Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for मार्च, 2010

लेखन व्यवहार हा कष्टाचा असतो.कष्टाचाच असायला पाहिजे. पण हे कष्ट घेताना-ते घेतल्यावर किती हलकं हलकं वाटतं,हे ते कष्ट घेतल्यावर लक्षात येतं. निर्मीती प्रक्रीया जेवढी गूढ असते;तेवढीच- म्हटली तर छान,म्हटली तर गमतीदार असते. यातला गमतीचा भाग म्हणजे, प्रसिध्दी प्रक्रीया. आपलं लेखन प्रसिध्द होणं-पुस्तक प्रसिध्द होणं, या आनंदाला पुत्रप्राप्तीच्या आनंदाशिवाय दुसरा शब्द नाही. नवोदीत लेखकाची ती तारांबळ केवढी अवखळ असते… सापडलेली शंख शिंपलं पटकन मुठीत धरून पोराने चटकन आईबाबांना आणून दाखवावेत,तशीच घाई नव्या मार्गाच्या लिहिणार्‍याला असते..

लेखन प्रसिध्द होत जातं. ते शंभरांनी वाचल्याची खात्री ठेवून वावरावं अन् ते वाचलेलं असतं दहाएक जणांनी -हे  नंतर कळत जातं. त्याची मग सवयही होत जाते. ‘ मी अगदी आतून सुचलं तरच लिहितो ’,  ‘उगिच्या उगिचंच लिहिणं-पाट्या टाकणं ,तसं मी लिहित नाही-दुसर्‍या सारखं ’, ‘ माझं लेखन स्वत:साठी- प्रसिध्दीत मला रुची नाही’ हे असं सगळं बोलणं भ्रमांना जपण्यासारखं. खरं म्हणजे, प्रसिध्दीची/ प्रतिसादाची जाणिव न ठेवता लेखन करीत रहाणं,
हे अविवाहीत रहाण्याइतकंच अनैसर्गिक.

आपलं लेखन हे ‘ अक्षर साहित्य ’ आहे,कायम आहे -उत्तम आहे, या भावनांचे दगड गोटे मग आपल्या झोळीत जमा होतात.हे लेखनाच्या पुढच्या टप्प्याचे अनुभव. लेखनाबद्दल- मह्त्त्वाचं म्हणजे प्रसिध्दीबद्दल –  लोकप्रियतेबद्दल आडमूठ ठामपणा,आडमूठ अपेक्षा,आडमूठ धुंदी वगैरे ठेवत ठेवत लिहिणारा माणूस स्वत:कडे केव्हा तोंड करून बसतो,त्यालाही खबर रहात नाही. आपलं नाव- आपली ओळख-आपलं छापून आलेलं लेखन साहित्य, याबद्दल त्याची जेवढी आग्रही भावना-स्वत:ला गोंजारणारी,अपरिहार्य अशी- तयार होते, ती एका अर्थाने मोठया कारूण्याची असते.
थडग्यावर-कबरीवर मृताचे नाव, त्याचा जन्म-मृत्यू वा अन्य माहिती कोरून ठेवायची जी प्रथा आहे, त्याबद्दल ‘रवां ‘या  शायरने स्वत:लाच म्हटले होते-
है संगे-मजार पे तेरा नाम  ‘  रवां  ‘
मर कर भी उम्मीदे-जिंदगानी ना गयी

खरंच की… आपण गेल्यावर आपली स्मृती रहावी,ही इच्छा जगण्याच्या लोभातून निर्माण झालेली असते,का आणखी काही असतं त्याला कारण…

तर ते असो. ब्लॉगवर लेखन सुरू झालं आणि माझी अवस्था कशी झाली,हे सांगण्याची अनिवार इच्छा होते आहे; खरं म्हणजे कशी झाली हे वाटून घ्यायची इच्छा होते आहे.. कागदावरचे शब्द आता कागदाशिवाय व्यक्त होत आहेत… उन्हात वाळत घातलेल्या कुरड्या पापड्यांचे कापड मग संध्याकाळी ओसरीवर घेवून त्यावर पाठीमागून पाण्याचे सपकारे मारतात. मग खरपूस वाळलेल्या त्या कुरड्या पापड्या सुट्या होतात. दुरडीत जमा होतात. … माझे शब्द कागदावरून संगणकात जमा होताना मी पहातो आणि हे आठवत रहातं. दोन बोटांत लेखणी धरून होणार्‍या  लेखनाला,धावता धावता पंख फुटून जमिनीवरून उचलल्या जावं, तसं, दहा बोटांचे पंख लाभले . वाचकाला-प्रसिध्दीला-कौतूकाला चिकटून बसलेले हे शब्द आता अवकाशात झेपावले. वाचणारे इथेही आहेत, बरंवाईटाची नोंद इथेही आहे; पण ज्या तर्‍हेने यात गुंतून होतो, ते आता कुठं आहे… नाहीच की. सुचलेल्या कल्पनांचा आकार करून ब्लॉगवर नोंदविणं हे, कागदी होडी करून पाण्याच्या प्रवाहावर सोडण्यासारखंच आहे.ही होडी कुठे कुठे जाईल,डुलत डुलत जाईल का बुडत बुडत जाईल, सांगता नाही येणार. आपली खुशी त्या कल्पनेची-त्या कल्पनेला अधांतरी केल्याची. नाही तरी ,आपलं लेखन छातीशी कवटाळून बसणं हा एका तर्‍हेनं पाहिलं तर हट्टीपणाच. मिर्जा गालिब हा  शायर- टीकाकाराच्या, निंदकाच्या वागण्याने आचंबीत झाला आहे.त्याला सांगायचं आहे, की मी काही शाश्वताचा आग्रह धरून आलो नाही,ना माझा तसा दावा माझ्या साहित्याबद्दल आहे. मी जाणारच आहे,रहाणार नाही. मग असं असताना, माझ्याबद्दल कोणती भीती ठेवून तुम्ही माझ्याशी असं वागता बरं-

यारब! जमाना मुझको मिटाता है किस लिए
लोहे-जहान पे हर्फ-ए-मुकर्रर नही हूं मै…

या कायमस्वरूपी-लोखंडी अशा दुनियेवर कोरून ठेवलेल्या शब्दासारखा मी थोडाच आहे…

असो. आपल्या अखत्यारीत  काही न ठेवता,आपल्या कल्पना अंतराळाच्या हवाली करणं हा रम्य अनुभव असतो. गुलजार यांनी आपल्या शब्दांतून अशीच एक  गुफ्तगू केली आहे- ‘ दो दुनी चार ‘ मध्ये,किशोर कुमारच्या मार्फत…

