Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for फेब्रुवारी, 2010

Sachin creates history

सचिन…तुला मॅचमध्ये पहाणं हा आनंदाचा भाग. तुझं शतक पाहाणं हा तर पुत्रप्राप्तीचा आनंद. तुला मैदानात पाहणं ,तुझं वागणं बोलणं, वावरणं  पहाताना एवढा आनंद होत असतो,एवढं सुखाचं असतं ते,काय सांगावं… आमचं भाग्य आहे हे, की तुझ्या कारकिर्दीत आम्ही हयात आहोत. प्रत्येक शतकानंतर कसल्याही उत्तेजना न दाखविता तू आकाशाकडे पाहून तुझ्या तर्‍हेनं व्यक्त होतोस…

तू सामान्य खेळाडू नाहीस. क्षुल्लक हावभाव, क्षुल्लक टीका टिप्पणी, क्षुल्लक चमकदार पण बेजबाबदार खेळी ही तुझी तबीयत नाही. तू मोठा आहेस . तुझं स्थान कितीतरी उंचावरचं आहे-

नही तेरा नशेमन कैसर-ए-सुलतान की गुंबद  पर

तू शाहीन है , कर बसेरा पहाडों की चट्टानों पर

असं डॉ. इक्बाल यांनी म्ह्टलं आहे : सम्राटांच्या घुमटांवर घरटं करून रहाणार्‍या साध्या सुध्या पक्ष्यांसारखा  तू पक्षी नाहीस. तू तर आहेस घारीसारखा, ससाण्यासारखा मोठा, मोठी झेप असलेला रुबाबदार पक्षी. पर्वतांच्या शिखरांवर अशा पक्ष्यांचा  वावर असतो, निवारा असतो. तू तसा आहेस.

आज, आत्ता तुझी दोनशे धावांची ती अविस्मरणीय खेळी पाहिली आणि भरून पावलो. तुझं बोलणं,तुझं वागणं यात कमालीचा सभ्यपणा आहे. तुझ्याकडे पाहिलं, की पटून जातं-

अच्छे बुरे का मेल ही क्या

नूर जुदा,जुल्मात अलग ( नूर : तेज, प्रकाश.  जुल्मात : अंध:कार )

( शायर : मुश्ताक )

भारतीय क्रिकॆटला तू शिखरावर नेलंस. तुझ्यासारखी माणसं इतिहास घडवितात. तुझा विजय असो ! तुझा हवाला देवून आम्ही जगाला अभिमानाने सांगू-

इ न्सान नही है वो, जो हवा के साथ बद्ले

इन्सान वही है, जो हवा का रुख बदले

वा! आजचा आमचा दिवस- आमचं आयुष्य तू सार्थक केलंस.

Read Full Post »

फुलांचे अश्रू…

पूर्वी रात्री साडे दहाला ऑल इंडिया रेडिओवर गाण्यांचा कार्यक्रम असायचा. आताही असणार. ‘ त’अमील-ए-इरशाद’ असं त्या कार्यक्रमाचं नाव. या शिर्षकाचा अर्थ लागायला काही वर्षं गेली. ( त’अमील : अंमलबजावणी,कार्यवाही. इरशाद : आदेश, हुकूम ) तो कार्यक्रम, रात्रीची वेळ,गंभीर गाणी आणि त्या निवेदकाचं सांगणं हे सगळं आयुष्याचा एक हिस्सा बनून राहिलं आहे. उत्तम उर्दू भाषेत, सावकाश आणि धीरगंभीर आवाजातलं ते निवेदन असायचं. फर्माइश सांगितल्यावर गाण्याच्या मूडशी संबधीत तो काही सांगायचा. ते सांगणं एवढं परिणामकारक असायचं, की मनाची अवस्था मेणासारखी व्हायची. … अन् त्यानंतर लागणारं गाणं त्या मनावर रूतून बसायचं. अशा कितीतरी गाण्य़ांच्या मुद्रा या ‘ त’अमील-ए-इरशाद ‘ने उमटविलेल्या. त्यापैकी ही एक मुद्रा :
… सकाळी सकाळी वेलीवरच्या त्या सगळ्या फुलांवर दव साचलेलं होतं. प्रत्येक फुलाच्या प्रत्येक पाकळीवर दवाचे थेंब दाटून आलेले. अशा फुलांनी डवरलेली ती वेल कशी श्रांत-क्लांत वाटत होती…

