Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for मार्च, 2010

शोकाचा वैताग !

‘ गुमनाम ‘ मध्ये हैदराबादी महेमूदचं एक वाक्य आहे- ‘ अरे ! सारे जहां का मातम मेरीच मजार पे  नक्को ! ‘

एके दिवशी एका मित्राच्या भेटीनंतर माझ्या मनात हा ‘ डायलॉग ‘ अचानक उद्भवला . मी माझ्याच काहीतरी विवंचनेत गुंतलेलो होतो; आणि त्याचवेळेस तो मित्र माझ्याकडे येवून त्याची काही तरी अडचण -विवंचना सांगू लागला. पण त्याचं ते दु:ख ऎकून घ्यायच्या मन:स्थितीत मी नव्हतो. मी माझ्याच काळजीत गुंतलेलो असताना, त्याचं ते सांगणं चालू होतं; अन् त्याच दरम्यान वैतागाने मला वाटून गेलं, छे ! मलाच का सांगतोय हा ! आणि त्याच वेळेस त्याचा विश्वासाचा चेहरा, सांगायची तळमळ जाणवू लागली. पण पुन्हा मनाने उचल खाल्ली- ‘ अरे, पण मलाच का ! ‘

– आणि महेमूदचा तो डायलॉग आठवला.विस्मृतीत गेलेला; पण फारच आवडलेला असल्याने कुठे तरी जपून राहिलेला.

आपले काही मित्र, नातेवाईक आपल्याला आवार्जून भेटत असतात. आपलं सुखद:ख आपल्याला सांगतात. त्यांना त्यांचं हे सगळं आपल्याला सांगायची निकड वाटत असते. आणि आपणसुध्दा मोठ्या  जिव्हाळ्याने ते सगळं ऎकून घेत असतो.

पण कधी कधी ऎकणारा हा स्वत:च्याच विवंचनेत गुरफटलेला असल्याने, त्या विवंचनेच्या मन:स्थितीत समोरच्या माणसाची विवंचना उभी राहिली,की त्यातून मोठा वैतग उभा रहातो.! पण विवंचना सांगणार्‍याला  असं चिडणं अपेक्षित नसतं. तो- म्हणजे आपण- सभ्य असल्याचा लौकीक असतो.; याची आपल्याला कल्पना असते.  समोरचा माणूस विश्वासाने आपलं मन मोकळं करायला आला असतो. पण ,लोड शेडींगच्या दरम्यान गर्मीनं त्रस्त झाल्यासारख्या मन:स्थितीत आपण असतो. सभ्य असलो म्हणून काय झालं, आपल्याला स्पष्ट बोलता येत नसतं तसं. पण आपलं मन वैतागून म्हणतंच- ‘ अरे, पण मलाच का सांगतोस ? ‘

मातम म्हणजे शोक . मजार म्हणजे धार्मिक माणसाची समाधी. या मजारवर – दर्ग्यात माणसं मिन्नत बोलायला येतात. महत्त्वाचं म्हणजे, आपलं दु:ख,विवंचना मांडायला येत असतात. त्याच्यामुळे त्या माणसांची मनं हलकी होतात. बरं वाटत असतं. ती मजार , कृपाशील- दयावान अशा संताची असते.

पण इथे महेमूद वैतागाने बोलतो आहे. त्या बोलण्यातला अन्  त्या विधानातला वैताग मोठा मजेशीर आहे. पुष्कळवेळा आपण एखाद्याला सभ्य समजतो; किंवा आपण सभ्य आहोत, अशी प्रतिमा काही जण करून घेतात. ही ‘ सभ्य ‘ माणसं आपली प्रतिमा जपण्यासाठी इतरांच्या सुख द:खात सहभागी होतात, संवाद साधतात. आणि दु:खातल्या माणसाला तर काय ! त्याचं दु: ख भळाभळा वाहात असतं. असा दु :खी माणूस जवळच्या ‘ सभ्य ‘ माणसाला गाठतो. सांगत रहातो. अशा प्रसंगाचा एक शे’र आहे-

मर रहे है आप, अपने गम में हम

गैर के मरने का मातम क्या करें  ?

