(जर्रा : कण )
संगीताच्या मैफलीमध्ये तबल्याची संगत असते,संगतच. पण आपण कधी पहातो, गाणं किंवा ते वाद्य संगीत रंगात आलं,की हा आपल्या हरकती दाखवायला लागतो-तबलावादक. एवढ्या त्याच्या हरकती,की मुख्य कलाकाराचा खोळंबा व्हावा. कोणत्याही कार्यक्रमात सूत्र संचालक हा दुवा असतो,कलावंत आणि श्रोत्यांमधला. पण या हौशी गृहस्थाला त्याचं भान रहात नाही अन तो स्वत:च बोलत सुटतो,सांगत सुटतो. गुरू गौरव समारंभात शिष्याचाच रूबाब दिसत असतो.नेत्यापेक्षा त्याच्या कार्यकर्त्यांची वर्दळ आणि ‘हुशारी’ दिसत रहाते. हाताखालच्या कुणालाही, त्याची चूक दाखवायला गेलं-काही सांगायला गेलं, की ‘अन्याया’च्या भाषेची त्याची प्रतिक्रिया होवून जाते.उजळणी शिकण्याच्या आज के दौरवयात मुलाने आईबाबांना वर्तणूकीचे दाखले द्यावेत,देवासमोरच भक्तांची अरेरावी पहायला मिळावी…
ज्या गोष्टी मुळात लहान आहेत,त्यांना लहान संबोधणं हा अवमनाचा मुद्दा समजला जातो आहे. त्यामुळे कर्तुत्त्वाने उंची गाठणारा आणि त्या मार्गाला नुकतीच सुरूवात केलेला, यांचं नातं बिघडत आहे. …’समभावा’च्या वृत्तीची ‘भावकी’ होवून बसली आहे- मी पणाची. एक शायर हतबल होवून तिरकस तर्हेने सांगतो-
आज के दौर में कमतर को न कमतर कहिए
जर्रे कहते हैं,हमें महरे -मुनव्वर कहिए
आज कुण्या लहानाला ‘लहान’ म्हणू नका रे बाप्पा! त्यांची चूक दाखवू नका. कारण आज चमकणारे कणसुध्दा, त्यांना सूर्य म्हणा-चमक नाही ही; असं बजावीत आहेत…दरडावीत आहेत…
जर्रा-एक कण या कणावर सूर्याचा-चंद्राचा प्रकाश पडतो अन तो चमकतो. चमचमतो. पौर्णिमेच्या रात्री तलावातल्या जललहरींवर चंद्राचा प्रकाश पडतो आणि असंख्य लहरींचा सुरेख चमचमणारा खजाना पाहून मन आनंदीत होतं. पाण्याच्या त्या कणांना-त्या थेंबांना लाभलेलं हे प्रकाशीत रूप हे त्यांच वैभव आहे,त्यांचं वैशिष्ट्य आहे- आणि हीच त्यांची मर्यादाही आहे. नेमकं याचंच भान दुर्देवाने हरपून जातं. मग जेव्हा तो कण स्वत:ला सूर्यच म्हणू लागला,चंद्रच असल्याचा आग्रह धरू लागला, तर त्या जललहरींचं कलहात रूपांतर व्हायला किती वेळ लागणार ? स्वत:ची मर्यादा बाळगून सहिष्णू वृत्तीने रहाणं-मोठ्याला मोठं म्हणणं,लहानाला लहान म्हणलं तर त्यात गैर काही नाही अशी समजूत बाळगणं हे नितांत गरजेचं आहे. ‘लहान’पणाची जी चमक आहे, तेच त्याचं वैशिष्ट्य असतं, त्याचं मोल- त्या मोलाचा विसर पडणं ही अन्यायाची बाब नाही,दुर्देवाची बाब आहे.
नुमाया जर्रे जर्रे में वो ही तस्वीरे-जानां है ही जाणिव आपल्या सगळ्यांना समृध्द करते. आणि हीच क्षणभर-कणभर समृध्दी आपलं सार्थक असतं. अकबर इलाहाबादी यांचा एक शे’र आहे-
हर जर्रा चमकता है अनवर-ए-इलाही से
हर सांस ये कहती है,हम है तो खुदा है.
( ज्रर्रा जसा चमचमतो,तसाच या शे’रचा आशयसुध्दा : ईश्वरी प्रकाशाने प्रत्येक कण उजळून निघाला आहे, प्रश्नच नाही;तथापि, एकदा वाटतं, प्रत्येक श्वासागणिक जाणिव होते, ती अशी,की आम्ही आहोत, ‘म्हणूनच’ ईश्वर आहे, म्हणावं, का आम्ही आहोत, ‘म्हणजेच’ ईश्वर आहे असं म्हणावं ! म्हणजे,ही कृतद्न्यतेची भावना आहे, की ‘जर्रेगिरी’च्या उध्दटपणावर ‘अकबर’ यांनी नेहमी प्रमाणे व्यंग केलं आहे !) असो.
प्रत्येकाने आपली मर्यादा बाळगून असणं हे संस्कृतीचं लक्षण आहे. त्यातच त्याचं मोल आहे आणि महत्त्वही आहे. ते स्वाभावीकही आहे.तसं जर नसेल, तर तपश्चर्या अन लक्ष लावून पहाणं सारखंच होवून बसेल की ! भक्ताने भक्तीच्या मार्गाने मोक्षाच्या प्राप्तीची इच्छा सोडून ईश्वरी अवताराचाच आग्रह ठेवावा हे विपरीत आहे.
प्रकाशाने विलक्षण चमकून उठणारा जर्रा-कण आणि अनुभुतीने विलक्षण जीवंत झालेला लम्हा-क्षण; तीच त्याची क्षमता आणि क्षणभराचं-कणभराचं अस्तित्त्व हेच त्याचं वैशिष्ट्य. माणूससुध्दा तसाचे की. कालप्रवाहाच्या दिर्घ व्यापापुढे त्याचं हे लहानपण,त्याचं हे मर्यादित आयुष्य;यातच खरी मौज आहे.
क्या गजब है के इंसा को नही इंसा की कद्र
हर फरिश्ते को ये हसरत है के इंसा होता
-दाग
देवदूताला माणसाच्या थोडक्या अस्तित्त्वाचा मोह होतो अन माणूस मात्र मोठेपणाचा आव आणतो-हाव धरतो.
क्षण एक पुरे प्रेमाचा असं,प्रेमाच्या प्रत्ययकारी क्षणाची अनुभुती घेणार्या कवीचं म्हणणंच एका शायरने असं मांडलं आहे-
इश्क फना का नाम है, इश्क में जिंदगी न देख
जल्वा-ए-आफताब बन, जर्रे में रोशनी न देख
प्रेम क्षणाचं असतं,त्याच्या कडून चिरंतनाची अपेक्षा ठेवू नको. ईश्वरी कृपा दृष्टीचं रूप हो,कृपा करणारा होवू नको.
(उर्दू शायरीतले हे शे’र.तसं पाहिलं तर गजलच्या या दोन ओळी. पूर्ण गजल,दिर्घ काव्यातल्या अनुभवाचं व्यापक स्वरूप शे’रमध्ये नसतं. आरशाच्या तुकड्यांत आभाळ दिसावं, तसा तो शे’र अन त्यातून जाणवणारं जीवन… …शे’रचे हे जर्रे चमकत असतात,भुरळ पाडीत जातात…)
Please visit my blog :http://hasanyachaaakar.wordpress.com/