Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for एप्रिल, 2010

हिमतीचा माणूस वेगळ्या अशा रुपाचा असतो. मरगळ, कंटाळा,न्यूनत्त्व अशा गुणांची धूळ त्याच्या चेहर्‍यावर कधीही नसते- अगदी स्नान केलेलं नसलं तरी, दीर्घ प्रवासाहून परतलं तरी. हिमतीच्या माणसाच्या वागण्या बोलण्याची तर्‍हाही निराळी असते. सामान्य माणसासारखा तो हेतूंनी लडबडलेला नसतो. सर्वसामान्य माणूस ईश्वरापुढे झुकतो,ते सहसा स्वत:ची शिफारस करण्यासाठी. स्वत:साठी काही मागण्यासाठी. पण हा हिमतीचा माणूस – तो भक्त असतो, ईश्वरावर त्याची श्रध्दा असते. मग तो सर्वसामान्यांपेक्षा वेगळा कुठे असतो ?

सिजदों के एवज फिर्दौस मिले, ये मुझे मंजूर नही
बेलौस इबादत करता हूं, बंदा हूं तेरा मजदूर नही

( सज्द :- डोके टेकणे, मस्तक नमविणे .फिर्दौस : स्वर्ग . बेलौस  : नि:स्वार्थी,अपेक्षा न ठेवणारा )
ईश्वरापुढे झुकून त्याची प्रार्थना करतानाच ईश्वराला ठणकावणारा असा भक्त पाहून क्षणभर ईश्वरही गडबडून जावा.

माणसाला जगण्यासाठी काय काय करावं लागतं,काय काय मिळवावं लागतं ! त्याच्या एकट्याच्या हातून होत नसलं, मिळविता आलं नाही की तो दुसर्‍याची मदत घेतो. ईश्वर हा त्यासाठी सर्वात जवळचा. त्याला मागाय़चं आणि संसार चालवायचा,एवढं सोपं काम.
पण हा हिंमतवाला निडर माणूस. त्याला गरजा असतात, पण तो शर्मिंदा नसतो. पाहिजे त्या गोष्टी मिळविण्याचे दोन मार्ग असतात-एक लाडीगोडीचे,  दुसरा मार्ग हिमतीचा. हिंमतवाला माणूस सांगतो-

बंदगी से नही मिलती, इस कदर जिंदगी नही मिलती ( बंदगी : प्रणाम,पूजा, गुलामी )
लेने से तख्तो-ताज मिलते है,मांगने से भीक भी नही मिलती
आपल्या आयुष्याचे जबाबदार आपण आहोत.आपणच आपलं भलं कमवायचं असतं. हे जगणं काही प्रार्थना करून मिळत नसतं.

वो खुद अता करे,तो जहन्नुम भी है बहिश्त
मांगी हुवी नजात मेरे काम की नही
( अता :प्रदान .    बहिश्त : स्वर्ग.     नजात : मोक्ष,मुक्ती,सुटका )

असा माणूस.हिमतीने वागणारा-बोलणारा-वावरणारा. त्याच्याबद्दल पहाता क्षणी वाटून जातं, की हा उर्मट आहे,उध्दट आहे. हे असं वाटायचं कारण,अभिमान आणि अहंकार यातली तफावत आपण लक्षात घेतलेली नसते. ( आपल्या हिशोबाने नेहमीच,’आपला तो अभिमान,दुसर्‍याचा तो अहंकार! ‘ असा व्यवहार असतो. ) हिमतीचा माणूस उध्दट नसतोच. काळा-गोरा,कुरूप-सुरूप कसाही असला,तरी हिमतीच्या माणसाचं देखणेपण हजारात उठून दिसणारं असतं. कारण त्याच्या चेहर्‍यावर आत्मविश्वासाची झळाळी सदैव असते.

अहसास-ए-अमल की चिंगारी,जिस दिल में फरोजां होती है
उस दिल का तबस्सुम हिरा है, उस दिल का तबस्सुम मोती है.

( अहसास-ए-अमल : आत्मविश्वास.   फरोजां : प्रज्ज्वलीत,प्रकाशमान.   तबस्सुम : हास्य )

अशा माणसावर तर ईश्वरही फिदा असतो. म्हणून तर कहावत प्रसिध्द् आहे-
हिंमते-मर्दा,मददे-खुदा !