( अरे, तू मरतो आहेस,ठीक आहे; पण मी इथे माझ्याच दु:खात ,विवंचनेत आहे,अन् तुझं दु:ख काय करू – आं ! )

हा शे’र बहूतेक आपलं दु: ख व्यक्त करणार्‍या प्रियकराला त्याच्या प्रेयसीने ‘ खडसावलेला ‘ दिसतो. तिला सध्या प्रेम वगैरे बाबींपेक्षा व्यवहारातल्या इतर बाबीं महत्त्वाच्या वाटत असतील, नाही का- तबियत ठीक नसेल, वैयक्तिक-व्यक्तीगत अशा काही विवंचना असतील, ती प्रेयसी नापासही होवून बसलेली असेल, तिचं मन लागत नसेल कुठं,कदाचित तिचं मन ‘ कुठतरी’ लावण्या च्या प्रयत्नात तिला प्रतिसाद मिळत नसेल, त्या विवंचनेत ती असेल ( किंवा तिची दाढ ठणकत असेल- असंच असेल ! ) – थोड्या असतात का विवंचना माणसाला ! अन् अशा वेळी तो- तिचा प्रियकर म्हणविणारा-  समोर बसून आपलं रडगाणं गात असावा – नेहमीचंच त्याचं सांगणं- तू नाही म्हणशील तर मी मरून जाईन ! ( अरे जा की ! इथं का डोकं खातोस माझं ? )

… किंवा असंही असेल, वैयक्तिक दु:खात, वेदनेच्या मन:स्थितीत इतरांचं दु:ख करायला सवडच कुठे असते ? असं होत असतं. असे अनुभव येत असतात. मजारवर आपलं दु:ख मोकळं केल्यावर आपल्याला हलकं वाटत असतं. का? कारण ती संत व्यक्ति , स्वत:चं दु:ख विसरून दुसर्‍याचं दु:ख जाणणारी असते.तिथे, त्या व्यक्तिला स्वत:च्या दु:खाचा संबध नसतो,दु:खाच्या पलिकडे गेलेल्या असतात अशा संत व्यक्ति.

मी तसा नव्हतो.. तसा असल्याचं दाखवीत होतो !

पण हे जे वाक्य आहे, महेमूदने म्हटलेलं- ती कदाचित म्हणही असेल; आणि त्यातून व्यक्त होतो, ‘ दु:ख ऎकणारा ‘ म्हणवून घेणार्‍या माणसातला क्षुल्लक माणूस- स्वत:च्याच दु:खाला प्राधान्य देणारा.

मात्र एवढं काही लां ब जायला नको. आपल्याला ते वाक्य ऎकून हसू येतं- हे कशामुळे येतं ? सभ्यपणाचा बुरखा बाजूला होवून चिडखोरपणा प्रकट झाल्याचं ते हसू.. दु:खाला टाळून पळण्याची त्याची घांदर ट वृत्ती जाहीर झाली, त्याचं ते हसू…

असाच एक शायर, त्याला त्याच्या प्रेयसीने कधी जुमानले नाही. शायरने धीर सोडला,प्राणही सोडला. मग काय ! ‘ शोरे-मातम ‘ उठला. ( हा शब्द आपल्याला ‘ कोहिनूर ‘ मधल्या – चलेंगे तीर जब दिल पर- मध्ये भेटला आहे. ; मृत्यूचा शोक , रडणं ) तर ती भेटायला आली आहे, अन्  विचारते आहे- काय झालं ? कोण गेलं ? पहा, म्हणजे तिच्या करिता शायरने प्राण सोडला , अन तिला खबर नाही ! अन् मूर्खासारखं विचारते पुन्हा, कोण गेलं म्हणून !  वा ! शायरचा आत्मा ते ऎकून ओरडतो आहे-

अब मेरे रोने वालो, खुदारा जवाब दो ( खुदारा : कृपा करून )

वो बार बार पुछते है, कि कौन मर गया

Read Full Post »

तलब !

