Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for the ‘तबस्सुम’ Category

गेली दोन वर्षं हा ब्लॉग लिहिला, याला बर्‍याच जणांचा छान प्रतिसाद मिळाला.

आता हे ब्लॉग लेखन पुस्तक रूपाने प्रसिध्द झाले आहे, त्याचा हा तपशील-

उर्दू शे’रचं आकर्षण प्रत्येक रसिकाला असतं. आणि हे शे,र आपल्याला कुठेही

भेटत असतात- निवेदनातून, गाण्यातून, लेखनातून, व्याख्यानातून किंवाअ साध्या

गप्पांतून. या शे’रचं वैशिष्ट्य असं, की जाता जाता आपण मुख्य विषय विसरून

त्यापाशी घुटमळतोच. एखाद्या वचनासारखं रूप असलेल्या या दोन ओळी काव्याची

प्रकृती जपून असतात. एखाद्या विषयावरचे शे’र घेऊन रमत गमत केलेला हा

आस्वाद-प्रवास; उर्दू शायरीबद्दल प्रेम आणि समज वाढविणारा….

प्रकाशक :: मीरा बुक्स ऍंड पब्लिकेशन,

2, साई कॉम्पलेक्स, न्यू एस बी एच कॉलनी,

सहकार नगर, औरंगाबाद 431005

दूरध्वनी : 0240 -2340414

मूल्य : रू 110/-

Read Full Post »

बेखयाली

अत्यंतिक संवेदनशील मन:स्थिती ही अत्यंतिक ज्वालाग्राही पदार्थासारखी होवून बसलेली असते. निमित्ताची ठिणगी उद्भवली,की क्षणार्धात संवेदनांच्या ज्वाळा पेटतात. फरक एवढाच, की ज्वालाग्राही पदार्थाने पेट घेतला,तर परिणाम खाक होण्य़ात; तर पेटलेल्या संवेदनांमुळे- मन उजळून निघतं.
अर्थात ही अत्यंतिक संवेदना असते प्रेमाची-रोमांचीत करणार्‍या भावनांची संवेदना. ( द्वेषाची संवेदना,ज्वालाग्राही पदार्थापेक्षा बेकार) या संवेदनेनं तरूण मन जेव्हा भारावलेलं असतं, तेव्हा तिच्या हालचाली- तिचा कटाक्ष चक्क प्रतिसाद वाटून जातो. सहसा तिच्या त्या वागण्याबोलण्यात हालचालीत कसलंही आवाहन नसतं,ना सुचविणं- ती असते स्वाभावीक चलनवलनाची हालचाल. मात्र संवेदनांच्या धुक्यातून पहाताना,त्याच तिच्या हालचाली स्वर्गिय होवून बसतात. वेड लावतात. त्याला तो चक्क प्रतिसाद वाटत असतो-आपल्या संवेदनांसाठी दिलेला.
हिंदी सिनेमातल्या प्रेमव्यवहारात एवढ्या तरल संवेदना क्वचीत पहायला मिळतात. ‘मजरूह’सारखा निष्णात शायर सिनेमाचं गाणं लिहिताना कधी ही रेशमी-मुलायम भावना अलगद शब्दांत उतरवितो आणि मग आपण नकळत त्या संवेदनांच्या हवाली होतो.
‘तीन देवियां’ (1965) या चित्रपटात देव आनंदला एका पार्टीत फर्माईश केली जाते. सिनेमातला नेहमीचा -टिपीकल असा प्रसंग. आता भळभळ भरघोस प्रेम वहाणारं गाणं ऎकायला मिळणार अशा तयारीत आपण असतो आणि रफीच्या स्वरातून-शब्दांतून अलगद प्रकट होते, ती अत्यंतिक संवेदनशील मन:स्थिती…
कहीं बे-खयाल हो कर, यूंही छू लिया किसी ने
कई ख्वाब देख डाले,यहां मेरी बेखुदी ने

समारंभात भेटीगाठी होतात.हसणं-बोलणं होतं.कधी उपचार म्हणून, कधी ओळख म्हणून ,कधी नाईलाज म्हणूनसुध्दा. अशाच वेळी झालेला तो स्पर्श असतो. अगदी अनाहूत म्हणावा असा; पण त्या स्पर्शाच्या सुताने हा संवेदनेनं भरलेला माणूस चक्क स्वर्ग गाठतो की ! (बेखुदी : धुंदी,नशा ) तेवढ्याशा स्पर्शाने स्वप्नांची गर्दी होवून जाणं-दाटी होवून जाणं…केवढ्या तीव्र संवेदना म्हणाव्या त्या !
याच सिनेमात आणखी एक एका गाण्यात अगदी अशाच तर्‍हेने संवेदना कशा ‘ज्वालाग्राही’ बनलेल्या आहेत पहा-( गाणं आहे- ख्वाब हो तुम या कोई हकिकत…)
धडकनों ने सुनी इक सदा पांव की
और दिल पे लहराई आंचल की छांव सी