निवेदकाने आशा भोसलेच्या गाण्याची फर्माइश सांगितली. गाणे लावण्यापूर्वी क्षणभर थांबून ( हा थांबणारा क्षणसुध्दा लक्षात आहे..)  आपल्या भारदार गंभीर आवाजात मग त्याने एक शे’र एकविला :

अश्कोंसे तर है फूल की हर एक पंखुडी
रोया है कौन थाम  के दामन बहार का

आणि मग गाणं सुरू झालं.. पथ भूला इक आया मुसाफीर / लेके मेरा मन दूर चला… बिखरे सपने, रह गई यादें /रात के पहले चांद ढला… ( दूर गगन की छांव में )
गाणं ऎकताना तो शे’र जणू डोळ्यांसमोर उभा राहिला. आजही उभा राह्तो. … वसंत आता निघून जातो आहे. त्याला थांबणं शक्य नाही. बागेत तो आला, रुळला, सगळ्यांना हसविलं-फुलविलं आणि काल… हो, कालच्या रात्रीच तो निघून गेला आहे. त्याचं जाणं अस्वस्थ करणारं होतंच; पण हे काय- सगळ्या फुलांच्या या सगळ्या पाकळ्या कशा दवाने भिजून चिंब झालेल्या.. वसंताचा हात धरून कोण बरं रडलं आहे…

आशा भोसलेच्या आवाजातलं ते दु:ख, ती वेदना आणि गाण्याच्या शेवटी तिचे ते अनावर हुंदके – काळजाला घर करून जातात…

बहार आलेल्या त्या बागेत कुणी तरी आपल्या जाण्याबद्द्लचं बोलत आहे अन् ते ऎकून लाजणार्‍या बुजणार्‍या कळ्या अस्वस्थ होत आहेत, कावर्‍या बावर्‍या होत आहेत, अशा आशयाचा एक शे’र आठवतो :
चमन में कोई बातें अपने जाने की सुनाता है
गुलों का एक रंग आता है, एक रंग जाता है

पण तो जाणारा… त्यालाही कुठं जावं वाटत असतं. त्याचंही मन रमलेलं असतं. ओढ असते, जावसं वाटत नसतं. पण निसर्ग आहे, जावं लागणार, परिस्थिती अशी येते की जाणं जरूरीचं होवून बसतं. मोठ्या उदासीने तो स्वत:ला सांगत निघतो :
अब तो वापसी का सवाल ही नही
आंसूओं की तरहा घर से निकल पडे

… हे अनाम शायर… यांना माझा सलाम.

Read Full Post »

उपासनेशिवाय…

तमाम जिंदगी गुजरी,बिना इबादत के
बगैर खुद के, किसी और को देखा ही नही
( इबादत : उपासना,आराधना )
आयुष्याच्या सरत्या काळात कधी मागचे दिवस आठ्वतात. आपण जे केलं, ते बरोबरच केलं, योग्य केलं असं जे आपल्याला नेहमीच वाटत असतं, ते वर्तमानात, आत्ताच. आपण आपल्या समर्थनातच सगळं आयुष्य घालवतो. पण जेव्हा मागच्या दिवसांचा विचार आपण करतो,तेव्हा संवेदनशील मनाला एक प्रकारचे भान येते. स्वत: ची उलटतपासणी करायची ही मन:स्थिती.. अर्थात ही वेळ सुध्दा शहाणपणाची, सावधपण आल्याची असते. भाग्याची असते. कित्येक जणांच्या आयुष्यात असा अवधी येतच नसतो- सायकलचे हॅंडल वाकडे असले, की ती तिरपीच फिरत रहावी, तसे होत असते- तो माणूस अखंड तिरपा फिरत असतो. …(अशी माणसं हातात  नेहमी आरसा घेवून वावरणारी- यात कधी आपणही असतो- कुठेही वारताना,वागताना-बोलताना त्यांचं लक्ष नेहमी आरशाकडेच-स्वत:कडेच असतं.)