“छोटी सी बात”  मध्ये , पोरगी कशी पटवायची याचे धडे अशोक कुमार नायक अमोल पालेकरला देत असतो. पोरगी- अन् ती पटविणे असे व्यवहार सभ्यतेला धरून नसतात, तो आगावूपणा असतो, छछोरपणा असतो, याचा आपल्या मध्यमवर्गीय मनावर एवढा पगडा ( लोखंडी ! ) असतो, की त्याला दुसरी बाजू- उदात्त, धैर्याची अशी- असते हे आपण ध्यानात घ्यायला तयार नसतो. डरपोकपणा, भय, असुरक्षिततेची जाणिव यांची सरमिसळ झालेल्या तारूण्याला ती तशी ‘फिलॉसफी’ सोईची असते – पोरगी पटविणे म्हणजे वाह्यातपणा, असो.

तर अशोक कुमार प्रात्यक्षीक करून दाखवीत असतो. समोर अमोल पालेकर आहे, एक तरूण पोरगी आहे- एका हातात टेबल टेनिसची बॅट घेवून अशोक कुमार दुसर्‍या हाताने तिचा हात धरतो, जोरदारपणाने. सांगतो,’ पहले उसका हाथ पकडो, इस तरहा ! वो छुडाने की कोशिश करेगी- छोड दो. फिर पकड लो. फिर छुडाने की कोशिश करेगी, अब मत छोडो ! ‘

तर, खरं प्रेम असेल तर धैर्यही तेवढंच गरजेचं असतं. लेचेपेचेपणा, अन् त्या प्रकृतीचं समर्थन करणारं तत्त्व माणसाला भ्रमात टाकीत असतं.असा माणूस लग्न करू शकेल फक्त ; प्रेम नाही जमणार त्याला. एका शायरने म्हटलं आहे,

दीदार की तलब है , तो आंखे जमाए रख ( दीदार : दर्शन       तलब : इच्छा, तगादा )

चिलमन हो या नकाब , सरकती जरूर है ( नकाब/निकाब ; बुरखा        चिलमन : चिकाचा पडदा.)

खरंच, तिच्या भेटीची – दर्शनाची तीव्र इच्छा ( उथळ इच्छा नाही ) तुला  असेल, तर डोळे रोखून रहा. पहात रहा. चिलमन असो वा नकाब – सरकल्याशिवाय राहात नाही. कारण पडदा असो, वा नकाब; सरकण्यासाठीच- सरकविण्या साठीच असतो ना !

तर असं धैर्य ठेवून, उघड्या डोळ्यांनी बेडर प्रेम करणार माणूस ; त्याची इच्छा वाया कशी जाणार !

आ गया कौन है पस-ए-पर्द: ( पस-ए-पर्द: पडद्या आ ड, मागील बाजूस )

नूर से झिलमिलाती है चिलमन ( नूर : तेज , प्रकाश )

पडद्याच्या मागे कोण बरं आलं आहे… कारण प्रकाशाने , तेजाने त्या पडद्यावर कशी हालचाल होते आहे.. झिलमील- म्हणजे चमचमणारी,हलणारी.. अर्थात ती आलेली आहे…

‘ मेरे महेबूब ‘ मध्ये राजेन्द्र कुमार पियानोवर गाणं गात असतो ( ऐ हुस्न जरा जाग, तुझे इश्क जगाए.. गीतकार शकील बदायुनी )

ए शम्मा तू आजा जरा चिलमन से निकल के

हसरत है के रह जावूं तेरी आग में जल के

आणि साधना त्या चिलमनच्या पलिकडे असते, लाजत बुजत धीर करून चिलमन बाजूला सारते… आपल्याला त्या अप्रतीम अशा सौंदर्याचा दीदार होतो. राजेंद्र कुमार सोबतच आपणसुध्दा तिचे दीदावर ( पारखी, जाणकार ) असतो ना !

