Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for ऑक्टोबर, 2010

शरीफ

फुलांसोबत काटे असतात,सुख-दु:ख सोबतीनेच असतं असं आपण म्हणतो, ऎकतो. पण फुलाचे-काट्यांचे परस्पर संबंध कसे असतात याचा क्वचितच विचार होतो. फुललेला चेहरा घेवून सगळ्यांना सदैव हसण्याचा संदेश देणारं फूल -त्याला मात्र सदैव संगत असते,ती काट्यांची. फुलाला स्पर्श करायला जावं,तर आपल्या बोटांना काटे रुततात. मग फुलांचं कसं होत असेल…त्यांना तर काट्यांचीच सोबत असते की. सदैव हसण्याचा फुलाचा संदेश हा जेवढा महत्त्वाचा;तेवढाच-किंबहुना अधिक महत्त्वाचा संदेश म्हणजे, नको असलेला,त्रासदायक असा तो सोबती-काटा; त्याच्या सोबतीने फूल गुण्यागोविंदाने रहातं… माणूस मात्र  माणसासोबत राहू शकत नाही.
फूल कर लेंगे निबाह कांटो से
आदमी ही न आदमी से मिले
– ‘खुमार’

खरं म्हणजे काट्यांचा हा त्रास फुलं सोसतात, त्याबद्द्ल तक्रारही करीत नाहीत; शिवाय चेहर्‍या वर समजूतीचं प्रसन्न असं ते हसू… त्यांना काय वाटत असतं काट्यांकडून होणार्‍या  छळाबद्दल ? ते का शिकायत करीत नाहीत काट्यांची ? काट्यांच्या त्रासाबद्दल फूल काहीच बोलत नाही, याचं कारण असतं फुलाचा सभ्यपणा. ते नुसतं हसरा  चेहरा घेवून जन्माला आलेलं नसतं,तर एक समजूतदार तबीयत घेवून ते वावरणारं असतं.काट्यांच्या उद्घटपणाकडे दूर्लक्ष करण्याइतका सोशीकपणा फुलाकडे असतो.  फुलाचा हा सभ्यपणा एका शायरला जाणवला. तो म्हणतो-
गुलोंने खारोंके छेडने पर सिवा खामोशी के दम न मारा
शरीफ उलझेंगे गर किसी से तो फिर शराफत कहां रहेगी
( खार : काटा )

ही शराफत. ही केवळ सभ्य रहाण्याशी संबंधीत नाही. सभ्य माणूस जाणून असतो. वाईटाला सरळ वाईट म्हणण्यापेक्षा  अशा वृत्तीचा आभ्यास त्याला आवश्यक वाटतो. म्हणूनच काट्यांचा बोचरेपणा फुलांना वेगळ्या तर्‍हेने  जाणवतो. काट्यांच्या त्या सवयीकडे क्षमाशील वृत्तीने फूल पहातं, आणि आपल्याला सांगतं-

बेकार शिकायत है कांटो से चमनवालों
चुभते है,तो ये उन की फितरत का तकाजा है

काट्यांच्या काटेरीपणा बद्दल शिकायत काय करायची? इश्वरानेच त्यांना ते रूप दिलं आहे. ती प्रकृती दिली आहे.
त्यांचा काय दोष… त्यांच्याशी निबाह करणं यातच आपली परीक्षा असते..

please visit another  blog :       http://hasanyachaaakar.wordpress.com/

Read Full Post »

वर्गात शिकविणारे एखादे शिक्षक जरबेचे असतात.त्यांच्या विद्वात्तेचा,त्यांच्या शिकविण्याचा प्रभाव आपल्यावर असतो,त्यांच्याबद्दलचा आदर सदैव मनात भरून असतो. पण एक ढ आणि व्रात्य पोरगा आपल्या मनात सदैव मागच्या बाकावर बसलेला असतो.धडा समजून थेन्यापेक्षा न घेण्याकडेच त्याचा कल असतो. ..अतिरिक्त प्रभावाच्या दडपणापासून सुटका मिळविण्याची त्याची ही धडपड.समोरची मुलं अध्ययानात मग्न झालेली असताना,मागच्या बाकावरचा हा व्रात्य पोरगा अंगवळणी पडलेल्या त्याच्या सवयीत मश्गुल असतो-विडंबनाची त्याची सवय.
डॉ.इक्बाल यांची भरदार शायरी,भक्कम उपदेश,शब्दांतला तो दरारा त्याचबरोबर वर्गाताल्या मुलांबद्दल असावा, तसा ‘माणसा’बद्दल असलेला जिव्हाळा.त्यांच्या काव्याचा प्रभाव जीवनभर साथ देणारा. पण ते एवढ काव्य समजायला- पेलायला,’जज्ब’व्हायला आपली क्षमता तोकडी पडते की काय अशा भावनेचा अंमल कधी चढतो आणि मग त्याच वेळेस मनाच्या मागच्या बाकावर बसलेल्या त्या व्रात्त्य पोराच्या चाळ्यांकडे लक्ष जातं.
तरूण वयात तत्त्वांबद्दल-उपदेशांबद्द्लचं जे आकर्षण असतं,त्यात रोमांच असतो,तसा माझ्यातही होताच. त्याच दिवसांत डॉ.इक्बाल यांचे शे’र वाचून विलक्षण असा थरार मनात उमटायचा.त्या भरात,त्यांचे अवघड शब्दांचे अर्थ-अक्षरश: आक्रोड फोडून गर खावा,तसं शोधून घेवून समजावून घेतले-
तू ने ये क्या सितम किया मुझको भी फाश कर दिया
मैं ही तो एक राज था, सिना-ए-कायनात में

इक्बाल यांची ईश्वराबद्द्लची तक्रार मशहूर आहे. ईश्वराला उद्देशून ते म्हणतात, ‘ तू हा काय माझ्यावर अन्याय (सितम) केलास-मलासुध्दा प्रकट (फाश) केलंस !(जन्माला घातलंस !) या विश्वाच्या उदरातलं रहस्य म्हणून मीच होतो. (तू जन्माला घातलं नसतंस, तर विश्वाच्या रहस्याचाच एक भाग बनून मी राहिलो नसतो का?)