Read Full Post »

( ते तिच्या जीवाचे फूल / मांडीवर होत मलूल / तरी शोके पडूनि भूल /वाटतची  होते तिजला,राजहंस माझा निजला      ….सिडनी प्राणीसंग्रहालयात आपल्या गतप्राण पिल्लाला सोमवारपासून कवटाळलेल्या गोरिला मातेने  या  भावनेचाच प्रत्यय दिला आहे. )

…किती वर्षं झाली त्याला. वर्तमान पत्रातलं हे छायाचित्र पाहिलं आणि त्यासोबतच्या मजकुराने लक्ष वेधून घेतलं होतं. गोरिला मादी आपल्या पिल्लाला घेवून आहे, एवढंच दिसलं होतं; पण मजकुर वाचला,आणि आजवर त्या छायाचित्रातून बाहेर निघालो नाही. दि.3 एप्रिल 1998 च्या वर्तमानपत्रातलं हे छायाचित्र कापून, त्याला चोपडं-टिकावू आवरण चढवून ते मी बाळगतो आहे… तसंच, जसं ती आई आपल्या पिलाला बाळगून आहे.
मी एकदोन ठिकाणी वाचलं होतं,दूरदर्शनवर पाहिलंही होतं, वानरीला आपलं मूल गेल्याचं कळत नसतं म्हणे. ती त्याला तसंच एकदोन दिवस बाळगून असते…
या छायाचित्रासोबतचा मजकूर वाचला आणि पिलाची ती निष्प्राण नजर अस्वस्थ करून गेली. माणूस-प्राणी कसाही असो,कुठल्याही रंगाचा-पंथाचा-स्तराचा वा प्रकृतीचा ; प्रत्येकाला आपलं मूल राजहंसासारखं वाटतं. मृत झालेल्या त्या पिलाला जवळ घेवून बसलेल्या त्या आईच्या चेहर्‍याकडे पाहून वृत्तपत्राच्या त्या माणसाला या ओळींची अनावरपणे आठवण यावी,हे किती स्वाभावीक… राजहंस माझा निजला.
कितीदा तरी विचार येतो मनात, की माझी नजर,माझ्या भावना एवढ्या कालावधीतही खिळून राहिलेल्या आहेत, गुंतून राहिलेल्या आहेत त्या नेमक्या कशात… शब्दांत का दृश्यात… अनावर अशा भावना शब्दांतून  व्यक्त होतात- का बरं. शब्दांची गरज का भासावी ?  वाटून जातं,की अगतीक भावना, व्याकूळ भावना अनावर असतात, त्या धडपडतात शब्दांच्या आधारासाठी. कुठंतरी थांबण्यासाठी.म्हणून माणसाला शब्द पाहिजेत.

…पण नाही. तसंही  म्हणणं एकेरीच असावं. रेबरच्या या व्यंगचित्रात तर शब्दांचा वापरही नाही;  ना शब्दांतून उतरलेल्या त्या भावना. एक वृध्दा बसलेली आहे. एकटीच अशी. स्वत:तच मग्न झालेली,गुंतून गेलेली,विचाररहीत गाढ भावनांत उतरलेली. तिच्या शेजारी, तिचंच असं मांजर जवळ तर बसलेलं आहे, पण अंग मुडपून, स्वत्:तच गुंतून. शेजारी वृध्देचाच तो पोपट आहे ; पण तो सुध्दा स्वत:तच मश्गूल होवून-स्थीर होवून बसलेला आहे. या तिघांच्याही गप्पपणाला  संदर्भ आहे, तो भिंतीवरच्या तसबिरीतल्या भरगच्च परिवाराचा. हा परिवार – या वृध्देचा परिवार.कुठे गेलाय तो.. कुठं गेलीत ती सारी माणसं,कुठं हरवलं ते गोकुळ… आज कुणीही नाही इथे. जी आहेत,माणूस -प्राणी ती निश्चल झालेली आहेत स्वत:मध्ये. भरलेलं घर होतं;आता ते रिकामं आहे- राजहंसांचा तो थवा निघून गेला आहे. निवासाची आता पोकळी झालेली आहे. मनात त्या गोकुळाच्या-त्या अपत्यांच्या स्मृती शेष आहेत.

पण आयुष्य थोडंच थांबणार आहे… आपल्याला जगावं लागतं.जगावं लागणार आहे. मात्र निकटच्या अशा आप्ताशिवाय जगत रहाणं म्हणजे…

गुजर ही जाएगी तेरे बगैर भी लेकिन
बहोत उदास, बहोत बेकरार गुजरेगी..

छायाचित्रात आणि व्यंगचित्रात…दोन्ही ठिकाणी एक प्रकारची विषण्णता
एक प्रकारची उदासी भरून आहे…आप्तांच्या दुराव्याची,अगतीकतेची
.

