शाळकरी वयात जेव्हा गाणी ऎकायचो, त्यावेळी ती काय सगळी बालगीतं थोडीच असायची ? छे ! उलट ती तशी गीतं आवडायची नाहीत. भक्ती गीतं,भावगीतं,चित्रपटातली गीत्ं ऎकल्या जायची. मोठ्या चवीनं ऎकल्या जायची. अर्थात त्या गाण्यांचा अर्थ समजण्याचं ते कुठं वय होतं म्हणा; पण गाणी मात्र मुखपाठ असायची.प्रश्नच नाही. मग शाळा ओलांडून जसजसं मोठं होत गेलो, तसतसं गाण्यांतल्या शब्दांचे अर्थ उजळू लागले, गाण्याचा अर्थ समजू लागला, गाणं कळू लागलं. अशी कितीतरी गाणी आहेत, जी शाळेत असताना वेगळ्या अर्थाची वाटली, त्याचा खरा अर्थ नंतर जाणवला. हिंदी गाण्यांच्या बाबतीत तर नेहमीच तारंबळ उडायची, ती शब्दांची. रेडिओवर ऎकलेलं ते गाणं- एक तर शब्द नीट ऎकायला यायचे नाहीत. नीट ऎकायला आले, तर त्याचा नेमका अर्थ समजायचा नाही.
मराठी गाण्यांच्या बाबतीत शब्दांचं तेवढं कोडं पडायचं नाही. ‘नववधू प्रिया मी बावरते..’ ( कवी : भा.रा.तांबे.)या गाण्यानं मात्र गंमत केली. शाळेत असताना हे गाणं आवडलं होतं, ते त्याच्या चालीमुळे. शिवाय आईला, मावशीला हे गाणं आवडायचं म्हणून मलाही आवडायचं. अर्थात त्या दिवसांतल्या सवयीमुळे ते गाणं मुखपाठ करून टाकलं होतंच. नव्या नवरीचं ते बावरणं, अडखळणं,लाजणं वगैरे सगळं सगळं त्यात आहे, हे शाळा ओलांडताना समजलं होतं फक्त. माहित असायचा प्रशनच नव्हता की. हे सगळं नवर्याला उद्देशून म्हटलेलं गाणं असून त्याच्यापुढे व्यक्त केलेल्या त्या भावना, आधारासाठी त्याने हात पुढे करावा हे आवाहन असलेलं ते गाणं जपून राहिलेलं होतं मनात. मग –
आता तूच भय लाज हरी रे
धीर देवूनी मी नवरी रे
भरोत भरतील नेत्र जरी रे
कळ पळभर मात्र खरे घर ते
हे कडवं ऎकलं की मनात चलबिचल व्हायची. काहीतरी वेगळं- उदासी ओलांडलेली हुरहुर,त्या प्रकारची अधीरता या गाण्यात आहे, हे तरूणपणात समजू लागलं. तथापि, हे कडवं तेवढं गांभीर्याने घेतलं नाही. का- कारण माझं तरूण वय आणि ती नववधू आहे, ही भावनाच एवढी तल्लख होती,की… अशावेळेस शरीरात गुंतलेल्या मनाला डोळ्यातला ओलावा जाणवत नसतो. तो कुणाचा दोष नसतो, बस- वय असतं ते.
…आजही त्या गाण्याची संगत सुटली नाही. आजही ते गाणं तितकंच आवडत आहे. मात्र त्या गाण्याच्या आवडीला आता कारण आहे माझ्या पन्नाशी ओलांडलेल्या वयाचं. ते शेवटचे कडवे जे मला फक्त समजले होते, ते आता अधिक अधिक जाणवत आहे. वय वाढू लागलं,व्याप-ताप वाढू लागले,मुलं मोठी झाली आणि कुणाच्याही लग्न समारंभाला गेलं, की आता मुलीचं ते निघणं मनात घर करू लागलं. लग्नाच्या घाईगर्दीचे साताठ दिवसांचे ते ताण तणाव, जाग्रणं, धावपळ,उत्साह, कष्ट सगळं सगळं गोळा होवून त्या निघण्याच्या वेळेला जणू पूर येवून जातो. अधीर झालेलं मन बावरून जातं….कुणाचंही लग्न असो, लग्नाच्या या शेवटच्या प्रसंगाने मनात चलबिचल होवू लागली.
दरम्यान केव्हातरी पूर्वीच या कडव्याचा अर्थ लागलेला होता.मागेच लक्षात आलं होतं,की हे गाणं ईश्वराला उद्देशून आहे. प्रियकराच्या रूपातला तो ईश्वर-तिकडेच जायचे आहे…खरं घर तेच आहे. आणि जाण्याची ओढही आहे- नदीच्या नैसर्गिक प्रवाहासारखी. आणि जाताना-निघताना होणारी थरथरही आहे. आता हे गाणं अधिक जिव्हाळ्याचं वाटू लागलं, अधिक जवळचं वाटू लागलं.
