Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for the ‘फलासिफ :-ए-जिंदगी’ Category

जीएंच्या एका कथेत नायक गावाबाहेर असलेल्या जंगलात एका गोसाव्याला भेटतो. या गोसाव्याबद्दल त्याने ऎकलेलं असतं,की याला भविष्य स्पष्ट दिसत असतं. माणसाचं सगळं भविष्य तो स्पष्ट पाहू शकत होता. एका ठिकाणी बसलेला भल्या मोठ्य दाढी मिशा असलेला हा गोसावी; नायक त्याला विचारतो, तू भविष्य जर एवढे स्पष्ट सांगतोस तर गावातल्या लोकांनी तुला एवढ्या बाहेर का बरं आणून बसविलं…. गोसावी त्याला आपल्या छातीवरची दाढी बाजूला काढून दाखवितो-सगळ्या छातीवर डोळे असतात. गोसावी सांगतो, ‘माणसाला भविष्य हवं असतं, पण भविष्याकडे निर्देश करणारं फक्त. सरळ स्पष्ट भविष्य कुणालाच नको असतं.’ हे स्पष्ट भविष्य म्हणजे लखलखीत सत्य. कुणाला पाहिजे असतं… ते सोसणारं असतं का माणसाला… माणसाला सत्य पाहिजे असतं, ते गुळमट; विषेशत: त्याच्याबद्दल काही सकारात्मक असेल तरच. नसता सत्त्याचा गळा घोटायला तो मागे पुढे पहाणारा नसतो.
….एका उर्दू शायरने म्हटलं आहे-
मेरे हातों ही मेरा कत्ल होगा,
मेरी बातों में सच्चाई बहोत है

खरंच, आपल्याला सत्त्य-स्पष्ट असं पाहिजे असतं का बरं… आपण सत्त्याचा उदो उदो करतो, मी खरंच सांगतो, मी कधी खोटं बोलत नाही, असं आपण नेहमी म्हणतो, खरंच का बरं आपण सत्त्य तेच बोलत असतो..विशेष म्हणजे खरंच का आपल्याला निर्मळ सत्त्य असं हवं असतं… त्या सत्त्यात जर आपला अहंकार गोंजारणारं काही नसेल तर ते आपल्याला रूचेल का,पटेल का…
आणखी एका शायरने म्हटलं आहे-
मजा देखा मियां सच बोलने का
जिधर तूम हो उधर कोई नही है

Read Full Post »

संवेदना जास्त उत्तेजीत झाल्या, की त्या संवेदनांची अभिव्यक्ती ठळकपणे होणं स्वाभावीक असतं. सुख दु:खाच्या भावना तीव्रतर झाल्यावर हळूवार तर्‍हेने,सूचक तर्‍हेने ते सुख दु;ख व्यक्त होणं कठीण होतं. अवख़ळपणाने त्या भावना व्यक्त होतात आणि असं व्यक्त होताना सरळ सरळ सांगितलं जातं किंवा जीवन व्यवहाराचे नियम भक्क शब्दांत आकाराला येतात. नशेचा अंमल वाढला की, असं हमखास होतं.

या भावना गडद तर्‍हेने व्यक्त होणार्‍या. कोल्हापूरी मटनाचा तांबडा-पांढरा रस्सा मनसोक्त ‘ओढताना’ डोळ्यात पाणी यावं अन मजाही यावी, तसं उत्तेजनेच्या मन:स्थितीत जीवन व्यवहाराबद्दल विचार-भावना-तत्त्वद्न्यान कसं तिखट आग असलं की पोट भरतं.

हिंदी गाण्यात मुजरा ही अशी भूक क्षमविण्यासाठी योग्य प्रकार. मुज्रा म्हणजे,  कलावंतिणीने बसून म्हटलेले गाणे असा त्याचा अर्थ आणि आणखी एक अर्थ म्हणजे, कमी केलेला-वजा केलेला. दोनही अर्थ सिनेमातल्या मुजर्‍याला लागू होतात. ‘ठुकरा रहा था मुझको कई दिन से ये जहां,आज मैं इस जहां को ठुकरा के पी गया’ असा साहिरचा नायक ( प्यासा ) म्हणतो,ते कलावंतिणीच्या बैठकीत येवूनच.मुजर्‍यातसुध्दा अशा भावना कशा रस्सेदार तर्‍हेने व्यक्त होतात पाहा –

जो लुटते मौत के हाथों,तो कोई गम नही होता 
सितम इस बात का है जिंदगी ने हमको लूटा है  

आणि गंमत म्हणजे याची अनुभुती येते ते तिथेच- तिच्या कोठ्यावर !अर्थात आपली कोठी म्हणजे थिएटर !