Read Full Post »

माणसानं आयुष्यभर जे काम केलं असतं,ते काम करत करत सरत जाणं, हे त्याचं जगण्याशी प्रामाणिक असणं म्हणावं का. .. गाणारा गात गात मूक व्हावा, वादक-वाद्याशी खेळत खेळतच थांबून जावा, बोलणारा बोलत बोलत गप्प व्हावा तर लिहिणारा लिहिता लिहिताच पूर्ण विरामाला यावा .. असंच असतं का .. असंच असायला पाहिजे का..
हे असं असणं, असं होणं म्हणजे एक प्रकाराने भान असणं. आपण संपणार आहोत, जाणार आहोत याचं भान असल्यावर मग शिकायत कशाची ? मर्यादित षटकांच्या खेळीत आणखी षटकाची इच्छा नाही,तो विचारच नसतो.;तो प्रश्नच नसतो.विचार असतो, तो एकच- शेवटचं षटक आहे हे खेळायचं ,जोरदार खेळून काढायचं.
शायरला असं मृत्यूचं भान असतं. तो तयार असतो. आपला प्राण आता आपल्या शरीराची संगत सोडणार आहे,सोडतो आहे याची जाणिव त्याला असतेच; इतकंच काय,आयुष्यभर  जे साधलं नसतं, ते त्याला, आत्ता या वेळी साधलेलं असतं : एकाच वेळेस शरीर आणि प्राण या दोहोंकडे अलिप्तपणे पहाणं. हे असं पहाता येतं,ते केव्हा- यावेळी. का ? तर यावेळी आयुष्यभराच्या सर्व संवेदना तीव्रतर अवस्थेत पोंचल्या असाव्यात.  म्हणूनच   ‘ दाग ‘ हा शायर या वेळेला-या शेवटच्या वेळेला आपल्याला सांगतो-

होशो-हवास-ओ’ताबो-तुवां, ‘दाग ‘ जा चुके ( शुध्दी,शरीरावरचा ताबा, भान )
अब हम भी जाने वाले  है, सामान तो गया
..

एक शायर असा, की त्याने आपले शरीर-प्राण यांना  संगिताच्या-मैफिलीच्या-वाद्यवृंदांच्या जाणिवेतूनच पाहिलेलं आहे. शरीर मनाला केवळ संगीताचा हिस्सा समजणं..केवढं वेगळ्या प्रकारचं,सुरेख असं ते जगणं असेल.. आपलं शरीर हे वाद्य आहे, ज्यातून संगीत स्त्रवणारं असतं, गाणं उमटत असतं. या स्वरांच्या,या संगीताच्या -या रागदारीच्या लोभात आयुष्याचा प्रवास त्याने केलेला असतो. गाता गाता वाट सरावी, तशा धुंदीत आयुष्याचा हा प्रवास चालतो, होतो अन्  आता वेळ आलेली असते,मैफिलीच्या शेवटाची. विलंबीत लयीत सुरू झालेला आयुष्याचा हा राग आता द्रुत लयीत आलेला तर असतोच, पण अगदी विरामाच्या समीप आल्यावर तर त्या लयीने एक गती पकडलेली असते,धुंदी चढलेली असते. हातवारे, शरीर, आवाज, चेहरा सगळं सगळं त्या क्षणापाशी गोळा होवू लागलेलं असतं… तो  क्षण -शेवटचा.जीवनाची मैफिल थांबविण्याचा.

हिचकीयों पर हो रहा है ,जिंदगी का राग खत्म
झटके दे कर तार तोडे जा रहे है, साज के..

प्राण जाताना येणार्‍या उचक्या, हातापायांच्या त्या हालचालीला कोणत्या वळणाने हा  शायर घेवून जातो आहे..
..पण कलावंत माणूस,कवी माणूस मोठा भाबडा असतो. त्याला परिसराचं भान असलं तरी, त्याचे त्या निमित्ताने उद्भवणारे प्रश्न – त्याच्या शंका एवढ्या निरागस असतात, एवढ्या भाबड्या असतात, की गंमत वाटावी. ..वास्तव समजून घ्यायचे त्याचे प्रयत्न ,त्याचे निकष एकदम साधे !
…की असंही असतं का- वय झालं,म्हातारपण आलं,की सगळी हुशारी, सगळं कर्तृत्त्व ,सगळं सगळं पाटीवरून पुसून जावं अन् मनाची पाटी पुन्हा कोरी व्हावी- लहानपण यावं, असं तर नाही ना.. हा शायर असाच झाला आहे. विझता विझता लहान लहान होतो आहे.त्याला कळेना झालंय की आपल्या बिछाण्याभोवताली ही सगली जण का बरं गोळा झाली असावीत…

ये क्यूं उड चला है रंग यारब मेरे चेहरे का
ये क्यूं पिछले पहर से सब के सब हुशियार बैठे है..

टीप: माझ्या दुसर्‍य़ा ब्लॉगला भेट द्या इथे – http://hasanyachaaakar.wordpress.com/

Read Full Post »

लबाडीची हिरवळ.