Read Full Post »

छायाप्रकाश

रात्रीची रोषणाई.विविध दिवे,प्रखर दिवे,रंगीत दिवे-अंधाराची फजिती करणारे,अंधाराला पळवून लावणारी ही रोषणाई… आणि या रोषणाईच्या मदतीने सगळा अंधार उज़ळून टाकून दिल्याची माणसाची मस्ती,त्याचा तो अभिमान – वृथा अभिमान. अंधारात कितीही दिवे लावले,केवढाही प्रकाश केला तरी पहाटेच्या उजेडाची बरोबरी हा प्रकाश कसा करणार ?
गृहसौख्य,निर्मळ प्रेम,कर्तव्य भावना या सगळ्यांकडे पाठ फिरवून माणूस संपत्तीचा आधार घेतो आणि जीवनात सगळा झगमगाट करून टाकतो.अतिरिक्त श्रीमंतीमुळॆ माणूस अंधाराला हाकलून लावायच्या प्रयत्नात असतो का नेहमी… आणि खोट्या रूबाबात वावरत असतो का…
पण… उदो उदो करणारी,सभोवताली जमणारी माणसं,ती संपत्ती ओसरली की अंधारात गडप झाल्यासारखी निघून जातात. म्हणून साधेपणा, निर्मळपणा याचं मोल करताच येत नाही.

चिरागां लेके दिल बहला रहे हो दुनिया वालों
अंधेरा लाख रोशन हो,उजाला फिर उजाला है.

खरं म्हणजे अंधाराला अस्तित्त्वच नसतं. प्रकाशाचा अभाव म्हणजे,अंधार.(प्रकाशाची तिरीप येते,तशी अंधाराची तिरीप येत नसते) त्याच प्रमाणे उर्जेचा अभाव म्हणजे थंडी. थंडीला वेगळं अस्तित्त्व नाहीच.

…असं जरी असलं तरी,जुल्फोंका अंधेरा- त्याला मात्र अस्तित्त्व आहे !मनात घर करून रहाणारा घनदाट केश संभार. प्रकाशीत चेहर्‍याच्या आजूबाजूचा हा सावळा अंधार..ही सावली;प्रखर उष्णतेच्या प्रकाशात हाताच्या खोप्याची जशी सावली; तशी-त्यापेक्षा अधिक मोलाची. य अंधाराचे वॆड ज्याला लागले,तो प्रकाशासाठी राजी होणारच नाही की !राजेन्द्र कृष्ण यांचा, एक मुजरा आहे; ‘जहान आरा’ सिनेमातला. लता आशाने गायलेल्या या मुजर्‍यातला  हा शे’र दोघींनी एवढा घोळवून घोळवून गायला आहे, की मनाला त्या भावनेची सुरेख कल्हई होवून जाते…अंधाराचे आकर्षण वाटत रहाते…

छाए रहे नजर में तेरी जुल्फ के अंधेरे
कई आफताब चमके,कई चांद जगमगाए


Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

Read Full Post »

रोना धोना

वो रुलाकर हंस न पाया देर तक
जब मैं रोकर मुस्कुराया देर तक

हम दोनो’मध्ये साहिरची एक गजल म.रफीने गायली आहे-कभी खुद पे कभी हालात पे रोना आया.. मनात रडू दाटून आलेलं असलं की त्याला निमित्तच पाहिजे असतं. मग कधी स्वत:वर, कधी परिस्थितीवर रडू येत असतं. या गजलचा एक शे’र आहे-
कौन रोता है किसी और की खातीर ऎ दोस्त
सबको अपनी ही किसी बात पे रोना आया

आपण इतरांची विचारपूस करतो,इतरांच्या दु:खाने आपण दु:खी होतो अशी आपली समजूत असते, केवळ समजूत. खरं म्हणजे,समोरचा माणूस आपलं दु:ख सांगताना आपण ते ऎकत असतो आणि आपण आपल्या तर्हेडने दु:खी होत असतो. स्वत:च्या बाहेर जायला तयार नसणारे आपण अशा रीतीने आपल्याच सुख द:खात मश्गूल होवून बसलेले असतो.
मोठ्या मनाची माणसं..त्यांचं सुख-दु:ख मात्र स्वत:पुरतं कधीच नसतं. त्यांनाही दु:ख असतं, पण त्यांचं दु:ख विस्ताराचं असतं. अपार करूणा भरलेली असली, की माणसाला रडू फुटतं ते अगदी वेगळ्या कारणामुळे. डॉ इक्बाल यांना रात्रीच्या चमचमणार्याम तार्यांतची शांतता,त्यांचं ते गप्प रहाणं फार अस्वस्थ करीत असतं.
रुलाती है मुझे रातों को खामोशी सितारों की
निराला इश्क है मेरा, निराले मेरे नाले है