या मुजर्‍याची शब्द रचना अगदी त्या मन:स्थितीला योग्य अशी. साजेशी अशी. भडक शब्दांत सुख दु:ख-विशेषत: स्वत:च्या दु:खाचं उदात्तीकरण हे या मुजर्‍याचं वैशिष्ट्य.  ‘भरोसा कर लिया जिस पर उसी ने हमको लूटा है,’  किंवा  ‘सनम तू बेवफा के नाम पर ‘  ही अशी काही उदारहरणं..

Read Full Post »

लहानपणात कुणी घसरून पडलेलं पाहिलं की अगदी खळखळून हसू यायचं. माणसाची फजिती आणि त्याचं खजील होणं याच्या एवढं करमणूकीचं प्रकरण दुसरं काही नसायचं. पुढे जसजसं मोठं होत गेलो, तसतसं त्यातली करमणूक कमी कमी होत गेली-म्हणजेच हसू कमी कमी होत गेलं. आता जेव्हा असं वय आलेलं आहे-ज्या वयात हात पायाला फ्रॅक्चर झालं तर किमान दोन महिने ते जुळणार नाही, याची जाणिव झाली आणि कुणी समोर घसरून पडलं तर चटकन त्याच्या मदतीला धावावं वाटतं;त्याला काही जास्त तर लागलं नाही ना या विचाराने अस्वस्थ होत रहातो.
जीवनव्यवहारातले टक्के टोणपे खाल्ल्यावर आता हसण्याचे विषय बदलले आहेत;किंबहूना आता हसण्यासारखं काही आहे का राहिलं,याचा विचार येतो आहे. पक्ष्याला पिंजर्‍यात द्डपून ठेवणं,पिलाला बांधून ठेवणं हे सगळं आता अघोरी वाटत आहे. जाणिवांचं स्वरूप बदललं की कसा अनुभव येतो पहा : अंत्यविधीच्या वेळेस मुतदेहावर उदबत्ती लावलेली, साबणाने त्याला स्नान घालून अत्तर लावलेलं एकदा जवळून पाहिलं-ते अनुभवलं, त्या सगळ्यांचे वास मनात असे भरून राहिले होते, की पुढे किती तरी दिवस या वासांना संदर्भ लागायचा तो संपून जायचा. वस्तू त्याच, ज्यांचा नेहमी वापर होतो, मनाच्या उल्हासासाठी,भक्तीच्या-मंगल वातावरणासाठी; पण कधी संदर्भ बदलले की विपरीत होवून जातं. एक शायर सांगतो-
एहसास के अंदाज बदल जाते हैं वर्ना
दामन भी उसी तार से बनता है कफन भी

…एकाच सूताने-एकाच धाग्याने दोनही वस्त्रं विणली असतात; पदराचे ते वस्त्रच आणि मृतदेहावर पांघरायचं कापड;ते पण त्याच धाग्याने बनलेलं की ! पण जाणिवेचे पदर वेगळॆ झाले की भावना बदलून जाणार…
एकाच धाग्याने बणलेली वस्त्रं जशी वेगळी वेगळी असतात तसंच माणसांचं ही असतं. अगदी ‘फिल्मी’ भाषेत सांगायचं झाल्यास एकाच आईचं एक पोरगं चोर तर एक पोरगं पोलीस असतं. एक सभ्य तर एक वाईट मार्गाचा. एकाचा वावर अंधारात तर एक प्रकाशाकडे जाणारा…
डॉ. इक्बाल यांनी अशीच एक तफावत सांगितली आहे-
परवाज है दोनों की इसी एक फिजां में
करगस का जहां और है,शाहीं का जहां और
एकाच वातावरणात दोनही पक्षी वावरतात, एकाच आभाळाखाली झेप घेतात- ससाणा आणि कावळा;
पण दोनही पक्ष्यांची प्रकृती वेगळी, दोघांचं विश्व वेगळं…

Read Full Post »