दाट हिवाचे दिवस असतात. सोनेरी,कोवळं अन् उष्ण असं उन पडलेलं तर असतं,पण हातापाय़ांची घडवंची आवळलेली असते. मान आखडून घेतलेली असते. समोरच्या उन्हात हिरवळीवर वावरणारं मांजर पाहून असं वाटतं, मांजर होवूनच रहावं.बाग़डावं.
माणसाच्या मनात असं मांजर असतंच. सभ्यपणा, संकेत-संस्कृतीने आवळून बसलेले आपण;  अशावेळेस मनात उद् भवणार्‍या  व्रात्य-चावट-बालिश विचारांचं ते मांजर मात्र लबाडीच्या हिरवळीवर मस्त उन खात असतं, बागडत असतं. अर्थात ‘बाहेरच्या’ वर्दळीची चाहूल आली आली, (-बरेवाईटपणाच्या विचारांची,फजीती-बदनामी-आक्षेप यांची ती वर्दळ ) की, ते मांजर बावरून जातं. पळून जातं.
मिर्झा असदुल्ला खां ‘ गालिब’, याने आपल्या मनात तसं मांजर पाळलेलं होतं. आपल्याही मनात अशा प्रकारचं मांजर असतंच; पण आपला कल त्याला-‘छीर ! ‘ म्हणून ओरडण्याकडेच जादा असतो !
सुरेख,तरल आणि व्रात्य-चावट अशा हलक्या विचारांचं ते गुबगुबीत मांजर, हलक्याश्या तरल अशा विनोदवृतीसहीत पाळावं लागतं. त्या तशा अद्भुत वृत्तीचा गालिब हा हकदार  होता. रास्त हकदार.
आता व्रात्य विचार ;आणि तो ‘ तिच्या ‘  बद्दल असू नये असं कसं शक्य आहे ? आपल्या बायकोबद्द्ल थोडंच कुणी व्रात्त्य होतं ? हे चांगलं नाही,-वाह्यात आहे, अशा साखळीला झुगारण्याची धडपड तर मजेशीर असते नं…मग विचारात रमून लबाडीच्या त्या हिरवळीवर चावटपणाचं उन चाखायला काय हरकत आहे ? मनातल्या मनातच हे वावरणं असल्याने, कुणी पहातही नसतं की…

झोपलेल्या आपल्या प्रेयसीकडे पहाताना, कुणाच्या मनात काय विचार येतील,सांगता येत नाही ; पण गालिबचा  ‘  सभ्य व्रात्यपणा ‘ एवढा मजेशीर आहे, की आपणही लबाड होवून जातो –
ले तो लूं सोते में उसके पांव का बोसा मगर
ऎसी बातों से वो काफिर बद् गुमां हो जाएगा
ती झोपलेली आहे..अशावेळेस तिच्या सुरेख पावलांवर ओठ टेकवायची ( बोसा ) अनावर इच्छा होते आहे…  पण त्यामुळे तिचा गैरसमज ( बद् गुमा ) होईल की काय याची भितीसुध्दा वाटते आहे. लबाडीचं हे एक लक्षण- हिंमत होत नसते !

हा लोभ. मनाला अनावरही करीत असतो. बेशरमही करतो आणि त्याच बरोबर शर्मिंदगीसुध्दा होत रहाते. पण गंमत पहा- तिने आता कूस बदललेली आहे. तो तिथे जवळच बसलेला आहे, याची तिला कल्पनाही आहे. आणि ( बहूतेक अर्धवट झोपेत, थोडं कण्ह्त – थोडं छान वाटण्यासाठी ) तिने त्याला आपले हात पाय दाबून देण्यासाठी सांगितलं आणि गालिबच्या मनातलं ते मांजर हिरवळीवर चक्क बाग़डू लागलं की !
‘ असद  ‘ खुशी से मेरे हाथ पांव फूल गए
कहा जो उसने, मेरे हाथ पांव दाब तो दे

(आपल्या काव्यात गालिबने आपलं नाव तीन वापरलं आहे- ‘असद ‘ ‘ असदुल्ला खां ‘ आणि ‘ गालिब ‘)

पण ही जी  आहे, तिला आपण म्हणतो त्याची प्रेयसी ; गालिबलाही ती आपली प्रेयसी आहे – असावी असं वाटत आहे ; पण ( हात पाय दाबून देण्याच्या )  पुढे  प्रेमाची गाडी जाईच ना  झालीय की ! तिच्याबद्दलच्या प्रेमाचा इजहार केव्हा करावा- आता की उद्या,करावाच की नाही…आणि लबाड विचारांच्या संगतीने आत्मविश्वास डळमळलेला असल्याने,गालिब सांगतो-
काम उससे आं पडा है, के जिस का जहान में
लेवे न कोई नाम, ‘सितमगर’ कहे बगैर !

सगळा  इलाखाच तिला निष्ठूर  म्हणून ओळखतो ( सुंदर पोरीच निष्ठूर का असतात बरं ? ) कुणाचीच गय न करणारी, सडेतोड, तापट, रागीट वगैरे वगैरे ती आहे, अशी तिची प्रसिध्दी अन् ( आता काय करावं बुवा ! ) आपलं ‘ काम ‘ तर तिच्याशीच पडलं आहे की. अशा मांजरीच्या गळ्यात प्रेमाची  घंटा बांधायची आणि तीही आपल्यालाच .( सितमगर : जुलूम करणारा, अत्त्याचारी ) पण मनात लबाडीचं मांजर पाळणारा गालिब कमालीचा सभ्य आहे. आपल्या मर्यदा-संस्कृतीच्या बंधनाला तो ओलांडणारा नाही. चावटपणा-वाह्यातपणा त्याने कधीही केला नाही.