Read Full Post »

नांदेडपासून दिडशे किलोमिटर अंतराव्रर असलेल्या किनवट येथे आदिवासी प्रकल्प कार्यालयात , लेखापाल या पदावर त्यावेळी मी होतो. एकटा रहात होतो. संगत होती पुस्तकांची, गाण्यांची-गजलांची. लाखो-करोडो रुपयांचं बजेट असलेल्या मोठ्या अशा व्यवहाराचं ते कार्यालय आणि माझं पद  महत्वाचं असं.

एकदा महिन्याच्या रजेवर होतो. त्या दरम्यान कार्यालयाच्या एका कोर्ट प्रकरणात किनवटला कोर्टात मला हजर रहायचे होते. पंधरा वीस दिवस झाले होते, रजेवर येवून अन् नांदेडला घरी होतो. आता कोर्ट केसच्या निमित्ताने किनवटला मला जावे लागले. गेलो. जाताना बसमध्ये विचार करीत होतो- कार्यालयातल्या  मंडळींना माझी किती उणीव भासत असेल.. माझ्या सही शिवाय बिलं राहिली असतील, फाईली खोळंबल्या असतील… माझ्या गप्पा, माझी हजेरी याच्या शिवाय रहाणारी ती माझी मित्र मंडळी माझी आठवण काढीत असणार… आता गेलो, की छान वाटेल त्यांना, मुक्काम करा म्हणतील, संध्याकाळी पार्टी करू म्हणतील… आपण आता कार्यालयात  गेल्यावर सगळ्या फाईल्सवर सह्या करू,बिलांवर सह्या करू. खुश होतील सगळे…

कार्यालयात गेलो, तेव्हा विपरीत अनुभव आला. कुठलीही बिलं, फाईल्स खोळंबल्या नव्हत्या. ‘ लेखापाल रजेवर’ असा उल्लेख करून ती प्रकरणं सरळ साहेबांकडे गेली होती. साहेबांनीही सह्या करून टाकल्या होत्या. चुकीची- अनियमीत प्रकरणे तर विशेष  लगबगीने अंतीम केली होती.

त्यापेक्षा कठीण गोष्ट होती, ती म्हणजे, मला जसं वाटलं तसं स्वागताचं वातावरण नव्हतंच तिथं. जुजबी नमस्कार, चहापाणी, विचारपूस झाली; पुन्हा सगळी कामाला लागली. स्वत:बद्द्लच्या मोठ्या कल्पना घेवून, स्वत:ला वगळून कार्यालयाच्या कल्पनेत मी रमलो होतो अन् तिथे तर स्वत:ला-मला कुणी हिशोबातच घेतलं नव्हतं. .. ना कुणाचं अडलं होतं. परतीच्या प्रवासात बसच्या आवाजात गुलाम अलीची गजल कानात-मनात भरून राहिली होती-साक्षात झाली होती. त्यातला शेवटचा शे’र तर मनाला झोंबत होता; विशेषत:  गुलाम अलीचा आवाज, गाण्याच्या चालीतली त्याची उदासी, तो विषाद..

है वो ही हुस्न की महेफिल, वो ही जल्वे, वो ही रंग ( जल्व: – दर्शन, आत्मप्रदर्शन , शोभा )

क्या कमी हो गई, ‘ राणा ‘ मेरे मर जाने से

.. माझ्या मृत्यूमुळे कुठं काय बिघडलं आहे, सगळे जल्वे-यौवनाचे, सौंदर्याचे उत्सव, तो रंग ढंग सगळं चालूच आहे की..