आमचे दादा-आईचे वडिल परभणीला सरकारी दवाखान्यात कम्पाउंडर होते. आईची बाळंतपणं तिकडेच झाली दादांकडे. मी आईसोबत असायचो. मी असेन पाच सहा वर्षांचा. दादांचं भरलेलं घर,वाढता खर्च आणि तुटपुंजी मिळकत ही तफावत मला लक्षात यायची, पण माझं ते शाळकरी वय असल्याने तेवढी जाणवायची नाही. मनात सतत असायचं ते घरात आंबटवरणाचं जेवण. चहाचं काम दादाच करायचे. संगीत नाटक, संगीताचा छंद असलेले आमचे दादा.
नवरात्रात तर देवीच्या आरत्यांचा उरूस या घरी भरलेला असायचा. आमच्या घरचं दैवत होतं बालाजीचं-गिरी बालाजीचं.आमच्या घरी हे वातावरण नसायचं; त्यामुळे या देवीच्या सामूहीक आरत्या, हे वातावरण मला फार आवडायचं. लाकडी वेलबुट्टीदार मोठ्या आकाराचं ते जाळीदार देवघर. त्यात रेणूका माता. आरत्यांच्या तयारीत संध्याकाळपासूनच आजी,मामी वगैरे असायच्या. महातपुरीकरांच्या त्या वाड्यातली-गल्लीतली स्त्री-पुरूष मंडळी घरात जामायची. मामा,आजोबा संगितातले जाणकार असल्याने आरत्यांतून करण्यात येणार्यास त्या अवाहनांना स्वरांचं-ठेक्यांचं छान रूप लाभलेलं असायचं. पाटावर उभे राहून आरतीचं तबक घेवून दादा रेणूका मातेच्या आरत्यांत सहभागी व्हायचे आणि त्या समूह स्वरांत मी- गर्दीत वडिलांचं बोट धरून चालावं तसं दादांच्या स्वरांवर-त्यांच्या आवाजावरच लक्ष ठेवून असायचो.
-आणि दादांची मिळकत आणि वाढत्या खर्चाची ती तफावत मात्र मला त्या वेळी तीव्रतेने जाणवायची. अगदी तीव्रतेने. दादांनी आरतीतल्या ओळींचा स्वर धरलेला असायचा-
अजूनी अंबे तुजला माझी करूणा का येईना हो….
गर्दीत वडिलांचं बोट धरलेलं असताना कधी भीतीने अधिक गच्च व्हायचं,मुठीतला घाम जाणवायचा. …त्या ओळींतून दादांच्या स्वरातला ओलावा मला जाणवत रहायचा.समूह स्वरांतून एकटा-वेगळा असा त्यांचा आवाज,त्यांचं एकट्याचं ते देवीला केलेलं आवाहन. त्या दाटीतून गर्दीतून दादांच्या जवळ मी सरकायचो. मला वाटायचं,त्या आरतीतून दादा सांगत असावेत देवीला, आपल्या कर्जाबद्दल, दुकानांच्या वाढत जाणार्‍या उधार्‍यांबद्दल,पैशाच्या गरजेबद्दल,पैशा अभावी वाटत रहाणार्‍या अपराधी भावनेबद्दल…एकदा परभणीला ‘देव दीनाघरी धावला’ हे नाटक आलं होतं.(फिरता रंगमंच हे त्या दिवसांत अप्रूप होतं.) घरासमोरून जाहिरातीचा टांगा जात होता आणि महिन्याअखेरीच्या त्या आर्थिक विवंचनेत असलेले दादा…त्यांची चुटपुट आजही मनात भरून आहे…‘काय करावं रे.. एवढं चांगलं नाटक..’
आज दादा नाहीत. ते केव्हाच निघून गेले. आता सगळ्यांचीच आर्थिक परिस्थिती चांगली झालेली आहे. मातीची घरं जाऊन फ्लॅटमध्ये रहात आहेत सगळे. चाळीस पावरचा पिवळा बल्ब जाऊन भक्क लाईट आहेत; एवढे भक्क की घरात अंधाराचा कण-क्षण कुठे सापडणार नाही,शोधूनही.
आजही मामांकडे रूढीनुसार नवरात्रात आरत्या होतात. आजही मी एक दिवस का होईना जातो. मामांची नातवंडं आरत्यांची पुस्तकं हातात धरून उत्साहाने आरत्यांत सहभागी होत असतात-
विपुल दयाघन गरजे तव ह्रदयांबरी श्री रेणूके हो !
पण- माझ्या मनात आज- आजचे हे दिवस आणि ईश्वराचं स्मरण यांची सरमिसळ झालेली आहे. मनात करूणा आहे, पण या करूणॆत चंचलतेचा समावेश झाला आहे. विवंचना आहेत, पण या चंचलतेपायी त्या ईश्वरापुढे त्या मांडणं गैरजरूरी वाटत आहे. लहानपणात नाही का,आईनं काही विचारलं तर मी चिडून म्हणायचो तिला- अं! तुला काय माहित आहे गं- उगं गप्प बस !
आज दिवस उजेडाचे आले आहेत, महत्त्वाचं म्हणजे वडिलधार्‍यांचं अर्धं अधिक आयुष्य हाता तोंडाची मिळवणी करण्यातच गुजरलं, तसं आज नाही.
…म्हणून तर आज जाणवतो आहे तो शे’र… निघून गेलेले ते शायर जावेद नासेर यांचा-

   अंधेरा हो तो तुझको पुकारूं यारब !
   उजालों में मेरी आवाज बिखर जाती है

अंधारात,संकटात ईश्वराची तीव्रतेने आठवण व्हावी,दु:खामुळे आवाजात-आवाहनात आर्तता यावी आणि तेच आवाहन तीच, आठवण प्रकाशात केलेली असताना, भल्या दिवसांत केलेली असताना लक्ष विचलीत झालेलं… खोडकर पोराचा आभ्यास असावा तसं ते चित्त…
म्हणून तर ईश्वराचं अस्तित्त्व जाणवत रहातं –दु:खात,अंधारात.
     हम्द म्हणजे स्तोत्र,स्तुती. आरत्यांमध्ये ईश्वराची,देवीची स्तुती असते. तसंच हम्दमध्ये अल्लाहची स्तुतीच असते. अशीच एक हम्द संगीतकार उषा खन्नाने स्वरबध्द केलेली आणि गायलेली आहे; मै हूं अलादिन नावाच्या चित्रपटात….