रडणं हे वाईट,अशूभ असतं, ते नेभळ्या माणसाचं काम असतं असं सहसा म्हणल्या जातं. रडण्यापेक्षा हसत हसत संकटांना सामोरे जा-रडगाणं काय गात बसता असं रडणार्या वर वैतागणारे काही कमी नाहीत.
पण याला अपवाद प्रेमात पडल्यावरचा. प्रेमातलं सुख प्रेमातलं दु:ख त्यालाच कळतं, ज्याला त्या प्रेमाची झीज सोसावी लागते,जो स्वत:ला प्रेमात उगाळून घेत असतो. त्याला रडणं म्हणजे गैर आहे असं वाटत नसतं. उलट रडण्याचं तो समर्थन करीत असतो. त्याला सांगायचं असतं,की अरे बाबा,रडण्यामुळे तर माणूस धुवून निघतो,स्वच्छ होवून जातो.मोकळेपणाने रडायलासुध्दा आज कुणाला जमतं? उलट रडू आवरून,रडू लपवून माणूस कुढत रहातो, कुजत रहातो.
गालिब म्हणतो-
रोने से और इश्क में बेबाक हो गए
धोए गए हम ऐसे के बस पाक हो गए

धो धो रडून,आंघोळ केल्यासारखं स्वच्छ होवून जायची, पवित्र व्हायची कल्पनाच किती छान आहे. आणि प्रेम व्यवहारात सगळे राग लोभ,आशा निराशा, सुख दु:ख सांगून मोकळं होणारा माणूस… त्याचं रडणं जेवढं मोकळं असतं,तेवढंच त्याचं त्या रडण्यानंतरचं हसू… सूर्यप्रकाशासारखं निर्मळ असतं. हृदयनाथ मंगेशकर यांनी गालीबच्या या गजलला एवढी सुरेख चाल दिली आहे,लताने ही गजल एवढ्या निरागस आनंदाने म्हटली आहे, की-
रडण्याचा सुध्दा मोह पडावा…


please visit another  blog :       http://hasanyachaaakar.wordpress.com/

Read Full Post »

एकदा माणसाच्या लोभीपणाबद्दल बोलताना,मित्र वैतागाने सांगत होता-‘अरे,माणसाचं काही खरं नाही. बेडवर अगदी मरायला टेकला असला, अन समजा फर्शीवर चिल्लर पडली,
तर पटकन उठून पाहील-कुणाचे पैसे पडले!’
ही माणसाची अत्यंत स्वाभावीक प्रकृती. ती लोभीवृत्ती असेलच असे नाही. मात्र एवढे खरे,की काही हातचं सुटू नये, नुकसान होवू नये, लाभाचेच व्यवहार असावेत अशी त्याची आणखी एक स्वाभावीक तबीयत. पैसे पडल्यावर पटकन पाहणं (आपले तर नाही पडले?),हा मनापेक्षा शरीराच्या सवयीचा भाग म्हणता येईल- तोंडासमोर अचानक आवाज झाल्यावर पापण्यांची उघडझाप व्हावी तसा. पण फायदा हुंगणार्‍यांचं तसं नसतं. त्याचं सदैव लक्ष असतं लाभाकडे. प्रत्येक व्यवहारात,प्रत्येक कृतीत,कुणाशीही संबंध ठेवायचा झाल्यास त्याच्या मनाचा मुनीम आधी विचारतो- यातून तुला काय मिळणार आहे? विनाकारणच की…मग असा माणूस प्रेम कसं करणार ? कारण प्रेमात तर त्याच्या हिशोबाने नफा कमी (क़िंवा नफा नाहीच) अन गुंतवणूक तर केवढी- वेळेची, पैशाची, शरीर-मनाची !
‘फिराक’गोरखपुरीच असावेत बहूतेक; त्यांनी अशा माणसांना एक प्रश्नच विचारला आहे-
पूछते हैं,फायदा क्या इश्क से
पूछिए,क्या फायदे से फायदा