मग…  मग काय ! सुंदर झाली-निष्ठूर असली  म्हणून काय झालं, केव्हातरी तिचं  डोकं ठिकाणावर येतंच. तिला प्रेमाची महती कळते. खर्‍या प्रेमाची. गाढ अशा भक्त्तीची. आणि ती खुश होते. एवढी, की काय पाहिजे ते माग, एवढं असं ( ओपन ! ) त्याला सांगून टाकते !
पण गंमत पहा- गालिबच्या मनातलं ते लबाड मांजर पुन्हा उसळी घेतं. लोभ अनावर झालेला असतो अन् अशा वेळी जे पाहिजे ते सगळंच मिळाल्यावर आता केवढा आनंद व्हायला पाहिजे ! पण लबाडीचं गणित मोठं फसवं असतं. आता ‘ मागायला ‘ काहीच शिल्लक नाही याची ‘ शरमिंदगी ‘ बाळगून ते मन मग वावरत असतं. ( भ्रष्ट माणसाला पाहिजे तेवढे पैसे ताबडतोब दिले,तर त्याचाही चेहरा असाच होत असावा ! )
दोनों जहान दे के वो समझे ये खुश रहा
यां आ पडी ये शर्म की तकरार क्या करें
हा
शे’र जेवढा प्रेयसी साठी लागू आहे, तेवढाच ईश्वरासाठी-ईश्वरभक्ती च्या संदर्भात लागू आहे. उत्तम काव्याचं हे लक्षण आहे.

तेव्हा आपल्या मनातल्या त्या मांजराला  बागडण्यासाठी आपण लबाडीची हिरवळ राखून ठेवायला काय हरकत आहे..( राखून- म्हणजे ‘मेंटेन ‘की ‘ रिझर्व्ह ‘ हे ज्या त्या लबाडाने ठरवायचे ! )

आपल्यातल्या अंतर्गत विनोदवृत्तीला चेतवीत ठेवणारी ती सवय- स्वत:ची, स्वत:साठीच.

Read Full Post »

मध्यमवर्गिय आर्थिक स्थिती- तीही दारिद्र्याकडे झुकणारी असणं फार वाईट. कुटुंब प्रमुखाला या परिस्थितीत संसाराचा गाडा ओढ्णं म्हणजे सर्कसच.हो, सर्कसच म्हणावी लागणार. कारण परिश्रम करा, महिनाभर घर चालवून दाखवायची कमाल करा आणि जी कुतरओढ होते, त्याचं हसू इतरांसाठी. कुटंबप्रमुख हा एकटा असा पडतो. त्याला साथ असते- तीही फक्त घरापुरती, ती म्हणजे त्याच्या बायकोची. दोघंही मिळून संसाराचा गाडा ओढत असतात.. विवंचना अडचाणींचा तो खडतर मार्ग- संसाराचा.

सगळं नाटक करता येतं, मात्र पैशाचा अभाव असला तर.. तर मग ते दु:ख कुणाला सांगताही येत नाही… बोलताही येत नाही. आर्थिक ओढग्रस्तीच्या या दिवसांत समज न आलेली घरातली मुलं- त्यांना या वातवरणाची कुठली जाणिव असणार ? त्यांच्या त्या बालसुलभ अपेक्षा, आपल्या आईवडिलांजवळ त्यांनी केलेला तो हट्ट..काही तरी घेवून देण्यासाठी,आणून देण्यासाठीचा त्यांचा आग्रह..
आणि त्यांना आपण काही घेवून देवू शकत नाही, त्यांचा साधा हट्ट पुरवू शकत नाही, हा विचार मात्र आईबापाला दिवस रात्र अस्वस्थ करून टाकीत असतो-

मिट्टी के खिलौने भी सस्ते न थे मेले में
घर आके बहोत रोए, मां-बाप अकेले में.
.

दिवस थांबून रहात नसतात. संसाराचा गाडा खडखडाट करीत का होईना, पुढे जात असतो.आता दिवस बरे आलेले असतात. वाटचाल बर्‍यापैकी चालू असते. श्रमाच्या प्रमाणात थोडी विश्रांतीही लाभत असते. पुढचंही दिसत असतं-पोरांचं कर्तृत्त्व , पोरींची लग्नं, नातवंडं.. पण ते सगळं थोड्या अंतरावर असतं.
या प्रवासात एक घाट रस्ता येतो. मुलं मोठी झालेली असतात, पण नोकरी व्यवसायाला लागायची असतात. पोरगी मोठी झाली असते,पण तिचं लग्न व्हायचं असतं, ती जबाबदारी झोपू देत नसते. आणि हा कुटुंब प्रमुख- आता शरीर थकत चाललेलं असतं, सेवा निवृत्तीची वेळ जवळ आलेली असते.. आणि मुलांच्या शिक्षणाचा वाढ्लेला ख्रर्च, मुलीच्या लग्नासाठीची आर्थिक तरतूद.. विवंचना शिगेला पोंचलेल्या असतात.
पुढे दिवस बदलतात, चांगले येतात.हळू हळू शक्ती भरत जावी तसं आर्थिक सुबत्ता येत जाते- पण ती पुढे; काही दिवसांनंतर, महिन्यांनंतर, कदाचित वर्षांनंतर. पण – पण त्या,त्या घाटाच्या दरम्यान, श्रमात बुडालेल्या त्या कुटुंब प्रमुखाला वयाचं, संपत आलेल्या नोकरीचं कसलंच कारण सांगता येत नसतं. त्याला चालतच रहावं लागतं…