Read Full Post »

(जर्रा : कण )
संगीताच्या मैफलीमध्ये तबल्याची संगत असते,संगतच. पण आपण कधी पहातो, गाणं किंवा ते वाद्य संगीत रंगात आलं,की हा आपल्या हरकती दाखवायला लागतो-तबलावादक. एवढ्या त्याच्या हरकती,की मुख्य कलाकाराचा खोळंबा व्हावा. कोणत्याही कार्यक्रमात सूत्र संचालक हा दुवा असतो,कलावंत आणि श्रोत्यांमधला. पण या हौशी गृहस्थाला त्याचं भान रहात नाही अन तो स्वत:च बोलत सुटतो,सांगत सुटतो. गुरू गौरव समारंभात शिष्याचाच रूबाब दिसत असतो.नेत्यापेक्षा त्याच्या कार्यकर्त्यांची वर्दळ आणि ‘हुशारी’ दिसत रहाते. हाताखालच्या कुणालाही, त्याची चूक दाखवायला गेलं-काही सांगायला गेलं, की ‘अन्याया’च्या भाषेची त्याची प्रतिक्रिया होवून जाते.उजळणी शिकण्याच्या आज के दौरवयात मुलाने आईबाबांना वर्तणूकीचे दाखले द्यावेत,देवासमोरच भक्तांची अरेरावी पहायला मिळावी…
ज्या गोष्टी मुळात लहान आहेत,त्यांना लहान संबोधणं हा अवमनाचा मुद्दा समजला जातो आहे. त्यामुळे कर्तुत्त्वाने उंची गाठणारा आणि त्या मार्गाला नुकतीच सुरूवात केलेला, यांचं नातं बिघडत आहे. …’समभावा’च्या वृत्तीची ‘भावकी’ होवून बसली आहे- मी पणाची. एक शायर हतबल होवून तिरकस तर्‍हेने सांगतो-
आज के दौर में कमतर को न कमतर कहिए
जर्रे कहते हैं,हमें  महरे -मुनव्वर कहिए
आज कुण्या लहानाला ‘लहान’ म्हणू नका रे बाप्पा! त्यांची चूक दाखवू नका. कारण आज चमकणारे कणसुध्दा, त्यांना सूर्य म्हणा-चमक नाही ही; असं बजावीत आहेत…दरडावीत आहेत…
जर्रा-एक कण या कणावर सूर्याचा-चंद्राचा प्रकाश पडतो अन तो चमकतो. चमचमतो. पौर्णिमेच्या रात्री तलावातल्या जललहरींवर चंद्राचा प्रकाश पडतो आणि असंख्य लहरींचा सुरेख चमचमणारा खजाना पाहून मन आनंदीत होतं. पाण्याच्या त्या कणांना-त्या थेंबांना लाभलेलं हे प्रकाशीत रूप हे त्यांच वैभव आहे,त्यांचं वैशिष्ट्य आहे- आणि हीच त्यांची मर्यादाही आहे. नेमकं याचंच भान दुर्देवाने हरपून जातं. मग जेव्हा तो कण स्वत:ला सूर्यच म्हणू लागला,चंद्रच असल्याचा आग्रह धरू लागला, तर त्या जललहरींचं कलहात रूपांतर व्हायला किती वेळ लागणार ? स्वत:ची मर्यादा बाळगून सहिष्णू वृत्तीने रहाणं-मोठ्याला मोठं म्हणणं,लहानाला लहान म्हणलं तर त्यात गैर काही नाही अशी समजूत बाळगणं हे नितांत गरजेचं आहे. ‘लहान’पणाची जी चमक आहे, तेच त्याचं वैशिष्ट्य असतं, त्याचं मोल- त्या मोलाचा विसर पडणं ही अन्यायाची बाब नाही,दुर्देवाची बाब आहे.
नुमाया जर्रे जर्रे में वो ही तस्वीरे-जानां है ही जाणिव आपल्या सगळ्यांना समृध्द करते. आणि हीच क्षणभर-कणभर समृध्दी आपलं सार्थक असतं. अकबर इलाहाबादी यांचा एक शे’र आहे-
हर जर्रा चमकता है अनवर-ए-इलाही से
हर सांस ये कहती है,हम है तो खुदा है.
( ज्रर्रा जसा चमचमतो,तसाच या शे’रचा आशयसुध्दा : ईश्वरी प्रकाशाने प्रत्येक कण उजळून निघाला आहे, प्रश्नच नाही;तथापि, एकदा वाटतं, प्रत्येक श्वासागणिक जाणिव होते, ती अशी,की आम्ही आहोत, ‘म्हणूनच’ ईश्वर आहे, म्हणावं, का आम्ही आहोत, ‘म्हणजेच’ ईश्वर आहे असं म्हणावं ! म्हणजे,ही कृतद्न्यतेची भावना आहे, की ‘जर्रेगिरी’च्या उध्दटपणावर ‘अकबर’ यांनी नेहमी प्रमाणे व्यंग केलं आहे !) असो.

