Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for सप्टेंबर, 2010

आयुष्याची लांबी

डॉ.इक्बाल यांनी म्हटलं आहे-

तू इसे पैमान:-ए-इमरोज व फर्दां से न नाप
जावेदां,पैहम रवां, हरदम जवां है जिंदगी
( पैमान: – मोजमाप,इमरोज : आज,   फर्दां : उद्या,   पैहम : निरंतर, र वां : प्रवाही )

दैनंदिन घटना, समस्या, काळजी ( आजाराची-मृत्यूची ?) अशा बाबीं कधी घ्रेरून येतात आणि मग गोमाशांनी एखादं जनावर त्रस्त होवून जावं तसं होवून जातं. काही खरं नाही गड्या.. असं वाटत जातं. कधी चिंतेचे एवढे काळे कुट्ट ढग जमा होतात, की वाटतं सरला आता खेळ सगळा, खल्लास ! हे खल्लास होणं केवळ शरीरानेच नाही तर अनेक अर्थांनी असतं. काही सुचत नसतं,संपून गेल्याची जाणिव अगदी रिकामं करून टाकीत असते.आयुष्याची निरर्थकता वगैरे तत्त्वांची आपण बडबड करीत असतो.  अशा वेळेस डॉ.इक्बाल सारखे विचरवंत आपल्याला समजावितात, की केवळ दिवस व रात्रीच्या फुटपट्टीने तू आयुष्याची लांबी-रूंदी मोजू नकोस…आयुष्य हे निरंतर आहे, प्रवाही आहे,सतत चालणारं आहे.

पण होतं असं, की हे पटून तर जातं मात्र मनात ती उदासी निर्थकता भरलेली असल्याने मनाला आलेला ओशटपणा काही जात नाही. हा ओशटपणा जातो, ते एखादं वडिलधारी माणूस जेव्हा तोच आशय सुरातून सांगतो, समोर येवून सांगतो तेव्हा. दिन और रात के हाथों नापी नापी एक उमरिया साँस की डोरी छोटी पड़ गई लम्बी आस डगरिया भोर के मन्ज़िल वाले उठ कर भोर से पहले चलते ये जीवन के रस्ते… ‘आशीर्वाद’ मधल्या या गीताचे गीतकार आहेत,गुलजार. दिवस-रात्रीच्या हातांनी हे आयुष्य मोजलं. श्वासाची दोरी तोकडी पडली. दीर्घप्रवास चालूच आहे… अशोक कुमारसारखा दिर्घ आयुष्याचा धनी, अभिनयाचा धनी हे सांगतो, आणि सांगता सांगता निघूनही जातो, तेव्हा आयुष्याचा हा प्रदीर्घ प्रवास आपल्याला जाणवत रहातो आणि दम खावून आपणही त्या प्रवासाची नव्याने तयारी करीत जातो. हे असं चालतच रहातं… डॉ.इक्बाल यांनी हे सांगितलं, ते 1938 मध्ये गेले ,तेव्हा गीतकार गुलजार  यांच्या आयुष्याची पहाट झालेली होती;त्यांचा जन्म 1934 चा.

 

please visit another  blog :       http://hasanyachaaakar.wordpress.com/

Read Full Post »

हम अपने अहद की खुशियां खरीदते कैसे
हमारे पास पुरानी सदी के सिक्के थे

( अहद : क़ाळ,कारकीर्द, सत्ता )

हा शे’र वाचण्यात आला आणि सुरूवातीला सर्वसाधारणपणे शे’रचा मोह ज्या कारणामुळे पडतो, त्याच कारणामुळे या शे’रचा मोह पडला.’अहद’ – वर्तमान आणि ‘पुरानी सदी’ या परस्पर विरोधी शब्दांचा संकोच (स्पार्किंग?) हे ते कारण. पुढे अर्थाच्या नादाला लागलो.आजच्या जमान्यातली खुशी -आनंद आम्हाला खरेदी कसे करता येणार…आमच्या हाती तर जुन्या जमान्यातली-आता बाद झालेली नाणी आहेत.