म्हणजे अश्रध्द माणूस आत्मकेंद्रित असतो. इथे श्रध्दा म्हणजे केवळ इश्वरावरची श्रध्दा असं नसून प्रत्येक गोष्टीबद्द्लची जाणिव ठेवणारं मन, इतरांबद्द्ल सह-अनुकंपा ठेवणारं मन असं अभिप्रेत आहे.

हा अनाम शायर तसा नाही. स्वत: बद्दल त्याला भान आलेलं आहे. एक प्रकारच्या विषादाने तो सांगतो आहे – सगळं आयुष्य माझं उपासनेशिवाय गेलं. श्रध्देशिवाय मी घालविलं.. मग मी काय केलं आजपर्य़ंत ? स्वत: च्या बाहेर कधी पाहिलंच नाही. मी, मीच सगळा पाहिला इथे तिथे.. श्रध्देचं महत्व इथे त्याला कळून आलेलं आहे. ज्याच्या मनात श्रध्दा असते, त्याचं लक्ष स्वत: सोबतच इतरांवरसुध्दा असतं. इतरांचं मोल असा माणूस जाणून असतो.
या शायरला तशी अनुभुती झाली-  आणि त्याची  इबादत सुरू झाली…

Read Full Post »

टोकदार सहानुभुती…

काही माणसांच्या तोंडात विस्तव असतो. तोंडात विस्तव ठेवून बोलणार्‍या माणसाची- त्याची  स्व:ताची जीभ होरपळून निघतेच;शिवाय समोरच्या  माणसाच्या डोळ्यांत  धूर गोळा होतो. अशी माणसं मदत करतात,पण तीव्र शब्दांत बोलून. अर्थात सहानुभुती दाखवायची त्यांची ती पध्दत असते. मनातून ती काही तशी वाईट नसतात. एका एकाच्या तर्‍हा…

माणसाच्या जीभेवर नेहमी लोणी पाहिजे- असं लोणी म्हणजे पुढे पुढे करणं, लाडी गोडी करणं असं अजिबात नाही. तशी माणसं वेगळी.( ती कधीच ‘आपली ‘ वाटत नसतात. ) जीभेवर लोणी असलं, की त्याची भाषा मुलायम होते. जखमी माणसाला अशा माणसाचं बोलणं मलम असतं,फुंकर असते. पण काही माणसं गमतीची असतात.  त्यांची इच्छा असूनही, का कोण जाणे त्यांच्या बोलण्यात विनाकारण तीव्रता येवून जाते- केलेलं सगळं,  असा माणूस बोलून घालवून  टाकतो, असा आपला अनुभव. अशा माणसांसाठी हा शे’र –

कुछ यूं मेरे जख्म का उसने किया इलाज

मरहम भी गर लगाया, तो कांटे की नोक से

… प्रेमात पडलेल्या त्या शायरला  मेहबूबा अशी मिळाली होती, की तिच्या कडे त्याच्या विरहाचा इलाज तर होता, पण ‘ जालीम’  होता. फटकळ भाषेचा. पण प्रेम हा आजारच असा, की तो इलाजही मस्त वाटत राहतो. म्हणून तर ग़ालिबने म्हटलं आहे-

कितने शिरीन है , तेरे लब के रकीब ( शिरीन  : गोड. रकीब : शत्रू ; इथे प्रेयसीला उद्देशून )

गालियां खा के बे-मजा न हुवा

Read Full Post »