आपण नसलो की, जगाचा मोठा खोळंबा होणार आहे – होईल, ही कल्पना मोठी रिझविणारी असते- अट फक्त एकच. .. त्याचा प्रत्यय येवू नये ! स्वत:बद्द्लची प्रतीमा आपण ( आपण ? का मी… )  भिंतीवर लावून ठेवायला तयारच नसतो ; ती स्वत:च्या गळ्यात मिरवीत रहातो. मग असा विपरीत अनुभव आला, की त्या प्रतिमेचं ओझं जाणवत रहातं, त्याची दोरी मानेला काचत रहाते.

मिर्झा गालिबला प्रत्येक गोष्ट उलटी-सुलटी करून पहायची खोडकर सवय होती. कोणतीही घटना- ती जशीच्या तशी स्विकारण्याऎवजी, असं झालं तर, तसं झालं असतं तर.. अशा मजेदार कल्पना विलासात रमलेला तो, एकदा स्वत:ला वगळून त्याने लोकांच्या परिस्थितीचा विचार केला अन् तो म्हणून गेला-

हुवी मुद्दत के गालिब मर गया पर याद आता है ( मुद्दत : काळ, कालावधी )

वो हर बात पे कहना, के यूं होता तो क्या होता..

गालिबचं, आर्थिक ओढग्रस्तीचं आयुष्य अन् त्याची सूक्ष्म विनोद बुध्दी खरंच, आजही आठवत रहाते, जाणवत रहाते. म्हणूनच, माणूस जातो- त्याला जावं लागतंच; पण त्याची कृती त्याच्या असण्याचा , त्याच्या होण्याचा पुरावा देत असते –

मर भी जाऊं तो कंहा ! लोग भुला  ही दें गे

लफ्ज मेरे, मेरे हो ने की गवाही दें गे ( लफ्ज् :  शब्द, काव्य, विधान… मी सांगितलेलं ते सगळं..)

… आणि लक्षात येतं , मोठ्या माणसाचं नसणं आणि जुजबी माणसाचं नसणं यात काय फरक असतो ते..

Read Full Post »

उपदेश उपदेश आपण म्हणतो, त्याच्याबद्दल असं गमतीने म्हटल्या जातं, की शहाण्याला उपदेशाची गरज नसते आणि मूर्खाला उपदेशाचा उपयोग नसतो. मग असं असेल तर उपदेश हवाच कशासाठी ? कुणासाठी ? असंही म्ह्ट्ल्या जातं, की कौतूक फुकट करा ( फ्री ऑफ चार्ज ! ) मात्र उपदेश व्ही पी पी ने पाठवा.
खरं आहे ते. गरज नसताना, मागणी नसताना, केलेल्या उपदेशाचे ‘ साइड इफेक्ट्स् ‘ जास्त असतात. त्याच्या उलट अडचणीच्या, द:खाच्या वेळेस आपण कुण्या वडिलधार्‍या माणसाजवळ जातो, सांगतो-बोलतो… पण तिथंही थोडी गडबड होते. काय असते बरं ती गडबड – ती अशी असावी, की मुळात त्यावेळी त्या क्षणाला आपलं दु:ख आपल्या समस्या ह्या उभ्या ठाकलेल्या असतात, त्या सुटणं ही प्रधान गरज असते. त्या का उदभवल्या, कसं चुकलं, काय करायला पाहिजे होतं याची चर्चा ही खरं म्हणजे समस्या सुटल्यानंतरचा मुद्दा असतो,त्या वेळेचा नाही. विपरीत उदाहरण द्यायचं झाल्यास, अशा संकटातला माणूस पिसाळलेल्या कुत्र्यासारखा असतो; त्याला उनही नको असतं,सावलीही. तो अस्वस्थ असतो फक्त. तर, सांगायचं असं, की उपदेश हे कठीण प्रकरण असतं.  ( स्वेट मॉर्डेनची पुस्तकं तरूणपणात वाचली, तेव्हा मला उत्साह आला होता, माझी ‘ निराशा ‘ जावून आत्मविश्वासही आला होता. पुढे संसाराचे टक्के  टोणपे खाताना ध्यानात आलं, की तो माझा उत्साहाचा ‘ ज्वर ‘ होता, आत्मविश्वासाचा ‘ ताप ‘ होता. नंतर खलास झालेला. )
मग उपदेशाचं मोल काय ? आवश्यकता काय ?
उपदेश हा टॉनिकसारखा असतो- आजारातून बरं झाल्यावर शक्ती येण्यासाठीचा. संकटात सापड्लेल्याला उपदेश करणं म्हणजे, आजारी माणसाला ऑषध देण्याऎवजी टॉनिक देणं ! संकटातल्या, दु:खातल्या माणसाला मदत करायच्या ऎवजी उपदेश करणारा मूर्ख; तर तशा स्थितीत केवळ उपदेशाची अपेक्षा करणारा-वेडा ! असो. पंचेवीस-तीस वर्षांपूर्वी एका मुशायर्‍यात, हैद्राबादच्या एका शाय्ररने पेश केलेला शे’र आजही लक्षात आहे-
मुझको मेरा जमीर ही बहोत है, सजा के लिए ( जमीर : सद्सद् विवेक बुध्दी )
तू दोस्त है, नसीहत न कर खुदा के लिए ( नसीहत : सल्ला, उपदेश )

