Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for जून, 2010

नातजूर्बा हूं,खतावार नही मैं यारो
आफताब को तूफां का आगाज समझ बैठा
बाद जाना,के दस्तक थी मसिहा ने दी
मैं जिसे मौत की आवाज समझ बैठा था

…ह्या ओळी वाचण्यात आल्या,आणि त्या ‘मै’च्या विचारात गुंतून गेलो. मी अननुभवी हे तो सांगतो आहे,.माझी चूक नाही-मी दोषी नाही,माझ्याकडून नकळत घडलं आहे, हे तो सांगतो आहे. काय घडलं होतं त्याच्याकडून-सूर्याचं तळपणं,ती प्रखरता पाहून त्याला ती वादळाची-संकटाची ती सुरूवात आहे असं वाटलं. खरं म्हणजे दारावर जी थाप पडलेली होती, ती मसिहाची (उपचार करणारा,आयुष्य देणारा   ) होती, मला मदत करायला तो आला होता,हे नंतर कळलं..आधी मला ती माझ्या मृत्यूचीच चाहूल वाटली होती.

हे वाचलं.त्या निर्दोष अशा निराशावादी माणसाची गंमत वाटली अन मनात एकानंतर एक असे ‘निरपराध निराशावादी’गोळा होवू लागले.हा त्याचा एक भाऊ पहा-

Pessimist is the man
Who complaint about the opportunity-
knocking the Door !

पहिला तो जो होता,तो निराशावादी होता,पण त्याला आपल्या चुकीची कल्पना होती. पण हा जो दुसरा आहे,त्याच्याही दाराशी संधी चालून आलेली आहे; संधी दार ठोठावते आहे अन हा गडी चक्क त्या आवाजाने वैतागला आहे-च् ! काय कटकट आहे ! निराशावादी माणसाचं हे व्यवच्छेदक लक्षण आहे म्हणा ना!

‘रिडर्स डायजेस्ट’ मध्ये आलेला अशाच माणसाचा एक छोटा विनोद पहा :
पुराने वेढलेल्या घराच्या दारावर थाप देण्यात येते.
‘ कोण ?’ आतून विचारल्य़ा जातं.
‘आम्ही आहोत रेडक्रॉसची माणसं ! दार उघड !’
‘मी रेडक्रॉसची वर्गणी गेल्याच महिन्यात दिली !’आतून सांगितल्या जातं !

रेडक्रॉसचे लोक-सेवाभावी संस्थेचे लोक नेहमी येतात, ते निधी-वर्गणी मागायला येतात हे माहित असल्याने,ते आता संकटातून सुटका करण्यासाठी,मदतीसाठी आली आहेत(हे संस्थेचं उद्दीष्ट्य असतं,पण मोठी संकंटं क्वचित येत असल्याने-)हे आतल्या माणसाच्या घ्यानातही नाही. तोसुध्दा ‘नातर्जूब’च म्हणायला हवा.
निराशावादी आणि आशावादी यांची तबियत जाहीर करणारा हा शे’र पहा:

नामुराद को तो सूरज है सिरदर्द की वजह
जानेवाले को तो जुगनुसे पता मिलता है
आशावादी माणसाने विमानाचा,तर निराशावादी माणसाने पॅराशूटचा शोध लावला असं म्ह्टल्या जातं (गमतीने!) हे जाहीर आहे. पण यातून एक गोष्ट जगजाहीर होते, ती तीव्र इच्छाशक्तीची. आशा-निराशेतही कार्यान्वित रहाणारी माणसाची तीव्र इच्छाशक्ती-उठावाची,बचावाची.
Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

Read Full Post »

बियाबानी

बियांबा,दश्त,जंगल… उर्दू शायरीत वावरणारे हे शब्द .आणि शब्दांची संगत घेवून जंगलाची सततची ओढ मनात बाळगणारा मिर्जा गालिब. संवेदनशील माणसाला अगदी दाट अशा जंगलात स्वत:ला हरवून टाकण्यात कोणतं बरं …काय बरं मिळत असावं… सुख,समाधान,आनंद वगैरे शब्द तिथे लागू होत नसतात. हे शब्द व्यवहारातले,दैनंदिन अनुभवातले-मतलब जाहीर करणारे शब्द आहेत. जंगलाची ओढ असणार्‍या माणसाला गूढ असं स्वत:बद्द्ल वाटत असतं, ते पडताळून पहाण्यासाठी तर तो तिथे रमत नसावा. नाही…  काहीच सांगणं-बोलणं नको. डोहात शिरत जाण्याची ती एक अनुभुती असते,बस.