हवाओं पे लिख दो, हवाओं के नाम
हम अनजान परदेसीयों का सलाम

साहित्यिकांचे सिमीत वर्तूळ, ओळखीचा परिसर,नावं ठेवणं-दूर्लक्ष करणं, अतिरिक्त कौतूक,भाबड्या भावना या सगळ्यांशी विरहीत अशी ही ब्लॉगची निर्मिती संवेदना… हा ब्लॉग- निर्मिती प्रक्रियेला उत्तेजना देणारा,नव्या रूपात मांडणारा. ( खरं म्हणजे, ब्लॉगचं साहित्य हे मुद्रीत साहित्यापेक्षा जादा कायम- हर्फ ए मुकर्रर; पण असं असलं तरी,ते बाळगता येत नाही,मिरविता येत नाही ही किती मजेदार  बाब आहे ! ) ‘ग्लोबल’ भाषेत  सांगायचं झाल्यास परसदारातल्या शेवग्याला आंतरराष्ट्रीय बाजार पेठ मिळवून देणारा. ही बाजार पेठ अभिव्यक्तीची- धंद्याचे, नफा नुकसानीचे व्यवहार, हिशोब न ठेवणारी.

ब्लॉगला पर्यायी शब्द मराठीत नाही. अद्याप नाही. आणि इंग्रजीतही त्याचा स्पष्ट अर्थ तसा नाही. ‘ वेब-लॉग ‘ या शब्दाचा तो संकोच असून दहा बारा वर्षांपूर्वी ब्लॉगचा जन्म झाला असे समजले. स्वत:साठीच लिहिलेली दैनंदिनी आणि प्रसिध्दीसाठी पाठविलेलं साहित्य; या दोहोंच्या दरम्यान या ब्लॉगचं अस्तित्त्व आहे, त्याची जागा अन त्याचं महत्त्व शोधायला पाहिजे . अभिव्यक्तीसाठी एकाच वेळी शब्द- दृश्य-चित्र-श्रवण अशा चोहू बाजूंनी  उपलब्ध असलेल्या या अद्भुत माध्यमाला,तूर्त ‘चौफेर ‘ असं म्हणायला काय हरकत आहे ?

… किशोर कुमारने ते  गाणं अशा पध्दतीने म्हटलं आहे, की तो जणू हवेत ब्लॉग लिहितो आहे-

ये किस के लिए है,बता किस के नाम
ओ पंछी तेरा ये, सुरीला सलाम …

लिहिलेल्या शब्दांचं मोल आबाधीत रहाणार आहेच; तेव्हा एखाद्या वेळी वही सोडून ‘वेब’चा आधार घ्यावा,
आपलं जडत्त्व कमी करावं…
काय हरकत आहे…

Read Full Post »

ऎसे तो ये जहान कहीं डूब जाएगा
हर शख्स कह रहा है, के बस नाखुदा हूं मैं
( शख्स : व्यक्ती,माणूस    नाखुदा : नावाडी, कर्णधार )

सगळ्याच पक्षांचं एकमेव उद्दीष्ट असतं – जनतेचं कल्याण. सगळ्याच नेत्यांच्या तोंडी असतं, देशाचं भलं- जनतेचं भलं. मग असं ज्रर पक्कं असेल, तर भोळ्या जनतेला असं वाटणं स्वाभावीक आहे, की बुवा मग सगळेच एक का होत नाहीत ? बरं,  नाही झाले एक तरी हरकत नाही; पण ही भांडणं का ? आरोप-प्रत्यारोप, चिखलफेक –  हंगामा ! ( हा खमंग शब्द आता गुलाम अलीच्या तोंडातून निघून राज्य सभेत जावून बसला आहे. तिखट होवून बसला आहे !)  का बरं; अन् ती ही आमचा हवाला देवून-जनतेचा ? आमच्या कल्याणाचं, कळवळ्याचं प्रयोजन पुढे करून ? बरं, प्रत्येकाचा आवेश,ती बोलण्याची तर्‍हा,ते वक्तृत्त्व अन् आमच्या अत्यंत खाजगी असलेल्या श्रध्देचा वारंवार उल्लेख करून तणाव उत्पन्न करायची त्यांची ती हातोटी पाहून थक्क व्हायला होतं.आपली अवस्था विचीत्र होवून जाते-

कदम कदम पे जहां बेशुमार राहबर है ( बेशुमार : असंख्य     राहबर : मार्गदर्शक  )
मुसाफिरों को वहां कैसे ऎतबार आए.. ( ए’अतिबार : विश्वास,भरवसा  )

मार्गदर्शक- पथप्रदर्शक. आपण लहानपणापासून त्याच्याबद्द्ल वाचलं आहे. गुरू असतो तो – मार्ग दाखविणारा. यशाकडे घेवून जाणारा. आपणही त्याच्यावर श्रध्दा ठेवून त्याच्या मागे जाणारे.. अशा प्रकारचे काहीसे चित्र शाळकरी वयात मनात जपलेलं असतं. मग जीवनात पुढे एक एक अनुभव येत जातात, मतदानाचा हक्क प्राप्त होतो अन् ध्यानात येतं,की कुणी तरी तेज:पुंज (!) व्यक्ती आपल्याला मार्ग दाखविते आहे.. गुळगुळीत दाढी केल्यासारखा तो छान वळणदार रस्ता,मग तो डोंगर,तो सूर्योदय,ते मंदिर,तो ध्वज.. आ रा रा रा , असं काही नसतं, तसं काही समजणं हे बावळटपणाचं आहे हे आपल्याला ताबडतोब लक्षात आलेलं असतं. कारण-आपल्याला आलेले खडतर अनुभव. कारण आपल्या भोवती पावला पावला वर वाढलेल्या – असुरक्षिततेची हवा तयार करून सुरक्षेची खात्री देणार्‍या मार्गदर्शकांची संख्या. त्यांचा उपदेश.. नाही तर.. धमकी.
अशावेळेस भानावर यायला पाहिजे ते आपणच. आपणच निर्णय घ्यायला पाहिजे.
सय्याद म्हणजे पारधी,शिकारी.तो माणूसच. जमिनीवर चालणारा. आणि तो शिकार करतो आभाळात वावरणार्‍या पक्ष्यांची. कसं शक्य आहे ते. किती विचित्र. जमिनीवरच्या माणसाला-ज्याला पंख नसतात,त्याला आभाळातल्या, पंख सर्सावून उडणार्‍या पक्ष्यांना पकडता कसं येणार… पण कठोर वास्तव असतं- कटू, पण सत्य अशी स्थिती असते.. आणि पक्षी शिकार होवून जातो, त्या सय्यादची.  सय्याद  सगळीकडेच असतात- सगळ्याच क्षेत्रात असतात, जाळी लावून बसलेले, भुलविणारे.. दोष त्यांचा नाही, आपला आहे- पक्ष्यांचा. आपली प्रकृती आकाशात भरारी घेण्याची. तिथे सय्याद पोंचूच शकत नाही. .. मात्र आपली भरारीच जर कमी झाली, आपणच रेंगाळू लागलो, वेंधळ्यासारखे प्रभावीत होवू लागलो, सारासार विचारशक्तीचे पंख जवळ घेवू लागलो, तर…
‘ असगर ‘ हा शायर म्हणतो-

