Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for सप्टेंबर, 2011

सहमतीची विनंती

‘शगून’चित्रपटातलं जगजीत कौर हिने गायलेलं, ‘तूम अपना रंजो-गम ..’ हे गाणं ऎकताना काव्य-संगीत-आवाज यांची अनुभुती होत असतानाच मनात नकळत एक जादू होत जाते. ही जादू असते,एका अत्यंत खाजगी संवेदनांचे आपण साक्षीदार होत चालल्याची. ती आपल्या सहका-याला ( इथ पती म्हणण्यापेक्षा सहकारीच म्हणावे वाटते,एवढी उत्कटता,एवढी संवेदना त्या वातावरणात भरलेली आहे. ) त्याच्या दु:ख विवंचना आपल्याला सांगायला,त्यात सहभागी करून घ्यायला आर्जव करते आहे. तो बोलत नाही,सांगत नाही …आणि आपल्याला त्याचं तो गप्पपणा त्याचं स्वत:तच गुंतून बसलेपण जाणवत रहातं आणि आपण सुध्दा त्याच्या या सहचारीप्रमाणेच व्याकूळ होऊन जातो :

तूम अपना रंजो-गम,अपनी परेशानी मुझे दे दो
तुम्हे गम की कसम, इस दिल की विरानी मुझे दे दो

मुळात तिची अवस्था कशी आहे ? नाकारलेली,टाकून दिलेली.पण तरीही,आपल्या सोबत रहाणे त्याला स्विकारावे लागले,ही जाणिव मनात ती ठेवून आहे. असे असूनही अपमान विसरून त्याचं दु:ख कमी करायला ती तयार आहे-

ये माना मै किसी काबील नही हूं,इन निगाहों में
बुरा क्या है अगर, ये दुख ये हैरानी मुझे दे दो

..तुझ्या दृष्टीने माझ्यात एवढी पात्रता नसेलही…पण काय हरकत आहे,दु:खात सहभागी करून घ्यायला… कदाचीत समाजाच्या टीकेमुळे भीती,काळजीने त्याची कुचंबना झालेली असेल. अशावेळेस त्याला स्वत:बद्दल काळजी,दु:ख वाटत असते. आणि ती म्हणते-

मैं देखूं तो सही, दुनिया तुम्हे कैसे सताती है
कोई दिन के लिए,अपनी निगेबानी मुझे दे दो

या गीताचे गीतकार आहेत, साहिर लुधियानवी. साहिरच्या गाण्यात उर्दू शब्दांचा चपखल वापर असतो. या ओळीतसुध्दा ‘निगेबानी’शब्दामुळे अर्थाला आकार आला आहे. (निगाह-बान : संरक्षक,काळजी घेणारा)पुष्कळ वेळा असंही असतं,की बाहेरचे विश्व, स्पर्धा,चिंता हे घरात रहाणार्‍या सहचरीला माहीत नसतं. तिला एवढंच कळालेलं असतं,की याला काही दु:ख आहे, चिंता आहे. मग लहान मुलाला समजवावं तसं ती म्हणते-मी आहे नं इथं.तुमची काळजी माझ्यावर सोपवा.( कधी गमतीने वाटून जातं, लहानपणात मित्रांशी भांडल्यावर आई तावातावाने बोलायची, किंवा शाळेतल्या प्रश्नांची सोडवणूक मी करते, असं काही बोलायची,ते मला फार गैर वाटायचं,गैरजरूरी वाटायचं…आणि आईची तळमळही जाणवायची. खरंच अशा वेळी तळमळीच्या माणसाला सोबत घेता न येणं…किती कुचंबना म्हणावी ही…)

गाण्याच्या शेवटच्या ओळीत नायिकेच्या स्वत:च्या दु:खाची जाणीव आपल्याला होते. हे अपमानाचं दु:ख ती केव्हाच विसरलेली आहे. उलट, तुम्हाला वाटणारा अपमान, अपराधीपणा (पशेमानी)मला द्या,असे ती म्हणते-

वो दिल जो मैने मांगा था मगर, गैरो ने पाया था                                               
बडी शै है अगर, उसकी पशेमानी मुझे दे दो

सगळ्या गाण्यात ह्रदयाला थेट भिडणारा असा एक समजूतीचा सूर आहे. जणू दु:खाची जाणीव झाल्यानंतरचे सांत्वन आहे.गाणं ऎकलं,की असं वाटतं,आता त्याने तिच्या कुशीत आपला चेहरा लपविला असावा… सिनेमाच्या कथेनुसार गाण्याची रचना असते, अर्थाचा संदर्भ असतो हे खरे; पण इथे उत्कटताच एवढी आभळासारखी दाटून आलेली आहे, की आपण तिच्या त्या सुचीत केलेल्या दु:खाच्या वैशम्याच्या अनुषंगाने चार पावलं पुढे टाकीत जातो. सिनेमाच्या कथेची तशी गरज रहात नाही….