जीवन व्यवहारात टक्क्या-टोणप्यातून सावरल्यावर, सोसल्यावर, सुख दु:खाचे अनुभव सरल्यावर डॉ. इक्बाल यांचे शे’र वाचणं अशाच टॉनिकसारखं असतं- बळ देणारं. त्यांचा एक शे’र आहे-

तू अगर अपनी हकिकत से खबरदार रहे ( हकिकत : वास्तव खबरदार : सावध )

न सियाह-रोज रहे, फिर न सियाह-कार रहे ( सियाह-रोज : अध:काराचा दिवस. सियाह-कार : पाप, वाईट कर्म )

स्वत:ची स्थिती गती – अवस्था याबद्द्ल तू कमालीचा जागरूक रहाशील, तर मग तुझ्यासाठी कोणताही अंधाराचा दिवस रहाणार नाही. तुझ्याकडून कसलंही वाईट असं काम होणार नाही.
अखंड सावध असावं, हे संतांनी सांगून ठेवलं आहे, ते याच तळमळीतून . सावध चित्त- तिर्‍हाईत होवून स्वत: कडे पहायची ताकत संतांच्या वचनांमुळे, उत्तम अशा काव्यामुळे येवून जाते.

Read Full Post »

माणसाचं, उपजिविकेसाठी कराव्या लागणार्‍या सेवेचं ठिकाण आणि त्याचा निवारा,त्याचा संसार यात किती अंतर असावं ! किती तफावत असावी ! नोकरी-काम-कष्ट हे सगळं  पोटापाण्यासाठी करावं  लागत असतं , आणि त्याचं ते कामाचं ठिकाण अन्  त्याचं घरटं-वाट पाहणारी पिलं,सहचरिणी- यात किती अंतर असतं,असावं याचा त्याने कधी ना  विचार  केला, ना त्याची शिकायत…

पण आज … आजचं भरपूर गर्दीचं असलेलं हे जीवन,हे ताण तणाव, ही वाहतूक … आणि निवारा अन् नोकरी यात असणारं मोठं अंतर .. दरी. आणि घर ते कार्यालय असं जाणं येणं करताना दिवसाचे किती तास त्याच्यात जातात. जणू पाय म्हणजे घेवून जाणारं-  आणून सोडणारं वाहन.

अशा स्थितीत नोकरीसाठी कार्यालयात आलं, की माणसाचं अर्ध लक्ष घराकडे लागून असतं. घरची काळजी, घरचे विचार, शाळेत जाणारी-येणारी त्याची पोरं.. या सगळ्या विचारात तो असतो.