यहां कोताही-ए-जौके-अमल है खुद गिरफ्तारी (कोताही -ए- जौके -अमल : तीव्र इच्छा शक्तीची मर्यादा )
जहां बाजू सिमटते है, वही सय्याद होता है.
‘असगर्’ गौंडवी.

आपली इच्छा शक्ती प्रखर असायला हवी- तीच क्षीण झाली, की मग भरारीला मर्यादा येणार, मलूलपणा येणार. आणि असा रेंगाळणारा गोंधळणारा पक्षी- सय्याद तर त्याच्यासाठीच ट्पून बसलेला असतो.
… म्हणून परिस्थीतीचे,  वास्तवाचे  भान ठेवणारा तरून जातो. अशा माणसाची निर्णय शक्ती शाबूत असते. आपलं स्वत:चं भलं बुरं याची त्याला  स्पष्ट जाण असल्याने तो गोंधळून जात नाही. आणि त्याला मार्गदर्शकांच्या गर्दीशी काही घेणं-देणं नसतं. .. ना त्यांच्यामुळे त्याची उत्तेजना वाढते.

अपनी मंजील के जो खुद राहनुमा होते हैं
राह से उनको भटकते कभी देखा न सुना

आपल्या कामावर ज्याची निष्ठा आहे, तो स्वत:च स्वत:चा मार्गदर्शक असतो. तो कधीही भरकटत  नाही. त्याला तारतम्य येतं.अशा माणसाची राहनुमाई कोण करतं ? कशाच्या आधारे तो निर्णय घेत असतो ? अशा माणसाचं लक्ष परिणामाकडे असतं.त्याला परिणाम लक्षात येतात,आणि तो सावध होतो-

भली राहनुमाई है, भली नाखुदाईयां है
वही रुख करार पाया, जो बता दिया हवा ने
( -‘ हफिज ‘ मेरठी )

Read Full Post »

खामोश न था दिल भी, ख्वाबिदा न थे हम भी ( ख्वाबिदा : झोपलेला )
तनहा तो नही गुजरा, तनहाई का आलम .. .
– ‘ शमीम ‘ क्ररहानी.

‘लम्हे’ या टिपणावर विद्याने प्रतिक्रीया दिली, ती अशी : अबोलपणे जाणारे  क्षण रिकामेच असतात असे नाही..
बोलके क्षण आणि अबोल  क्षण याचा विचार करताना सहसा आपण ‘ब्लॅक ऍन्ड व्हाईट’ तर्‍हेने विचार करतो:  बोलके क्षण म्हणजे बडबड आणि अबोल क्षण म्हणजे कोंडून ठेवलेली बडबड ( आणखी एक उथळ कल्पना म्हणजे, बोलणारा तो सुखी; अबोल तो दु :खी ) असं काही खरंच नसतं. किंवा असं म्हणता येईल,की नेहमीच हे खरं असतं असं नाही.

कित्येकदा संध्याकाळी आपण एकटे असतो. त्यावेळी अनाहूतपणे आपल्याला एकलेपण जाणवत रहातं. या एकलेपणात कुणाबद्द्ल शिकायत नसते;ना हुरूप. एक प्रकारच्या निवांतपणाची पोकळी मनात तयार झालेली असते. आपण बाहेर पहात नसतो, बोलत नसतो,शांत असतो. अन्  मनातल्या त्या निवांत पोकळीत डोकावून पाहिलं तर तिथेही काहीच तर नसतं की. सगळेच क्षण जणू विरघळून गेलेले असतात. नितळ पाण्यासारखं मन-त्यावर ना लाटा ना हेलकावे…
या शांतपणाचा आपल्याला क्षणभर आचंबा वाटतो. मनात कुणीच नाही. कुठं गेले ते सारे… आणि आपण एकले आहोत का उदास आहोत… नाही,नाही;छे! उदासी नाहीच ही. खुशी- खुशीही नाही . गोड पदार्थ बाजूला सारावा, तशी ती खुशी आपोआपच बाजूला झालेली असते. पण हे रिकामपण नसतं.
मग हे काय असतं… काय आहे हे. रिकामं मन .ना आनंद ना विषाद ना तक्रार.. काहीच तर नाही. एक प्रकारची ‘चुपसी ‘ आहे ही. अशावेळेस आपलं मन आपल्याला काही तरी सांगू पहात असतं. फुलावर बसलेल्या फुलपाखराने संवाद साधावा तसं ते मन आपल्याशी सांगत-बोलत असतं.

वो दासतां,जो हमने कही  भी हमने लिखी
आज वो खुदसे सुनी है ..नही, उदास नही..

नाही, ही उदासी नसते. गप्प बसणं म्हणजे रुसून बसणं असं जे आपल्याला सहसा वाटत असतं,ती ही स्थिती नसते . ही वेगळीच- अनुभवावी अशी मन:स्थिती असते.
अशा या मन:स्थितीची हकीकत गायक-संगीतकार हेमंत कुमार यांनी मोठ्या( नाही, विशेषणसुध्दा लागू होणार नाही, एवढी निर्वीकार अवस्था असते ही ) स्वत:ला सांगितली आहे.गीतकार आहेत गुलजार; आणि सिनेमाचं नावसुध्दा या मन:स्थितीशी जुळणारं,असं.. सन्नाटा.

Read Full Post »

लम्हे…

..काही शब्द कधी अवचितपणे मनात रेंगळतात. त्यांना जवळ घ्यावं वाटतं. गोंजारावं वाटतं. लम्हा ( लमहे ) हा असाच शब्द. लिहिल्यानुसार त्याचा उच्चार करायच्या ऎवजी लमहा ( लमहे ) असं म्हटलं,की मोठं अल्हाददायक वाटतं.