प्रत्येकाने आपली मर्यादा बाळगून असणं हे संस्कृतीचं लक्षण आहे. त्यातच त्याचं मोल आहे आणि महत्त्वही आहे. ते स्वाभावीकही आहे.तसं जर नसेल, तर तपश्चर्या अन लक्ष लावून पहाणं सारखंच होवून बसेल की ! भक्ताने भक्तीच्या मार्गाने मोक्षाच्या प्राप्तीची इच्छा सोडून ईश्वरी अवताराचाच आग्रह ठेवावा हे विपरीत आहे.
प्रकाशाने विलक्षण चमकून उठणारा जर्रा-कण आणि अनुभुतीने विलक्षण जीवंत झालेला लम्हा-क्षण; तीच त्याची क्षमता आणि क्षणभराचं-कणभराचं अस्तित्त्व हेच त्याचं वैशिष्ट्य. माणूससुध्दा तसाचे की. कालप्रवाहाच्या दिर्घ व्यापापुढे त्याचं हे लहानपण,त्याचं हे मर्यादित आयुष्य;यातच खरी मौज आहे.
क्या गजब है के इंसा को नही इंसा की कद्र
हर फरिश्ते को ये हसरत है के इंसा होता
-दाग
देवदूताला माणसाच्या थोडक्या अस्तित्त्वाचा मोह होतो अन माणूस मात्र मोठेपणाचा आव आणतो-हाव धरतो.
क्षण एक पुरे प्रेमाचा असं,प्रेमाच्या प्रत्ययकारी क्षणाची अनुभुती घेणार्‍या कवीचं म्हणणंच एका शायरने असं मांडलं आहे-
इश्क फना का नाम है, इश्क में जिंदगी न देख
जल्वा-ए-आफताब बन, जर्रे में रोशनी न देख
प्रेम क्षणाचं असतं,त्याच्या कडून चिरंतनाची अपेक्षा ठेवू नको. ईश्वरी कृपा दृष्टीचं रूप हो,कृपा करणारा होवू नको.

(उर्दू शायरीतले हे शे’र.तसं पाहिलं तर गजलच्या या दोन ओळी. पूर्ण गजल,दिर्घ काव्यातल्या अनुभवाचं व्यापक स्वरूप शे’रमध्ये नसतं. आरशाच्या तुकड्यांत आभाळ दिसावं, तसा तो शे’र अन त्यातून जाणवणारं जीवन… …शे’रचे हे जर्रे चमकत असतात,भुरळ पाडीत जातात…)

Please visit my blog :http://hasanyachaaakar.wordpress.com/

Read Full Post »

माणसाच्या दिर्घ म्हणविल्या जाणार्‍या आयुष्यात अनेक टप्प्यांचे प्रवास असतात-
सुख,दु:ख,हसू-आसू,कष्ट-भोग,काय काय. सुखाच्या दिवसात शरीर मन कसं फुलून आलेलं असतं.पण कधी आकाशातून काळे ढग जातात,तेव्हा पठारावर त्यांची सावली पडावी,सगळा परिसर झाकोळून जावा तसं होतं अन संकटांना तोंड देता देता आपलं शरीर मन जणू कोळपून जातं. पण आयुष्य संपलेलं नसतं,प्रवास चालूच असतो. पण संकट-ते येऊन गेलेलं वादळ असं असतं,की आपला चेहरा मोहरा बदलून जातो-

चेहरे की चमक छीन ली हालात ने वर्ना
दो चार बरस में तो बूढापा नही आता

पण हे झालं, कष्टांशी प्रत्यक्ष लढण्यामुळे जी शरीर मनाची झीज होते,त्याबद्दल. गंमत अशी,की त्याच सोसलेल्या-भोगलेल्या दु:खाचं माणूस नंतर भांडवल करतो.कष्टी चेहरा करून वावरतो. सुखाचे दिवस आले, तरी त्याच्या चेहर्‍यावरचा तो कळंकलेपणा निघून जात नाही. शिवाय तिच सवय एकदा झाली,की माणूस एकांतातसुध्दा वाकड्या चेहर्‍यानेच रहातो.(-रहातो की काय! एकदा बघायला पाहिजे स्वत:कडे ) पण अशा कष्टी चेहर्‍याने अंतिमत: नुकसान कुणाचं होणार- आपलंच ना. कुणाला काय देणं घेणं असतं?

