Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for फेब्रुवारी, 2011

(जर्रा : कण )
संगीताच्या मैफलीमध्ये तबल्याची संगत असते,संगतच. पण आपण कधी पहातो, गाणं किंवा ते वाद्य संगीत रंगात आलं,की हा आपल्या हरकती दाखवायला लागतो-तबलावादक. एवढ्या त्याच्या हरकती,की मुख्य कलाकाराचा खोळंबा व्हावा. कोणत्याही कार्यक्रमात सूत्र संचालक हा दुवा असतो,कलावंत आणि श्रोत्यांमधला. पण या हौशी गृहस्थाला त्याचं भान रहात नाही अन तो स्वत:च बोलत सुटतो,सांगत सुटतो. गुरू गौरव समारंभात शिष्याचाच रूबाब दिसत असतो.नेत्यापेक्षा त्याच्या कार्यकर्त्यांची वर्दळ आणि ‘हुशारी’ दिसत रहाते. हाताखालच्या कुणालाही, त्याची चूक दाखवायला गेलं-काही सांगायला गेलं, की ‘अन्याया’च्या भाषेची त्याची प्रतिक्रिया होवून जाते.उजळणी शिकण्याच्या आज के दौरवयात मुलाने आईबाबांना वर्तणूकीचे दाखले द्यावेत,देवासमोरच भक्तांची अरेरावी पहायला मिळावी…
ज्या गोष्टी मुळात लहान आहेत,त्यांना लहान संबोधणं हा अवमनाचा मुद्दा समजला जातो आहे. त्यामुळे कर्तुत्त्वाने उंची गाठणारा आणि त्या मार्गाला नुकतीच सुरूवात केलेला, यांचं नातं बिघडत आहे. …’समभावा’च्या वृत्तीची ‘भावकी’ होवून बसली आहे- मी पणाची. एक शायर हतबल होवून तिरकस तर्‍हेने सांगतो-
आज के दौर में कमतर को न कमतर कहिए
जर्रे कहते हैं,हमें  महरे -मुनव्वर कहिए
आज कुण्या लहानाला ‘लहान’ म्हणू नका रे बाप्पा! त्यांची चूक दाखवू नका. कारण आज चमकणारे कणसुध्दा, त्यांना सूर्य म्हणा-चमक नाही ही; असं बजावीत आहेत…दरडावीत आहेत…
जर्रा-एक कण या कणावर सूर्याचा-चंद्राचा प्रकाश पडतो अन तो चमकतो. चमचमतो. पौर्णिमेच्या रात्री तलावातल्या जललहरींवर चंद्राचा प्रकाश पडतो आणि असंख्य लहरींचा सुरेख चमचमणारा खजाना पाहून मन आनंदीत होतं. पाण्याच्या त्या कणांना-त्या थेंबांना लाभलेलं हे प्रकाशीत रूप हे त्यांच वैभव आहे,त्यांचं वैशिष्ट्य आहे- आणि हीच त्यांची मर्यादाही आहे. नेमकं याचंच भान दुर्देवाने हरपून जातं. मग जेव्हा तो कण स्वत:ला सूर्यच म्हणू लागला,चंद्रच असल्याचा आग्रह धरू लागला, तर त्या जललहरींचं कलहात रूपांतर व्हायला किती वेळ लागणार ? स्वत:ची मर्यादा बाळगून सहिष्णू वृत्तीने रहाणं-मोठ्याला मोठं म्हणणं,लहानाला लहान म्हणलं तर त्यात गैर काही नाही अशी समजूत बाळगणं हे नितांत गरजेचं आहे. ‘लहान’पणाची जी चमक आहे, तेच त्याचं वैशिष्ट्य असतं, त्याचं मोल- त्या मोलाचा विसर पडणं ही अन्यायाची बाब नाही,दुर्देवाची बाब आहे.
नुमाया जर्रे जर्रे में वो ही तस्वीरे-जानां है ही जाणिव आपल्या सगळ्यांना समृध्द करते. आणि हीच क्षणभर-कणभर समृध्दी आपलं सार्थक असतं. अकबर इलाहाबादी यांचा एक शे’र आहे-
हर जर्रा चमकता है अनवर-ए-इलाही से
हर सांस ये कहती है,हम है तो खुदा है.
( ज्रर्रा जसा चमचमतो,तसाच या शे’रचा आशयसुध्दा : ईश्वरी प्रकाशाने प्रत्येक कण उजळून निघाला आहे, प्रश्नच नाही;तथापि, एकदा वाटतं, प्रत्येक श्वासागणिक जाणिव होते, ती अशी,की आम्ही आहोत, ‘म्हणूनच’ ईश्वर आहे, म्हणावं, का आम्ही आहोत, ‘म्हणजेच’ ईश्वर आहे असं म्हणावं ! म्हणजे,ही कृतद्न्यतेची भावना आहे, की ‘जर्रेगिरी’च्या उध्दटपणावर ‘अकबर’ यांनी नेहमी प्रमाणे व्यंग केलं आहे !) असो.