-आणि घरी आलं,की कार्यालयाची कामं, डोक्यातून जात नाहीत. कामाचे तणाव, निकड, तातडीने उरकायची प्रकरणं या विचारात तो असतो. बायको विचारते-‘ काय झालं हो ? ‘ पोरं म्हणतात, ‘ बाबा बोला नं ! ‘

एका शायरने ही स्थिती आपल्या शे’र मध्ये अशी व्यक्त केली आहे-

द्फ्तर में जेहन, घर पर निगाह, रस्ते में पांव ( जेहन : बुध्दी, चित्त       निगाह :दृष्टी, नजर.लक्ष  )

जिने की कश्मकश में बदन हाथ से गया ( कश्मकश/कशमकश : संघर्ष, धडपड )

जगण्याची अशी तर्‍हा.. यामुळे व्यक्तीमत्त्वाची – स्वत:ची अशी, एकसंघ जाणिवच रहात नाही . सगळंच विस्कळीत होवून गेलं आहे. हसणं..बोलणं.. वागणं आणि संसार करणं…

अशा दिवसांत माणसावर कोणती संकटं आली,आपत्ती आली, तर मग काही विचारूच नका . संकटं एकट्याने येत नाहीत, ती घेरून टाकतात याचा अनुभव येतो. काळजी वाटते, भय वाटतं. झाडपाला खावून रहाणारा, जंगलातला प्राणी – अचानक हिंस्त्र पशू समोर दिसल्यावर भयाने  जागीच उभा रहावा, तसं माणसाचं होतं. त्याला काहीच सुचत नाही. तो बावरून जातो, घाबरून जातो. इश्वराकडे पाहून अगतीकतेने तो म्हणून जातो-

जोश-ए-तूफां, शोर- ए-दर्या, बर्क-ए-लर्जा, बाद-ए-तुंद

कश्ति-ए-उम्र-ए-रवां यारब ! बडी मुश्किल में है .. ( जोश -ए-तूफां : मोठं वादळ. शोर-ए-दर्या : समुद्राची गर्जना. बर्क-ए-लर्जा : लखलखती वीज बाद-ए तुंद : झंजावात, वावटळ . कश्ति-ए-उम्र-ए-रवां : जीवन नौका  )

..वादळाचा जोर, उसळलेला दर्या, चमकणार्‍या विजा, गच्च भरलेलं आभाळ.. देवा ! माझ्या जीवनाची नौका मोठ्या संकटात सापडलीय रे…

आणि इश्वर. त्याला अशा माणसाची काळजी असतेच; शिवाय त्याला अशा माणसाचा आचंबाही वाटत असावा- माणसाचे कष्ट्, त्याची जीद्द, संसाराची जबाबदारी, अन् त्याच्यातून प्रवाहीत होणारं आयुष्य, त्याचं मोल … संकटातून तावून सुलाखुन पुढे घेवून जाणारी त्याच्यातली उर्जा…

Read Full Post »

पहिली तारीख

रेडिओ सिलोनवर सकाळी साडे सात वाजता,गेल्या कित्येक वर्षांपासून एक तारखेच्या दिवशी हमखास लागणारं गाणं म्हणजे,