‘दिल ही तो है’ या चित्रपटातलं मन्नाडेचं गाणं अशाच नवथर तरूणीच्या अविचारी कृतीला पडलेला प्रश्न नमूद करणारं आहे-
लागा चुनरी में दाग छुपाऊं कैसे
चुनरी में दाग छुपाऊं कैसे घर जाऊ कैसे
या गाण्याचंही असंच झालं. शास्त्रोक्त संगीताचा साज-शृंगार असलेलं, लयदार,ढंगदार असं हे गाणं; या गाण्यातली पहिली ओळच तेवढी त्या वयात जाणवायची, आवडायची.चुनरीला लागलेला-बदनामीचा,लोकांच्या बोलाचा हा रंग आता कसा लपवायचा,कसा पुसयचा…
पण त्यातही गंमत अशी व्हायची,की मन्नाडेची ती ओळ ज्या तर्हेने म्हटल्या गेली-
वो दुनिया मेरे बाबुल का घर, ये दुनिया ससुराल
जा के बाबुल से नजरे मिलाऊं कैसे,घर जाऊं कैसे
त्याच तर्हेने मनात वैताग उमटून जायचा- ही कसली ओळ ? या ससुराल-बाबुलचा कुठे संबंध आला या झोकदार,रोमॅंटिक गाण्यात ? आं !
पण गाण्यातले पडलेले-पडणारे हे प्रश्न आभ्यासातल्या प्रश्नांसारखे नसतात : उत्तर दिलंस तर पास नाहीतर नापास, असे दटावणारे हे प्रश्न नसतात. आवडीच्या प्रांतात न समजणार्या गोष्टी,न सुटणारे प्रश्न हे सुध्दा आपलेच असतात; आपुलकीचे असतात,ते सुटले नसले तरी त्या प्रश्नांची संगत छानच वाटत असते. हिंदी गाण्यातल्या अशा कितीतरी कितीतरी अपरिचीत- न समज़लेल्या प्रश्नांच्या गाठी सोबत राहिल्या आणि पुढे आपोआप सुटून गेल्या.
साहिरची ही रचना मनात अशीच घर करून राहिली होती; त्या ससुराल-बाबुलच्या संबंधाची गाठ घेवून. पुढे वयाच्या पुढच्या टप्प्यात लक्षात आलं, हे गाणं रोमांचीत करणार्या भावनांचं जसं आहे, तस6 त्यात वेगळ्या जाणिवांचा वावरही आहे. आपलं आयुष्य, आपला या जगातला वावर,आपल्या आयुमर्यादेची जाणिव,आपल्यावरची जबाबदारी, आपल्याकडून अनाहूतपणे झालेल्या चुकांमुळे आता ईश्वराला- तिकडे गेल्यावर, काय सांगावे- त्याला कसं तोंड दाखवावं, या अशा भावना असलेलं हे गाणं आहे-जोरदार वाद्यवृंद आणि लयीत असलेलं.
पण गंमत आहे या दोनही गाण्यांत. लता मंगेशकरच्या त्या गाण्यात ईश्वराला नाथ म्हटलेलं आहे. तिकडेच आपल्याला नांदायचं आहे,ही जाणिव आहे. आणि मन्नाडेच्या या गाण्यात ईश्वराचं घर हे बाबूल आहे-माहेर. दोनही गाण्यत रोमांचीत करणार्या शारीर भावनांतून शरीरापलीकडचे जे अस्तित्त्व आहे, त्या अस्तित्त्वाची ओढ आहे.-तिकडली जाणिव आहे.
गाण्यातले-काव्यातले अर्थ आपल्याला समजतात; पण खरेदीला आलेला ग्राहक जसा आपापल्या रुचीनुसार त्यात्या दुकानांत रेंगाळतो, तसं आपल्या वयानुसार- आवडीच्या अनुरूप आपण त्यात्या शब्दांपाशी गुंतून रहातो. …पुढे दिवस बदलतात आणि तेच गाणं आपल्याला वेगळ्या स्वरूपात जाणवत रहातं. ‘फिराक’ गोरखपुरींचा एक शे’र कॉलेजला असताना वाचण्यात आला होता-
हजारबार जमाना इधर से गुजरा है
नईनई सी है कुछ तेरी राहगुजर फिर भी
अर्थ सरळच होता.प्रेमाच्या ऑळखीच्या वातावरणाचा. प्रेयसीच्या घराकडचा हा रस्ता वर्दळीचा असा. जाणारे येणारे लोक नेहमीच येत जात असतात. मीसुध्दा या रस्त्यावरून आलो-गेलेलो आहे. पण जेव्हापासून तुझी ओळख झाली आहे, तू मला आवडायला लागली आहेस, तेव्हापासून हाच रस्ता कसा नवीन वाटतो आहे….
या शे’रचा अर्थ सरळ असूनही मला तो एकदम वेगळ्या तर्हेने जाणवला एकदा. दवाखान्यात चार दिवसांकरीता ऍड्मिट होतो. ते सगळं तिथलं वातावरण ती औषधं, आजारपणाचे ते वातावरण आणि ती काळजी हे सगळं सगळं मी अनेक वेळा पाहिलेलं होतं. मित्रांच्या,नातेवाईकांच्या उपचारांच्या निमित्ताने. दवाखान्यात आलो होतो,मुक्कामही केला होता, काळजीही… नवीन नव्हतंच तसं काही. पण जेव्हा माझ्यावरच ही वेळ आली, जेव्हा मीच रूग्ण झालो, तेव्हा मला हाच दवखाना, हेच वातावरण, हाच परिसर कसा नवा नवा वाटू लागला.
वयाचा हा अनुभव ही अनुभुती…
समजणं आणि समजून घेणं…
ऑगस्ट 15, 2011 Madhukar Dharmapurikar द्वारा
प्रतिक्रिया व्यक्त करा