मुझे थकने नही देता ये जरूरतों का पहाड
..मेरे बच्चे ,मुझे बूढा नही होने देते…

… मला आठवतात,माझ्या लग्नापूर्वीचे आमच्या घरचे ते दिवस, नोकरी नसलेले,बेरोजगारीचे. आज पोराच्या कारमध्ये पाऊल ठेवताना आठवते, वडिलांची, ती अंगठा दुरूस्त करून आणलेली चप्पल. आईला तर कित्येक वर्षं चप्पलच माहित नव्हती. ती सांगायची, लग्नात घेतलेली चप्पल कुठे देवळात दर्शनाला गेलं, तेव्हा हरवली. मग  चप्पलच नाही. पुढे, रबराच्या चपला आल्या- तशा चपला घेतल्या, तरी त्या कुठेतरी विसरून जात. मग आईला बोलणी खावी लागायची. मग त्यानंतर तिनं चप्पल वापरलीच नाही… नोकरी संपण्यापूर्वी हाताला आलेला-कमावू लागलेला मुलगा मदतीला यावा,हे भाग्य. पण तसं झालं नाही, तर ती तगमग अस्वस्थ करणारी असते. ..आमचे, शिगेला पोचलेल्या विवंचनेचे ते  दिवस आणि आमचे वडिल.. आजही आठवत रहातात, आणि आजची निकड म्हणजे चंगळ वाटत रहाते…

धोंडू मोकाशी. एक उमद्या प्रकृतीचा गृहस्थ. कवी, साहित्यिक , संगिताचा रसिक म्हणून तालुक्यात नाव कमावलेला. पण लग्नाची मुलगी, बेरोजगार तरूण मुलं अन् तुटपुंजी शेतीवाडी. काय वाटत असावं त्याच्या मनाला, हा संसार ओढताना.. अन् त्यातही ती निर्मिती प्रक्रियेची धुंदी, जिल्हा स्तरीय वर्तमान पत्र, मासिकात येणार्‍या त्यांच्या कविता, लेख.. ( त्यांच्या बोलण्यात महत्त्वाचं असायचं, ते नाव .’त्यात माझं नाव आलंय, माझी कविता आलीय.. ‘  ) मग त्या जुन्या पेटीतून वर्तमान पत्रांतली ,मासिकातली प्रसिध्द झालेल्या साहित्याची कात्रणं ते दाखवायचे…डिंकाने चिकटवून ठेवलेल्या कात्रणांची वही- फुगलेली, जिर्णतेचा रंग ( मोठा अशूभ वाटतो ) ,हे सगळं दाखविताना, त्यांच्या चेहर्‍यावर कमालीच्या संवेदना जाग्या व्हायच्या. खुशीचा तो चेहरा… पण घरात पंखा नसल्याने, कपाळावरचा घाम टिपत, पंचाने उघड्या अंगाला वारा घालीत ते बोलायचे,  तेव्हा त्यांच्या आवाजातला चढ उतार तिव्रतेने जाणवायचा. प्रसिध्दीची खुशी आणि –  कसल्याही मानधनाविना सांभाळावी लागणारी ती कागदपत्रं…

गजल की दाद तो मैफिल में मिल गई लेकिन,
मैं अपने बच्चोंको घर जा के क्या खिलाऊंगा
..

( माझीही , एक सदैव असणारी चुटपुट : या सगळ्या , मला नाव माहित नसलेल्या शायर लोकांनी माझ्यावर केवढे उपकार केले आहेत. हिरे, माणिक-मोती खिशात भरून घ्यावेत, तसे हे शे’र लहानपणापासून गोळा करीत आलो आहे.. त्या अनाम कलावंताना माझा सलाम… )

Please visit http://hasanyachaaakar.wordpress.com/

Read Full Post »