दिन है सुहाना, आज पहिली तारीख है
खुश है जमाना, आज पहिली तारीख है

किशोर कुमारने गायलेलं हे गाणं ‘ पहिली तारीख ‘ या सिनेमातलं असून त्याचे संगीतकार होते, सुधीर फडके. गाणं लिहिलं होतं, कमर जलालाबादी यांनी. किशोर कुमारचा , तो पगाराच्या आनंदाचा आवाज अन् पैसे मिळाल्यावर होणारी ती उत्तेजना सगळं सगळं आजही  जाणवत रहातं.
महिनाभर नोकरी करताना संसाराचा गाडा ओढताना, मध्यमवर्गीयांची गाडी त्या
दिवसांत वीस बावीस तारखेलाच ‘ रिझर्व ‘ ला यायची. मग उधारी उसणवारी करायची, काही गरजा पुढे ढकलायच्या,एक तारखेचा हवाला देवून काही व्यवहार करायचे… या धडपडीत ते साताठ दिवस निघून जायचे. मग यायची पहिली तारीख. पगाराचा दिवस.
संध्याकाळी ऑफिसमधून बाबा यायचे. ‘ पगार झाला बरं ! ‘ असं कुठं सांगायचे? छे! आणि ‘ पगार झाला का ? ‘ असं आई कुठे विचारायची ? छे छे ! तसं काही व्हायचंच नाही. आम्ही पोरं बाबांच्या तोंडाकडे पाहात असू. पण पैशाच्या कुठलाही उच्चार न होता, घरात शिरलेली ती पैशाची हवा जाणवायचीच. आई कुणाबद्द्ल उगिच्या उगीच बोलायची.; बाबा ‘ कुणी येवून गेलं का? ‘ विचारायचे. त्यांचा आवाज फुग्यासारखा  मोठा झालेला आम्हाला जाणवायचा…रंगबिरंगी फुग्यासारखा..
एका मध्यमवर्गीय शायरची भलतीच ओढातान व्हायची – आणि एवढी, की पगाराच्या दिवशी सगळे सावकार- पठाण येवून बसायचे वसूलीला (गाण्यातसुध्दा तसं एक कड्वं आहे- दफ्तर के सामने आए महेमान है/ बडेही ‘ शरीफ ‘ है, पुराने ‘ मेहेरबान ‘ है .. ही मेहेरबानी म्हणजे त्यांनी व्याजाने दिलेले पैसे ! )… आणि त्या सगळ्या आर्थिक विवंचना, ती ओढग्रस्त स्थिती, ते सगळं ओलांडून तो शायर म्हणायचा-

मेरी तनख्वा के दिन, कर्जख्वाहोंका था हुजूम      ( कर्जख्वा/कर्दख्वा : सावकार.     हुजूम : गर्दी )
कयामत ही के पहेले, मेरे घर रोजे-हिसाब आया
( कयामत,कियामत :महाप्रलय;अंतिम दिवस. मुसलमान, यहुदी यांच्या कल्पनेप्रमाणे, सृष्टीचा शेवटचा दिवस. या दिवशी सारे मृतात्मे थडग्यातून बाहेर येतील व इश्वरासमोर त्यांच्या पापापुण्याचा हिशोब होईल- रोजे-हिसाब !- अशी समजूत आहे.)

हा, उधारी वाढ्लेला नोकरदार म्हणतो, कयामतच्या आधीच माझ्या दारात – पगाराच्या दिवशी- रोजे-हिसाब येवून बसतो ! … आपल्या विवंचनांचं हसू करणारा हा शायर कोण असावा बरं, किती श्रीमंत वृत्ती त्याची…

अपूरेपणा, ओढग्रस्त स्थिती यामुळे उत्पन्नाच्या त्या निश्चित दिवसाबद्द्ल – एक तारखेबद्द्ल- वाटणारं ते अप्रूप आता राहिलं नाही. उपवास केल्यावर जेवणाची चव जाणवावी, तसा तो दिवस वाटायचा. पगाराचा दिवस. Income is something, that you can not adjust without..or within ! असं ते उत्पन्न असायचं. .. अपूरेपणाच्या भावनेचे, मोलाचे ते दिवस.. त्यावेळी एक तारीख आणि इतर दिवसांत फरक होता, इतर दिवस अन् सण यात फरक होता.
सगळेच दिवस सारखेच झालेल्या या काळात , या वयात पहिल्या तारखेची आठवण मनात जपून ठेवलेली आहे-
पगारातले रोखीचे बंदे रेशमी तापता घेवून मुडूप बांधून ठेवावेत तसे…

Read Full Post »

« Newer Posts