कालच्या ब्लॉगवर श्री रणजित यांनी प्रतिक्रिया देताना, त्यांना ‘दो बूंदे सावन की’ या गाण्याची आठवण झाली. श्रावणात बरसलेली पावसाची दोन थेंबं… त्यांचं नशिब किती वेगळं असतं, एकाच झाडावरची दोन फुलं, आणि दोन लहानपणच्या मैत्रिणी…. दोघांना सोसावं लागलेलं वेगवेगळं आयुष्य… साहिर लुधियानवींची ही रचना असून संगितकार आहेत खय्याम.या गाण्यात आशा भोसलेंची संगत केली आहे ती बासरीने. त्या बासरीचे स्वर आणि आशाबाईंचा आवाज… दोन मैत्रिणीच या…
Archive for जुलै, 2011
दो बूंदे सावन की…
Posted in Uncategorized on जुलै 16, 2011| Leave a Comment »
जाणिवेचे स्वरूप
Posted in फलासिफ :-ए-जिंदगी on जुलै 15, 2011| 6 Comments »
लहानपणात कुणी घसरून पडलेलं पाहिलं की अगदी खळखळून हसू यायचं. माणसाची फजिती आणि त्याचं खजील होणं याच्या एवढं करमणूकीचं प्रकरण दुसरं काही नसायचं. पुढे जसजसं मोठं होत गेलो, तसतसं त्यातली करमणूक कमी कमी होत गेली-म्हणजेच हसू कमी कमी होत गेलं. आता जेव्हा असं वय आलेलं आहे-ज्या वयात हात पायाला फ्रॅक्चर झालं तर किमान दोन महिने ते जुळणार नाही, याची जाणिव झाली आणि कुणी समोर घसरून पडलं तर चटकन त्याच्या मदतीला धावावं वाटतं;त्याला काही जास्त तर लागलं नाही ना या विचाराने अस्वस्थ होत रहातो.
जीवनव्यवहारातले टक्के टोणपे खाल्ल्यावर आता हसण्याचे विषय बदलले आहेत;किंबहूना आता हसण्यासारखं काही आहे का राहिलं,याचा विचार येतो आहे. पक्ष्याला पिंजर्यात द्डपून ठेवणं,पिलाला बांधून ठेवणं हे सगळं आता अघोरी वाटत आहे. जाणिवांचं स्वरूप बदललं की कसा अनुभव येतो पहा : अंत्यविधीच्या वेळेस मुतदेहावर उदबत्ती लावलेली, साबणाने त्याला स्नान घालून अत्तर लावलेलं एकदा जवळून पाहिलं-ते अनुभवलं, त्या सगळ्यांचे वास मनात असे भरून राहिले होते, की पुढे किती तरी दिवस या वासांना संदर्भ लागायचा तो संपून जायचा. वस्तू त्याच, ज्यांचा नेहमी वापर होतो, मनाच्या उल्हासासाठी,भक्तीच्या-मंगल वातावरणासाठी; पण कधी संदर्भ बदलले की विपरीत होवून जातं. एक शायर सांगतो-
एहसास के अंदाज बदल जाते हैं वर्ना
दामन भी उसी तार से बनता है कफन भी
…एकाच सूताने-एकाच धाग्याने दोनही वस्त्रं विणली असतात; पदराचे ते वस्त्रच आणि मृतदेहावर पांघरायचं कापड;ते पण त्याच धाग्याने बनलेलं की ! पण जाणिवेचे पदर वेगळॆ झाले की भावना बदलून जाणार…
एकाच धाग्याने बणलेली वस्त्रं जशी वेगळी वेगळी असतात तसंच माणसांचं ही असतं. अगदी ‘फिल्मी’ भाषेत सांगायचं झाल्यास एकाच आईचं एक पोरगं चोर तर एक पोरगं पोलीस असतं. एक सभ्य तर एक वाईट मार्गाचा. एकाचा वावर अंधारात तर एक प्रकाशाकडे जाणारा…
डॉ. इक्बाल यांनी अशीच एक तफावत सांगितली आहे-
परवाज है दोनों की इसी एक फिजां में
करगस का जहां और है,शाहीं का जहां और
एकाच वातावरणात दोनही पक्षी वावरतात, एकाच आभाळाखाली झेप घेतात- ससाणा आणि कावळा;
पण दोनही पक्ष्यांची प्रकृती वेगळी, दोघांचं विश्व वेगळं…
प्रतिक्षा आणि अभिलाषा
Posted in Uncategorized on जुलै 1, 2011| 6 Comments »
कुणाची प्रतीक्षा करणं म्हणजे वाढत जाणारा ज्वर सोसणं. प्रतीक्षा सुरू केव्हा होते-जेव्हा नियत वेळ ओलांडली जाते. कधी कधी ही नियत वेळ जेव्हा आपण स्वत:होवूनच अलिकडे-अगदी अलिकडे आणतो अन वाट पहायला सुरूवात करतो,तेव्हा खरं म्हणजे त्यावेळी ती प्रतीक्षा नसते बरं, ती असते अभिलाषा. उतावीळपणा,उत्सुकता. प्रतीक्षा करणार्याीची नजर वाटेकडे केंदित होवून बसलेली असते आणि त्या नजरेसोबत सगळं शरीर,सगळ्या हालचाली इतकंच काय श्वाससुध्दा तिकडे-त्या तिकडे लागून राहिलेले असतात.