स्वत:ची खबर

कलावंताला, व्यक्त होण्यासाठी त्याने निवडलेलं किंवा त्याने जोपासलेलं असं त्याचं एक माध्यम असतं. एखादा पक्षी स्वैर गात रहावा,तसा तो कलावंत आपल्या माध्यमातून सूर लावून असतो. कधी वाटतं, गवयाचं पोर सुरात रडतं, हे जे गमतीने म्हणतात,ते गंमत नसावी. पोराचं जावू द्या, कलावंताची-त्याची अशी तीव्रतर अनुभुती किंवा स्वत:चं असं जे काही प्रत्ययकारी असतं,ते सांगण्यासाठी ( नाही-जाणवण्यासाठी) त्याला त्याच्याच माध्यमाशिवाय पर्याय कुठे असतो ! काम करताना, गुणगुणावं, तसा तो कलावंत आपल्या विचारातच गुंतलेला असताना,त्याच्या माध्यमातून गुणगुणतोच. अनुभुतीचे क्षण कधी शे’र मधून रुपांतरीत होतात, अन मग तो शे’र जणू त्या कलावंताच्या त्या मन:स्थितीचा  सुरेख असा फ्लॉवर पॉट होवून बसतो.

आगाह म्हणजे माहीतगार,जाणकार,सावधान असा. आगाही म्हणजे, पूर्वसूचना,जाणिव, परिचय. आणि आगही हा शब्द बहूतेक जाणिव, आत्मप्रचिती अशा अर्थानेच वापरला जात असावा. मिर्जा गालिबच्या एका गजलमध्ये मोठा सुरेख शे’र आहे-

अपनी हस्ती ही से हो,जो कुछ हो
आगही न सही, गफ्लत ही सही

एका संग्रहात या शे’रचे दोन अर्थ असे सांगितले आहेत : स्वत:ला जाणून घेणं किंवा स्वत:शीच गाफील रहाणं हे आपल्याच हिमतीवर व्हायला पाहिजे. दुसर्‍याची मदत नको. दुसरा अर्थ आहे, कुणाच्या सांगण्यावरून एखाद्या बद्दल मत बनविणं चुकीचं आहे. जो काही समज-गैरसमज होईल तो आपल्याचमुळे व्हावा, आपल्याच आकलनामुळे. त्याच्या वर छाप असावी ती आपलीच, दुसर्‍याची नको. गालिबचा हा शे’र वाचल्यावर तो आपल्या विचाराशी-स्वत:शी किती समरस होता हे लक्षात येतं. या संदर्भात इंग्रजीतलं एक कोटेशन किती समर्पक आहे पहा : when truth is discovered by someone else, it loses something of its attractiveness. गालिबचंही तर हेच म्हणणं आहे नं, वेडेपणा असू दे, पण तो मझाच हवा.

कृष्ण बिहारी ‘ नूर ‘ हा शायर असाच स्वत:च्य शोधात निघालेला असताना, त्याला त्याचं वेडही लागलं आणि त्याच्यात तो अगदी स्वैर तर्‍हेने गुंतून गेला आहे-

कभी जुनूं, तो कभी आगही में कैद हूं
मैं अपने जहन की आवारगी में कैद हूं. ( आवारगी : उनाडकी )

पण स्वत:चा शोध जेवढा गुंतवून टाकणारा असतो, तेवढाच गूढही असतो. या प्रवासात भान हरवण्याच्या वेळा जशा येतात, तसंच आत्मभान येवून जातं आणि वेगळी अशी जाणिव होते; एका शायरला ते लक्षात आलं आहे-

पिछे से खेंचता है कोई दामन बार बार
शायद कुछ आगे बढ गए, खुद आगही से हम

पण ही खुद आगही- स्वत:बद्दलची माहिती, आत्मप्रचिती, व्यापक अशी जाणिव काही चांगली नाही बुवा. कारण मग त्यावेळी काहीच प्रश्न शिल्लक रहात नाहीत. काहीतरी ग़ूढ अशी, मनाला गुंतवून टाकणारी ती नशाच हरवून जाते आणि मग कसा उथळपणा येतो. आपल्याला तशी खुद आगही आलेली नसल्याने त्यानंतरचा परीणाम आपण कसा सांगावा… पण शे’र मात्र अगदी उमदा आहे-

इस आगही से तो बेहतर था दौरे-बेखबरी
शुऊर आया तो, जेहनों पर छा गई पस्ती

( जेहन : बुध्दी, प्रतिभा,चित्त शुऊर : विवेक,तारत्म्य,सभ्यता पस्ती : उथळपणा, भ्याडपणा )

या जानिब-ए-मंजिल मध्ये सोलापूरचे मशहूर शाय्रर प्रा.ए.एम. कारीगर ‘ एजाज ‘ शामील झाले, दोस्त झाले. मोठ्या हौसेने त्यांनी मला मार्गदर्शन केलं. आगहीच्या संदर्भात एक लज्जतदार शे’र ऎकविला-

आगाह अपनी मौत से कोई बशर नही ( बशर : माणूस )
सामान सौ बरस का,पल की खबर नही
– ‘ जोश ‘ मलिहाबादी.
…. आपल्या मृत्यूची माहिती माणसाला नसते;मात्र  शंभर वर्षांचे ‘प्रोग्रॅम’   ( बिझी ! )  त्याच्याकडे तयार असतात !  …  क्षणात होत्याचं नव्हतं होवून जात असतं याची खबर त्याला नसते.