वक्त के पास न आंखे है न अहसास  न दिल
अपने चेहरे पे कोई दर्द न तहरीर करो ( तहरीर :लिहणे, दर्शविणे)

म्हणूनच ‘सिमाब्’ अकबराबादी हा शायर म्हणतो-

खुद किस्सा-ए-गम अपना कोताह किया मैने
दुनिया ने बहोत चाहा अफसाना बना देना ( कोताह : मर्यादित,सिमित)

माझ्या दु:खाची हकीकत मी स्व्त:च सिमित करून टाकली. गप्प राहिलो. लोकांना माझ्या दु:खाच्या हकिकतीमध्ये  भलतीच रूची दिसू लागली.. त्यांना ते ‘भलतंच’ चवदार वाटू लागलं, म्हणून…

Please visit :http://hasanyachaaakar.wordpress.com/

Read Full Post »

खबरदार

नूतन वर्षाच्या शुभेच्छा !

Past is History.Future is Mystery and Present is Gift;that is why we call it as ‘Present’ !
कळतं पण वळत नाही अशी माणसाचे गत असते. सुखाच्या मागे बावळटपणाने आपण लागलेलो, दु:ख आलं की गडबडून जातो आणि अशाच तर्‍हेची धावपळ आयुष्यभर करणारे आपण : जेव्हा कुणी वडिलधारा, शहाणासुरता माणूस आपल्याला आपल्या अशा बालिशपणाची जाणिव करून देतो, आपल्या वागण्यातली विसंगती दाखवून देतो, तेव्हा आपण थबकतो. लाजतो-बुजतो. विचार करतो. आपल्याला ते पटून जातं.

आपल्या उर्जेचा-शक्तीचा बराचसा हिस्सा हा आपण आपल्या भूतकाळाभोवती तरी विणलेला असतो किंवा भविष्यकाळा कडे जाळं लावण्यात खर्च केला असतो. मग हाती जे लागतं ते बर्‍याच अंशी दु:ख, निराशा असंच असतं. वर्तमानात- या क्षणात रहायला शिकलं तर आपण आपली अनावश्यक खर्च होणारी शक्ती वाचवू शकतो.

आपल्या क्षणाबद्दल -आत्ताच्या क्षणाबद्दल सावध राहून जगायला संतांनी सांगितलं आहे,पश्चिमेच्या विचारवंतांनी सांगितलेलं आहे…पूर्वेच्या कलावंतांनी सांगितलेलं आहे-
तू अगर अपनी हकीकत से खबरदार रहे
न सिया-रोज रहे,फिर न सिया-कार रहे

– डॉ.इक्बाल

आपल्या वर्तमानाशीच तू जर संबंधीत राहिलास,वर्तमानाचं तुला स्पष्ट असं भान असेल,तर मग तुझ्यासाठी अशुभ दिवस रहाणार नाही, कसलंही पाप रहाणार नाही…

Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

Read Full Post »

माणसाचे बाहू म्हणजे त्याच्या कर्तृत्त्वाचे मह्त्त्वाचे साधन. या बाहूंचं बळ ( जोरे-बाजू) माणसाला,त्याचं ध्येय मिळवून देतं; यश मिळवून देतं. पण हे जे बाहू असतात-जोमदार बैलांसारखे, त्यांना सावरणारा ,हांकणारा गाडीवान तेवढाच जोमदार हवा. मनच भक्कम नसेल तर बाहूंकडे हात चोळण्याशिवाय दुसरं काय रहाणार ? एखादे संकट आले-अडचणींच्या पिंजर्‍यात  कधी आपण बंदिस्त झालेलो असतो; तेव्हा जोरे-दिल,जोरे-बाजू व्यवस्थितरित्या कार्यरत राहिले नाहीत तर आयुष्य कठीण होवून बसतं. माणूस पायाने कमी चालतो,मनाने जादा. बंदिस्त(सवयीचा?) माणूस तर स्वातंत्र्याच्या अफाट कल्पना करतो. विजयाच्या-उन्मादांच्या भावनांनी बेभान होतो, पण बसल्या बसल्याच. बसून केलेली अशी बगावत (बंड) निष्प्रभ असते.