प्रत्येकाने आपली मर्यादा बाळगून असणं हे संस्कृतीचं लक्षण आहे. त्यातच त्याचं मोल आहे आणि महत्त्वही आहे. ते स्वाभावीकही आहे.तसं जर नसेल, तर तपश्चर्या अन लक्ष लावून पहाणं सारखंच होवून बसेल की ! भक्ताने भक्तीच्या मार्गाने मोक्षाच्या प्राप्तीची इच्छा सोडून ईश्वरी अवताराचाच आग्रह ठेवावा हे विपरीत आहे.
प्रकाशाने विलक्षण चमकून उठणारा जर्रा-कण आणि अनुभुतीने विलक्षण जीवंत झालेला लम्हा-क्षण; तीच त्याची क्षमता आणि क्षणभराचं-कणभराचं अस्तित्त्व हेच त्याचं वैशिष्ट्य. माणूससुध्दा तसाचे की. कालप्रवाहाच्या दिर्घ व्यापापुढे त्याचं हे लहानपण,त्याचं हे मर्यादित आयुष्य;यातच खरी मौज आहे.
क्या गजब है के इंसा को नही इंसा की कद्र
हर फरिश्ते को ये हसरत है के इंसा होता
-दाग
देवदूताला माणसाच्या थोडक्या अस्तित्त्वाचा मोह होतो अन माणूस मात्र मोठेपणाचा आव आणतो-हाव धरतो.
क्षण एक पुरे प्रेमाचा असं,प्रेमाच्या प्रत्ययकारी क्षणाची अनुभुती घेणार्‍या कवीचं म्हणणंच एका शायरने असं मांडलं आहे-
इश्क फना का नाम है, इश्क में जिंदगी न देख
जल्वा-ए-आफताब बन, जर्रे में रोशनी न देख
प्रेम क्षणाचं असतं,त्याच्या कडून चिरंतनाची अपेक्षा ठेवू नको. ईश्वरी कृपा दृष्टीचं रूप हो,कृपा करणारा होवू नको.

(उर्दू शायरीतले हे शे’र.तसं पाहिलं तर गजलच्या या दोन ओळी. पूर्ण गजल,दिर्घ काव्यातल्या अनुभवाचं व्यापक स्वरूप शे’रमध्ये नसतं. आरशाच्या तुकड्यांत आभाळ दिसावं, तसा तो शे’र अन त्यातून जाणवणारं जीवन… …शे’रचे हे जर्रे चमकत असतात,भुरळ पाडीत जातात…)

Please visit my blog :http://hasanyachaaakar.wordpress.com/

Read Full Post »

माणसाच्या दिर्घ म्हणविल्या जाणार्‍या आयुष्यात अनेक टप्प्यांचे प्रवास असतात-
सुख,दु:ख,हसू-आसू,कष्ट-भोग,काय काय. सुखाच्या दिवसात शरीर मन कसं फुलून आलेलं असतं.पण कधी आकाशातून काळे ढग जातात,तेव्हा पठारावर त्यांची सावली पडावी,सगळा परिसर झाकोळून जावा तसं होतं अन संकटांना तोंड देता देता आपलं शरीर मन जणू कोळपून जातं. पण आयुष्य संपलेलं नसतं,प्रवास चालूच असतो. पण संकट-ते येऊन गेलेलं वादळ असं असतं,की आपला चेहरा मोहरा बदलून जातो-

चेहरे की चमक छीन ली हालात ने वर्ना
दो चार बरस में तो बूढापा नही आता

पण हे झालं, कष्टांशी प्रत्यक्ष लढण्यामुळे जी शरीर मनाची झीज होते,त्याबद्दल. गंमत अशी,की त्याच सोसलेल्या-भोगलेल्या दु:खाचं माणूस नंतर भांडवल करतो.कष्टी चेहरा करून वावरतो. सुखाचे दिवस आले, तरी त्याच्या चेहर्‍यावरचा तो कळंकलेपणा निघून जात नाही. शिवाय तिच सवय एकदा झाली,की माणूस एकांतातसुध्दा वाकड्या चेहर्‍यानेच रहातो.(-रहातो की काय! एकदा बघायला पाहिजे स्वत:कडे ) पण अशा कष्टी चेहर्‍याने अंतिमत: नुकसान कुणाचं होणार- आपलंच ना. कुणाला काय देणं घेणं असतं?