म्हणजे, आज काळ बदलला आहे.रिती-रीवाज,मान-अपमान,सभ्यता,रहन सहन याबाबत सगळेच नियम,संकेत -ते मागचे,राहिले नाहीत. किंवा ते एवढ्या झपाट्याने बदललेले आहेत,की कालची गोष्ट आज जुनी झालीय.रद्द झालीय. आज तुम्हाला जगायला हवं, तर आजचंच चलन हवंय,नाही का? (‘नाही का?’ असं आपण म्हणतो-‘जुन्या नाणी’ वाले; आजचे लोक विचारतात-‘माहिताय का?’ )

तर गडबड अशी झाली आहे, की मागच्या पिढीला ही जाणिव झाली आहे,की आमच्याकडे आमच्या पिढीच्या संवेदना आहेत;त्या संवेदना घेवून आम्ही आनंदाची खरेदी करण्यासाठी आजच्या पिढीच्या बाजारात फिरलो आणि हात हलवीत परतलो. आज ती उत्कटता नाही, ती सवड नाही,त्या संवेदना नाहीत,श्रध्दा नाहीत. म्हणून आम्हाला खुशियां लाभल्या नाहीत.

पण गंमत अशी,की तुम्हाला खुशियां पाहिजे असतील तर तुम्ही आजच्या युगानुसार तुम्हाला दुरूस्त करून घ्यावं नाही का लागणार ? जुनी नाणी  ‘एक्स्चेंज’ करून रूपांतरीत करून घ्यायला काय हरकत आहे ? आपला ताठा आणि हट्ट सोडला,तर आजच्या युगातल्या आनंदाचे क्षण आपल्याला स्वस्तात मिळतील.

पण आणखी एक गंमत अशी आहे, की ‘पुरानी सदी के सिक्के’, जे आपण मनात बाळगतो, ती नेमकी कोणती सदी असते? आपल्याकडे खरेदीसाठी जी नाणी आहेत, त्याचा  नेमका कोणता ‘जमाना’ असतो?

आपल्यापुरतं सांगायचं झालं, तर आपल्याच वयाची ही सदी असते. आपलं वय काय असतं- सत्तर एक वर्षं. तर ही जाणिव वयाच्या अंतीम ट्प्प्याला थोडीच होते- ती होते  अर्धं वय ओसरल्यावर; म्हणजे, पन्नाशीला आल्यावर. त्यातून ‘नासमझीची’ पंचवीस वर्षं काढली, तर किती उरणार- पंचवीस. मग ते तर वय ‘चालू’ असतं, ‘काळ’ ही चालू असतो. आपण त्या काळातली नाणी घेवून त्याच काळातल्या खुशियां खरीदलेल्याही  असतात; मग ती पंचवीस वर्षंही वजा केल्यावर पुरानी सदी ही  कुठे रहाते? नेमकी कोणती सदी म्हणावी ही ?

मला वाटतं,ही पुरानी सदी म्हणजे, मनातले आपले पूर्वगृह; आपण बाळ्गून असलेले संकल्प,अपेक्षा, इच्छा- आपल्या,अशा. या बाळगलेल्या भावना,या संवेदनांची नाणी घेवून आपण आज बाहेर जातो आणि पूर्वगृह बाळगून वावरणार्‍या माणसाच्या वाट्याला काय येतं ? त्याच्या चेहर्‍यावर कधी हसू नसतं- तणाव असतो, हा तर सार्वत्रीक अनुभव  असतो. अपेक्षा ठेवून वागणार्‍या-बोलणार्‍या माणसाचे व्यवहार शेअर्सच्या गुंतवणूकीइतकेच जोखिमीचे !