तर नसू द्या. ‘ एजाज ‘ सरांनी मोबाईलवर ऎकवलेला एक खुबसुरत शे’र मात्र मनात रेंगाळत होता…

अब इसे दिवानगी कहिए, के दिल की आगही
चुन लिया हमने उन्हे, सारा जहां रहने दिया

Read Full Post »

बहोत मुश्किल है दुनिया का संवरना
तेरी जुल्फों का पेचो-खम नही है.
.       ( पेंचो-खम : केसांच्या बटा  )
– ‘ मजाज  ‘

प्रेम करणं, आशिक होणं, कविता करणं, तिच्या मागे लागणं-आठवणीत रहाणं हे सगळं सगळं भरल्या पोटानंतरच्या गोष्टी आहेत. माणूस भुकेनं जेव्हा हैराण  असतो, तेव्हा त्याला  कसली आली शायरी सुचायला ;अन कसलं आलंय प्रेम बिम, आं ! ते सगळं सुरक्षीत झाल्यावरचं, पोट भरल्यावरचं प्रकरण असतं.माणसाला यश जसं मिळतं, तसंच विवंचनाही असतात.कष्ट असतात. आजूबाजूला भोवताली जी जगण्याची धडपड चालू असते, ते पाहून संवेदनशील माणूस अस्वस्थ होतो. आयुष्याच्या खडतर वाटचालीत माणूस बेभान होतो,हातातोंडाची गाठ पडायची मारामार होते. त्या वेळी या सगळ्या प्रेमींबद्द्ल तो जणू वैतागून म्हणतो –

कहां के वो हिज्र-ओ-विसाल, कहां के वो हुस्न-ओ-इश्क
यहां तो लोग तरसते है, जिंदगी के लीए ..
.
( हिज्र : विरह .      विसाल : मिलन    हुस्नो-इश्क : सौंदर्य,प्रेम )

मिर्झा गालिबला, एकाने आपल्या पुस्तकासाठी  ( अर्थात कविता संग्रह असणार ) प्रस्तावना लिहायची विनंती केली होती. त्या वेळी गालिबचे दिवस मोठे कठीण होते. आर्थिक विवंचना- आजार, कौटुंबीक समस्या चालू होत्या. शायरी वगैरे बाजूला राहिली होती. अशा मन:स्थितीत काय प्रस्तावना लिहिणार ? या प्रस्तावनेच्या संदर्भात त्याने आपल्या मित्राला एका पत्रात ( 2 जून 1855 ) वैतागाच्या दोन ओळीच लिहिल्या-

गया हो जब अपना ही जेवडा निकल
कहां की रुबाई, कहां की गजल

( या ‘जेवडा ‘ शब्दाचा काही अर्थच मिळेना. ना शब्दकोषात, ना कुण्या मित्राकडे. पण काही तरी शारिरीक व्याधीमुळे कलाम पेश करायला अडचण यावी असं काहीसं ते प्रकरण असावं असं वाटतं.एका मित्रानं सांगितलं, जीव – प्राण याच्याशी संबंधीत हा शब्द आहे.  )

‘ दिदी ‘ सिनेमात साहिरची रचना गाताना सुधा मल्होत्रा म्हणते- तूम मुझे भूल भी जाओ, तो ये हक है तुमको / मेरी बात और है, मैने तो मुहोबत की है
आणि मुकेश तिला वास्तवाची एक वेगळी जाणिव करून देतो- वास्तवाकडे तिचं लक्ष वेधतो-

जिंदगी सिर्फ मुहोबत नही कुछ और भी है
जुल्फ-ओ-रुख्सार की जन्नत नही, कुछ और भी है
भूक और प्यास  की मारी हुवी इस दुनिया में
इश्क ही एक हकिकत नही कुछ और भी है

तरूणपणात आपल्या कोषातून बाहेर पडल्यावर वास्तवाची-प्रखर वास्तवाची जाणिव होते. समाजातली सुख दु:खं,विवंचना-कष्ट या सगळ्यांची जाणिव करून घेताना मनातल्या त्या रोमांचाचे क्षण-तप्त जमिनीत पाण्याचे थेंब विरावेत तसे विरून जातात.
मात्र अशा तल्खीच्या वातावरणात निकटची स्त्री;तिचा सहवास,तिच्या संवेदना सावली सारख्या वाटतात.
या दोनही भावना, हे दोनही अनुभव प्रत्ययकारी तर्‍हेने या गाण्यात उतरले आहेत.
सुधा मल्होत्रा- अत्यंत गुणी गायिका-संगीतकार.

* [निमंत्रण :  नवीन ब्लॉगच्या भेटीचे –http://hasanyachaaakar.wordpress.com/] *

Read Full Post »