Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for ऑगस्ट, 2010

एकदा माणसाच्या लोभीपणाबद्दल बोलताना,मित्र वैतागाने सांगत होता-‘अरे,माणसाचं काही खरं नाही. बेडवर अगदी मरायला टेकला असला, अन समजा फर्शीवर चिल्लर पडली,
तर पटकन उठून पाहील-कुणाचे पैसे पडले!’
ही माणसाची अत्यंत स्वाभावीक प्रकृती. ती लोभीवृत्ती असेलच असे नाही. मात्र एवढे खरे,की काही हातचं सुटू नये, नुकसान होवू नये, लाभाचेच व्यवहार असावेत अशी त्याची आणखी एक स्वाभावीक तबीयत. पैसे पडल्यावर पटकन पाहणं (आपले तर नाही पडले?),हा मनापेक्षा शरीराच्या सवयीचा भाग म्हणता येईल- तोंडासमोर अचानक आवाज झाल्यावर पापण्यांची उघडझाप व्हावी तसा. पण फायदा हुंगणार्‍यांचं तसं नसतं. त्याचं सदैव लक्ष असतं लाभाकडे. प्रत्येक व्यवहारात,प्रत्येक कृतीत,कुणाशीही संबंध ठेवायचा झाल्यास त्याच्या मनाचा मुनीम आधी विचारतो- यातून तुला काय मिळणार आहे? विनाकारणच की…मग असा माणूस प्रेम कसं करणार ? कारण प्रेमात तर त्याच्या हिशोबाने नफा कमी (क़िंवा नफा नाहीच) अन गुंतवणूक तर केवढी- वेळेची, पैशाची, शरीर-मनाची !
‘फिराक’गोरखपुरीच असावेत बहूतेक; त्यांनी अशा माणसांना एक प्रश्नच विचारला आहे-
पूछते हैं,फायदा क्या इश्क से
पूछिए,क्या फायदे से फायदा

खरंच,प्रत्येक गोष्टीत लाभ शोधणार्‍याने  असा कधी विचार केला असावा का,की लाभाचा काय लाभ असतो बरं… लाभ-हानीच्या विचाराने मनाला जो ओशटपणा आलेला असतो,त्यामुळे वेगळा विचार निसटून जात असतो. कळत नसतं. एकदा का हे मन स्वच्छ होवून गेलं तरच ते सगळं-ते सगळे व्यवहार शुभ्र होतात. नफा-नुकसानीपेक्षा वेगळं असं काही व्यवहारात असतं हे कळायला लागतं. केव्हा –प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ येतेच येते. सुख-दु:खाचे अनुभव घेवून त्यातून निवृत्त होताना मनाची उभारी तर असते,पण त्या तशा भावना काहीशा बालिश वाटत असतात. (कारण सुख-दु:ख असं ज्याला तो म्हणत आलेला होता,ते फारच जुजबी होतं,किंवा फार जुजबी लाभ-हानीच्या मुद्द्यांत आपण जीव गुंतविला होता,हे त्याच्या ध्यानात यायला यायला लागलेलं असतं)
अशा माणसाच्या मनात मग सकाळचं सोनेरी उन ओसरीवर पडावं तसा विचार येवून जातो-
हर चीज का खोना भी बडी दौलत है
बेफिकीरी से सोना भी बडी दौलत है

पैशाच्या साठ्यावर लक्ष असलं,तर साठा होतो पण मनाची एक बाजू बधीर` होवून जाते;ती म्हणजे संवेदनेची. अशा माणसाचा आवाजच मोठा होवून बसलेला असतो. मग असा माणूस सहानुभुती दाखवितो तेव्हा, मदत करतो तेव्हा ‘मी करतो’चा तो आवाज असतो. आस्था,संवेदना,सह-अनुभुती,संवाद असं काही जर माणसात राहिलं नाही,तर ,मग आर्थिक सुबत्ता काय कामाची? आपले आडाखे नेहमी बरोब्ररच असायला पाहिजेत, आपल्याला नुकसान शक्यच नाही असं वाटणार्यााला नियतीचा विसर पडलेला असतो. कलावंताला अशा ‘फायदेदार’माणसाची करूणा वटत असते.मग तो कलावंत अशा माणसासाठी ईश्वराला साकडं घालतो-
दो और दो का मेल हमेशा चार कहां होता है
सोच समझ वालों को थोडी नादानी दे मौला…

Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

Read Full Post »