खामोश बगावत से कटती नही जंजीरे
जुगनू से शबिस्तां का जादू कभी टूटा नही
( शबिस्तां : रात्री रहाण्याचे ठिकाण, शयनागार)
इथं,आपल्या मर्यादेच्या विचारांत एकदा का गुंतून पडलं,की आपल्या क्षमतांचा विसर पडत जातो. मागे पुढे पहाणे,काल्पनीक पराभवाच्या शंकेने मग नशिबाला दोष लावणे, तक्रार करणे-प्रार्थना करणे या चक्रात माणूस सापडतो.मान्य आहे संकट कठीण आहे ; पण त्याबद्दल तक्रार करायच्या ऎवजी जरा प्रयत्न करून पहा .आपल्या बाहूतलं बळ काय,हे तर आजमावून पहा गड्या-

जोरे-बाजू आजमां,शिकवा न कर सय्याद से
आज तक कोई कफस टूटा नही फर्याद से

मग या मन:स्थितीच्या-परिस्थितीच्या रेट्यातून असे काही क्षण येतात,त्यावेळी आपले बाहू फुरफुरतात ( पराभव-अन्यायाच्या कल्पनेत केलेल्या विचारांचा दाह असह्य होवू लागला तेव्हा) मग आपल्याकडून प्रयत्न केले जातात.या प्रयत्न-संघर्षात एक नाजूक वेळ येते. क्षणिक पराभवाची. जोरदार शत्रूला मारलेली धडक-पहिलीच धडक कामियाब कशी होईल ? फक्त छन्न ! आवाज होईल-हातोडा मागेच उचलला जाईल. पण इथे, ‘जमत नाही गड्या’असं म्हणणं मूर्खपणाचं नाही का? अहो,बंदूकीची प्रत्येक गोळी,धनुष्याचा प्रत्येक बाण हा लक्ष्याला लागावाच असा आग्रह धरणं,तो नाही लागला तर आयुध फेकून देणं… आततायीपणाचं नाही का ?

ये लाजमी नही के सभी तीर हो खता
फेंकी है अपने हाथ से तू ने कमान क्यूं

please visit another  blog :       http://hasanyachaaakar.wordpress.com/

Read Full Post »

 

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
***
वेदनेच्या भयाने विव्हळणारा माणूस पुढे भयाच्या वेदनेने विव्हळत रहातो असं कुण्या देशातल्या कुण्या भाषेतल्या माणसाने कुण्या काळात लिहून ठेवलेलं-अन् त्याचे प्रतिध्वनि माझ्या मनात उमटत जातात अन मी तपासाला लागतो- मी कशामुळे त्रस्त आहे…द:खाच्या काळजीने का काळजीच्या दु:खाने… एखादा मनोरूग्ण बसल्या बसल्याच थरथर कापावा,कण्हावा-कुंथावा तसं माझं मन दैनंदिन व्यवहारांच्या वर्दळीत उगीचच बाजूल होतं, उगीचच कण्हत रहातं.खरं म्हणजे, आत्ता-आत्ता काही घाबरण्यासारखं नसतं,काळजीचं नसतं.सगळं एका परीने आलबेल असतं.पण-

न राहे सख्त होती है,न मंजिल दूर होती है
मगर अहसासे-नाकामी,थका देता है राही को
( अहसासे-नाकामी : निराशेची भावना,पराभवाची जाणिव)

समस्या तेवढ्या अवघड नसतात.संकटं तेवढी घेरलेली नसतात.धैर्याने-धीराने तोंड दिलं, तर त्यातून सहज बाहेर पडूही शकतो…पण पडलो नाही बाहेर तर? …हा प्रश्न पाऊलच उचलू देत नाही ना. उत्साहाच्या ‘रिडींग’चा काटा झिरोच्या पुढे हटायलाच तयार नसतो की.
निराशेच्या,पराभवाच्या फाजील विचारांत गुंतून पडलं,की असं होतं. वाटतं,की शक्यच नाही,सगळीकडे अंधारच आहे.
पण हे सगळे मनाचेच खेळ. मन तशा विचारानं भारून गेलं,की शरीरावर मळभ साचणार.

आणि याच मनावर उत्साहाचा अंमल झाला-प्रकाशाच्या विचारांचा असर झाला,की ढगाची सावली जावून सगळ्या परिसरावर सोनेरी उन पडावं तसं शरीर मोहरून उठतं…

कुछ कफस की तिलीयों से छन रहा है नूर सा
कुछ फिजां,कुछ ताकते-परवाज की बातें करो
( कफस : सापळा,पिंजरा,देह.. नूर :प्रकाश. ताकते-परवाज : उड्डानाची इच्छा-शक्ती )

आणि खरंच,प्रकाशाचे स्वागत केले,की शरीर मनात तो उमटतोच उमटतो :

दिल रोशन,तेरा मन रोशन तो जहां ss रोशन !

Please visit another blog –http://hasanyachaaakar.wordpress.com

*******

 

 

 

Read Full Post »

हम अपने अहद की खुशियां खरीदते कैसे
हमारे पास पुरानी सदी के सिक्के थे

( अहद : क़ाळ,कारकीर्द, सत्ता )

हा शे’र वाचण्यात आला आणि सुरूवातीला सर्वसाधारणपणे शे’रचा मोह ज्या कारणामुळे पडतो, त्याच कारणामुळे या शे’रचा मोह पडला.’अहद’ – वर्तमान आणि ‘पुरानी सदी’ या परस्पर विरोधी शब्दांचा संकोच (स्पार्किंग?) हे ते कारण. पुढे अर्थाच्या नादाला लागलो.आजच्या जमान्यातली खुशी -आनंद आम्हाला खरेदी कसे करता येणार…आमच्या हाती तर जुन्या जमान्यातली-आता बाद झालेली नाणी आहेत.