जिंदगी…

दैनंदिन जीवन व्यवहारात कधी कंटाळा येतो. एखादी अडचण असते,तसं पाहिलं तर क्षुल्लक प्रसंग असतो, पण संथ प्रवाह त्यामुळे थांबून रहावा, तसं होवून जातं. किरकोळ समस्या, तणाव कधी असे मोठे होवून उभे राहतात, की पुढचं काही सुचत नाही. प्रश्नाच्या सुतळीचा पाहता पाहता बाऊ होवून जातो, नागोबा होवून जातो. हे जसं वैयक्तीक घडामोडींच्या बाबतीत होतं, तसं राजकीय, सामाजिक मुद्दे उपस्थित झाले, वृत्तपत्रे,मिडिया च्या मार्फत आपल्यावर आदळू लागले, की आपण थबकतो. काळजी वाटत राहाते. आता कसं व्हावं बुवा.. असं वाटत राहतं. ‘अभिमान’ ‘स्वाभीमान्’, ‘बाणा ‘ , याचं खरं, का त्याचं… असे प्रश्न अंगावर धावून येत असतात – जादूगाराच्या त्या खेळातल्या सारखे- भिंतीला चिटकून आपण उभे असतो, अन तो जादूगार सपासप चाकू आपल्या रोखाने फेकत असतो.. ते चाकू कधी कानाच्या बाजूला, कधी डोक्याच्या वर, कधी हाताच्या बाजूला,पोटाच्या वर.. असे अंगावर येवून भिंतीवर रूतत जातात. मग खेळ संपतो. पाहणारे सुटकेचा नि:श्वास टाकतात, भिंतीशी उभा असलेला तो,(  त्याच्यात मीच जावून बसलेला असतो ) तो सुध्दा मोकळा होतो. दैनंदिन समस्या आपोआप विलग झालेल्या असतात- आपल्या कोणत्याही प्रयत्नांशिवाय, सहभागाशिवाय. पण तो तणाव आठ्वून जातो. मग डॉ. इक्बाल यांची आठ्वण होते- त्यांनी सांगून ठेवलेलं असतं-

तू इसे इमरोज व फर्दा से न नाप ( इमरोज- आज. फर्दा– उद्या )

जावेदां,पैहम रवां, हरदम जवां है जिंदगी ( जावेदां – स्थायी, शाश्वत. पैहम – निरंतर. रवां – प्रवाही )

( दिवस-रात्रीच्या मोजपट्टीने आयुष्याला तू मोजू नकोस. क्षुल्लक प्रसंग, तत्कालीन अडचणींच्या अनुषंगाने मोठे निष्कर्ष काढायला जावू नकोस ( कारण,) आयुष्य – जीवन हे त्याच्याही पुढे जणारं, निरंतर, प्रवाही आहे. मोठं आहे.)

प्रसंग ओसरून गेल्यावर हे आठवतं , लक्षात येतं, पटतं; ते प्रसंग ओसरल्यावर, आधी नाही.मुळीच नाही.  कारण ? आपण साधी माणसं.ना राजकारणी, ना मुत्सद्दी; ना साधू ना संत. पण काळजी ओसरल्यावर असा एखादा शे’र किती धीर देवून जातो… एका  अनामिक शायरने असाच आपल्या शे’र मधून आपल्याला धीर दिला आहे-

काम रुकने का नही, अए दिले-नाही कोई ( दिले-नाही : अडविणारं, रूकून बसणारं मन. )

खुद ब् खुद गैब से हो जाएगा सामां कोई ( गैब : अप्रत्यक्ष, अपरोक्ष . सामां  : उपाय )

( सतत कां कूं करत रहाणार्‍या, अडचणींचा बाऊ करीत राहणार्‍या आपल्या मनाला शायर समजावितो आहे- अरे ! कसलंच संकट थांबून राहात नसतं. कोणतंही काम खोळंबून असं राहात नसतं. तुझ्या माहितीबाहेर, तुझ्या कक्षेबाहेर असं काही परस्पर चालंत असतं आणि समस्या परस्पर

सुटूनही जात असते… चिंता का करतोस… )

Read Full Post »

आसाम पूर परिस्थितीची छायाचित्रं वर्तमान पत्रात अनेकदा येतात, त्यापैकी हे एक. या चित्राकडे पाहातच बसलो. सर्वत्र पसरलेल्या अफाट पाण्याकडे हतबल होवून पाहात रहाणारी ती अगतीक महिला… आणि हातात भली मोठी काठी घेवून मोठ्या आवेशाने आपली ‘ नाव ‘ ढकलणारा,

तो नागवा बाळकृष्ण.. या चित्राचे कात्रण काढून, त्याचं लॅमिनेशन करून जपून ठेवलं होतं. पुढे दिवाळीच्या शुभेच्छा पाठविण्यासाठी हे छायाचित्र घेतलं आणि डॉ. इक्बाल यांचा अनुरूप शे’र घेवून शुभेच्छा तयार केली :

कांपता है दिल तेरा, अंदेशा-ए-तूफां से क्या
नाखुदा तू, बहर तू, कश्ती भी तू, साहिल भी तू..