खरंच,प्रत्येक गोष्टीत लाभ शोधणार्‍याने  असा कधी विचार केला असावा का,की लाभाचा काय लाभ असतो बरं… लाभ-हानीच्या विचाराने मनाला जो ओशटपणा आलेला असतो,त्यामुळे वेगळा विचार निसटून जात असतो. कळत नसतं. एकदा का हे मन स्वच्छ होवून गेलं तरच ते सगळं-ते सगळे व्यवहार शुभ्र होतात. नफा-नुकसानीपेक्षा वेगळं असं काही व्यवहारात असतं हे कळायला लागतं. केव्हा –प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ येतेच येते. सुख-दु:खाचे अनुभव घेवून त्यातून निवृत्त होताना मनाची उभारी तर असते,पण त्या तशा भावना काहीशा बालिश वाटत असतात. (कारण सुख-दु:ख असं ज्याला तो म्हणत आलेला होता,ते फारच जुजबी होतं,किंवा फार जुजबी लाभ-हानीच्या मुद्द्यांत आपण जीव गुंतविला होता,हे त्याच्या ध्यानात यायला यायला लागलेलं असतं)
अशा माणसाच्या मनात मग सकाळचं सोनेरी उन ओसरीवर पडावं तसा विचार येवून जातो-
हर चीज का खोना भी बडी दौलत है
बेफिकीरी से सोना भी बडी दौलत है

पैशाच्या साठ्यावर लक्ष असलं,तर साठा होतो पण मनाची एक बाजू बधीर` होवून जाते;ती म्हणजे संवेदनेची. अशा माणसाचा आवाजच मोठा होवून बसलेला असतो. मग असा माणूस सहानुभुती दाखवितो तेव्हा, मदत करतो तेव्हा ‘मी करतो’चा तो आवाज असतो. आस्था,संवेदना,सह-अनुभुती,संवाद असं काही जर माणसात राहिलं नाही,तर ,मग आर्थिक सुबत्ता काय कामाची? आपले आडाखे नेहमी बरोब्ररच असायला पाहिजेत, आपल्याला नुकसान शक्यच नाही असं वाटणार्यााला नियतीचा विसर पडलेला असतो. कलावंताला अशा ‘फायदेदार’माणसाची करूणा वटत असते.मग तो कलावंत अशा माणसासाठी ईश्वराला साकडं घालतो-
दो और दो का मेल हमेशा चार कहां होता है
सोच समझ वालों को थोडी नादानी दे मौला…

Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

Read Full Post »

उर्दू शायरीमघ्ये, प्रेम झाल्यापेक्षा,  प्रेम न झालेलं अधिक चांगलं असतं; अर्थात आपल्यासाठी.  शायरीतला प्रेमी आपलं अर्धं अघिक आयुष्य तिची वाट पहाण्यात किंवा ती भेटून गेली,  तर त्या आठवणी काढून पुन्हा तिची वाट पहाण्यात घालवतो. तिनं होकार दिला, लग्न झालं बुवा त्यांचं ( किंवा चांगला एन्ड करायचा झाला, तर नाही झालं ),  असं कधी झालंच नाही. तिची वाट पहाण्यात, शमा आणि शराब यात त्यांचे हजारो रुपये खर्च झाले असतील !( तुम्ही म्हणाल शायर लोकांकडे एवढे पैसे आले कुठून ? तर तसं नाही म्हणायचं मला- हजारों शायर लोकांचे मिनिमम तेवढेच हिशोबात घेतले तर ? ) असो.

महत्त्वाचं  म्हणजे, रात्रं दिवस तिचा विचार करीत , तिची वाट पहात रहाणारा हा शायर एका विचीत्र मानसिकतेचा बळी होवून जातो- साईड इफेक्टच म्हणा ना  ! सतत वाट पहाण्याने अन सतत विचार केल्याने त्याच्यातली कृतीशिलताच खलास होवून जाते ; आणि मग जेव्हा ती प्रत्यक्ष भेटते,  तेव्हा त्याला
काही सुचतच नाही की !

तूम मुखातीब भी हो, और करीब भी
तुमको देखूं, की तुमसे बात करूं..            (‘फिराक’ गोरखपुरी)

