दु:ख… या दु:खाला खरंच काही मोल असतं का…विचारपूस न होणं,त्या दु:खाला आश्रय न मिळणं हा दु:खाचा खरा दाहक भाग असतो-

जिंदगी आंख से टपका हुवा बेरंग कतरा
तेरे दामन की पनाह पाता तो आंसू होता

Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

Read Full Post »

Older Posts »