म्हणजे, आज काळ बदलला आहे.रिती-रीवाज,मान-अपमान,सभ्यता,रहन सहन याबाबत सगळेच नियम,संकेत -ते मागचे,राहिले नाहीत. किंवा ते एवढ्या झपाट्याने बदललेले आहेत,की कालची गोष्ट आज जुनी झालीय.रद्द झालीय. आज तुम्हाला जगायला हवं, तर आजचंच चलन हवंय,नाही का? (‘नाही का?’ असं आपण म्हणतो-‘जुन्या नाणी’ वाले; आजचे लोक विचारतात-‘माहिताय का?’ )

तर गडबड अशी झाली आहे, की मागच्या पिढीला ही जाणिव झाली आहे,की आमच्याकडे आमच्या पिढीच्या संवेदना आहेत;त्या संवेदना घेवून आम्ही आनंदाची खरेदी करण्यासाठी आजच्या पिढीच्या बाजारात फिरलो आणि हात हलवीत परतलो. आज ती उत्कटता नाही, ती सवड नाही,त्या संवेदना नाहीत,श्रध्दा नाहीत. म्हणून आम्हाला खुशियां लाभल्या नाहीत.

पण गंमत अशी,की तुम्हाला खुशियां पाहिजे असतील तर तुम्ही आजच्या युगानुसार तुम्हाला दुरूस्त करून घ्यावं नाही का लागणार ? जुनी नाणी  ‘एक्स्चेंज’ करून रूपांतरीत करून घ्यायला काय हरकत आहे ? आपला ताठा आणि हट्ट सोडला,तर आजच्या युगातल्या आनंदाचे क्षण आपल्याला स्वस्तात मिळतील.

पण आणखी एक गंमत अशी आहे, की ‘पुरानी सदी के सिक्के’, जे आपण मनात बाळगतो, ती नेमकी कोणती सदी असते? आपल्याकडे खरेदीसाठी जी नाणी आहेत, त्याचा  नेमका कोणता ‘जमाना’ असतो?

आपल्यापुरतं सांगायचं झालं, तर आपल्याच वयाची ही सदी असते. आपलं वय काय असतं- सत्तर एक वर्षं. तर ही जाणिव वयाच्या अंतीम ट्प्प्याला थोडीच होते- ती होते  अर्धं वय ओसरल्यावर; म्हणजे, पन्नाशीला आल्यावर. त्यातून ‘नासमझीची’ पंचवीस वर्षं काढली, तर किती उरणार- पंचवीस. मग ते तर वय ‘चालू’ असतं, ‘काळ’ ही चालू असतो. आपण त्या काळातली नाणी घेवून त्याच काळातल्या खुशियां खरीदलेल्याही  असतात; मग ती पंचवीस वर्षंही वजा केल्यावर पुरानी सदी ही  कुठे रहाते? नेमकी कोणती सदी म्हणावी ही ?

मला वाटतं,ही पुरानी सदी म्हणजे, मनातले आपले पूर्वगृह; आपण बाळ्गून असलेले संकल्प,अपेक्षा, इच्छा- आपल्या,अशा. या बाळगलेल्या भावना,या संवेदनांची नाणी घेवून आपण आज बाहेर जातो आणि पूर्वगृह बाळगून वावरणार्‍या माणसाच्या वाट्याला काय येतं ? त्याच्या चेहर्‍यावर कधी हसू नसतं- तणाव असतो, हा तर सार्वत्रीक अनुभव  असतो. अपेक्षा ठेवून वागणार्‍या-बोलणार्‍या माणसाचे व्यवहार शेअर्सच्या गुंतवणूकीइतकेच जोखिमीचे !

बद्द झालेली नाणी आणि (पूर्वगृहांनी) बध्द झालेलं मन अशा मनाला ‘खुशियां’ बहाल होणं अशक्य असतं.
जुनी पिढी-नवी पिढी नाते संबंधातले व्यवहार यामुळेच फायद्याचे रहात नाहीत.

….कधी बाजारात,कधी समारंभात,कधी एखाद्या छायाचित्रात किंवा जाहिरातीत एखादा हसरा वृध्द दिसतो… मुलांसोबत,सुनांसोबत;नातवांसोबत -नातेवाईकांसोबत तो हसत असतो,बोलत असतो. त्याच्याकडे पाहून असं वाटतं, की त्या वृध्दाला ही खुशी लाभली आहे-तो आपल्याला सांगत आहे,

पुरानी सदी के सिक्के लेकर हमने
अपने अहद की खुशियां संवार ली है

please visit another  blog :       http://hasanyachaaakar.wordpress.com/

Read Full Post »

Older Posts »