शायर लोकांचे प्रेमाचे व्यवहार फार जालिम असतात. सामान्य माणसासारखं त्यांचं प्रेम काही असं तसं नसतं. जीवन मरणाच्या नुसत्या बाता मारणारे ते वादे-इरादे नसतात,तर कृतीत उतरवून दाखवायची धमक त्यात असते.आणि या शायर लोकांना प्रेयस्या ( वा! काय छान अनेक वचन आहे !) तशाच अगदी जालीम-अगदी जीवघेण्या असतात. एका शायरच्या नशिबाला अशीच एक जीवघेणी प्रेयसी लाभली. तिच्या, ‘निघून जा !’अशा सांगण्याचा एवढा असर त्याच्यावर झाला,की दुसर्याज दिवशी मोठ्या बाका प्रश्नाला उत्तर द्यायची वेळ त्याच्यावर आली-
जनाजा रोक कर मेरा,कुछ इस अंदाज से वो बोले
गली तो हमने कही थी,तुम तो दुनिया छोडे जाते हो
आता हा प्रश्न आपल्यासाठी हसण्याचं निमित्त होतो,त्याच्यासाठी जिव्हारी लागणारा असा.(पण जीवच गेला तर जिव्हार कुठे रहाणार..) आणि माणसाचं जाणं-निघून जाणं असंच तर असतं-सांगणारा असतो,ऎकणारा मात्र निघून गेलेला असतो. ‘अमर’मध्ये म.रफीने गायलेलं एक आर्त असं गाणं आहे-‘ओ दूर के मुसाफिर हमको भी साथ ले ले..’ शकील बदायुनीच्या या गीतामध्ये सुरूवातीला एक शे’र आहे-
चले आज तुम जहां से,हुई जिंदगी पराई
तुम्हे मिल गया ठिकाना,हमे मौत भी ना आई
आलेला माणूस हा जाणारा असतोच. बुलावा आला की त्याला निघावं लागतं,जावं लागतं. पण हे त्याचं जाणं केव्हा असतं-जेव्हा त्याला बोलावणं आलेलं असतं तेव्हा.
पण जवळचा माणूस जातो,तेव्हा आपल्याला का कोण जाणे वाटत रहातं, त्याने इतक्या लौकर जायला नको होतं.त्याने जायची घाई केली…जसं काही त्याला बोलावणं आलं नव्हतं,तोच निघून गेला.आपण होवून निघून गेला.रुग्णाची विचारपूस करायला आपण जातो.त्याच्याशी बोलतो.त्याला बरंही वाटतं. चार सुख दु:खाच्या गोष्टी होतात. प्रकृतीबद्द्ल सांगताना तो सांगून जातो,की फार अशक्त वाटतं आहे, उठायलासुध्दा होत नाही,तेवढी शक्तीच नाही राहिली.त्याला धीर देवून आपण त्याचा निरोप घेतो.
आणि सकाळी निरोप येतो, तो गेल्याचा. आपण सुन्न होतो. कालची विचारपूस आठवत रहाते. आपलं एक मन मग राहून राहून त्याला उद्देशून म्हणत असतं-
कल तो कहते थे,के बिस्तर से उठा जाता नही
आज दुनिया से निकल जाने की ताकत आ गई…
Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com
प्रतिक्रिया व्यक्त करा