Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for जून, 2011

तस्बीह म्हणजे जपमाळ. ईश्वराचे स्मरण करण्यासाठी हाताशी असणारी मण्यांची माळ. अंगठा आणि तर्जनी यात धरून असलेली ती माळ- कधी डॉळे बंद असतात कधी अर्धवट उघडे असतात आणि मुंगी धावते तसा तो अंगठा मण्यांवरून सरकत रहातो. एकेक मणी तर्जनीवरून उतरत जातो,जपाचा संकल्प पुरा होत रहातो. ईश्वरनामाच्या आवर्तनाची संख्या जसजशी वाढत जाते-भक्तीभावाने मन ओथंबून जातं..एकेका मण्याच्या-क्षणाच्या मापाने ईश्वराच्या जवळीकीची भावना दाटत जाते.
पण माळ घेवून नाम जपताना मन तल्लीन असतंच असं नाही. मनातल्या त्या उच्चारांना कधी यांत्रिक स्वरूप येतं. आरती म्हणताना अन टाळ्या वाजवीत असताना नजर फिरत रहाते तसं आपलं मन त्या मण्यांवरून घरंगळून विचारांत-इतर विचारांत केव्हा नादाला लागतं पत्ता लागत नाही.
‘कामील’शुत्तारीचं मन असंच. माला जपताना त्याच्या मनात विचार येतो. पण हा विचार भलताच नसतो. अंगठ्याने मणी मागे मागे सारताना त्याच मार्गाने त्याचं मन पुढे धावतं आणि त्याला आचंबा वाटतो. स्वत:वर तो रागावतो अन् हे काय- हातातली माळ चक्क तोडून टाकतो !
कामील’ने इस खयाल से तस्बीह तोड दी
क्यूं गिन के उसका नाम ले, जो बेहिसाब दे

ईश्वर,जो आपल्याला भरभरून देतो-देताना कसला संकोच करीत नाही,काय दिलं,किती दिलं याचा हिशोब करीत नाही त्या ईश्वराचं आपण नाम घेतो, ते मात्र एकशे आठ, हजार आणि अशाच आकडेवारीच्या सहाय्याने ! तो देणारा दोन्ही हातांनी देतो अन् आपण त्याच्या नामाची मोजदाद करून हिशोबाने रहातो-केवढी विसंगती ही !
ईश्वर भक्तीमध्ये लबाडीची सरमिसळ फार बेमालूमपणाने कधी होत असते.लबाडी-चावटपणाला भक्तीच्या बेगडाचे वेष्टण लावून बसणारा एखादा बुवा ईश्वराला पुढे करून ‘मतलब’साधणारा असतो. भक्तीमार्गात स्त्रियांची दाटी असते आणि सुरेख चेहरे समोरून एकेकाने सरकत जाताना एकेकाने सरकत जाणार्‍या बोटांतल्या मण्यांवरून ईश्वर स्मरण आपोआप निसटून जातं…चेहर्‍यावर मन स्थीर झालेलं असतं आणि देवाच्या नावाच्या उच्चारांत लाडीगोडी आलेली असते-
तस्बीह की मूंगे होती है ये हसीन सूरत वाले
नजर से गुजरते जातें हैं,इबादत होती जाती है
( तस्बीह की मूंगे : माळेचे मणी इबादत : उपासना,आराधना )

 अशीच एक घटना आहे सिनेमतली :…तिच्या पायातलं घुंगरू वाजावं आणि माळेतल्या मण्यात गडबड होऊन जावी अशी घटना चित्रलेखा या चित्रपटात घडलेली आहे-ब्रह्मचारी असलेल्या महेमूदच्या बाबतीत.

Read Full Post »

बेखयाली

अत्यंतिक संवेदनशील मन:स्थिती ही अत्यंतिक ज्वालाग्राही पदार्थासारखी होवून बसलेली असते. निमित्ताची ठिणगी उद्भवली,की क्षणार्धात संवेदनांच्या ज्वाळा पेटतात. फरक एवढाच, की ज्वालाग्राही पदार्थाने पेट घेतला,तर परिणाम खाक होण्य़ात; तर पेटलेल्या संवेदनांमुळे- मन उजळून निघतं.
अर्थात ही अत्यंतिक संवेदना असते प्रेमाची-रोमांचीत करणार्‍या भावनांची संवेदना. ( द्वेषाची संवेदना,ज्वालाग्राही पदार्थापेक्षा बेकार) या संवेदनेनं तरूण मन जेव्हा भारावलेलं असतं, तेव्हा तिच्या हालचाली- तिचा कटाक्ष चक्क प्रतिसाद वाटून जातो. सहसा तिच्या त्या वागण्याबोलण्यात हालचालीत कसलंही आवाहन नसतं,ना सुचविणं- ती असते स्वाभावीक चलनवलनाची हालचाल. मात्र संवेदनांच्या धुक्यातून पहाताना,त्याच तिच्या हालचाली स्वर्गिय होवून बसतात. वेड लावतात. त्याला तो चक्क प्रतिसाद वाटत असतो-आपल्या संवेदनांसाठी दिलेला.
हिंदी सिनेमातल्या प्रेमव्यवहारात एवढ्या तरल संवेदना क्वचीत पहायला मिळतात. ‘मजरूह’सारखा निष्णात शायर सिनेमाचं गाणं लिहिताना कधी ही रेशमी-मुलायम भावना अलगद शब्दांत उतरवितो आणि मग आपण नकळत त्या संवेदनांच्या हवाली होतो.
‘तीन देवियां’ (1965) या चित्रपटात देव आनंदला एका पार्टीत फर्माईश केली जाते. सिनेमातला नेहमीचा -टिपीकल असा प्रसंग. आता भळभळ भरघोस प्रेम वहाणारं गाणं ऎकायला मिळणार अशा तयारीत आपण असतो आणि रफीच्या स्वरातून-शब्दांतून अलगद प्रकट होते, ती अत्यंतिक संवेदनशील मन:स्थिती…
कहीं बे-खयाल हो कर, यूंही छू लिया किसी ने
कई ख्वाब देख डाले,यहां मेरी बेखुदी ने

समारंभात भेटीगाठी होतात.हसणं-बोलणं होतं.कधी उपचार म्हणून, कधी ओळख म्हणून ,कधी नाईलाज म्हणूनसुध्दा. अशाच वेळी झालेला तो स्पर्श असतो. अगदी अनाहूत म्हणावा असा; पण त्या स्पर्शाच्या सुताने हा संवेदनेनं भरलेला माणूस चक्क स्वर्ग गाठतो की ! (बेखुदी : धुंदी,नशा ) तेवढ्याशा स्पर्शाने स्वप्नांची गर्दी होवून जाणं-दाटी होवून जाणं…केवढ्या तीव्र संवेदना म्हणाव्या त्या !
याच सिनेमात आणखी एक एका गाण्यात अगदी अशाच तर्‍हेने संवेदना कशा ‘ज्वालाग्राही’ बनलेल्या आहेत पहा-( गाणं आहे- ख्वाब हो तुम या कोई हकिकत…)
धडकनों ने सुनी इक सदा पांव की
और दिल पे लहराई आंचल की छांव सी

Read Full Post »