वक्त के पास न आंखे है न अहसास  न दिल
अपने चेहरे पे कोई दर्द न तहरीर करो ( तहरीर :लिहणे, दर्शविणे)

म्हणूनच ‘सिमाब्’ अकबराबादी हा शायर म्हणतो-

खुद किस्सा-ए-गम अपना कोताह किया मैने
दुनिया ने बहोत चाहा अफसाना बना देना ( कोताह : मर्यादित,सिमित)

माझ्या दु:खाची हकीकत मी स्व्त:च सिमित करून टाकली. गप्प राहिलो. लोकांना माझ्या दु:खाच्या हकिकतीमध्ये  भलतीच रूची दिसू लागली.. त्यांना ते ‘भलतंच’ चवदार वाटू लागलं, म्हणून…

Please visit :http://hasanyachaaakar.wordpress.com/

Read Full Post »

रूबाब

लताच्या एका जुन्या गाण्यात शेवटचे कडवे गाताना आवाज उंचावून ती गाते-
जो टूटता  है रूबाब, उसको टूट जाने दे
मेरे शबाब को जी भर के गीत गाने दे…

माझ्या तारूण्याच्या उत्साहाला आवर मी घालणार नाही. मी गात रहाणार. गाण्य़ाच्या साथीसाठी घेतलेला हा जो रूबाब आहे, तो तुटला तरी बेहत्तर,मी गातच रहाणार…
हा रूबाब. हे वाद्य. साथ संगतीचं वाद्य. आणि उत्साहाच्या मनाला संगत देणारं शरीर हेसुध्दा वाद्यच असतं ना. आणि रूबाब हा शब्द आणखी एका अर्थाने लागू होतोच की आपल्याला. उत्साहाने,तारुण्याने भरलेल्या शरीराचा रूबाबच वेगळा असतो.
आणखी एका अर्थाने हा शब्द लागू होतो. शरीर हे थकणारंच असतं.संपणारच असतं. मनाला आवर नसतो,मर्यादा नसते. म्हणून तर अनावर झालेलं मन शरीराची पर्वा न करता म्हणत रहातं-जो टूटता है रूबाब,उसको टूट जाने दे… शरीर जेव्हा थकायला लागतं,तेव्हा आपण म्हातारे होत चाललो,की काय अशी शंका येत रहाते; आणि एवढंच नव्हे तर ती शंका स्वस्थ बसू देत नाही. मग मागचे ते दिवस, तारूण्यातल्या त्या आठवणी येत रहातात, मन अनावर होतं; अन वाटतं, नाही….अभी तो मैं जवान हूं..
मुहंमद ‘अल्वी’हा शायर म्हणतो,
याद करता हूं पुरानी बाते
सोचता हूं,के जवां हू मै भी

पण ‘जोश’मलिहाबादी हा शायर मात्र मोठा आचंबीत झालेला आहे. त्याला आपल्या यौवनाचे ते दिवस आठवतात.ती मस्ती,तो जोम आठवतो आणि ते सगळं आत्ताच्या तबियतीच्या तुलनेत (बीपी,शूगर,कोलेस्ट्रोल?) विचार करता,एकदमच खोटं वाटून जातं- मीच होतो का तो ? छे!
‘जोश’ अब तो शबाब की बातें
ऎसा लगता है जैसे अफवा हो

गेलेल्या दिवसांच्या दु:खात सगळ्यात जास्त क्लेषकारक बाब म्हणजे- गेलेले यौवन.
अब इत्र भी मलो तो खुशबू नही आती,
वो दिन हवा हुए,जब पसिना गुलाब था

खरंच आहे ते. यौवनाचे,उभारीचे ते दिवस…त्या दिवसांचं वेगळं असं अस्तित्त्व त्यावेळेस कुठं जाणवत असतं ? ते जाणवतं,ते प्रकर्षाने लक्षात रहातं ते तो काळ सरल्यावरच.
…आणखी एक गंमत अशी,की त्यावेळ्च्या सुखामुळे आपल्याला किती छान वाटलं होतं,अन त्या वेळच्या दु:खामुळे आपण किती विचलीत झालो होतो, हे आता आठवतं.
… आज ते सुख काही एवढं मोठं नव्हतं,ते दु:ख काही एवढं घाबरून जाण्यासारखं नव्हतं हे लक्षात आलेलं असतं.
‘जज्बी’ या शायरला त्या  सुख दु:खाचाच आचंबा वाटतो-

ऎश से क्यों खुश हुए, क्यों गम से घबराया किए
जिंदगी क्या जाने क्या थी,और क्या समझा किए

….जाऊ द्या.नाईलाज को क्या इलाज ?

टीप : माझ्या या जानिबे-मंजिल बद्दल इ टिव्ही (उर्दू) चॅनल वर बातमी आली होती,
त्या बातमीचा हा अंश :

Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

Read Full Post »