गरज

परस्परांवरचा विश्वास कमी झाला, की पहिलं नुकसान होतं,ते निर्मळ हसू-मोकळी थट्टा निघून जाण्याचं. चेहर्‍यावर सदा संशय, तणाव,राग मुक्कामाला येतात. परस्परांचा द्वेष व्हायला सुरूवात होते.अशात कुणी थट्टाही केली,तर ऎकणारा प्रतिसाद द्यायच्या ऎवजी शंका घ्यायला सुरूवात करतो- याने असं का म्हटलं? याचा हेतू आपली टिंगल करण्याचा आहे, की काय वगैरे… हसणं हरवून बसलेला समाज कलहाकडे वळतो. कटकटी-समस्यांनी घेरून जातो. एखाद्या कलावंताला या सामाजीक परिस्थितीची जाणिव होते;त्याला त्याचं महत्त्व कळतं, तो निदान करतो-
लोग तारीक के औराक में कल ढूंढेंगे
कौन से दौर में इन्सा को हसी आई थी
( माणूस कोणत्या कालावधीत हसला असावा बरं, याचा शोध उद्या इतिहासांची पानं ढूंडाळून घ्यावा लागेल !)
खरंच आज जर माणूस हसण्यापेक्षा विनोद कोण केला आहे,त्याचा हेतू काय तो कोणत्य समाजाचा आहे,त्यातून आपल्या धर्माला-आपल्या नेत्याच्या प्रतिमेला धक्का बसला काय हेच जर शोधू लागला, तर हसणं कुठे राहिल? द्वेषाने कडू कडू झालेली माणसं आज दिसतात ते याच भावनांच्या प्रभावामुळे. म्हणून आज गरज आहे हसण्याची. निर्मळ होवून रहाण्याची. पण या हसण्याच्या नादाला लागून थोडा धोका होवू शकतो,त्यापासून आपण सांभाळायला पाहिजे-
हसो,के आज हसी की बहूत जरूरत है
मगर किसी के लबों से न छीन कर लावो
….

दुसर्‍याला दु:ख देवून मिळविलेलं हसू विषासारखं असतं.

Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

Read Full Post »

हवेची हलकीशी झुळूक असते.तसं पाहिलं तर तिचं अस्तित्त्व ते काय-महत्त्व काय-काहीच तर नाही की. कसल्याच जड वस्तूंना या झुळका जाणवतही नसतात, त्यांना पत्ताही लागत नसतो.
पण शेतातली डुलणारी रोपं-गहू,साळ किंवा मोहरीची रोपं जेव्हा आपल्या बहराला घेवून उभी असतात,त्यावेळी हवेची झुळूक त्यांच्यावरून गेली,की पाहता पाहता सगळ्या रोपांचा एकत्रित पिसारा होतो,डुलायला लागतो.त्यांच्या त्या हलण्या डुलण्यात ना शब्द असतात,ना स्वर असतो. एक तेवढी लहर सगळ्या रानावरून फिरते अन सगळ्या पिकावर मोहोर उठतो,रोमांच उठतात. कसल्याही’बाह्य’ घटनेशिवाय होणार्याक या हालचाली,ही अस्वस्थता.
आतूरलेल्या मनांचंही तसंच असतं. त्यांना ना शब्दांची गरज ना संवादाची आवश्यकता असते. त्याशिवाय कधी स्थिती अशी येते,की ना शारीर-जवळीकीची मुभा असते ना साद प्रतिसादाचं स्वातंत्र्य असतं. अशावेळी सूक्ष्म संवेदनांची लहर येवून जाते अन केवढी अंदोलनं निर्माण होतात !

बज्म-ए-अगियार में हरचंद वो बेगाना रहे
फिर भी हात मेरा आहिस्ता दबा कर छोडा
चार लोकांसमोर ओळख दाखविता येत नाही. नजरेनेसुध्दा काही सूचीत करता येत नाही,सगळ्यांचं लक्ष असतं. अशा वेळेस सगळ्यांशीच हात मिळवणी करता करताच आपल्या माणसाने आपल्याशी हात मिळविताना, तो हलकासा दाबून धरल्यावर संवेदनांचं जे आदान-प्रदान होतं- त्याची खबर कुणालाही नाही,ही जाणिव आणि संवेदनांचा तो ‘निरोप’ यामुळे सगळ्या शरीरावर केवढे रोमांच उठतात… पण उदासीच्या संवेदना फार अस्वस्थ करणार्‍या असतात-

वक्त-ए-रुखसत,’अल्विदा’लफ्ज कहने के लिए
वो तेरे नाजूक लबोंका थरथ्रराना याद है…
निरोपाची ती सगळी भावना शब्दांपेक्षा थरथरणार्‍या  ओठांत जी समावलेली होती, ती कायम मनात कोरून ठेवलेली असते.
असा निरोप फार बेचैन करून जात असतो. आपण निघून तर गेलेलो असतो,पण निघताना संवेंदनांचं जे आदान प्रदान झालेलं असतं, त्यामुळे ताटातूट होण्यापेक्षा माणूस एकजीव होवून जातो.
…आणि अशा एकजीव झालेल्या माणसाचं कशात म्हणता कशातच लक्ष लागत नाही…

हर मंजिले-हयात से गुम कर दिया मुझे
मुड मुड के राह में वो तेरा देखना मुझे


Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

Read Full Post »