वादळाच्या भयाने तुझं मन का बरं कापत आहे.. अरे, तूच नाविक आहेस, तुझ्यातच प्रवाह आहे-लाटा आहेत, तूच नाव आहेस आणि किनारासुध्दा

तुझ्यातच आहे. हा शे’र आणि त्या पोराचा आवेश.. कितीतरी वेळा मनाला उभारी दिली आहे या चित्राने, या शे’रने..

Read Full Post »

जमा…खर्च…

जमा करती है मुझे रात बडी मुश्किलसे

सुबह को उठता हूं बिखरने के लिए....

दिवसभर विविध व्याप-तापात मी गुंतून असतो.विस्कळीत झालेला असतो.सकाळी घराबाहेर पडलेला मी,रात्रीच घरी येतो ते विश्रांतीसाठी.झोपेच्या आधीन होण्यासाठी…माझी रात्र मोठ्या कष्टाने मला जवळ घेते.भरकटलेल्या माझ्या स्थितीला एकत्र करते.पुन्हा मी साकाळी उठतो,ते बिखरण्यासाठी..दिवसभर मी एवढा व्यस्त असतो,की माझं मलाच समजत नाही, मी कुठे आहे-कसा आहे..माझे विचार, भावना, चित्तवृत्ती सगळं विखुरलेल्या स्थितीत असतं. माझ्याजवळ मी नसतो. थकतो भागतो, रात्री मग बिछान्यावर अंग टाकून देतो. मग आईने जवळ घ्यावं तसं माझी रात्र, माझी झोप मला जवळ घेते. गोंजारते… मी तिच्या आधीन होतो..

सकाळी पुन्हा खेळायला जावं तसं विखरून जाण्यासाठी.

Read Full Post »

गुमगश्तगी…

गुमगश्तगी में मंजिले-मख्सूद मिल गयी / अच्छा हुवा,के छूट गए कारवां से हम

गुमगश्तगी… भरकटणे.. उद्दीष्ट सोडून उद्देश सोडून भरकटणे..मध्यमवर्गिय मानसिकतेतून पाहिलं, तर असं वागणं मूर्खपणाचं.. आपलं प्रत्येक काम, प्रत्येक कृती ही उद्देश घेवून आलेली असते. नियोजनानुसार चालणे हेच आपले काम. जो नियोजनानुसार चालत नाही , तो आपल्या नजरेतून वेडा…

या श’रमध्ये मात्र त्या अनामिक शायरला त्याच्या वेडेपणातूनच त्याचे घ्येय गवसले आहे. सगळ्यांनी ठरवून दिलेल्या मार्गाला झुगारून तो निघाला होता..आपल्याच मस्तीत जावू लागला होता… आपल्या या प्रवासात तो भरकटलासुध्दा… पण गडबडला नाही, गोंधळला तर अजिबात नाही. आणि या भरकटण्यातून त्याला त्याचं ध्येय गवसलं की ! मंजिले-मख्सूद… ( हा शब्द आपल्याला यापूर्वी भेटलेला आहे – ‘ संगम ‘ मध्ये मुकेश म्हणतो- तेरे दिल के पास ही है मेरी मंजिले-मख्सूद… ) प्रत्येक गोष्टीत फायदा ‘ हुंगणारा’ माणूस, त्याला यश मिळेल, पण आनंद मिळेलच असं नाही. म्हणूनच आणखी एका माहित नसलेल्या शायरने ( पण बहूतेक हा शायर ‘ फिराक गोरखपुरी’ असावा.)म्हटलेलं आहे-

पूछते हैं फायदा क्या इश्क से

पूछिए , क्या फायदे से फायदा !

Read Full Post »