बद्द झालेली नाणी आणि (पूर्वगृहांनी) बध्द झालेलं मन अशा मनाला ‘खुशियां’ बहाल होणं अशक्य असतं.
जुनी पिढी-नवी पिढी नाते संबंधातले व्यवहार यामुळेच फायद्याचे रहात नाहीत.

….कधी बाजारात,कधी समारंभात,कधी एखाद्या छायाचित्रात किंवा जाहिरातीत एखादा हसरा वृध्द दिसतो… मुलांसोबत,सुनांसोबत;नातवांसोबत -नातेवाईकांसोबत तो हसत असतो,बोलत असतो. त्याच्याकडे पाहून असं वाटतं, की त्या वृध्दाला ही खुशी लाभली आहे-तो आपल्याला सांगत आहे,

पुरानी सदी के सिक्के लेकर हमने
अपने अहद की खुशियां संवार ली है

please visit another  blog :       http://hasanyachaaakar.wordpress.com/

Read Full Post »

मुझको गुस्सा दिखाया जाता है
तबस्सुम को चबाया जाता है
प्रेयसीला प्रेयसीपण बहाल व्हायच्या आधीची अवस्था मोठी विचित्र असते. नायकाचा ,प्रियकर पदाचा ‘शपथविधी’झालेला असतो. पण ती तयार नसते. आणि तिला राजी करून घ्यायचा-प्रियकराचा तो कठीण काळ ! न पहाणं,प्रतिसाद देणं, यानंतर मग उतावीळ झालेल्या त्या नायकावर राग व्यक्त करणं,चिडणं आणि रागावणं असं तिच्याकडून होत जातं अन त्याला त्या सगळ्याची कमालीची मजा येत जाते.

मिर्झा गालिबचा एक शे’र आहे-
कितने शिरीन है तेरे लब के रकिब
गालियां खा के बे मजा न हुवा

शिरीन म्हणजे गोड आणि रकिब म्हणजे दुश्मन.शत्रू. इथे तिला-ती त्रास देते आहे,रागावते आहे म्हणून रकिब म्हटलेलं आहे.
हिदी चित्रपटात तर सरसकट म्हणता येईल असे प्रसंग तर हमखास असतात. नयिकेची ओळख,तिच्याशी लगट करताना होणारी चकमक आणि तिचा राग-संताप मोठा पहाण्यासारखा असतो. आणि सुंदर असलेली नायिका जेव्हा रागात येते- डोळे वटारते,ओठ मुडपते तेव्हा ती केवढी सुंदर दिसते ! तिच्या रागाचा उलटा परिणाम होवून नायकाला तिची चक्क भुरळ पडून जाते.
‘दिल ही तो है’मध्ये मुकेशने गायलेल्या गाण्यात या रागाच्या सौंदर्याचं किती छान वर्णन केलंय पहा-
गुस्से में जो निखरा है,उस हुस्न का क्या कहना
कुछ देर अभी हमसे, तुम यूं ही खफा रहना
या गाण्याचे गीतकार आहेत साहिर लुधियानवी. गद्यप्राय रचना हे त्यांच्या गाण्यांचं वैशिष्ट्य. अशा गाण्यांना चाल लावणं अत्यंत कसरतीचं असतं, पण संगीतकार रोशननं साहिरच्या अशा अनेक अवघड रचनांना मोहक चाली देवून त्या वाकवून दाखविल्या. याच गाण्यातल्या शेवटच्या ओळीतली कल्पना किती सुरेख आहे पहा-
पहले भी हसीं थीं तूम,लेकिन ये हकिकत है,
वो हुस्न मुसिबत था,ये हुस्न कयामत है

रागातलं हे सुंदरपण आणि कुणाचं- नूतनचं. वा! ‘दिल्ली का ठग’ मध्ये नूतनची छेडछाड किशोर कुमार करतो
आणि त्यामुळे नूतन तर वैतागून जात असते…आपल्याला मोह पडत असतो.

Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

Read Full Post »