..हे लमहे ,हे क्षण ..माणसाच्या इतके जवळ असतात- इतके जवळ की दिसू नये. सगळ्या कृती, सगळं वागणं-बोलणं क्षणांतच होत असतं.. बोलताना, बोलण्याच्या भरात क्षणांतच काही अद्वातद्वा बोलून जातं. मग त्याचा पश्चात्ताप होत रहातो. बरं, बोलणं हा काही ‘ स्क्रिन ‘ वरचा, ‘ सेव्ह ‘ न केलेला मजकूर नसतो;  कि बुवा घ्या ‘ कर्सर ‘ तिकडे, चुकीच्या शब्दाला  ‘ बॅकस्पेस ‘ नं ढकला, किंवा ‘डिलिट’ करा,असं. बोलून गेलेल्या शब्दांबद्द्लचा ‘ कर्सर ‘ आपल्या मनात नंतर ( अन् निरंतर ! ) स्थिरच होवून बसलेला असतो. तो डिलीट होत नाही ..वा दुरुस्त होत नाही. मनाच्या स्क्रिनवर मग चुटपुटीच्या भावना पसरून जातात. बोलून गेलेले क्षण – झोंबत रहातात. आपल्याला आणि ऎकणार्‍याला. हे सगळं का होतं- बोलताना आपण विचार करीत नाहीत या मुळं. माणसाचं मन ( बुध्दी ) एवढी कार्यक्षम असते, ती त्याच्या जन्मापासून सतत कार्यरत असते- अपवाद फक्त माणूस बोलत असतो, त्या वेळेचा; असं एक मजेदार कोटेशन आहे. फार वर्षांपूर्वी , अशाच पश्चात्तापदग्ध अवस्थेत, चुटपुटीच्या मन:स्थितीत मी डायरीत एक प्रश्न विचारला होता स्वत:ला –
.. त्याचं काय झालं- तू ठरविलं होतंस ना, बोलताना-बोलण्यापूर्वी क्षणभर थांबायचं,त्याचं ?

.. या प्रश्नाला अद्याप मला ना उत्तर सापडलं, ना ठरविल्यानुसार  कार्यवाही होते आहे. परिणामाची जाणिव न ठेवता, बोलून टाकायची  ती सवय ..

.. पण तशी,ती आठवण मनात ठेवून बसलं,की वेगळीच समस्या उभी रहाते पहा- गप्पपणाच घेरून रहातो. अडथळाच होवून बसतो. बोलणं पुढं ढ्कलल्या जात नाही. काल्पनिक विचार-समस्या-परिणाम या मध्ये घुटमळून गेलं, की वाचा थांबते. दातखिळ बसते. ही दातखिळ – अहंकाराची, अहंपणाची,अपमानीत मनाची.

.. पण आपण गप्प बसल्याने समस्या थोड्याच सुटतात ? लोकं पुढे निघून गेलेले असतात,आपल्या गप्पपणाचा भलताच अर्थ बाळगून. सगळं जग पुढे निघून गेलेलं असतं अन् आपण बसलेलो असतो आपला मुखदुर्बळपणा गोंजारीत. एका शायरने क्षणा क्षणाचा हिशोब मांडताना, त्यातलं व्यस्त प्रमाण कसं मांडलं आहे पहा-
चले तो फासला तय हो न पाया लमहोंका
रुके तो पांवोसे आगे निकल गयी सदियां
..आपण चालतो, तेव्हा आपणच चालत असतो, अशा वेडगळ समजूतीत आपण असतो. खरं म्हणजे, आपल्याला याचं भान नसतं,की –
इक पल के रुकने से  दूर हो गई मंजिले
सिर्फ हम नही चलते,रासते भी चलते हैं

..म्हणजे जगण्याची ही ‘ ट्रेड मेल ‘ टेस्ट ज्याला जमते-सावरते, तो भानावर असतो.तो बदलाच्या संपर्कात असतो. माणसाने थांबू नये, आणि त्याच्या साठी कुणी थांबणार नाही.

.. बरं थांबू नये-ठीक आहे. चालू या. मग चालताना हे क्षणा-क्षणातलं अंतर एवढं दूरचं होवून बसतं, की मग पायाला मणामणाचं ओझं बांधल्यासारखं होवून जातं. विशेषत: नाते संबंधात,मैत्री संबंधात संवादाचे असे अडथळे येवून बसतात,की उच्चार थांबून जातात. मग थांबलेल्या उच्चारांचे प्रतिध्वनी उलटे उमटत जातात. मनात काळोख दाटत जातो.साचत जातो.एकमेकांबद्द्लचे राग-गैरसमज-उश्रमा हे सगळं सगळं भोवत रहातं. का ? तर बोलणं रुकल्यामुळे. ( आणि आजकाल मोबाईलमुळे संवादाला – संपर्काला एवढं जुजबी स्वरूप आलं आहे, की संवादाचं मोल खलास झालं आहे. ) आपण थांबून जातो अन् दुरावा दुप्पट वेगाने वाढत जातो.हे जे लम्हे आहेत, त्यातलं अंतर बोलण्यानेच मापायचं एवढंच नाही, चालण्यानेही-शारिरीक हालचाल,गती- याच्यानेही मापायचं असतं. जवळीक ही अशी शरीर मनाने क्षणाक्षणाला साधायची असते. वडिलधारं माणूस, जवळचा मित्र, बायको असं कुणी ; त्याने नुसतं पाठीवरून हात फिरवावा.. केवढी जवळीक वाटते… जवळीकतेचे ते क्षण..

…छे बुवा ! हे क्षणांच्या हिशोबात गुंतलं,की चिल्लर पैशांचा-नाण्यांचा गोंधळ व्हावा तसं होवून तर बसतं अन् शिवाय दिवसाचा हिशोब करता येतो,सांगता येतो. पण हे क्षण – केव्हा सरून जातात,वाळूच्या कणांसारखे निसटून जातात  पहा की-

बेच डाले है दिन के लम्हे
रात थोडी बहूत हमारी है
.