पण घर सोडून आलेला माणूस-जबाबदारी,संसाराकडे पाठ करून आलेला माणूस… त्याला जंगलात वावरताना कधी अस्वस्थ वाटतं. तो तसा मुक्त थोडाच असतो,योग्यासारखा… जंगलातलं नि:शब्द   वातावरण बघून माणसाला परत घराची आठवण व्हावी,हा कसा पेंच आहे पहा-

कोई विरानी-सी-विरानी है
दश्त को देख के घर याद आया

या मिर्जा गालिबचा  आपल्याला सतत  हेवा वाटतो, ते त्याच्या विवंचनेच्या आयुष्यात त्याने जोपासलेल्या तल्लख गमतीदार-वृत्तीचा. (नाहीतर आपण विवंचनामुळे वैतागून गेलेलो असतो- गोमाशांमुळे हैरान होणार्‍या माकडासारखे. आपल्याला हसण्यासाठी आधी सुखाची गरज असते, मगच आपण हसायला तयार होतो…) जंगलाची सैर करून गालिब  एकदा घरी परतला, आणि त्याने पाहिले-घराच्या भिंतीवर,दारांवर  पावसामुळे ठिकठिकाणी गवत उगवलेलं ! गालिबला त्याचीही गंमत वाटते-

उग रहा है, दरो-दिवार से सब्जा ‘गालिब’,
हम बियाबां मे है,और घर में बहार आई है

हाच शायर जेव्हा मनातली घालमेल-अस्वस्थता याचा विचार करतो, तेव्हा मनाच्या तशा स्थितीची अपरिहार्यता त्याला पटते. तो सांगतो,

घर हमारा जो न रोते भी तो विरां होता
बहर अगर बहर न होता तो बियाबां होता
( बहर : समुद्र. )
( गालिबला कुणी विचारलं असावं : अरे बाबा तू सतत का रडतोस, बघ रडून रडून तू घराची काय दशा करून टाकली आहेस ! तेव्हा गालिबने हे उत्तर दिलं असावं.)

पण म्हणतात ना,घराला माणसामुळेच घ्ररपण येत असतं. अगदी तसंच जंगलात सतत वारणार्‍या माणसामुळे जंगलातसुध्दा एकप्रकारचा जीव आलेला असतो. माणसाला जंगल जवळ घेतं,त्याला आधार देतं हे जसं खरं,तसंच माणसामुळे त्या अरण्यालासुध्दा एक प्रकारचा विरंगुळा असतो. म्हणूनच लैला,लैला करीत जंगलात भटकणारा मजनू जेव्हा निघून जातो,तेंव्हा जंगलसुध्दा उदास होवून जातं…

हर इक मकां को है, मकीं से शरफ  ‘असद’     ( शरफ : प्रतिष्ठा  मकीं : घरात रहाणारा  )
मजनू जो मर गया,जंगल उदास है..

लता मंगेशकरने गालिबची एक गजल गाताना, ‘कोई विरानी सी विरानी है..’ ही ओळ एवढ्या आर्ततेनं म्हटलेली आहे, की ‘बियाबानी’ ( जंगलातली भटकंती) करण्याची मनाला ओढ लागते…

Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

Read Full Post »

आंसू

‘आंसू तूम अब कभी न बहना’असं लतानं गायलेलं फार जुनं फिल्मी गीत आहे. मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी अभिनयाला जादा कष्ट न होवू देता काम करणारे हे डोळ्यातले दवबिंदू सिनेमात फार फार उपयोगाची ‘प्रॉपर्टी’ असते. ‘ये आंसू मेरे दिल की जुबान है’,’आंसू भरी है ये जीवन की राहे’, ‘भर भर आयी अखिंया’, अशी कितीतरी गाणी प्रसिध्द आहेत.

डोळ्यांच्या पापण्याआड असणार्‍या या ओलसर संवेदना केवढ्या आतूर,केवढ्या कार्यक्षम असतात;आणि गजब म्हणजे, आपल्याला त्याचा पत्ताही नसतो. खोल जिव्हारी अशी जखम बुजलेली असते,ती बुजून गेलेली आहे असं आपण बजावीतही असतो, पण रस्त्यात अचानक-अनाहूतपणे परिचीत माणूस नजरेला यावं,तशी ती आठवण उमटते आणि लागलीच डोळ्यांची झरझर सुरू होते…
आया ही था खयाल, के आंखे छलक पडी
आंसू किसी की याद के कितने करीब है.


मीना कुमारी. सौंदर्यवती,अभिनेत्री आणि शायरा. तिच्या प्रत्येक शे’रमधून एकप्रकारची झिरपणारी भावना जाणवत असते.
काम आते है, ना आ सकते है बेजां अलफाज
तर्जूमा दर्द की खामोश नजर होती है
या शे’रमध्ये दु:ख व्यक्त करण्यासाठी खामोश नजर हाच उपाय असतो,असं ती म्हणते. एका शे’रमध्ये ती म्हणते,डोळ्यांतून ओघळणार्‍या थेंबाची जाणिव कुणी करून घेतली, तरच तो थेंब-त्याला अश्रूचं मोल येतं. दखल न घेतल्या गेलेलं दु:ख… या दु:खाला खरंच काही मोल असतं का…विचारपूस न होणं,त्या दु:खाला आश्रय न मिळणं हा दु:खाचा खरा दाहक भाग असतो-

जिंदगी आंख से टपका हुवा बेरंग कतरा
तेरे दामन की पनाह पाता तो आंसू होता

Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

Read Full Post »