आ,के मुंतजिर है बज्मे-गुलिस्तां तेरे लिए
महकी हुई है देर से सांसे गुलाब की
( मुंतजिर : प्रतीक्षा करणारा. बज्मे-गुलिस्तां : बागेची मैफल )
…बागेची ही मैफल सजलेली आहे,प्रतीक्षा करीत आहे.कुणाची प्रतीक्षा आहे बरं या उपवनाला..उपवनातले गुलाबसुध्दा अगदी उत्सुक होवून वाट पहात आहेत,त्यांचे श्वास त्या आगमनाच्या प्रतीक्षेत घमघमू लागले आहेत. कुणाची बरं असावी ही प्रतीक्षा…उपवनाला प्रतीक्षा कुणाची असणार- वसंताची;नाही का! बाग आणि बहार हे नातंच असं आहे. त्यांना एकमेकांची ओढ असणारच.
पण हा प्रतीक्षेचा ज्वर जसजसा वाढत जातो, तसतसं अस्वस्थ वाटत जातं. चुळबुळ होत रहाते. आठवणी,विचार आणि कल्पना यांची मनात जणू दंगल सुरू होते. येण्याची खात्री असल्यावर तर मग काय- तो साक्षात झाला आहे याचेच भास होत रहातात. ‘जिगर’मुरादाबादी तर गाण्यासाठी,संगीतासाठी एकदा एवढा उत्सुक झाला होता,की त्याला त्या वाद्यातून गाणं चक्क ऎकायला येवू लागलं होतं की !
गोशे-मुश्ताक की क्या बात कहूं अल्लाह अल्लाह !
सुन रहा हूं मैं वो नग्मा,जो अभी साज में है
( गोश : कान, गोशे-मुश्ताक : उत्सुक,आतूरलेले कान)
आणि माणसाची ही अशी उत्सुकता जर त्याच्या प्रिय व्यक्तीशी निगडीत असेल तर मग काय विचारता! हा जो संघर्ष आहे-प्रियतमेसोबतच्या जवळीकतेचा,दुराव्याचा; त्यात ह्रदयाचं स्पंदन हे शारिरीक चलनवलनाची कृती न रहाता भेटीच्या धडपडींची हालचाल होवून जातं-जणू आजाराची बाधा होवून जाते.मिर्जा गालिब आपल्या या ह्रदयाचा (मनाचा) समाचार घेताना ( दिले-नादां तुझे हुवा क्या है,,,) विचारतो-
हम है मुश्ताक और वो बेजार
या इलाही! ये माजरा क्या है
(बेजार: उदास,नाखुश या इलाही : हे माझ्या परमेश्वरा! माजरा: मामला,भानगड )
आम्ही एवढे उत्सुक आहोत अन ती चक्क उदासीन-आं! देवा, हा मामला काय आहे ? काय झालं?
‘मिर्जा गालिब’सिनेमात या ओळी सुरैय्याच्या तोंडी असल्याने आपली ( हो, आपलीच, गालिबची नाही ) ‘मुश्ताकी’ अधिक होवून जाते !