पियानोच्या स्वरांच्या माळेत खय्यामने हे गाणं गुंफलं आहे. पियानोचा असाच वापर, सी.अर्जूनने ‘सुशीला’ या चित्रपटात केला आहे .( बे मुरव्वत बे वफा…)

जगजीत कौरचं हे गाणं असं आहे…प्रसिध्दीच्या गजबजाटापासून दूर असणारं,आपलं,खाजगी…

( माझ्या ‘गीतमुद्रा’ या शब्दालय प्रकाशनाच्या वतीने प्रसिध्द झालेल्या संग्रहातल्या एका लेखावरून. )

Read Full Post »

मुल्लांची थट्टा !

कोणत्याही धर्मातले धर्मगुरू खरं म्हणजे, चांगले असतात. त्यांचा आपल्याला त्रास नसतो. ते काही घरी येवून आपला कान धरून तिकडे घेवून जात नसतात प्रवचनाला. किंवा प्रवचनादरम्यान प्रश्न विचारून उत्तर नाही आलं, तर ना आपल्याला छड्या मारतात ना रागावतात ना अपमानित करतात. शिवाय ते बिचारे काही गृहपाठही देत नाहीत,आभ्यास करून येण्याबद्दल दटावतही नाहीत. ते आपापलं सांगत राहतात बिचारे- दु:ख विवंचनांना टाळण्यासाठी तो आध्यात्माचा-देवाचा रस्ता.
मग असं असताना, आपण का बरं नावं ठेवावीत ? का बरं त्यांची टिंगल करावी ? का बरं ? याचं खरं कारण म्हणजे, हा जो धर्मगुरू-ज्याला आपण हौसेने आणलेलं असतं आपणच आपल्या मनात. त्याची त्याची प्रतिष्ठापना केलेली असते उत्साहाने,उतावीळपणाने; आणि मग गणेश चतूर्थीचा उत्साह दुस-या.-तिस-या दिवशी ओसरावा अन मग दररोजच्या आरतीचे टेंशन यावे असे होवून जावे. गणपती तर निघून जातो बिचारा आठ दहा दिवसात; पण मनात बसलेला हा धर्मागुरू- धार्मिक,आध्यात्मिक भावनांची समज- ती कुठे निघून जाते ? त्याच्यासोबत रहाणं शक्य नसतं आणि मग त्याच्याबद्दलच्या तक्रारी सुरू होतात. त्याला नावं ठेवणं सुरू होतं. पहाता पहाता त्या तशा थट्टेत माणूस रमून जातो. ती थट्टा रुचकर वाटायला लागते. विशेषत: ‘संध्याकाळ’ च्या सवयीचा माणूस तर या थट्टेत अधिक आक्रमक होत असतो. कुणी तर ईश्वराचीही थट्टा करायला मागे पुढे पहात नाही. एक विनोद आहे :
एक फकीर भीक (खैरात ) मागण्यासाठी मशिदीसमोर कटोरा घेऊन उभा रहातो. सगळे नमाजी निघून जातात त्याला कुणी काही टाकत नाही. मग तो फकीर मंदिरासमोर येऊन उभा रहातो. तिथेही कुणी त्याला भीक घालीत नाही. मग तो चर्चसमोर उभा रहातो. तिथेही तसाच अनुभव. मग तो शराबखान्यासमोर येऊन उभा रहातो; तर तिथून जे जे शराबी बाहेर पडतात ते त्याला काही ना काही देवून जातात. त्याचा कटोरा भरतो. फकीर मग आभाळाकडे पाहून म्हणतो- “वाह मेरे मौला ! रहते कहा हो, और पता कहा का देते हो !”
मिर्जा गालिब म्हणतो,
कहां मैखाने का दरवाजा गालिब और कहां वाईज
पर इतना जानते थे कल वो जाता था के हम निकले

‘अकबर’इलाहाबादी तर या शैखची गंभीरपणे थट्टा करतात
शैख जी रात को मस्जिद में नही जाते है
यानी डरते है के बैठा कही अल्लाह न हो
म्हणजे, माणूस आणि ( धर्मगुरू ?) भुताला अन ईश्वराला रात्री भीतो की काय ?
बिघडलेला माणूस अधिकाधिक बिघडत जातो, पिन्याच्या सवयीचा होत जातो, तसतसं त्याला आतून त्याची सदसद्विवेक बुध्दी सतावीत रहाते. मग तो आपला राग या धर्मगुरूवर काढतो. त्याला शिकवायलाही कमी करीत नाही-
जाहिद शराब पीने दे मस्जिद में बैठकर
या वो जगह बता दे, जहां पर खुदा न हो
अशा पिण्यामुळे वाईट कृत्यांमुळे माणसाला स्वर्ग लाभत नाही, तो नरकात जातो असं तो शैख वारंवार बजावत असतो. पण शराबखान्यात बसलेला शायर काय म्हणतो

खैर दोजख में शराब मिले ना मिले
शैख साहब से तो जां छूट जाएगी

Read Full Post »