खरंच, दिवसभर बोलण्याच्या नादात, घुम्मेपणाच्या नादात आपण भरकटलेले असतो किंवा ठार होवून बसलेले असतो . हेवेदावे, मतभेद,व्यवहार,
लाभ-हानी,मान-अपमान यांना आपण आपले दिवसभरातले क्षण विकून टाकलेले असतात -विकून टाकलेले. हां, रात्र मात्र थोडी बहूत आपली असते. ही थोडी बहूत म्हणजे काय- झोपण्यापूर्वी, पंख जवळ घेताना, आपण आपल्या पाशी आलेले असतो. .. झोपेच्या त्या गूढ डोहात उरण्यापूर्वीचे ते क्षण . ती वेळ. त्या क्षणांत आपण ‘ जागे ‘ राहून पाहिलं,तर आपण आपल्याला दिसू- स्वच्छ.जसे आहोत तसे. अरे,अरे,पण पाय निसटतात,अन् पाहता पाहता आपण गाढ होवून जातो की. म्हणून तर मीना कुमारी म्हणते –

कई लम्हे
बरसात की सी बुंदे है
ना-काबिले-गिरफ्त
सीने पर आ के लगते है
और हाथ बढा, की इससे पहले-
फिसल कर टूट जाते है
!

Read Full Post »

उर्दू शायरीमघ्ये, प्रेम झाल्यापेक्षा,  प्रेम न झालेलं अधिक चांगलं असतं; अर्थात आपल्यासाठी.  शायरीतला प्रेमी आपलं अर्धं अघिक आयुष्य तिची वाट पहाण्यात किंवा ती भेटून गेली,  तर त्या आठवणी काढून पुन्हा तिची वाट पहाण्यात घालवतो. तिनं होकार दिला, लग्न झालं बुवा त्यांचं ( किंवा चांगला एन्ड करायचा झाला, तर नाही झालं ),  असं कधी झालंच नाही. तिची वाट पहाण्यात, शमा आणि शराब यात त्यांचे हजारो रुपये खर्च झाले असतील !( तुम्ही म्हणाल शायर लोकांकडे एवढे पैसे आले कुठून ? तर तसं नाही म्हणायचं मला- हजारों शायर लोकांचे मिनिमम तेवढेच हिशोबात घेतले तर ? ) असो.

महत्त्वाचं  म्हणजे, रात्रं दिवस तिचा विचार करीत , तिची वाट पहात रहाणारा हा शायर एका विचीत्र मानसिकतेचा बळी होवून जातो- साईड इफेक्टच म्हणा ना  ! सतत वाट पहाण्याने अन सतत विचार केल्याने त्याच्यातली कृतीशिलताच खलास होवून जाते ; आणि मग जेव्हा ती प्रत्यक्ष भेटते,  तेव्हा त्याला
काही सुचतच नाही की !

तूम मुखातीब भी हो, और करीब भी
तुमको देखूं, की तुमसे बात करूं..            (‘फिराक’ गोरखपुरी)

आणि खरंच आहे की-  जिच्या दर्शनासाठी ( दीदार ) एवढे दिवस वाट पाहिली ( एवढे दिवस –  चेहरा विसरून जायची वेळ आली, भलतीच आवडून जाईल की काय असं वाटायची वेळ आली. कारण मनातल्या मनात चेहर्‍याची उजळणी करून करून मनाची पाटी पांढरट होवून गेलेली ! ) , तिचं दिसणं एवढं मोलाचं झालेलं होतं, की ती दिसली – भेटायला आली, की डोळ्यावर विश्वासच बसत नाही. गडबड होवून जाते. मनाचं वारू बावरून जातं. तिला  पहात राहावं वाटत असतं आणि काय काय बोलू, काय नको हे अजिबात सुचत नाही. भेटीचा पहिला बहर सरला, तरी तो असर उतरलेला नसतो. तिला पहात बसावंही वाटतं,
आणि महत्वाचं म्हणजे, इतके दिवस मनात  साठवून ठेवलेला, घोळून घोळून तोंडाला पाणी सुटलेला तो मुद्दा- माझं तुझ्यावर प्रेम आहे हा – सांगायचाही असतो. … पण पहात बसणं सोपं हो ! त्याला काय लागतं नजर लावून रहायचं , तिचं लक्ष गेलं तर, रागात वाटली तर नजर वळवायची; शिवाय पहाणं म्हणजे काय डोळ्याला डोळे लावून पहाणं असं थोडंच असतं ! बाक़ी शरीर नसतं का !बोलणं मात्र मोठं अवघड !  तर मुख्य मुद्दा काही सांगितल्या जात नाही.  उलट –

लब पे आया न हर्फ-ए-मुद्दआ लेकिन,
इधर उधर से सुनाए हजार अफसाने

बरोबरच आहे. उजळणी करून करून आत्मविश्वास खलास झाला असतो . शिवाय प्रेमाचा इजहार तिच्या माघारी करण्याएवढी सोपी गोष्ट नसते. तिच्या समोर मात्र हिंमत होत नसते. महत्त्वाची  भिती अशी, की ती जर ‘नाही’  म्हणाली तर – आली का मग आफत ! शिवाय-  शिवाय संकोच, भय, धडधड या बाबी एवढ्या कार्यरत झालेल्या असतात, की त्यामुळे मुख्य मुद्दा रहातो बाजूला अन इकड्चं- तिकडचंच  सांगितल्या जातं, बोलल्या जातं. अप्रस्तूत असं ते वागणं बोलणं असतं.  अन मग ती निघून  गेली, की पुन्हा चुटपुट वाटत राहाते.. ( पुन्हा जाग्रणं ! )

एका शायरची प्रेयसी उत्सूक होती. तीने विचारलंही होतं त्याला ..’ कुछ कहना चाहते है क्या आप ? ‘ पण हा मुखदूर्बळ !  तो म्हणून गेला-
अब आ गए है आप, तो आता नही है याद
वर्ना हमें कुछ आप से.. कहना जरूर था

आता बोला !

