तत्कालीन भावनांच्या प्रभावाखाली येवून आपण तुरंत वागतो-बोलतो. त्या भावनांचा प्रभाव आपल्या शरीर-मनावर ऍलर्जी व्हावी, तसा होतो अन आपण वागून जातो,बोलून जातो.
आणि मग अडचणीत येतो. लक्षात येवून जातं,की काहीतरी बिघडलं गड्या आपल्याकडून. असं करायला-वागायला-बोलायला नको होतं आपण. हे असं वाटायला नेमकी केव्हा सुरूवात होते-जेव्हा आपल्याला याची जाणिव होते,की आपल्या त्या कृतीचे वेगळॆ परिणाम झालेले आहेत. परीसर-वातावरण; त्यात बदल झालेले आहेत. मग आपण सांभाळतो. पण आता तर वेळ निघून गेलेली असते.
आपल्या भावनांच्या अभिव्यक्तीमुळे बिघाड झाला, याची कल्पना आली,की आपण थबकतो. आपल्या त्या भावना आवरतो. पश्चात्तापाच्या विचारांचा अंमल मग चालू होतो. आणि इथूनच चालू होतो अकलेचा प्रभाव. भावना कैद होवून जातात. अकलेनं मनाचा ताबा घेतला असतो. आपलं चुकलं नाही, असं भावना वारंवार सांगत असते-बजावत असते,पण आता परिस्थीतीचा ताबा अकलेने घेतलेला असल्याने नाईलाज होत असतो. अक्कल बजावीत रहाते,डोळे वटारते,हात उगारते-तू दोषी आहेस ! …अपराधी मन ऎकत रहातं.गप्प रहातं.
अक्कल आणि भावनांचं नातं हे असं. शाळॆतली हुशार,व्यवस्थीत गृहपाठ करणारी,पुढच्या बाकावर बसणारी,नेहमीच गणवेशात रहाणारी पोरगी जशी,तशी ही अक्कल;तर तिच्याच मागच्या बाकावर बसणारी,शहाणी,पण गणवेषाचं भान नसणारी, नियमीत आभ्यासापेक्षा इतर बाबीत रमणारी पोरगी जशी,तशी भावना.
पुष्कळदा उचंबळून आलेल्या विचारांतून भावनांचा शुभ्र फेस तयार होतो अन शरीरावर त्याचा ताबा होतो. एका धुंदीत माणूस मग वागतो,बोलतो. त्यावेळेस अकलेची ती हुशार मुलगी असतेच बरं वर्गात; ती सांगत रहाते, बजावत रहाते, पण तिचं ऎकायला चित्त ठिकाणावर पाहिजे ना !
-अन प्रेमात पडलेल्या माणसाला-तिला पत्र लिहायच्या म्न:स्थितीत तर असं वाटतं,की अकलेला वर्गातच कोंडून टाकावं,आपण मैदानावर जावं,तिथं झाडाखाली बसून मस्त पत्र लिहावं तिला-
अक्ल कहती थी,न लिख दफ्तर-ए-मजकूर उसको
शौक ने एक भी मजमून बदलने न दिया
प्रेमाचा उमाळाच एवढा दाटून आलेला असतो,भावना एवढ्या गजबजलेल्या असतात, की तिला काय लिहू कसं लिहू किती लिहू या गोंधळात हे लांबलचक पत्र तयार झालं ! खरं म्हणजे, त्याच वेळेस ही अक्कल बजावीत होती, तिचा गहजब चालू होता- उगी काही बाही लिहू नकोस,थोडं आवर. काय वाटेल तिला,काय म्हणेल ती ? वेडा म्हणेल तुला…
पण भावनांचा तो भर-त्या भरात असलेल्या मनानं एकही मसूदा-मजकुर ना संक्षेप केला त्याचा, ना त्याची कपात केली,ना पत्र आवरलं.
आणि मग प्रेमाच्या त्या चार दिवसांतले ते अपरिहार्य क्षण येतातच आपल्या वाट्याला. चुटपुटीचे,अपराधी वाटण्याचे,निराशेचे. त्यावेळी या अकलेने दिलेल्या सुचनांची आठवण येत रहाते अन मन कसं मऊ मऊ होवून जातं. गरीब गरीब होवून जातं.
पण या अपराधी अवस्थेची-हतबलतेची पर्वा न करता, कसलीही सहानुभुती न ठेवता, ती अक्कल आपल्याला अधिक अधीक दोष लावीत रहाते-
अक्ल हर चीज को इक जुर्म बना देती है
बेसबब सोचना, बेसूद पशेमा होना…
अकलेचा हा स्वभावच. स्वभावातली खोडच म्हणा ना ! विनाकारणचे विचार,विनाकारणच्या भावना चुटपुट, हुरहुर, हे सगळं सगळं या मूर्ख अकलेच्या दृष्टीतून चक्क अपराध असतात-गुन्हे !
मस्त!
“अक्कल” हा शब्द आवडला. चपखल बसला आहे.
अशा वागण्यामुळे अडचणीत येणं तुम्ही चिमटीत पकडलं आहे.
यावर तुम्हांला एखादी कथा लिहिता येईल.
वा ! खरंच की… एकदा श्री पु भागवतांनी माधव आचवल यांना पत्रात लिहिलं होतं,की भावनाप्रधान-संवेदनशील मन सांभाळणं म्हणजे,तळहातावर तेजाब घेऊन वावरण्यासारखं आहे. अशी चर्चा करून त्यांनी म्हटलं होतं,की असा स्वभाव सोडून द्यावा असं जे लोक म्हणत असतात, माझं तर उलट म्हणणं आहे,की का सोडावा असा स्वभाव….
…बेसबब सोचना,बेसूद पशेमां होना, हीच जर एखाद्याची प्रकृती असेल,तर तेच तर त्याचं वैशिष्ट्य असतं ना…
शेर फारच बहारदार आहेत.
पूर्वी मला वाटायचं लोकांना आपल्या मनातलं वेगळं वाटणं —हा भाषेचा, भावनेबरहुकूम बाहेर न येणं हा दोषच असावा. भाषाशास्त्रात सेमिओटिक्स नावाचा अर्थ कसे उत्पन्न होतात त्यासंबंधीचे एक प्रकरण आहे. त्यात शब्दांबरोबर चेहर्यावरचे भाव ( तुम्ही समोर नसलात तरी) हेही अर्थ देववतात असे मानतात. म्हणजे “फारच शहाणा आहेस” हे चेहरा न पाहता ( समजा फोनवरून ऐकले तर ) ऐकले तर संभ्रम का होतो ? भावना चेहरा दाखवते खरा पण त्याचबेळेस अक्कल चे लक्ष नसेल तर अर्थाचा अनर्थ होतो…..हे आपले सहजच !
—अरुण अनंत भालेराव
वा ! भावनेचा चेहरा आणि अकलेचा चेहरा… आता वेगळंच काही सुचतं आहे. बुध्दीमान माणसं अन भोळी माणसं…यांची सुरेख गर्दी होते आहे….