तरूणपणातल्या त्या दिवसांत जीवनव्यवहाराचे ट्क्के टोणपे खाण्यापूर्वीच मला या तत्त्वांचा परिचय झाला आणि कुशाग्र पोराच्या चेहर्‍यावर कधी मूढता वाढते, तसं झालं.तो-तो व्रात्य पोरगा.त्याच्या उच्छादाकडे लक्ष गेलं.त्याच्याबद्द्ल अजिबात तक्रार नसते. सत्त्याचं रूप थट्टेच्या अंगानं पाहिल्यावर हुशारीची ती अतिरीक्त मूढता कुठल्या कुठे पळून जाते. या शे’रची थट्टा मी नेहमीच ‘एंजॉय’करतो :

याच दिवसांत मला व्यंगचित्रं काढायचा छंद लागला होता. एकदा या ‘फाश’वाल्या शे’रसाठी मी एक व्य़ंगचित्र काढलं होतं- अंधाराची पार्श्वभूमी. रस्ता -त्यावर लाईटचा खांब,हॅट घातलेला बल्ब अन त्या प्रकाशात एक पोलीस एका चोराला हातकड्या घालून घेवून जातो आहे…नाराज झालेला तो  चोर, ( बहुदा इक्बाल यांचा वाचक असावा) हा शे’र ऎकवितो आहे त्या पोलीसाला !मध्य रात्रीचं वातावरण, अंधारात चोरी करून पळून जाणार्‍या त्या चोराला या पोलीसाने पकडून ‘प्रकाशात’आणले आहे,आणि चोराची ही नाराजी !
मी काढलेल्या या व्यंगचित्रामुळे मला त्या शे’रचा खरा अर्थ समजला,आणि कायम लक्षात राहिला.

Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

Read Full Post »

घर

एका व्य़ंगचित्रात एक माणूस टेलिफोन बूथवरून फायर ब्रिगेडला फोन करून सांगतो आहे : तुम्हाला ताबडतोब सापडेल माझं घर- गल्लीतलं तेवढंच तर घर आहे,आग लागलेलं..
आपण रहातो,त्या घराचा पत्ता अशा तर्‍हेनं देणं यावरून आपलं अन घराचं नातं याबद्दल  एक गोष्ट लक्षात येते,ती म्हणजे आपली उपरोधाची तबियत. एका शायरने आपल्या प्रेयसीला घरी येण्याचं निमंत्रण देताना घराचा पत्ता असा दिला-
सारी बस्ती में फकत मेरा ही घर है बे-चिराग
तीरगी से आपको मेरा पता मिल जाएगा

( बे-चिराग : प्रकाश नसलेलं         तीरगी  : अंधार  )
‘गालिब’ ची प्रेयसी घरी भेटायला आली, तर गालिबला त्यावर विश्वासच बसेना. तिचं घरी येणं ही ईश्वराचीच कृपा आहे असं वाटतं त्याला अन त्याची अवस्था काय होते?
वो आए घर में हमारे,खुदा की कुदरत है
कभी हम उनको कभी अपने घर को देखते है

आपलं घर.. आपण चोवीस तास घरात रहातो, पण जेव्हा कुणी वेगळं माणूस घरात येतं,तेव्हा हेच आपलं घर आपल्याला वेगळं वाटत असतं. आपण त्या दुसर्‍याच्या नजरेतून आपल्या घराकडे पहातो, आणि घराचं एक वेगळं रूप आपल्याला जाणवत राह्तं…

अब तक न खबर थी मुझे उजडे हुए घर की
तुम आए तो घर बे-सरो-सामां नजर आया
(‘जोश’मलिहाबादी)
…तू घरात आलीस आणि लक्षात आलं माझं घर किती उजाड आहे…कसलंच सामान नाही घरात.

आपल्या या घरातल्या प्रत्येक निर्जीव वस्तू खरं म्हणजे आपल्याशी संवाद साधण्याच्या प्रयत्नात असतात. आपल्यालाच सवड नसते आणि म्हणूनच त्याची खबरही नसते. जिवाला जेव्हा लागतं,घरात जेव्हा आपण एकले असतो, तेव्हा आपल्याला घरातली प्रत्येक वस्तू जणू विचारीत असते, आपल्याला त्यांचं ते विचारणं जाणवत असतं-झोंबतही असतं…
घर की हर इक  शै पूछती है
कौन तुझको कर गया तनहा

…आणि मग एकलेपणा असह्य होतो. दारात उभं राहून तिच्या दिशेने आवाज द्यावा वाटतो,
तू जो आए तो इस घर को संवरता देखूं
एक मुद्दत से जो विरां है,वो बसता देखूं

please visit another  blog :       http://hasanyachaaakar.wordpress.com/

Read Full Post »