‘ अकबर ‘ इलाहाबादी हा एक मजेदार शायर होता. उत्तम व्यंग रचना कशी असावी , ते या शायर कडून शिकावं. एरवी शायर- कवी लोक एवढे संवेदनाक्षम (हायली इनफ्लेमेबल  ! ) असतात, की ते विनोदामुळे- थट्टेमुळे चक्क दुखावले जात असतात. असो. तर या अकबर इलाहाबादीने एका शे’र मध्ये हकिकत सांगीतली आहे, एका शैखची- धर्मगुरूची. आता धर्मगुरू झाला,  तरी माणूसच आहे ना तो. अन त्यातही  तो तरूण ; मग त्याला प्रेम करायला काय हरकत आहे ? तर त्याचं प्रेम बसलं एका तरुणीवर. तिनं त्याला भेटायलाही बोलावलं आहे, एवढी प्रगती झाली त्यांच्या प्रेम संबंधात. आता भेटीत बोलणं, गप्पा-गोष्टी, थट्टा-मस्करी पाहिजे ना- महत्त्वाचं म्हणजे, रोमांचीत करणार्‍या त्या गप्पा हव्यात. आता हा तरूण  पडला धर्मगुरू; धर्म – प्रवचन, पाप-पुण्याशी संबंधीत.  त्याचा तोच व्यासंग, तीच आवड.  मग तेच त्याच्या बोलण्यात येणार; नाही का ?  ज्याची जी आवड तीच त्याची भाषा . तर परिणाम काय झाला त्या भेटीचा पहा-

निकाला शैख को उसने ये कहकर
ये बेवकूफ है, मरने का जिकर करता है
.

आणि तिचंही कुठं चुकलं सांगा ना, माणसाला जन्म आहे तसाच मृत्यूही आहे, त्याने पुण्य कर्म करावं,पापं करू नयेत हे सगळं सगळं अगदी खरं आहे, हे मान्य; पण हे सगळं सांगायची ही वेळ आहे का,  ही जागा आहे का, आं ! सांगा की…प्रेमाच्या वेळी, प्रेयसीच्या सानिध्यात… एकांतात..मुका आठवावा की मृत्यू ?

Read Full Post »

हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर याचे हे एक शब्दरहीत व्यंगचित्र. साध्या रेषांनी काढलेल्या या साध्या सुध्या चित्रात आपण पहातो, पहिली दुसरीतलं एक पोरगं न सुटणारं एक गणित घेवून आलेलं आहे, त्याच्या बाबांकडे.एक गुणिले एक बरोबर किती ?  गणित अतिशय साधं आहे, पोराला सुटत नाही, हे ठीक; पण त्याचे बाबा.. त्यांनाही ते गणित सुटत नाही. पहा बाबांच्या कपाळावरच्या आठ्यां,दातात पेंसील धरलेली..  हे पाहून आपल्याला गंमत वाटते. मग तपशीलाने पहात जावं तस तसं हसू येतं, कारण त्याचे बाबा पहा- भरपूर दाढी वाढलेले, त्यांच्या आजूबाजूला ती पुस्तकं,ती उपकरणं- नक्कीच हा  मोठा संशोधक – अभ्यासक आहे, हे दिसतंच. पण त्याला ही हे साधं गणित सुटत नाही ? आणि पहाता पहाता आपण त्या चित्रात गुंतून जातो. बाबांना एवढं गणित येत नाही असं कसं होईल ? आणि मग आपल्याला चित्रातलं गांभीर्य लक्षात येतं. उत्तम व्यंगचित्र तेच, जे हसवितं आणि मग गुंतवून टाकतं.

मुळात बाबांना प्रश्न पडला आहे ( म्हणजे असावा ) तो असा , की मुळात एक म्हणजे काय ? एक गुणिले एक म्हणजे काय ? अन त्याचं उत्तर एकच का यावं,  आं ! पोराला त्याचं काही घेणं-देणं नाही, त्याला फक्त एक गुणिले एक चं उत्तर हवयं. तो खोळंबला आहे आणि त्याचे बाबाही खोळंबले आहेत. आता सही उत्तर देणारा-मार्गदर्शक त्यांनी कुठून आणावा ?पोराला गणीताचं उत्तर हवंय.. बाबांना गणिताचा अर्थ हवा आहे..
डॉ.इक्बाल हा शायरसुध्दा असाच गोंधळून गेला होता. दिवस आणि रात्र ; याचा गुणाकार करीत जाणारं आपलं हे आयुष्य. .. याला खरंच काही अर्थ असतो का..? अर्थ आहे का.. दररोजचे व्यवहार ,जेवणखाण अन् निद्रा; एवढाच विचार केला तर सगळंच क्षुल्लक वाटतं. अन् यातील प्रत्येक बाबीचा विचार करीत गेलं, तर जीवनाचा लांब पल्ला घ्यानात येतो. .. आणि आयुष्य गूढ होवून बसतं. त्याचा अर्थ- त्याचं प्रयोजन.. छे ! काहीच खबर लागत नाही. जीवनाचं हे कोडं सोडविता सोडविता इक्बालसुध्दा संभ्रमात पडले,परेशान झाले आणि मोठ्या अगतीकतेने स्वत:शीच पडलेला  हा प्रश्न  त्यांनी शे’र मध्ये मांडला :

खुलता नही है मिरी ( मेरे ) सफर-ए-जिंदगी का राज
लावूं कहां से बंदा-ए-साहिब-ए-नजर को मैं..
( बंदा-ए-साहिब-ए-नजर : दृष्टी असलेला ,पारखी , सक्षम असा माणूस – बंदा ! )

… माणूस लहान असो का मोठा, मूल असो का वृध्द.. प्रत्येकाला असा बंदा-ए-साहिब-ए- नजर भेटायला पाहिजे बुवा !

Read Full Post »

दु:खाचे पदर…

किशोरकुमारच्या,  ‘दूर गगन की छांव में ‘ मधल्या त्या गाण्याच्या निमित्ताने ‘ मिली ‘ मधल्या गाण्याची आठवण मी दिली, आणि त्या अनुषंगाने मित्रांनी त्या गाण्याची हकिकत सांगितली :बडी सुनी सुनी है जिंदगी ये जिंदगी….मै खुद से हूं यहां अजनबी.. ‘ मिली ‘ मधलं हे गाणं. हा एका अर्थाने, एस. डी.बर्मन यांचा शेवट्चा चित्रपट. एस.डी.यांचं हे शेवटचं  गाणं .( गीतकार : योगेश )  गाणं तयार होतं. एस.डी. दवाखाण्यात दाखल झालेले होते. असं म्हणतात, की किशोर कुमारने त्यांना दवाखान्यात जावून हे गाणं एकविलं आणि त्याला तिथे रडू आवरलं नाही…
एस.डी.गेल्यानंतर तर किशोर कुमार तीन दिवस गप्प होता. बोललाच नाही.

..आज एस.डींची आठवण येते आहे,किशोर कुमारची आठवण येते आहे .. यांचं हे गाणं ऎकताना,सुनं सुनं वाटत रहातं, द:खाची तीव्रता एवढी वाढत जाते, की स्वत:च,  स्वत:शी पारखे होत जातो.. अजनबीपण सतावीत रहातं. कालच्या गाण्यातलं दु:ख हे सकाळ न होणार्‍या रात्रीचं तर या गाण्यातलं दु :ख अधीक दीर्घ.. अधीक गडद..