आणि खरंच आहे की-  जिच्या दर्शनासाठी ( दीदार ) एवढे दिवस वाट पाहिली ( एवढे दिवस –  चेहरा विसरून जायची वेळ आली, भलतीच आवडून जाईल की काय असं वाटायची वेळ आली. कारण मनातल्या मनात चेहर्‍याची उजळणी करून करून मनाची पाटी पांढरट होवून गेलेली ! ) , तिचं दिसणं एवढं मोलाचं झालेलं होतं, की ती दिसली – भेटायला आली, की डोळ्यावर विश्वासच बसत नाही. गडबड होवून जाते. मनाचं वारू बावरून जातं. तिला  पहात राहावं वाटत असतं आणि काय काय बोलू, काय नको हे अजिबात सुचत नाही. भेटीचा पहिला बहर सरला, तरी तो असर उतरलेला नसतो. तिला पहात बसावंही वाटतं,
आणि महत्वाचं म्हणजे, इतके दिवस मनात  साठवून ठेवलेला, घोळून घोळून तोंडाला पाणी सुटलेला तो मुद्दा- माझं तुझ्यावर प्रेम आहे हा – सांगायचाही असतो. … पण पहात बसणं सोपं हो ! त्याला काय लागतं नजर लावून रहायचं , तिचं लक्ष गेलं तर, रागात वाटली तर नजर वळवायची; शिवाय पहाणं म्हणजे काय डोळ्याला डोळे लावून पहाणं असं थोडंच असतं ! बाक़ी शरीर नसतं का !बोलणं मात्र मोठं अवघड !  तर मुख्य मुद्दा काही सांगितल्या जात नाही.  उलट –

लब पे आया न हर्फ-ए-मुद्दआ लेकिन,
इधर उधर से सुनाए हजार अफसाने

बरोबरच आहे. उजळणी करून करून आत्मविश्वास खलास झाला असतो . शिवाय प्रेमाचा इजहार तिच्या माघारी करण्याएवढी सोपी गोष्ट नसते. तिच्या समोर मात्र हिंमत होत नसते. महत्त्वाची  भिती अशी, की ती जर ‘नाही’  म्हणाली तर – आली का मग आफत ! शिवाय-  शिवाय संकोच, भय, धडधड या बाबी एवढ्या कार्यरत झालेल्या असतात, की त्यामुळे मुख्य मुद्दा रहातो बाजूला अन इकड्चं- तिकडचंच  सांगितल्या जातं, बोलल्या जातं. अप्रस्तूत असं ते वागणं बोलणं असतं.  अन मग ती निघून  गेली, की पुन्हा चुटपुट वाटत राहाते.. ( पुन्हा जाग्रणं ! )

एका शायरची प्रेयसी उत्सूक होती. तीने विचारलंही होतं त्याला ..’ कुछ कहना चाहते है क्या आप ? ‘ पण हा मुखदूर्बळ !  तो म्हणून गेला-
अब आ गए है आप, तो आता नही है याद
वर्ना हमें कुछ आप से.. कहना जरूर था

आता बोला !

‘ अकबर ‘ इलाहाबादी हा एक मजेदार शायर होता. उत्तम व्यंग रचना कशी असावी , ते या शायर कडून शिकावं. एरवी शायर- कवी लोक एवढे संवेदनाक्षम (हायली इनफ्लेमेबल  ! ) असतात, की ते विनोदामुळे- थट्टेमुळे चक्क दुखावले जात असतात. असो. तर या अकबर इलाहाबादीने एका शे’र मध्ये हकिकत सांगीतली आहे, एका शैखची- धर्मगुरूची. आता धर्मगुरू झाला,  तरी माणूसच आहे ना तो. अन त्यातही  तो तरूण ; मग त्याला प्रेम करायला काय हरकत आहे ? तर त्याचं प्रेम बसलं एका तरुणीवर. तिनं त्याला भेटायलाही बोलावलं आहे, एवढी प्रगती झाली त्यांच्या प्रेम संबंधात. आता भेटीत बोलणं, गप्पा-गोष्टी, थट्टा-मस्करी पाहिजे ना- महत्त्वाचं म्हणजे, रोमांचीत करणार्‍या त्या गप्पा हव्यात. आता हा तरूण  पडला धर्मगुरू; धर्म – प्रवचन, पाप-पुण्याशी संबंधीत.  त्याचा तोच व्यासंग, तीच आवड.  मग तेच त्याच्या बोलण्यात येणार; नाही का ?  ज्याची जी आवड तीच त्याची भाषा . तर परिणाम काय झाला त्या भेटीचा पहा-

निकाला शैख को उसने ये कहकर
ये बेवकूफ है, मरने का जिकर करता है
.

आणि तिचंही कुठं चुकलं सांगा ना, माणसाला जन्म आहे तसाच मृत्यूही आहे, त्याने पुण्य कर्म करावं,पापं करू नयेत हे सगळं सगळं अगदी खरं आहे, हे मान्य; पण हे सगळं सांगायची ही वेळ आहे का,  ही जागा आहे का, आं ! सांगा की…प्रेमाच्या वेळी, प्रेयसीच्या सानिध्यात… एकांतात..मुका आठवावा की मृत्यू ?

Read Full Post »