[http://www.youtube.com/watch?v=oGXn2idrkL0]

Read Full Post »

‘ दूर गगान की छांव में  ‘ अशा छानशा नावाच्या त्या कृष्ण धवल, गाजावाजा न झालेल्या चित्रपटात किशोर कुमारचं एक गाणं आहे ( गीतकार : शैलेंद्र ) –

जिन रातोंकी भोर नही है
आज ऐसी ही रात आयी
बोझ में गम के डूब गया दिल
सागर की है गहराई…

नेहमी हलक्या फुलक्या गमतीदार आवाजात रमलेला किशोर कुमार या गाण्यात कमालीचा बदलून गेलेला आहे. हार्मोनियम किंवा तशा प्रकृतीचं वाद्य असावं ते, त्या वाद्याच्या सुरावटीने जणू काळोख पडायला सुरूवात होते. (‘ दिल एक मंदिर ‘ मध्ये, ‘ याद ना जाए बिते दिनों की..’या गाण्याची सुरूवात अशाच वाद्याने झाली आहे. ) कमालीचं दु:ख , कमालीची निराशा जेव्हा माणसाला घेरते, तेव्हा तो स्वत:शीच गुरफटून बसतो. रडत नाही – कारण रडणं, आवेग याच्याही खोल खोल तो जात रहातो.. तिथे फक्त अंध:कार असतो, कसलीही हालचाल नसते. अशावेळेस जाणवत रहाते,दु:खाची तीव्रता- तीव्रतर अवस्था. निराशेचे खोल खोल गर्तेत घेवून जाणारे विचार…

राह किसी की हुवी न रोशन
जलना मेरा बेकार गया
लूट गयी तकदीर मुझे मैं
जीत की बाजी हार गया

दु:खाच्या जाणिवेने आलेली ती हतबल अवस्था, विमनस्क अशी स्थिती अन् तो आवाज, ते गाणं मनात घर करीत रहातं.. भक्कम लाकडात एखादा कीडा घूसून आत आत कोरत जावा,घुसत रहावा, तशी ती दु:खाची जाणिव…पुढे बर्‍याच वर्षांनी किशोर कुमार अशा दु :खाच्या डोहात उतरला होता-‘मिली’मध्ये : बडी सूनी सूनी है,जिंदगी ये जिंदगी…

… रात्री साडे अकराच्या सुमारास, ‘ तामिले-इर्शाद ‘ मध्ये , निवेदकाने गाण्याची माहिती दिली आणि फर्माइश सांगितली – कार्यक्रमाच्या अनेक श्रोत्यांनी या गाण्याची फर्माइश केली होती… दु:खाची जणू मागणी केली होती.( तामिले-इर्शाद : हुकुमाची अंमल बजावणी  – फर्माइश सादर करणे )

– आणि गाण्यापूर्वी आपल्या तेवढ्याच गडद अशा आवाजात एक शे’र ऎकवून मला त्या निवेदकाने त्या डोहात अलगद सोडले होते-

न जाने कौन सा गम दिल में ले के डूबा है
वर्ना डूबने वाला  उभर गया होता…

( हा माणूस कोणतं  दु :ख बाळगून बुडालेला आहे, कोण जाणे… नाहीतर बुडणारं माणूस कधी ना कधी वर येतच असतं.. )

Read Full Post »

मनाची समृध्दी.

जुजबी इच्छा, जुजबी स्वप्न, जुजबी प्रयत्न याचं  फलीत मग जुजबी सुख , जुजबी आनंदात होतं आणि असा माणूस मग फारच किरकोळ होवून बसतो. त्याच्यात कसलीच धडाडी रहात नाही ना हिंम्मत. दु:खाची गोष्ट अशी, की माणसाला तसल्याच जुजबीपणात सुरक्षीत वाटत रहातं.  असला माणूस मोठी भरारी कशी घेवू शकणार ? अशा जुजाबीपणाचा अंमल चढायच्या पूर्वीच माणसानं सावध होवून ते सगळं झटकून द्यायला पाहिजे. प्रकृतीत तीक्ष्णपणा आणून परीसराकडे, स्वत:कडे पहायला पाहिजे. कष्ट, मेहनत याचं मोल समजून घ्यायला पाहिजे.. आळस झटकून गतीशीलतेची अनुभूती घ्यायला पाहिजे-

रख बुलंद अपने इरादे, काम करता जा सदा
हाथ कब आयी गिजा,शाहीन को आसानी के साथ ( गिजा :भोजन,आहार )
शाहीन पक्षी- ससाणा. त्याची भरारी उत्तुंग असते, त्याची ताकत मोठी, त्याची नजर तीक्ष्ण असते.. आणि तरीही शिकारीसाठी, अन्नासाठी त्याला प्रचंड मेहनत करावी लागते. त्याला सहजा सहजी शिकार मिळत नाही; कारण सहजासह्जी मिळणार्‍य़ा किडे-मुंग्यावर गुजराण करणारा तो सामान्य पक्षी थोडाच आहे ?

अशा तर्‍हेने प्रचंड मेहनत करून ,मोठं स्वप्न-मोठं उद्दीष्ट ठेवून कमाविलेली जी श्रीमंती असते, कमाविलेली समृध्दी असते- त्या समृध्दीला बरकत असते. विस्तार असतो, निश्चिंती असते. असा माणूस मनाने मोठा असतो. मेहनतीने कमाविलेल्या श्रीमंतीचा माणूस उतत नाही,मातत नाही. त्याला पैशाचे मोल कळालेले असते, महत्त्वाचे म्हणजे,  माणसाचे मोल त्याला कळाले असते. असा माणूस मदत करायला सदैव तत्पर असतोच;  शिवाय घरी येणार्‍या पाहुण्याचा आदराने सत्कार, पाहुणचार करणारा असतो. घरी येणारा पाहुणा त्याला मोठं समाधान मिळवून देणारा असतो-

खुदा करे, मेरे रिज्क की बरकत न चली जाए
दो रोज से घर में कोई महेमान नही है .. ( रिज्क : अन्न,आहार,आजीविका )

घरी येणार्‍याला जेवू खावू घालून स्वत:ची तृप्ती अनुभवणारा माणूसच समृध्द असतो, श्रीमंत असतो. सार्वजनीक कामात भाग घेणारा मदत करणारा असतो. अशा माणसाला पैशाचा लोभ नसतो.मेहनती माणूस लालची कसा असणार ?  त्याला माहित असतं, प्रचंड कष्ट करून पैसा मिळवायचा असतो. विनासायास मिळणारा पैसा, सहजपणाने मिळणारं धन तितक्याच सहज पणाने निघून तर जातंच;  शिवाय अशा माणसाला जवळचं-  जिव्हाळ्याचं कुणी रहात नाही. म्हणून खरा श्रीमंत कोण ?

है हासिल-ए-आरजू का राज, तर्क-ए-आरजू
मैने दुनिया छोड दी, और मिल गयी दुनिया मुझे
( हासिले- आरजू : अभिलाषा-प्राप्ती . तर्क-ए-आरजू : अभिलाषेचा त्याग )

अविरत कष्ट करणारा माणूस- त्याचं लक्ष लाभाकडे नसतं. लाभ त्याच्या मागे मागेच येतो. आणि असा माणूस जुजबी नसतो. मोठा असतो- मोठ्या मनाचा,  मोठ्या हिमतीचा ,  मोठ्या कर्तृत्त्वाचा आणि अर्थात मोठ्या जिव्हाळ्याचा.

Read Full Post »

फ्रेंच व्यंगचित्रकार मोजर याच्या या ( शब्द रहीत ) व्यंगचित्रातला हा वॉर्ड आहे,अपघाताचा – फ्रॅक्चरच्या उपचाराचा. ही वेळ म्हणजे, तसं पाहिलं तर भयाची चिंतेची अन् वेदनेची. वेदना सरली, उपचार झाला तरी, हुंदके उरावेत तसं ते भय उरलेलं असतं.

पण या व्यंगचित्रात आपल्याला एक वेगळीच महिला दिसते आहे. रॅकवरच्या रेडिमेड प्लॅस्टर्सची ती विविधता पाहून स्त्री सुलभ तबीयतीतून तिची वृत्ती जाहीर होते; ती सांगते- हे नको, ते ! प्लास्टर्सचे ते वेगळे रंग, वेगळ्या नक्षी यात ती स्वाभाविकतेने गुंतून जाते. तिच्यासाठी ते प्लास्टर म्हणजे, जणू फुलदाणी !

स्वत: साठी केलेली ही निवड, ही सौंदर्य दृष्टी, हा उल्हास – वेदनेची खबर न ठेवणारा- हा काही सांगण्या बोलण्यासाठी नाही, केवळ मिरविण्यासाठी नाही, तो आहे केवळ तिच्या स्वत:साठी छान रहायच्या वृत्तीतून आलेला हा उत्साह. अन् तिचं ते वागणं पाहून आपल्याला क्षणात एक प्रेरणाच मिळून जाते- वेदनेचं रुपांतर- विरक्ती; नाही,अनुरक्तीत करायची प्रेरणा. व्यंगचित्र पहाताच त्यातल्या गमतीनं हसू येतं अन् त्या नंतर मनात उरून रहाते,ती त्या महिलेची प्रकृती.

नांदेडला बिड्यांच्या कामगारांत तेलंगणातल्या बर्‍याच महिला असतात. मजूरी करणार्‍या त्या महिला कामावर जाताना मी पहातो. पहातच रहातो- नेटकं,चोपून नेसलेली लुगडी,साधंच गंघ-टिकलीचं ते रूप ; पण अंबाड्यात मळलेला फुलांचा गजरा -सदैव ! आणि स्वत:त मग्न झालेली,त्यांची ती लगबग … ते पाहून कित्येकदा मला प्रेरणा मिळायची. त्यांचं ते तसं रहाणं, दाखविण्यासाठी- मिरविण्यासाठी अजिबात नसायचं . ते असायचं त्यांच्या स्वत:साठी. पण त्यांची ती स्वत: साठीची सुरेख राहणी इतरांसाठी लक्षवेधी असायची. व्यंगचित्रातल्या त्या महिलेसारखी. उर्दू श’इरा शबनम म्हणते-

जो अपने लिए हमने कहे थे ‘ शबनम ‘
चर्चा है जमाने में उन्ही शे’रों का..

अर्थात,  स्वत:च्या सौंदर्य दृष्टीत मग्न असलेली ही महिला केवळ स्वत:तच मग्न असते,असं नाही. पुरूषाला- तिचा जीवनसाथी, त्याला ती  तेवढंच महत्त्व देते. तुझ्या विना मी अपूर्ण आहे असं ती सांगते. मीना कुमारी म्हणते –

आगाज तो होता है, अंजाम नही होता
जब मेरी कहानी में, वो नाम नही होता

ती केवळ एवढंच सांगत नाही, ती त्याच्याबद्द्ल केवढ्या अभिमानाने बोलत असते-

गम नही जो लाख तूफानों से टकराना पडे
मै वो कश्ती हूं, के जिसमें कश्ती का साहिल आप है

त्याच्या साथीचं मोल ती जाणून आहे. त्याच्या सहवासातली निश्चिंती ती अनुभवत असते. ‘ सुशिला ‘ मध्ये जां निसार ‘ अख्तर ‘ यांच्या या ओळी मुबारक बेगमने अशा झोकदार तर्‍हेने गायल्या आहेत, की लक्षात येतं, अवलंबून रहाणं- मग त्याने तिच्यावर किंवा तिने त्याच्यावर, याला दुबळेपणा म्हणणं हा त्या     नाते संबंधाचा अपमान आहे. अवलंबनाची ती निश्चिंती, ते सुख..काही औरच असते.

. .. आणि अशा सौंदर्य दृष्टीच्या, संवेदनेच्या, सह-अनुकंपा देणार्‍या आपल्या स्त्रीबद्द्ल पुरूष गौरवाने सांगतो-

मुझे सहल हो गई वो मंजिले, वो हवा के रूख भी बदल गए ( सहल – सोपी )
तेरा हाथ हाथ में आ गया, के चराग राह में जल गए शायर – मजरूह

… हा केवळ गौरव नसतो, केवळ कौतूक नसतं. तो असतो जीवनाच्या खडतर ट्प्प्यांतून सहीसलामत बाहेर पडण्या करीता सदैव साथ देणार्‍या त्या स्त्रीच्या साथीचा अनुभव. त्या अनुभवाच्या निमित्ताने व्यक्त केलेली त्याची भावना.

Read Full Post »

Older Posts »